Translate

Thursday, May 14, 2015

सृष्टीसमष्टी


चराचर म्हणजे काय याचा अनुभव अरण्यातच येतो. आपण एखाद्या दरीच्या कडयापाशी उभे राहतो आणि तिथून पुढे सारं काही अथांग घनदाट हिरवंगार असतं किंवा एखाद्या तलावापाशी जातो आणि त्या पाण्यात दिसणारं झाडांचं कमालीचं स्थिर प्रतिबिंब आपली दृष्टी बांधून घेतं. अरण्यात गेल्यावर सृष्टी समग्र रूपांनी अशी आपल्या समोर ठाकते. तिचं हे रूप नजरेत किती साठवावं, किती ते श्वासात खोल भरून घ्यावं, किती तिच्या अंगाखांद्यावर बागडावं-लोळावं याचं भान राहत नाही. हे अमृत पिण्यासाठी मग अधिकाधिक अपुरेच वाटू लागते. जंगलातले दिवस-रात्र कसे जातात याची ही एक झलक. अरण्यात घालवलेला प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असतो. मग तिथे एक तास घालवा नाहीतर दोन-तीन दिवस फक्त. जंगलातल्या एका दिवसाच्या एकेका प्रहरात कायकाय दडलंय हे सांगणा-्या अष्टौप्रहरांमधल्या कथा.

