Translate

Tuesday, February 18, 2014

वाइन गुणिले पर्यटनाचं नफ्याचं गणित

                                                  

वाइन इंडस्ट्री आपल्या राज्यात स्थिरावली त्याला बरीच वर्ष झाली. आता वाइन पर्यटन म्हणजे वाइनरीज्मधली सहल लोकांना भुरळ घालतेय. वाइन पर्यटनाचं इथं बस्तान बसलं तर राज्यात परदेशी पर्यटकांकडून येणारा महसूलदेखील वाढेल. काळाची पावलं व लोकांचा कल पाहून वाइन इंडस्ट्री व राज्य शासनानेदेखील पर्यटन विकासात वाइन पर्यटनाला महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. अशीच एक सैर नाशिक जिल्ह्यातील ग्रोव्हर झाम्पा वायनरीची..

द्राक्षं काढणीचा हंगाम आला की नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यातल्या काही गावातलं चित्र भराभर पालटतं. ऐन थंडीच्या दिवसातही उबेला बसायचं सोडून माणसं लगबगीनं कामाला लागतात. रस्त्यांवर द्राक्षमळ्यांची दिशा दाखवणारे बोर्ड ठोकले जातात. गावांची छान साफसफाई केली जाते. मळ्यातली कामं संपल्यावर माणसं पारावर बसून पाहुण्यांची वाट पाहायला लागतात आणि दर सीझनप्रमाणे पाहुण्यांच्या गाड्या रस्त्यावर धुळीचे फर्राटे सोडत गावात शिरतात. सहसा गावांमध्ये शहरी संस्कृतीला थारा नसतो असं म्हटलं जातं, पण द्राक्षाच्या लेकीचं माहेरघर असणा-या गावांमध्ये जेव्हा शहरी भागातले धनिक-वणिक येऊन ठेपतात, तेव्हा उत्तर-दक्षिण ध्रुव एकत्र आल्यासारखं वाटतं. त्यातूनच अशा प्रकारे दोन विभिन्न विश्वं एकत्र येतात. यातून काहींच्या गरजा पूर्ण होतात तर काहींना रोजगार मिळतो. राज्यातला वाइन उद्योग याचं एक उत्तम उदाहरण ठरला आहे. यातूनच आपल्याकडे काही वर्षापूर्वी वाइन पर्यटनाच्या एका वेगळ्या प्रवाहाची सुरुवात झाली आहे.
द्राक्षाचे मळे, त्यातच कुठेतरी सावली धरून टाकलेल्या शेड्स, भवतालचा खुला निसर्ग, हातात उंच, निमुळते, नाजूक असे काचेचे किणकिणाट करणारे वाइनचे ग्लास आणि त्यात मनमोहक रंगांनी डोळ्यांना व जिभेला सुखावणारी वाइन, असा सगळा माहोल वाइन इंडस्ट्री असणा-या गावांसाठी आता ओळखीचा झालाय. फ्रान्स, इटली, स्पेन, जर्मनी अशा काही देशांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्रातील वाइन उद्योगांनीही हा प्रयोग सुरू केला आणि वेगळेपणा म्हणून सुरू केलेल्या या संकल्पनेचे आजकाल मोठे इव्हेंट होऊ लागले आहेत. यातलेच एक वाइन उत्पादक म्हणजे ग्रोव्हर झाम्पा वाइन्स. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ असणा-या सांजेगावात ग्रोव्हर झाम्पा वाइन्सचं विनयार्ड आहे. वैतरणेच्या पाण्यावर पोसलेले हे द्राक्षाचे मळे ४० एकर जागेवर पसरलेत. वॅले द विन प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्रोव्हर झाम्पा विनयार्डस् याच्या संयुक्त मालकीची ही वाइन कंपनी आज देशातल्या वाइन उत्पादक कंपन्यांमध्ये दुस-या क्रमांकावर आहे.
ग्रोव्हर झाम्पा वायनरी सुमारे नऊ लाख लिटर वाइनचं उत्पादन दरवर्षी करते. त्यांच्या ब्रँडखाली झोम्पा, वन ट्री हिल रोड, ला रिझव्‍‌र्ह, शेने अशा काही व्हाइट, रेड, स्पार्कलिंग, रोझ वगैरे २६ प्रकारच्या वाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत व निर्यातही होतात. देशातली दुसरी उत्तम वाइन कंपनी असणा-या ग्रोव्हर झाम्पानं २००५ मध्ये वॅले द विन कंपनीशी हातमिळवणी केली. त्यांच्या अनेक वाइन्सना देश-विदेशात पुरस्कार मिळाले आहेत. बंगळूरुमध्ये नंदी हिल्सवर त्यांचं ४१० एकरवर पसरलेलं विनयार्ड आहे. वाइन पर्यटन करण्यासाठी सांजेगावात आलेल्यांना द्राक्षांनी भरलेल्या बकेटमध्ये नाचायला मिळतं, त्याची गंमत घ्यायला शहरातून गाड्या भरून माणसं येतात. त्यांच्यासाठी सर्व उत्तम सुविधा इथं उपलब्ध आहेत. दोन