प्रहर १
आज साडेपाच वाजताच ड्रायव्हरने आम्हाला खोलीवरून पिकअप केलं आणि हत्तींच्या गोठयापाशी आणून सोडलं. हत्ती बिचारे आमची जणू वाटच पाहत होते. नव्या दिवसाचा तो कोरा करकरीत गंध किती छान वाटत होता. त्यात हत्तींच्या शेणाचा उग्र वासही मिसळला होता. आकाशात अनोखं चित्र हळूहळू साकारत होतं. त्याआधी एक अप्रतिम निळसर प्रकाश क्षितिजावर रेंगाळल्यासारखा वाटत होता. मग त्यात हलके हलके पिवळे सोनेरी रंग मिसळू लागले. मग ते गडद होत शेंदरी झाले आणि म्हणता म्हणता त्या शेंदरी रंगाचा चक्क एक गोलच झटकन क्षितिजावर आला.
काही क्षणार्धातच हा एवढा मोठा गोळा कसा काय तयार झाला याचं आश्चर्य वाटलं. त्या विस्तीर्ण दाट हिरव्या गवताळ कुरणावर देखील त्या शेंदरी गोळ्याने त्याच्यातला सोनेरी रंग शिंपडला आणि तमाम पक्ष्यांना आवाज फुटला. वेषांतरासाठी घातलेला पोशाख बदलून एखाद्याने समोर यावं तसं त्या गवतात लपलेल्या आकारांना पाय फुटले आणि हरणं, गेंडे, हत्ती, पक्षी असं सर्व काही अचानक समोर येऊ लागले. वाटलं, किती महागडा दुर्लभ असावा हा या क्षणाचा श्वास.
इथे येण्यासाठी मोजलेल्या पैशांपेक्षाही कितीतरी पटीने महागडा. कशात तरी साठवून घरी घेऊन जाता आली असती ही हवा तर त्यापरते सुख नाही. इतक्यात मागून कुणीतरी हाक मारली. तीही मराठीत. बाजूच्या हत्तीवरल्या लोकांना त्यांचा फोटो काढून पाहिजे होता. मला मराठीत फोनवर बोलताना पाहिलं होतं बहुतेक त्यांनी. त्यामुळे विश्वासाने त्यांनी कॅमेरा माझ्या हाती दिला. तुम्ही जंगलात गेल्यावर काय पाहता हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. असो.
प्रहर २
सकाळच्या फेरीतला शेवटचा टप्पा. उनं वर यायला लागलीत. भयानक उष्मा. सर्वत्र कोरडं आणि सावलीला पान देखील नाही. जिथे नजर जावी तिथं काटेसावरच फक्त. सारा लँडस्केपच या काटेसावरीने आणि निळ्याभोर आकाशाने व्यापून टाकलेला. या राखाडी निळ्या रंगांमध्ये अगदी क्वचितच कुठेतरी हिरव्या रंगाला जागा मिळालेली. त्याच रणरणत्या रणात गाडी चालतेय. एवढया सर्व आसमंतात पक्षीदेखील नाहीत. नाही म्हणायला रुफस ट्री पायने सोबत सोडलेली नाही. थव्याने त्यांच्या कर्कश्य आवाजासकट गाडीबरोबर उडतायत. त्यांना गाडीतले प्रवासी खायला देतात हे माहीत झालंय. पण बाकी पक्षी-प्राणी कुठेतरी गडप झालेत.
अभयारण्य असूनही अरण्याचा मागमूस नाही. पण इथल्या प्राण्यांसाठी हाच निवारा आहे, हा उघडावाघडा आसरादेखील ते मोठया कसबाने वापरत असणार. आपल्याला त्यातलं फार कमी कळतं. तहान लागतेय सारखी. आणि अचानक गाडी चालता चालता ठप्प! सर्वाना परत खोलीवर जाण्याचे वेध लागलेत. सकाळचा नाश्तादेखील केलेला नाही. आता या वाळवंटी अरण्यात किती वेळ काढावा लागणार याची काहीच कल्पना नाही.
एक-दोन गाडया येऊन पुढे निघून गेल्या. पुढे थोडया लांब मृगजळाप्रमाणे हिरवळ पट्टा दिसतोय. तिथे तळंही असावं बहुदा. पण नियमाप्रमाणे गाडीतून उतरता येत नाही. त्यातच गाडीच्या जवळून गेलेल्या वाघाच्या ताज्या पाऊलखुणा दिसतात. तो विरुद्ध दिशेने गेल्याचं तज्ज्ञ सांगतात. तो कोणत्याही दिशेने गेलेला असो, आता तर कोणीच खाली उतरण्याची हिंमत करणार नाही. त्या लँडस्केपमध्ये तो कुठेही दडलेला असू शकेल असं वाटत राहतं. काही मिनिटांत होईल गाडी सुरू असं मोजत मोजत झाला तासाच्या वर वेळ. अखेर सव्वा तासाने गाडी सुरू झाली. आता एवढया शांततेत सर्वाचेच निश्वास ऐकायला आलेत.
प्रहर ३
ही वेळ शांत राहून आजूबाजूचा निसर्ग निरखण्याची. रेस्टहाऊसच्या पडवीत छानपैकी सतरंजीवर लकटावं आणि मस्तपैकी इकडेतिकडे पाहत राहावं. कोणीच त्रास देणार नसतं. आरामच आराम. विचारांनाही दूर लोटून द्यावं आणि निवांत पडावं. इतक्यात समोरच्या छोटयाशा मोकळ्या जागेत माकडांचा गलका ऐकू येतो.
कसला एवढा मोठा आवाज म्हणून सगळेच खोलीबाहेर येतात. बघितलं तर मोठीच गंमत सुरू असते. चांगला शंभरएक माकडांचा कळप आलेलाय. मोकळ्या जागेत काही कचरा टाकण्यासाठीच्या पेटया पण आहेत. त्यात हात घालून कचरा बाहेर काढण्याचे उद्योग काही जणांचे सुरू आहेत. पण एक जण सर्वाचं लक्ष वेधून घेतोय. त्याच्याचमुळे हा सर्व किचाट सुरू आहे. हे मर्कटराजे तिथल्या दोन खांबांवर कसरती करतायत.
अगदी पोल व्हॉल्टचा तरबेज खेळाडू असल्यागत त्याच्या उडया सुरू आहेत. खूप बारकाईने पाहिल्यावर त्याच्या उडया खरंच खूप पद्धतशीर वाटू लागल्यात. जवळजवळ पाऊणएक तास त्याचा हा खेळ सुरू होता, त्यात त्याचे कोणीच साथीदार सहभागी झाले नव्हते ही नवलाची गोष्ट. या अशा उडया मारण्यामागे त्याचा काय उद्देश होता हे कळत नव्हते. कदाचित मोहाची फुलं जास्त झाली असावीत. पण त्याचा खेळ खूपच मनोरंजक होता. आम्ही विश्रांती सोडून तेच पाहत बसलो.
प्रहर ४
आम्ही पाणवठयाकडे गाडी वळवली. वाटेत एक छोटा सिमेंटचा पाण्याचा चौक लागला. तिथं भेकर उभं होतं. जवळपास पिल्लूच होतं. गाडीचा आवाज ऐकून भेदरलं. त्याला काय करावं ते सुचेना. खरं तर त्याने पळून जायला हवं होतं. पण भ्यायल्यामुळे ते तिथेच थिजून त्याच्या भेकरडोळ्यांनी आमच्याकडे टुकटुक बघत उभं राहिलं. भर उन्हाळ्यात असे कृत्रिम पाणसाठे जंगलात ठिकठिकाणी बांधलेले असतात. नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांपर्यंत नेहमीच सर्वच प्राण्यांना पोहोचता येत नाही.
कधीकधी दुस-या मोठया जनावरांचं भय असतं. कधी कळपांच्या मारामा-या असतात. त्यामुळे असे वेगवेगळे पाणवठे प्राण्यांना-पक्ष्यांना खूप उपयोगी पडतात. शिवाय नैसर्गिक पाणवठे सुकले तरी या कृत्रिम पाणवठयांमध्ये वनखात्याचे कर्मचारी पाणी आणून सोडतात. या कृत्रिम पाणवठयांमुळे कितीतरी पशु-पक्ष्यांचा जीव वाचतो. इथे असंच एक तहानलेलं भेकर उभं होतं. नंतर थोडं आत पाहिलं तर अजून एक भेकर होतं. कदाचित आई असावी. आमच्या येण्यामुळे त्याच्या पाणी पिण्यात व्यत्यय आला होता. आम्ही गाडी तशीच पुढे नेली, त्याच्याकडे न पाहता. नंतर मागे वळून पाहिलं तर ते पाणी पित होतं.
प्रहर ५
संध्याकाळच्या भटकंतीला बाहेर पडलोय. जंगलाच्या इतक्या जवळ राहणाऱ्यांची घर-दुकानं पाहत फिरतोय. केळीची बनं दिसतायत. केळी हत्तींचं मोठं आकर्षण. मग का नाही इथे हत्तींचा मोठया प्रमाणात वावर असणार असं मनात आलं. ती गावठी केळी सगळ्यांच्याच मनात भरली होती. दुकानात मांडलेली केळी मग हातोहात खपली. इथे थेट निसर्गातूनच तुमच्या समोर आलेली फळं होती.
लांबलचक प्रवास करून आलेल्या फळांपेक्षा ही केळी खाण्यात मजा होती. ती हातात घेऊनच मग जंगलाकडे निघालो. उंच झाडांच्या दाट गर्दीतून वाट काढत आम्ही चालतोयत. अचानक माझ्या पुढयातून मोठी धामण सळसळत ओंडक्याबाहेरून निघते. ती रस्ता ओलांडून जाते. बाकी बोलण्यात गर्क होते, त्यामुळे तिच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं आणि मग ती कुठे गेली असेल याची चर्चा.
थोडया अंतरावर पुन्हा एकदा एक मोठा साप आम्हाला ओलांडून गेला. आता चालण्यातली मजा थोडी सांभाळून घ्यायला हवी. कारण बोलता बोलता पायाखाली लक्ष राहत नव्हतं. मग सर्वानाच गप्प राहून निसर्गाकडे लक्ष द्यायला सांगितलं. आता अंधार पडला होता. पुढे एक तळं होतं.
छान हिरवाईने वेढलेले शांत तळं. तिथे उभं राहिलो आणि काहीवेळातच पलीकडल्या झाडांमधून खसपस सुरू झाली. काय आहे पाहतो तर, बघता बघता एक एक करत पाच हत्ती तळ्यात दाखल झाले. त्यांनी आमची फारशी दखल घेतली नाही. आम्ही रस्त्याच्या एका बाजूला जाऊन उभे राहिलो. हत्तींची आंघोळ बघत. बराचवेळ पाण्यात खेळून झाल्यावर मग त्यांनी जंगली केळ्यांच्या झाडांकडे मोर्चा वळवला. पिल्लांना हत्तीण कसं भरवते ते पाहायला मिळालं. तिथून जावंसं वाटत नव्हतं; पण कदाचित हत्ती तळ्यातून रस्त्यावर आले असते त्यामुळे निघावं लागलं.
प्रहर ६
आम्ही सकाळीच बाहेर पडलो होतो. काही दिसेल अशी अपेक्षाही नव्हती इतकं जंगल शांत होतं. असं जेव्हा असतं तेव्हाच नेमकी कुठेतरी हालचाल होत असते. आजही तसंच झालं होतं. बांबूच्या झाडीमधून जाणारा सुरेख लाल रस्ता. सुदैवाने गचके देणारा नव्हता. सकाळची शांतता. त्यात फक्त पक्ष्यांचे आवाज. या इथे अशा भल्या सकाळी काय दिसणार अशा विचारात सर्वजण. पण कोणाशीतरी नजरानजर व्हावी अशीच सर्वाची आतून इच्छा. पण इथले कायदेकानून वेगळे असतात.
आपल्या मर्जीप्रमाणे घडायला हे आपलं घर नव्हे. त्यामुळे आम्हीही निवांत होतो. इतक्यात समोर नजर गेली आणि आम्ही गारच पडलो. आनंद, उत्सुकता, थरार, रोमांच असं सर्वकाही एकाच क्षणात मनात मावेनासं झालं. एक सुंदर देखणं लांबलचक जनावर. बांबूच्या पिवळ्या सोनेरी हिरव्या जंगलामध्ये तो खरं तर आम्हाला प्रथम दिसलाच नव्हता.
आमच्या सुदैवाने तो एका जाळीतून दुस-या जाळीकडे जाताना आणि आम्ही तिथे हजर व्हायला एकच गाठ पडली होती. त्याला पाहून आम्ही स्तब्धच झालो. तो मात्र जाळीत जाऊन विसावला. वाघाइतकंच भारतीय प्राण्यांमध्ये उमदं जनावर कोणी असेल तर तो बिबटया आहे. आपल्या दुर्दैवाने आपल्याकडला चित्ता फार पूर्वीच नामशेष झालाय. पण बिबटयाही काही कमी देखणा नाही. आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं.
प्रहर ७
रात्रीच्या काळोखातही पलीकडे गवतात हरणं चरताना दिसतायत. दिसतायत म्हणजे त्यांचे डोळे लुकलुकतात. घुबडांचे आवाज येतायत. आम्ही जिथं तळ्याच्या बाजूला बसलोयत तिथून मुंगुसाची जोडी भरभर पळत गेलीय. अंधार गच्च आहे आणि गचपण पण तेवढंच दाट आहे. त्यामुळे मुंगुसं कोणती होती ते फारसं नीट समजलं नाही. दोन जंगल आऊलेटना तर आताच बाजूच्या झाडाच्या ढोलीत पाहिलंय. तळ्यावरच्या एका झाडावर फिश आउलेटपण असतं. तेही आता बाहेर पडलं असेल.
रातकिडयांचा(सिकाडा) आवाज कहर करतोय असं फक्त जंगलातच वाटू शकतं. कारण आताशा शहरात ते तुमच्यापाशी येऊन ओरडणार नाहीत. तो काळ गेला. आज किडयामुंग्यांसाठी आपण झाडंच शहरात ठेवत नाही, साखळीच तोडतोय तर त्या साखळीतले हे बारीकसारीक प्राणी सिमेंटच्या जंगलात कुठून येणार? पूर्वी लहानपणी काजवे व रातकिडे दोन्ही घराच्या गॅलरीबाहेर येत. वाघळंपण चक्कर टाकत.एखाद् दुसरं घरातही शिरे.
आता शहरात ना पाकोळ्या उरल्या ना वाघळं, ना रातकिडे ना काजवे. लहानपणी चतुरांच्या शेपटाला दोरी लावून त्यांना हेलिकॉप्टरसारखं उडवायचा खेळ खूप आवडायचा. माझ्या मोठया भावाने शिकवलेला. पोपटांचे थवे नेहमी दिसत. शाळेतल्या निलगिरीच्या झाडांवर तर त्यांचा डेराच असे.
शाळेतल्या स्टेजच्या वर असणाऱ्या पोकळीत तेव्हा त्यांची घरटी असत. तेव्हा छानशा गोंडस अशा दिसणाऱ्या राघूंचा तो काळ होता. आता स्टेजची पोकळी कबुतरांनी घाण करून टाकलीय. या इथे तळ्याकाठच्या जमिनीवर बसून वर निरभ्र मोकळं आकाश पाहताना चांदण्या दिसण्याच्या ऐवजी हेच सर्व काही आठवतंय.
इथपर्यंत कुणी खेचून आणलंय त्याचा शोध मन घेतंय. अचानक महासीरने मोठी उडी घेतल्याचा आवाज येतो. खूप मोठा तरंग उठून नाहीसा होतो. त्याच्यासोबत मनातल्या आठवणी पण हळूहळू नाहीशा होत जातात आणि तळ्याच्या पलीकडे दिसलेल्या हालचालीकडे लक्ष जातं. ते काय असावं याचा वेध घेतल्यावर गवा असल्याचं दिसतं. इथे बॅटरी मारणं शक्य नाही. जे काही बघायचं ते चांदण्या न् चंद्राच्या प्रकाशातच. आता रान गोळा व्हायला सुरुवात झालीय. रात्रीच्या या खेळात कोण कोण सामील होतंय याची वाट पाहायची.
प्रहर ८
दोन वाजता झोपल्यावर खरं तर झोपच लागत नव्हती. सूं सूं वारा नुसता उधाणला होता आणि त्या उधाणाबरोबर काय काय उडत होतं हे बाहेर जाऊन पाहायची गरज नव्हती. सर्व पालापाचोळा खिडकीशी येऊन जात होता. साचत होता. सर्वत्र अंधार होता. कंदीलाची वात छोटीच केली होती, ती पण मालवली. उगाच त्यात मेणबत्ती-टॉर्च वगरे पेटवून त्या अनाम अंधाराचं न् वाऱ्याचं ते गुज भंग करावं असं वाटत नव्हतं.
खिडकीजवळ जाऊन उभं राहिल्यावर लक्षात आलं की वारा नुसताच नाहीये, सोबत पाऊस पण घेऊन आलाय. मृदगंध जाणवतोय, इतक्यातच अलवार थेंब मोठे टपोरे होऊन पत्र्यावर आदळू लागले. म्हटलं, हा ऑर्केस्ट्रा आता चांगलाच रंगात येणार, आपण निवांत झोपलेलं बरं. पावसामुळे की काय जंगलात देखील एक प्रकारची शांतता पसरली होती.
बाहेर काही सुरूही असेल; पण या पत्र्याच्या खोलीत काय सुगावा लागणार. झोप डोळ्यांवर पसरतेय. पहाटे चार साडेचारच्या सुमाराला जाग आली. बाहेर साडेपाचपर्यंत पडायचं होतं. इतक्यात दाणकन छपरावरून काहीतरी खाली आदळल्यासारखा आवाज आला. एक क्षण घाबरलेच. कारण बाहेर अजून काळोख होता आणि बाथरूम बाहेर होतं. मग लक्षात आलं की वानरं असणार. दोन्ही कंदील पेटवून दरवाजा उघडून सावकाश बाहेर पाहणी करून घेतली. सापकिरडू दिसतंय का ते प्रथम पाहिलं. मग वर पाहिलं तर माकडं नव्हती. दिवस सुरू झाला.
Here are the links for published articles http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=12,10,1464,2280&id=story1&pageno=http://epaper.eprahaar.in/10052015/Mumbai/Suppl/Page4.jpg