दिवस मुक्काम करायचा असल्यास कॅम्पसाइटपण आहे. तसंच एक दिवसाची वीकेंड टूरदेखील आहे. ज्यात द्राक्षाच्या मळ्यातून फिरता येतं, वाइन टेस्टिंग करता येतं व असं बरंच काही करता येतं. शुल्क भरून या टूरमध्ये गेल्यावर द्राक्षाच्या बागायतीची माहिती, वाइन कल्चरची माहिती पुरवली जाते. विविध प्रकारच्या वाइन्सची चव चाखायला मिळते. वाइनचा कारखाना दाखवला जातो, ज्यात वाइन साठवली जाते, मुरवली जाते ती बॅरल रूम, टँक्स पाहायला मिळतात. विविध वाइन्स कोणत्या प्रकारच्या निरनिराळ्या द्राक्षांपासून बनतात, याची मनोरंजक माहिती मिळते. कारखान्यात फिल्टरिंग, बॉटलिंग, पॅकेजिंग इत्यादी प्रक्रिया बघायला मिळतात.
नाशिक जिल्हा भारताची नापा व्हॅली किंवा वाइन कॅपिटल मानला जातो. इगतपुरी पट्ट्यात उत्तम वाइन बनवणा-या कंपन्यांची विनयार्डस् आहेत. या सर्वानीच विनयार्ड पर्यटनाची कल्पना उचलून धरली आहे. लोकांकडून मिळणा-या पैशांपेक्षा त्यांच्याकडून होणा-या तोंडी प्रसिद्धीची या कंपन्यांना जास्त गरज आहे. आपल्याकडची विनयार्ड सहल इतरांपेक्षा वेगळी कशी करता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. त्यातूनच मग वेगवेगळे वाइन फेस्टिव्हल्स आयोजित केले जातात. ग्रोव्हर झाम्पानेही सिनेतारकांच्या सह्या असलेल्या व देशातील काही उत्कृष्ट चित्रकारांची चित्रं असलेल्या वाइन बॉटल्सचा लिलाव करून यात नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला. शहरातल्या कोणत्यातरी हॉटेलमध्ये जाऊन वाइन ऑर्डर करण्यापेक्षा प्रत्यक्ष वायनरीज्मध्ये जाऊन आराम करत, आवडीचं संगीत ऐकत वाइन चाखण्याची मजा निराळीच आहे. अर्थात त्यासाठी शहरातून थोडं लांब जावं लागतं, पण वीकेंड सहलींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
राज्यातील ७२ वायनरीज देशातल्या एकूण वाइनपैकी ८० टक्के उत्पादन करतात. तीस हजार हेक्टर शेती वाइनसाठी लागणा-या द्राक्षांसाठी केली जाते.
एमटीडीसीकडूनही वाइन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होत आहेत. नुकतंच गेल्या वर्षी गंगापूर धरण परिसरात पर्यटन विकास करण्यासाठी जे ४० कोटी रुपये राज्य शासनानं मंजूर केलेत त्यात वाइन पर्यटनाचाही समावेश आहे. भविष्यात वाइन पर्यटनाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास या पर्यटन प्रकारातून मिळणारा महसूलही वाढेल, अशी वाइन उत्पादकांना आशा आहे. एकूणच वाइन इंडस्ट्रीमधल्या स्पर्धेची पताका आता वाइन पर्यटनानं खांद्यावर घेतली आहे. नाशिकशिवाय पुणे, बारामती, सातारा, अकलूजमध्येही वायनरीज् सहली आयोजित केल्या जात आहेत. विविध स्पर्धा, ग्राहकांना वाइनच्या किमतीत सवलत, काही वाइनरीजमध्ये राहण्याची सोय अशा काही आकर्षणांनी वाइन पर्यटनाला चांगले दिवस आणण्याचे प्रयत्न होत आहेत. वाइन पर्यटनानं एकाच वेळी व्यावसायिक व स्थानिकांसाठी रोजगार निर्माण केला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात आणि आसपास ५० वायनरीज् आहेत. अकलुजला फ्रॅटेली वायनरी, बारामतीजवळ युबी ग्रुपची फोर सीझन्स वायनरी, नाशिक जिल्ह्यात शातो देओरी, यॉर्क वायनरी अशा कितीतरी वायनरीज् राज्यात आहेत. यातील ब-याच वायनरीज् वाइन पर्यटन सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत, काहींनी ते आधीच सुरू केलं आहे. वाइन पर्यटनाचा जम बसायला थोडा वेळ लागतो आहे, कारण कोणतीही कल्पना रुजायला अर्थकारणाची त्यात मोठी भूमिका असते. राज्यातील वाइन इंडस्ट्रीचा बिझनेस पुन्हा जोमाने बहरला, तर वाइन पर्यटनालाही यशाचा रंग मिळू शकतो.
This article is published in www.prahaar.in on 16th February,2014 here is the link to published article http://prahaar.in/collag/184870