http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=16,1510,1470,2268&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/03052015/Mumbai/Suppl/Page4.jpg

Wednesday, May 6, 2015

पाऊलखुणा


धावपळीच्या आयुष्यात आपण अनेक गोष्टींना विसरून गेलेलो असतो. आपण जगतोय तीच आपली जीवनशैली असा आपण एक समज करून घेतलेला असतो. अशा चाकोरीतून थोडं बाहेर पडलं की आपलंच आपल्याला नवल वाटू लागतं. या नवलामधूनच काहीशा वेगळ्या विचारांनाही जाग येते.
१०:३०
हळूहळू लाल मातीच्या रस्त्याने चालायला सुरुवात केलीय. रस्ता कुठे जातो तेही माहित नाही. त्यामुळे उमटलेली पावलं पाहात चालणं सुरू होतं. अनेकदा आयुष्यात असंच आपल्याला दुस-यांवर विसंबून राहावं लागतं. रस्त्यावर सोबतीला अनेक वाटसरू दिसत होते. मात्र ते नेमके कोणत्या दिशेने जातील हे मलाही माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांच्यामागून गेल्यावर ते माझ्याच इच्छित स्थळापर्यंत जाणारे असतील याचा भरवसा नव्हता. मग काय..आजूबाजूच्या पायवाटांचा अंदाज घेत चालणं सुरू होतं. सोबतीला फक्त माझ्याच पावलांचा आवाज आणि बाजूला झाडावरून उडया मारणा-या माकडांचे आवाज, बाकी काही नव्हतं. चालायला सुरुवात केल्यावर थोडावेळ काहीसं विचित्र वाटलं, चुकल्याचुकल्यासारखं वाटलं. काय मिसिंग आहे ते कळायला काही वेळ लागला. मग लक्षात आलं की इथं भलतीच शांतता आहे. एवढया शांततेची आपल्याला सवय नाही. मनात आलं ही एवढी शांतता इथं मुळात टिकून तरी कशी राहिली? शहरातला गोंगाट, कोलाहल हा कानावर कितीही गच्च हात दाबून ठेवले तरी भेदून आत शिरतच राहतो. याउलट या वाटेवरली, या परिसरातली ही शांतता. हळूहळू डोळ्यांवर झापड यावी तशी अंगात भिनत चालली होती. शहरापासून दूर आल्यावर कुठेही डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया काही लगेचच सुरू होत नसते. थोडा वेळ जावा लागतो. तशाच प्रकारे इथं आल्यावर कानात गच्च साठलेले शहरी आवाज विरघळून त्यांच्या जागी निशब्द शांतता भिनायला काही अवधी लागतो, मग ती मुरत जाते. तिची सवय व्हायला लागते. मुंबईपासून अवघ्या काही तासावरचं हे गावपण मुंबईत मिळणार नाही अशी लाखमोलाची मन:शांती इथं मिळते. गिरिस्थानी असलेल्या या शहराचं हे प्रमुख आकर्षण असायला पाहिजे पण ते तसं नाहीये. कारण शहरी पर्यटक त्याच्यासोबत कायम शहरातल्या गोष्टी घेऊन फिरत असतो म्हणून त्याला इथल्या शांततेचं अप्रूप वाटत नसावं.

 २०:१५
निस्तब्ध जंगल..दुतर्फा झाडी न् अलवार पसरत गेलेला काळोख. काळोखाच्या या रंगातही एक लयबद्धता जाणवतेय. संध्याकाळची ही नीरवता सा-या आसमंतावर पसरलीय. थोड्या वेळाने लाल रस्ताही पायाखालून दिसेनासा झाला तेव्हा म्हटलं अंधार चांगलाच साकळलाय. डोळे पायाखाली काही साप-किरडू येत नाही ना ते पाहतायत. या अशा वेळी लांबचलांब वाटणारा जंगलातला रस्ता. तोही एकटय़ानेच चालायचा. अवचित काळोखातून भरधाव टापांचा आवाज येतोय. अंधारात एकतर काय समोर येईल याचा अंदाजही लावता येत नाहीये. घोड्यांच्या टापांचाच आवाज तेवढा कानापर्यंत पोहोचलाय पण नजरेच्या टप्प्यात घोडा काही आलेला नाही. घोड्यावर नक्की कोण असेल, मग त्याचा आवाज का नाही येत असा विचार मनात आला. सर्रकन डोळ्यांसमोर हॉलोमॅनमधला अश्वधारी येतो. आता पुढय़ात काय येईल ते पाहण्याची उगाचच उत्सुकता लागते. याच विचारात गुंतून बॅटरी बाहेर काढणार तेवढय़ात तो अंधारात बेमालून मिसळून गेलेला घोडा भरधाव शेजारून निघूनही जातो. नवलच वाटतं. कोण होतं त्यावर हे पाहायलाच हवं होतं असं वाटत राहतं. पुन्हा त्याची व माझी दिशा विरूद्ध त्यामुळे पुढं जाऊन त्याला गाठण्याचाही प्रसंग येणार नव्हता. चला..तेवढीच हॉटेलच्या वाटेवर थोडी सोबत झाली!

 १२:४५
कोणीतरी शार्लोट लेकला जाणारा रस्ता दाखवलाय. किती जवळ आहे किती लांब हे कळायला मार्ग नाही त्यामुळे रस्ता नेईल तिथं जायचं. गावात पर्यटकांची गर्दी नाहीच. रस्त्याने सोबतीला झाडं, न दिसणारे पक्षी व त्यांचे घुमणारे आवाज. झाडं सरळसोट उंच त्यामुळे पाखरांचं गाणंच फक्त ऐकू येतं. श्वासात मिसळणारा गंधभरला रानवारा. बाजूने मोठा ओहोळ वाहत असावा पण दिसत तर नाहीये खरा. त्याचा थांग लावता लावता अचानक समोर रस्ता संपून पालापाचोळा पडून हिरवट झालेला एक छोटा डोहच येतो. तो कुठे संपतोय पाहावं, तर समोर मोठा तलाव दिसतो. या तलावाला केंद्र करून एक छान मोठी रपेटही मारता येते जंगलातून. तलावाच्या बाजूला छोटय़ा बंधा-यातून पाणी सोडलंय, लोकांना पाण्यात खेळण्याचा आनंद घेता यावा म्हणून. तलाव पार केला की पुन्हा दोन फाटे. आता यातल्या कोणत्या रस्त्याने जावं, असा प्रश्न पडतो. त्यातल्या त्यात थोडा माणसाळलेला वाटणारा रस्ता पकडून चालणं सुरू ठेवायचं. निमर्नुष्य असण,ं ही या पायवाटांची खासियतच असावी. बाजूला बंगले आहेत पण तिथं जाग नाही. रस्ता चुकला तरी लांबवर विचारायला कोणी नाही. मग दगडावर बसून थोडी विश्रांती घ्यायची आणि एखाद्या गावक-याची नाहीतर घोडेवाल्याची वाट पाहायची. इथं पाटय़ा तशा कमीच. एकदाच सुरुवातीला अमुक एका पॉईंटला हा रस्ता जातोय असं बाणाने दाखवलं की, झालं काम. मग पुढे तुमच्या अंदाजाने चालत राहायचं. हरवला नाहीत तर तुमचं नशीबच म्हणायचं.

 ७:३०
तीन बेंच टाकलेला हा गर्द झाडीत लपलेला रस्त्याचा कोपरा..वाटचालीचा असूनही सुस्त अजगरासारखा पडलेला. तीन रस्ते इथं येऊन मिळतात. पुन्हा त्या रस्त्यांना वर जंगलात जाणा-या असंख्य पायवाटा फुटतात. बेंचशेजारची चौकी वापर होत नसल्याने रिकामी पडलीय. खालून रेल्वे लाईन जाते. त्यापलीकडे दरीच. इथं निवांत बसून दिवसभरात पुढं काय करायचं त्याचं प्लॅिनग करता येतं. अनाहूत पाहुणा दिसला की पाखरं व माकडं थोडा कल्ला करतात, नंतर आपण त्या चित्रात मिसळून गेल्यावर ती दुर्लक्ष करतात. मधूनच कधी खाली गावातून जड ओझं हातगाडीवर ढकलून वाहून आणणा-यांचे दम घेतानाचे आवाज लांबवरून खालूनच घुमत येतायत. वर गावात यायचं म्हणजे पूर्ण चढणीचा आणि खडकाळ रस्ता. या अशा रस्त्यानं सामान वर चढवून आणण्यात तगड्या लोकांचाही दम निघतो. पण नाईलाज आहे. त्यातच एखादी म्हातारीही ढकलगाडीने वर येते. पण नाक्यावर वर्दळ तशी कमीच कारण बहुतेकजण खालच्या रेल्वे रूळातून सपाटीच्या रस्त्यावरून जाणं पसंत करतात. इथं बसून कंटाळा आला तर झाडाखाली जाऊन झोपही काढता येते.

 १५:४५
इथं रान तुडवताना फारसं कोणी भेटत नाही. गर्दीचे पॉईंट सोडून दुस-या रस्त्याला लागलात तर अगदीच कोणी नाही. खालच्या दरीत डोकावलं तर धनगरवाड्यातून दूध घालायला वर येणारे गावकरी वर येताना दिसतात. गच्च कापडात नीट थंड राहील याची काळजी घेत बांधलेली दुधाची चरवी. बाकी उरतात थोड्या थोड्या अंतराने रानात आत कुठेतरी लांबवर दिसणारे पारशांचे जुनाट बंगले. काहींना तटबंदी तर काहींना ती देखील नाही. काही ठीकठाक तर काही अगदीच भग्नावस्थेत. बाहेर जीर्ण झालेल्या संगमरवरी पाटय़ा वाचून काहींची ओळख पटते. काही तसेच बेवारस वाटणारे. भुताखेतांच्या गोष्टींना जन्म देणारे. वाटेतच पारशांची स्मशानभूमी लागते. ती बाहेरूनदेखील नीट दिसते. तिथं कोणी येत नाही. जंगलात कोण जातंय मरायला, असं बरेचदा म्हटलं जातं. पण या पारशांनी खरंच जंगलात मरण्याची सोय करून ठेवलीय. किमान दोन तास सोबत केल्याखेरीज इथल्या रानवाटा तुम्हाला सोडत नाहीत. वाटेने जाताना गवत काढणारे आदीवासी दिसतायत. हे गवत ते चा-यासाठी विकणार. अगदी डोंगराच्या कडेकपारीच्या उतारावर जाऊन गवत काढतायत. हे उतारावर उगवणारं गवत काढणं खूप धोकादायक. पाय घसरला तर खाली साक्षात दरीच. जीव धोक्यात घालून त्याच जीवासाठी पैसे कमवायचे. यांना भीती कमी वाटते, कारण बहुतेकवेळा माणूस शहरी होतो, जेवढा त्याचा निसर्गाशी संपर्क तुटतो, तेवढा तो घाबरट होतो, पण निसर्गाकडून घेऊनही या लोकांनी बरंच काही शिल्लक ठेवलंय हे बरंच म्हणायचं. म्हणून तर रानमेवा अद्याप या आदीवासींच्या ताब्यात असावा.

१७:३०
संध्याकाळ झालीय. पण या रस्त्यावर वाट चुकता कामा नये. आणि चुकली तरी ती जिमखान्याजवळून जाता कामा नये. ही पूर्वीची पारशांची घोडे पाग किंवा घोडे तळ, पण गेल्या १०० वर्षापासून तळ बंद झाला अन् तळाचं रूपांतर गावाच्या डिपग ग्राऊंडमध्ये झालंय. त्यामुळे इथं थोडीथोडकी नाही तर १००-१५० कुत्री तळ ठोकून असतात. बरं ही शहरी वातावरणातली कुत्री नाहीत, तर रानात राहायला सवकलेली भटकी कुत्री. संध्याकाळी हा भाग पूर्ण त्यांच्या अंमलाखाली. वाटेत एकटादुकटा कोणी दिसला तर तिथंच फाडून खातील. ही कुत्री दिवसा गावात हॉटेलांपाशी रेंगाळतात. जंगलातही भटकत अस
तात. फिरताना त्यांची भिती वाटत नसेल तर खुशाल एकटय़ाने फिरावं. गावात हॉटेल व्यवसाय वाढतोय तसा कचराही भयंकर वाढतोय. प्रदूषणाचे नियम पाळणा-या या गावात कुत्र्यांची संख्या बेफाट वाढलीय. वाघालाही घाबरणार नाहीत असली गावठी कुत्री. सहानंतर कोणी पर्यटक फारसे हॉटेल-बाजार परिसर सोडून दूर जाणार नाहीत. एकूणच संध्याकाळी भुतांची व कुत्र्यांची भीती वाटत नसेल तर फिरावं असं इथलं वातावरण.