Sunday, January 19, 2014

काझीरंगाच्या रंगात..


आसामच्या छोट्या  निसर्गरम्य खेड्यांनी वेढलेलं काझीरंगा.. नजर जाईल तिथपर्यंत भातशेती व एलिफंट ग्रास (हत्तीगवत) पसरलेलं. मध्येच नजरेला विसावा देण्यासाठी चहाचे मळे व दूरवर दिसणा-या कार्बी अँगलॉँगच्या डोंगररांगा. या खेड्यांमधून जाता जाता काझीरंगाचं अरण्य नेमकं कधी सुरू होतं ते कळत नाही पण शेतांमध्ये राबणा-या माणसांमध्ये अचानक गेंडे व हत्ती दिसायला लागले की समजायचं काझीरंगात आलोयत. गेली कित्येक वर्ष  आसाम म्हटलं की इथे  मानस  अभयारण्य , पवित्रा अभयारण्य असूनही सर्वाधिक उल्लेख होतो तो फक्त काझीरंगाचाच. आसामच्या पर्यटन विकासात अत्यंत महत्त्वाचं स्थान असणारं व युनेस्कोनं एकशिंगी गेंडय़ांसाठी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेलं काझीरंगा नॅशनल पार्क हे वन्यजीव अभ्यासक व पर्यटक दोघांसाठीही अफाट खजिन्यासारखं आहे
कधीतरी असे क्षण येतात जेव्हा आपण खूप काळ एखाद्या गोष्टीसाठी थांबलेलो असतो, ती गोष्ट अगदी एका झटक्यात होऊन जाते. जंगलाचं पानदेखील गेल्या दोन वर्षात न पाहिलेली मी, एखाद्या नशेखोर माणसासारखी जंगलातल्या मातीमधून व पात्यांमधून येणारा तो अनोखा गंध श्वासामध्ये मुरवून घेण्यासाठी वाट पाहत होते. जंगलात मुद्दामहून वाट चुकायला जाणारा शहरी मनुष्य सहसा पश्चाताप करत नाही. माझ्यासारख्या अनेक भटक्या लोकांना हे पटत असेल. त्यामुळे संधी मिळताच या वेळी दुसरी-तिसरीकडे न जाता थेट आसाममधल्या काझीरंगाचा रस्ता पकडायचा हे मनाशी ठरवलेलं होतंच. त्यामुळे अनपेक्षित संधी मिळताच मी कोहरा या काझीरंगामधल्या गावात उतरले होते. हातात कोणतंही बुकिंग वगैरे नव्हतं. पण असं सर्व करायला लागलं की एक बरं होतं की आपली वाट आपणच आखतो व झापडबंद घोडय़ासारखे ठरवलेल्या मार्गावरूनच जात नाही. भटकंतीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तो असाच येतो. अगदी गोहाटीपासून कोहरापर्यंत येण्यासाठी बसचं तिकीटही माझ्याकडे नव्हतं. ते मी आदल्या रात्री नऊ वाजता गोहाटीतल्या लॉजच्या नोकराला मदतीला घेऊन आसाम परिवहनच्या बस स्टँडवर जाऊन बुक केलं होतं. ही सकाळी नऊ वाजता गोहाटीवरून सुटलेली बस नॉनस्टॉप (एकच स्टॉप तोही पंधरा मिनिटांचा, नागाव गावात घेऊन) पाच तासांनी कोहरामध्ये पोहोचली होती. सुदैवाने मित्राचं बीबीसीसाठी शूट सुरू होतं, त्यांची टीम माझ्यासाठी वाटच पाहत होती. त्यांच्यामुळे अर्थातच काझीरंगा अधिक वेगळ्या बाजूंनी पाहण्याची संधी मिळाली. पण एक आहे की, जंगलात तुम्ही कितीही फिरलात तरी जंगल कधीही पूर्णपणे वाचता