 ९:१०
ट्रेनसाठी स्टेशनवर आलेय. तिथं कोणीच नाही. थंडीत कोणत्याही छोटय़ा गावाच्या स्टेशनवर जा, तिथं एक प्रकारची आळसावलेली सामसूम असते. असलेले प्रवासीही दबकूनच बसल्यासारखे वाटतात. आख्खं स्टेशनच जणू रजई घेऊन झोपल्यासारखं वाटत असतं. पावसाळ्यात ही चिडीचूपची मजा नसते. तरीही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथला नजारा इतरांनी हेवा करून दृष्ट लागावा इतका अप्रतिम. खूप पावसाचे दोन महिने तर इथं शाळा वाहतूक रेल्वे सारंच बंद, पण रानाची खरी ओळख पावसाळ्यातच होते. इथं रानवैभवाची मुक्तहस्ताने उधळण पाहायला मिळते. तीच पाहायला अनेकजण येतात. पावसाळ्यात इथं सहसा पयर्टकांना फिरवत नाहीत. त्यामुळे बाहेर फिरायचं तर स्वत:च्या भरवशावर. हिवाळ्यात धुकं इतकं दाट की धुक्यात बोट घातलं तरी हटणार नाही. असो. मग विचार केला की चालतच पुढल्या स्टेशनला जावं. जाता जाता शेवटचा मॉìनग वॉक तरी होईल. काल याच रेल्वेगाडीच्या वळणावळणाच्या रस्त्याने कोवळ्या सोनेरी उन्हात चालत सकाळची फेरी मारली होती. कोणत्याही छोटय़ा गावाची ओळख तिथं जेवढं जास्त चालाल तेवढी चांगली होते. गाडीच्या शिट्टीचा आवाज लांबवरून ऐकू येतोय. बहुदा गाडी सुटली असावी. आता पुढलं स्टेशन गाठण्यासाठी पावलं झपाझप टाकावी लागतील..

link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=540,64,2288,1164&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/04012015/Mumbai/Suppl/Page4.jpg

प्रवासचित्र


काही प्रवासांच्या आठवणी या थंडगार झुळकेसारख्या असतात. अशा आठवणी कधी येऊन भेटल्या तर क्लांत मनाला बसल्याजागी थोडी विश्रांती मिळते व मन ताजंतवानं होतं. पुन्हा नव्या प्रवासाचं खातं लिहिण्यासाठी मन सरसावतं.
‘‘अज्ज मेरा जी करदा.. रब्बा रब्बा मीं बरसा.. सादी कोठी दाने पा..’’
खालच्या दरीत अंधाराच्या कुशीत गुडुप झालेल्या कोणत्या तरी अनोळखी गावातून पंजाबी लोकगीतातली तान-सूर वा-यावर हेलकावत वर येत होते. विलक्षण भेदक वाटत होते. दूरवर खाली काही प्रकाशाचे ठिपके लुकलुकत होते. बहुधा लग्नघर असावं. खिडकीत बसून डोळे मिटल्यावर त्या सुरांसोबत तिथं चाललेली सर्व घाईगडबड, नाचगाणी हे देखील डोळ्यांसमोर उगाचच उमटत होतं. भयंकर थंडीतही त्या कोण्या एका गावात नव्या जीवनाची सुरुवात करण्याची सारी तयारी चालली होती. कुलुला जाणा-या घाटातून आमची बसदेखील नव्या नवरीसारखी नाजूकपणे वळणं घेत चालली होती कारण वळणं नुसतीच धोकादायक नव्हती तर समजायलाही खूप कठीण होती. आमच्या डोळ्यांवर झोप चढत होती पण ड्रायव्हरच्या डोळ्यावर ती चढू नये ही प्रार्थना करत आम्ही जागे होतो. हे असे अनुभवच एखाद्या कंटाळवाण्या लांबलचक प्रवासालाही मनात जागा देत असतात. माणसाच्या आयुष्यातलं प्रवासाचं महत्त्व माझा आवडता लेखक ब्रुस चॅटविन यानं एका फटक्यात सांगितलंय, तो म्हणतो मुळात आयुष्यच हा एक आपला आपण करायचा मोठा प्रवास आहे, त्यामुळे फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुमचं घर हे रस्ता असलं पाहिजे, बांधलेलं घर नव्हे. प्रवास कसाही असो, मग तो शतकानुशतकं पडीक कातळांच्या प्रदेशातला असो की नागमोडी हिरव्या घाटातला, तो घडत असताना त्याची एक प्रतिमादेखील मनात तयार होत असते. जणू त्याचं व्यक्तित्वच म्हणा ना.. त्यात भेटणा-या अनेक माणसांनी, घटनांनी रंग भरलेले असतात. एखादा प्रवास मनात जर खूप वर्षानीही ताजा असेल तर त्याला कारण हे रंग असतात. हे रंग सुकणारे नसतात. आठवणींना झटकन ओलावा देणारे हे रंग असतात.
आपण सतत कुठे ना कुठे तरी प्रवास करतच असतो, माध्यमं निरनिराळी असतात, मात्र प्रवासचित्र प्रत्येकवेळी वेगळं उमटतं. या चित्रात तुम्ही कुठे, कसा, कोणत्या जाणिवेने अनुभव घेत असाल यावर त्याचं उत्तम साकारणं अवलंबून आहे. हे तुमचं स्वत:चं प्रवासचित्र असतं. मग तुमच्या सोबतीनं प्रवास करणा-या प्रत्येकाच्या जाणिवेतून ते तुमच्या चित्रासारखंच उमटेल हे शक्य नाही. प्रवासचित्रांमधला काळ हा एक त्यातला अनिवार्य घटक आहे. तो दिवस असो वा रात्र, जुना असोत वा नवा, संदर्भ असोत किंवा नसोत, तो तिथंच गोठलेला असतो. असं एखादं प्रवासचित्र पाहताना त्या क्षणापेक्षा मोठं तुम्हाला होता येत नाही. त्यातलं सौंदर्य हे पुन्हा त्या काळातच डोकावण्यातच आहे. ते तिथंच अनुभवावं व चुपचाप परत आपल्या जगात यावं. हा स्तब्ध काळ फक्त तुमच्यापुरताच नसतो तर तो तुमच्या प्रवासातला एखादा घटकही असू शकतो. दुरांतो एक्स्प्रेसने कोलकात्याला जाताना असाच एकदा गोठलेला क्षण भेटला. मिदनापूर जिल्ह्यातून गाडी जात असताना ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या कोसळलेल्या डब्यांचे अवशेष दोन वर्षानीही तिथंच पडलेले पाहायला मिळाले. मनात तेव्हाही चर्र झालं. कोणत्या बेसावध क्षणी त्या प्रवाशांच्या मनातलं चित्र अधुरं राहून गेलं असेल असं वाटलं. इतका काळ लोटून गेल्यावरही तिथली हवा थोडी सर्दच वाटली.
एखाद्या ठिकाणी जाताना आपण मनात काही तरी ठरवून जात असतो. तिथे गेल्यावर व तिथपर्यंतच्या प्रवासात आपण काय पाहणार याचं एक ठरावीक चित्र आपल्या मनात काहीसं तयार असतं. ठिकाण अगदीच ओळखीचं असेल, खूपच प्रसिद्ध असेल तर मनातल्या त्या चित्राबरहुकूम प्रवास होऊ शकतो. पण त्यापेक्षा खरी मजा असते ती कोणताही अंदाज न लावत वाटचाल करण्याची. आता काय हा प्रश्न मनात उभा करून त्याची उत्तरं शोधायला सुरुवात केलीत की या अनोळखी क्षणांमधली गंमत निघून जाते. म्हणजे टिपूर चांदणं पडलेलं आहे आणि आपण त्यामागचं शास्त्रीय कारण शोधायला जाऊ असंच ते काहीसं होतं. अशीच एक वाटचाल पौर्णिमेच्या चांदण्यातून केली होती. गाव अनोळखी, माणसं अनोळखी. पण एका सामाजिक कामासाठी एका गावात जाणं भाग पडलं होतं. तिथली माणसं मला स्टेशनवर घ्यायला आली होती. तिथून मग सुमारे अध्र्याएक तासाची चाल होती आणि पाहिलं तर गावात रस्त्यांवर लाईटचे खांबच नव्हते. नेहमीच्या शहरी (मूर्ख) सवयीप्रमाणे मी त्यांना म्हटलं की आता कसं चालायचं अंधारातून? त्यांनी माझी बहुतेक कीव केली असावी पण तसं न बोलता त्यातल्या एकानं वर आकाशात बोट दाखवलं. तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं की रात्र पौर्णिमेची होती व पूर्ण रस्ताभर त्या चिंधीभर बॅट-यांपेक्षाही कितीतरी जास्त व सुरेख प्रकाश पडलेला होता.
मनावर शहरी झापडं असल्यामुळे माझं मुळी त्याकडे लक्षच गेलं नव्हतं. अर्थातच गाडीतून उतरल्यावर कीर्र काळोखी वाटलेली ती वाट त्यानंतर खूप सुंदर वाटू लागली. प्रवासालाही एक लय असते. ती तुमची तुम्हाला शोधावी लागते. त्या लयीला बांधून घेतलंत तर तो प्रवास कितीही लांबचा किंवा कंटाळवाणा असू देत, तो आवडू लागतो. ब्रह्मपुत्रेला येऊन मिळणा-या गंगा व मेघनेच्या संगमावरचं सुंदरबन. अफाट जलसागर. आत आत गेलं की जणू समुद्रच भासावा. सवय नसेल तर असं तरंगत राहिल्यानंतर काही एक दिवसांनी मनावर मळभ दाटायला सुरुवात होते. कायम समुद्रावर राहणारे नौदल सनिक किंवा संशोधक इ. यांना याबाबतचं मानसिक समुपदेशन केलेलं असतं. आपलं तसं नाही. तर तिथे चार दिवस सतत जमीन दूर दूर कुठेतरी ठिपक्यासारखी दिसायची. त्याचं फक्त पहिल्या दिवशी वाईट वाटलं. कारण शहरी गोंगाटापासून दूर जातोय याचा आनंद त्यावर मात करत होता. अशातच आला होता वर्षाचा अखेरचा दिवस.
निर्मनुष्य डेकवर चांदणं पित, गाणी ऐकत, सर्व कोलाहलापासून दूर काढलेली ती रात्र अविस्मरणीय ठरली. काही प्रवास हट्टाने तुमच्या मनात जागा मिळवून बसतात. जिम कॉब्रेट नॅशनल पार्कजवळच्या रामनगरला रात्री पाऊण वाजता उतरून दुतर्फा घनदाट जंगल असणा-या रस्त्यावरून कारमधून केलेला प्रवासही असाच लक्षात राहिलेला. त्या रस्त्यावर एवढय़ा रात्री मी व माझा ड्रायव्हर एवढेच होतो. वन्यक्षेत्रातील रस्त्यांवर गाडीचे लाईट्स लावायला रात्रीची बंदी असते. ते कायम लावून न ठेवता फक्त थोडा वेळ अधूनमधून लावता येतात. त्यामुळे झोपाळलेल्या डोळ्यांना काळोखात अजूनच चित्रविचित्र भास होत होते. प्रवासांच्या अशा आठवणी झरझर मागे पडणा-या एखाद्या स्टेशनसारख्या असतात. मनात आलं तर पाहिजे तितका वेळ त्यात रमावं, नाहीतर रेल्वेत दरवाजात पाय सोडून बसून बाहेरचा नजारा पाहण्याची धावती मजा घेता येते तशी नुसतीच अशा प्रवासांची याद करून मनाला विरंगुळा द्यावा.
link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=600,88,2046,1020&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/11012015/Mumbai/Suppl/Page4.jpg

मावळतीचे ठसे


प्रवासाची गोष्ट लिहायला घेतल्यावर एक जाणवलं की जिथे-तिथे भेटलेत ते मावळतीचे रंग. हे रंग आवडले म्हणून स्मरणात त्यांचे ठसे राहिले. काही गोष्टींना तोड नसते म्हणतात ना, तसेच असतात मावळतीचे रंग. तप्त दिवसाला मृदू करून सोडणा-या मावळतीचे रंग जणू हंसध्वनीच्या सुरात उमटू लागतात आणि दिवसभराच्या शिणलेल्या, विखुरलेल्या मनाला एकत्र घेऊन येतात.
प्रवासात आपण फारसं थांबू नयेच कुठेही. असा नियम आपणच करावा आणि आपणच मोडावा; पण तो मोडण्यासाठी सुंदरसा क्षणही भेटावा लागतो. जिथून आपल्याला परत फिरू नये असं वाटू लागतं आणि बहुतेकदा ही वेळ मावळतीची असते. सूर्य अस्ताला जाताना दिसत असतो, तो उद्याशिवाय परत येणार नाही हे देखील कळत असतं तरीही त्याला पूर्णपणे जाताना पाहिल्याशिवाय काही आपण माघारी येत नाही. शहरांमध्ये फिरताना हमखास ही वेळ कुठे ना कुठे तरी भेटतेच. मात्र जंगलांमध्ये फिरताना ते थोडं कठीण असतं. कारण बहुतेक राष्ट्रीय अभयारण्यांमध्ये संध्याकाळी पाचच्या सुमारास गाड/e मागे परतू लागतात, तसे आदेशच असतात. अर्थात जंगल तुमच्या गावातलं असेल तर गोष्ट वेगळी. अशा तिन्हीसांजेला वन परिसरात फिरण्याची मजा काही वेगळीच असते. शहरात बँडस्टॅण्डवर बसून पाहिलेला किंवा एनसीपीएच्या मागे उभं राहून पाहिलेला सूर्यास्त छानच असतो, पण अरण्यातील या मावळत्या रंगांचा झोक काही निराळाच असतो. तिथं निसर्ग बेबंद असतो. तो इमारतींच्या गराड्यात अडकलेला नसतो. त्याला हव्या त्या रंगाचे फटकारे त्या निळ्या-पांढऱ्या पटलावर मुक्तपणे मारण्याची त्याची हौस जणू तो पुरवून घेत असतो. अर्थात इथे तिथे आकाश सर्व एकच असतं म्हणा, पण एखाद्या नदीकाठी संध्याकाळी बसून पाहा, म्हणजे काय ते कळेल.
आवडनिवड ऋतुचक्राशी किंवा कशाशीच बांधलेली नसावी. म्हणजे फेब्रुवारीत मी इथेच जाईन किंवा गोव्याला गेल्यावर हेच करेन. फिरस्त्याच्या मनाने पहिले ही खूणगाठ मनाशी बांधावी, तरच त्याच्या आनंदाचा दर्जा उंचावू शकतो. याचं प्रत्यंतर मध्य प्रदेशात आलं. तिथं बांधवगढला गेल्यावर शेवटच्या दिवशी सफारी करून सर्वच जण खूप थकले होते. सहलीचे पैसे भरून जंगलात गेल्यावर वाघाने निमूटपणे पुढे यावं अशी काही जणांची माफक अपेक्षा होती. पण वाघाला या गोष्टीची कल्पना नसल्यामुळे व बहुतेक मध्य प्रदेशातले वाघ तितकेसे कर्तव्यदक्ष नसल्यामुळे की काय, अनेकांना वाघ दिसला नव्हता. तर अशा काहींनी वाघ अखेरच्या दिवशी दिसेल याची आशाच सोडली होती. सुदैवाने आम्हाला सतत तीनही दिवस हा उमदा प्राणी अगदी जवळून पाहायला मिळाला होता. त्यामुळे आम्ही शेवटच्या दिवशी दुपारी बाहेर पडलो ते वाघासाठी नाही तर अरण्य कसं आहे ते पाहायला. अनपेक्षितपणे आमच्या समोर वाघीण आणि तिची तीन बछडी खेळताना दिसली. हा बोनस होता. मन हरखून गेलं. त्यानंतर लगेच सांजवेळ होऊ लागली आणि बछडे दाट गवतात दिसेनासे झाले. म्हणूनच जंगलात कशाचीही अपेक्षा न ठेवता जावं. त्यातून अशी सांजवेळ साधता आली तर बहारच. मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर आणि कित्येक लेखकांनी अरण्यातील या सांजवेळेचं महत्त्व व कौतुक लिहून ठेवलेलं आहे. माडगूळकरांनी त्यांच्या ‘नागझिरा’ पुस्तकामध्ये निलयकाठच्या तळ्यावर काढलेल्या संध्याकाळचं व अरण्याचंही वर्णन फार सुरेख केलंय. खरं तर शब्दातही मांडता येणार नाही अशाच या मावळतीच्या वेळा असतात.
अशीच वेळ अनुभवली ती काझीरंगाच्या अरण्यावर काळोख सांडत चालला होता तेव्हा. ऑफ सीझन असल्यामुळे पर्यटक फारसे नव्हते. होते तेही परतू लागले होते. आम्हाला खोलीवर परतून काय करायचं हा प्रश्नच होता, त्यामुळे रेंजमधून बाहेर पडण्याचा अखेरचा सेकंद येईस्तोवर आम्ही तळ्यावर गाडी थांबवली. समोर सूर्य मावळत चालला होता. कितीतरी ओळखीच्या-अनोळखी पक्ष्यांची लगबग सुरू होती. तळ्यात महासीर उड/e मारत होते. पलीकडे गेंडे लांबवर दिसत होते. ते वातावरण इतकं अद्भुत होतं की तोंडातून शब्दही काढून तिथली निर्मम शांतता भंग करावी, असं कोणालाच वाटलं नाही. जणू बोललो तर त्या चित्राला तडा जाईल की काय अशी भीतीच वाटली होती. ‘मौनाच्या संध्याकाळी आकाश स्वरांचे झाले.. वितळले क्षितीज गंधात रंगातून रूप निथळले..’’ या सुधीर मोघ्यांच्या एका कवितेसारखा तो सारा नजारा होता. आपसूकच आम्ही नि:शब्द झालो होतो. मावळतीने आमच्यावरही किमया केली होती. सुमारे तासभर आम्ही त्या तळ्यावर होतो. मग अंधारात तळं दिसेनासं झालं तेव्हा आम्ही जंगल सोडलं. काझीरंगातली ती संध्याकाळ मनात भरून राहिली. पण त्यावरही मात केली होती ती सुंदरबनमधल्या सूर्यास्ताने.
सुंदरबनच्या विस्तीर्ण जलसागरात बोट फिरत असताना इतकी शांतता असते की वेळेकडे सहसा लक्ष जातच नाही. इतर ठिकाणच्या जंगलांमध्ये वेळ कळते कारण अंधार पडू लागला की पाखरांचे-प्राण्यांचे आवाज, हालचाली बदलू लागतात. झपाटयाने सामसूम व्हायला सुरुवात होते. तसं इथं नाही. असंच एकदा गप्पा मारत होडीच्या टोकावर बसलेलो असताना अचानक आकाशात लक्ष गेलं आणि थक्क व्हायला झालं. म्हटलं हा काय अद्भुत खेळ मांडलाय निसर्गानं. मला गो. नी. दांडेकरांच्या ‘मृण्मयी’ची आठवण झाली. लहानगी बाळ मृण्मयी तिच्या अंगावर खेळणाऱ्या कोवळ्या किरणांचं नवल जितक्या कवतिकाने पाहते तितक्याच निरागसतेने व तन्मयतेने मी तो रंगखेळ पाहू लागले. मन त्या सांजवेळेच्या रंगांच्या भोवऱ्यात फिरत होतं. हे रंग अनाकलनीय होते. ते सहसा शहरी आकाशात न दिसणारे रंग होते. निसर्गही एक्सक्ल्युजिव्ह व्हिज्युअल्स देण्याची करामत करू शकतो, हे तेव्हा कळलं व आपण किती क्षुद्र आहोत हे देखील जाणवलं. अनेकाविध रंग आकाशाच्या पटलावर अक्षरश: उधळण्याचं काम सुरू होतं. त्यांना फक्त नजरेत साठवावं की कॅमेरातही टिपावं अशी मनाची द्विधा स्थिती झाली होती. इतर कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त व मेघना, गंगा, ब्रह्मपुत्रेच्या विस्तीर्ण संगमावरला तो सूर्यास्त यात जमीनअस्मानाचा फरक होता. अखेर कॅमेरा बंद करून ते विलक्षण दृश्य नुसतं नजरेत साठवून घेतलं. अशा अनेक वेळा असतात, अनेक ठिकाणं असतात की जिथं आपण पुन्हा येऊच याची शाश्वती नसते. अशी मनस्थिती असेल तर हमखास मनावर विसंबावं व त्या क्षणांना फक्त स्मृतीत ठेवावं. काही हरकत नाही. दिवसाच्या कोणत्याही प्रहरापेक्षाही सांजवेळेची जादू अनोखी असते. त्यातून ती सांजवेळ अरण्यातली असेल तर विशेषच असते. व्यंकटेश माडगूळकर म्हणतात त्याप्रमाणे, अशा शांत, सुखद वेळी मनात उदास विचारांची गर्दी होत नाही. अरण्यजीवन किती अर्थपूर्ण, थेट, रसरशीत व साधं आहे हे अशा एखाद्या संध्याकाळीच कळतं. आपण नकळत आपल्या आयुष्याविषयी अशा संध्याछायांमध्ये फिलॉसॉफिकल होत असतो, परंतु मावळतीच्या या जशा असंख्य छटा आहेत, त्याचप्रमाणे आयुष्यालाही अनेक छटा लाभलेल्या आहेत, हे समजून घेऊन त्या क्षणातील आनंदाला बिलगावं.
link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=554,90,1812,1178&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/18012015/Mumbai/Suppl/Page4.jpg

वेळ चुकवून पाहा..


बारा वर्ष, बारा महिने वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा संकल्प सोडा; पण एका अटीवर. कोणत्याही निश्चित वेळी एखाद्या ठिकाणी ठरवून जायचं नाही. शक्यतो वेळ चुकवायचीच. अनेकदा वेळ चुकल्याने तुमच्या अनुभवांना वेगळीच खोली मिळून जाते. काही अविस्मरणीय अनुभव येतात.
मी मागे म्हटलं होतं की ऋतुचक्राशी किंवा घडय़ाळाशी स्वत:ला बांधून घेऊ नका. अमुक वेळीच अमुक ठिकाणी जाईन असं म्हटलंत तर तुम्हाला जे दिसेल ते कदाचित घरातल्या फ्लॅट स्क्रीन टीव्हीएवढाच आनंद देणारं असेल. भटकायलाच जायचं असेल तर कोणत्याही ठिकाणी जायचा शिरस्ता पाळू नका. कुलूमनालीला मे महिन्यातच जाल तर इतर महिन्यांत तिथलं सौंदर्य थोडी कमी होतं? जसं दिवस उजाडल्यावर पक्षीनिरीक्षण कठीण असतं. पक्षी पाहायचे असतील, त्यांचं गाणं ऐकायचं असेल तर पहाटेसारखी अप्रतिम वेळ नाही. पण कधीतरी संध्याकाळीही घरटय़ात परतण्याची त्यांची लगबग पाहा. इतर वेळीही आवडती ठिकाणं अनुभवून बघा. ती तेवढीच सुंदर असतात. शिवाय ऑफ सीझनला जाण्याचे फायदे मिळतात ते वेगळेच. पण केवळ त्याचसाठी नाही तर ऋतूंमधलं वैविध्य पाहण्यासाठी जा. माझ्या अनुभवानुसार काही ठिकाणचे गाईड त्यांना जायचं नसेल तर ‘इस जगह मे जाना वेस्ट ऑफ टाइम है’ वगैरे ऐकवतात. अशा वेळी स्वत:चं लॉजिक लावा आणि निर्णय घ्या. इतर वेळचे दुस-या प्रांतातील ऋतू अनुभवून पाहा. काही ठिकाणी नक्कीच ते कठीण आहे; मात्र आपल्या नजरेला त्या त्या ठिकाणाचं एक रुटीन वैशिष्टय़ पाहायची सवय झाली आहे. ती मग मोडता येते. कधीतरी वेळाही चुकवून पाहा. त्यातही गंमत असते.
कॉब्रेटच्या जंगलात फिरताना एक दिवस मी खोलीवर थंडीत गुडूप झोपून गेले होते व साडेपाचला माझा ड्रायव्हर उठवायला आला. म्हणाला, आता फक्त अर्धा तासच उरलाय. तेवढा वेळच फिरून येऊ. म्हटलं ठीक आहे. सहाला बाहेर पडलो. गेलो सीताबनीच्या जंगलात. तिथं प्राण्यांचे अलर्ट कॉल सुरू होते. जंगलातून गाडय़ा परतत होत्या. वाटेत फॉरेस्टची माणसं भेटली. ती म्हणाली, ‘जास्त पुढं जाऊ नका. एकतर संध्याकाळ होऊन गेलीय. तुम्ही येणार तरी कधी परत आणि या एरियात वाघीण फिरतेय, हे कॉल तिच्यासाठीच आहेत.’ त्यावेळेस पायानं लंगडी झालेली एक वाघीण तिथं आसपासच्या गावात फिरत होती. मी परत मुंबईला आल्यानंतर बातमी कळली की, तिनं एका बाईला उचललं होतं. एव्हाना साडेसहा वाजून गेले होते.
ऐन डिसेंबरमधली ती भर्रकन काळोख पांघरून घेणारी संध्याकाळ. आम्ही तर नुकतेच जंगलात शिरलो होतो. तिथं सुंदरसा छोटा वळणावळणाचा घाटासारखा वाटणारा रस्ता आहे. अगदी पाहात राहावा असा. मात्र तो रस्ताही मागे केव्हाच काळोखात बुडत आलेला. तरी आम्ही शेवटल्या धूसर प्रकाशात गाडी जेवढी पुढे नेता येईल तेवढी नेली. भंडारपानी गेटच्या जवळ पोहोचल्यावर ड्रायव्हर म्हणाला, ‘‘मॅडम अब बस हो गया, अभी वापस चलेंगे. आप को डर नही लगता क्या?’’ मग आम्ही परतू लागलो. आता तर पूर्णच काळोख झालेला. पुन्हा एकदा झाडा-झुडपांमध्ये भास व्हायला लागले. गवताची पाती जरा जास्तच सळसळतायत असं वाटू लागलं. जीपच्या मागच्या रस्त्यावरून जरा मोठा आवाज आला की आम्ही चहूबाजूने पाहू लागलो. एकतर ती उघडी जीप. गार झोंबणारा वारा. तिच्यावर छतही नव्हतं. सीताबनीचं जंगलही एकाच भूप्रदेशात असल्यामुळे कॉब्रेटसारखंच गवताळ आणि म्हटलं तर मेन पार्कपेक्षा अधिकच मस्त. पण हे सर्व तेव्हा परतताना नव्हतं जाणवलं. कारण मनात भीती साचत चालली होती. अखेर आम्ही बफर झोनबाहेर गावच्या रस्त्याला लागलो व कंदील घेऊन चालणारे गावकरी भेटू लागले. तेव्हा कुठे हायसं वाटलं.
मध्यंतरी एका हिलस्टेशनला गेले होते. तेव्हा तिथं अजिबात गर्दी नव्हती. गावही कसं निवांत पडलं होतं. कोणालाच कसलीही घाईगर्दी नव्हती. माणसं बिझी नसल्यामुळे बोलायला मोकळी होती, मोकळी होऊन बोलत होती. चालाय-फिरायला रस्ते मोकळे होते. असाच निवांतपणा मिळाला तो पचमढीला. आम्ही नेमके पचमढी गाव बंद असणा-या दिवशी जाऊन पोहोचलो होतो. त्यामुळे एखादं पर्यटकांनी एरवी गजबजलेलं गाव शांतता कशी पांघरून घेतं, हे जाणवलं. जंगलात असताना कधीही ठरवून चालू नका की, आता या वेळेस आपल्याला अमुक एक प्राणी दिसेल. तसं कराल तर घोर अपेक्षाभंग होईल. उलट डोक्यात कोणत्याही कल्पना न ठेवता जाल तर नक्कीच काहीतरी पाहायला मिळेल. माझ्या जंगल सफरींमध्ये मला भालू, वाघ, बिबटय़ा, रानकुत्री हे सर्व असेच अचानक भेटले आहेत. नागझिराला गेल्यावर सर्वच जण रानकुत्र्यांच्या मागे होते. तिथं चिक्कार रानकुत्री दिसतात. भालूही दिसतात. पण आम्ही गेलो तेव्हा दोन-तीन दिवस भालू कुठे गडपच झाले होते. आणि अखेर जायच्या दिवशी सकाळी आमच्या समोर एक अस्वल कितीतरी वेळ येऊन चालत राहिले. बांधवगढला भेटलेल्या बामेरा मेल वाघासारखी.
प्रवास करताना सतत मनात काहीतरी शोध असू द्यात. आजूबाजूच्या निसर्गाशी बोला, माणसांशी बोला. बरंच काही सापडेल. माझी काही वर्षापूर्वी बरीच इच्छा होती की हॉर्नबिल प्रत्यक्ष जंगलात पाहावे; पण योग आला नव्हता. असंच एकदा गावी माल्रेश्वरला गेलेले असताना माझ्या घराच्या समोरच्या झाडावर येऊन एका संध्याकाळी अवचित धनेश येऊन बसले व माझी इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर दांडेलीच्या जंगलातल्या दरीत विहरणारे हॉर्नबिलदेखील पाहिले. मला हा अमुक प्राणी-पक्षी पाहायचा आहे, हे तुम्ही निसर्गाला सांगू शकत नाहीत आणि निसर्ग काही माणूस नाही जो तुमचं ऐकेल; पण थोडा धीर दाखवला तर निश्चितच काहीतरी गवसतं. म्हणूनच त्यासाठी वेळकाळ ठरवून जाऊन उपयोगी नाही. हे जे अद्भुत असतं ते कधीही घडू शकतं. पश्चिम बंगालच्या अगदी ग्रामीण भागात असणारं एक खेडं बेलून. तिथं गेल्यावर माझा वन्यजीव संशोधक मित्र म्हणाला की, आता आपण संध्याकाळी बाहेर पडू. मी म्हटलं, अरे नाही असं कसं संध्याकाळी काळोखात बाहेर जाणार? मनात लहानपणापासून संध्याकाळी-रात्री वगरे मुद्दामहून शेतात, जंगलात जाऊ नये असं ठसवलेलं वर येऊ लागलं. अखेर त्याच्या आग्रहामुळे सुमारे साडेसहा-सातला शेतं ओलांडून जंगलात गेलो. तर शहरात कधी न पाहिलेल्या नवलाईच्या गोष्टी समोर येऊ लागल्या. संध्याकाळी घरटय़ात परतणारे अनेक पक्षी पाहायला मिळाले. कोल्हे, जंगल कॅट, मुंगूस व इतर अनेक जंगली निशाचर प्राणी त्यांच्या वेळेनुसार बाहेर पडत होते. ते पाहायला मिळाले. आम्ही एका ठिकाणी मुक्काम ठोकून बसलो. तिथून आम्हाला सारं काही दिसत होतं. समोर नदी होती. एरव्ही मी जंगल पाहिलं ते सूर्यास्ताआधीचं, दिवसाकाठी असं सुरक्षित वेळेत. पण हा अनुभव काही वेगळाच होता. ऑफबीट पायवाट पकडा, वेळ चुकवा आणि बिनधास्त जा. नेहमीच संकट येतं असं नाही, त्या दृष्टीने तयारी ठेवून मगच वाटल्यास पाऊल टाका. आपल्यापैकी अनेकांनी हे केलंही असेल. त्यांना जरूर यातली गंमत कळली असेलच.
Link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=684,74,2436,1040&id=story6&pageno=http://epaper.eprahaar.in/26012015/Mumbai/Suppl/Page4.jpg