येत नाही. असल्या चार-पाच दिवसांच्या फे-यांमध्ये तर मुळीच नाही. पण शहरात राहून उबगलेल्या मनाला थोडा तजेला मिळवून देण्यासाठी एवढा मुक्काम पुरेसा होतो. तसं अनेकदा काझीरंगाचं जंगल ब्रह्यपुत्रेच्या पुरात बुडून गेलेलं टीव्हीवरील दृश्यांमध्ये पाहिलेलं. पुराच्या पाण्यात पोहण्याचा व जीव वाचवण्याचा निकराचा प्रयत्न करणारे प्राणी पाहून जीव गलबलून यायचा. त्या दृश्यांवरूनच काझीरंगाचा विस्तार किती अफाट आहे याची कल्पना आली होती. आणि आता तर प्रत्यक्ष तिथेच उभे होते. तिथल्या आदिम रहिवाशांची नजरभेट होईल या उत्सुकतेने.
काझीरंगा ४७० चौरस किलोमीटर इतकं पसरलेलं आहे. भारतीय वन्यजीवांतील बिग फाइव्हपैकी चार म्हणजे हत्ती, वाघ, बिबटय़ा व गेंडा हे काझीरंगात आढळतात. तसं म्हटलं तर काझीरंगा ज्यांच्यासाठी ओळखलं जातं त्या गेंडय़ांचं दर्शन बागुरी रेंजमधील गावांपासूनच सुरू होतं. कोहराला पोहोचण्याआधी लागते ती बुरापहार व बागुरीची रेंज. त्याच वाटेवर बाजूला जाणारी आगरतोलाची रेंजपण आहे. बागुरी गाव काझीरंगाच्या चार रेंजेसपैकी एक. काझीरंगा चार रेंजमध्ये विभागलेलं आहे. आगरतोली, बुरापहार, कोहरा व बागुरी. यापैकी बुरापहारमध्ये होणा-या चोरटय़ा शिकांरीमुळे त्याची थोडी दुष्किर्ती झाली आहे व अजूनही इथं अशा शिकारी होतच असतात. त्यामुळे पर्यटकांना शक्यतो ही रेंज मनमोकळेपणे पाहता येत नाही. इथल्या चोरटय़ा शिकारीला आळा बसावा म्हणूनच खरं तर ही रेंज काझीरंगा अरण्यात वाढवण्यात आली. पण परिणाम उलटाच झाला. गावातल्या लोकांमध्ये फारसा उत्साह नसल्यामुळे इथं पर्यटक फारसे जात नाहीत. शिवाय सेंट्रलचा विस्तारच एवढा मोठा आहे की हौशी पर्यटकांची भूक भागवण्यासाठी सेंट्रलची रेंज पुरेशी होते.
http://prahaar.in/wp-content/uploads/2014/01/kaziranga-elephant.jpgगेल्या सप्टेंबरमध्ये आलेल्या पुरामुळे या वेळी इस्टर्न आगरतोलीची रेंज काही काळाकरता बंद होती. त्यामुळे माझ्याकडे फक्त बागुरी ही वेस्टर्न रेंज व सेंट्रल रेंज करण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. पण कोणत्याही जंगलात पहिल्यांदाच फिरताना रेंजची आवडनिवड फारशी पाहायची नसते. तो दिमाख करायचा तो एकाच जंगलात दहाव्यांदा जाताना. तर खास गेंडा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सेंट्रल रेंजमध्येच फिरवलं जातं. इथं गेंडा अगदी हौस फिटेस्तोवर पाहायला मिळतो. गेंडा इथल्या लोकांसाठी अगदी दारातला प्राणी आहे. एकाच शेतात काम करणारे शेतकरी व गेंडा चरताना दिसणं इथं कॉमन दृश्य आहे. गेंडा हा मख्ख प्राणी आहे, असं प्रथमदर्शनी वाटतं पण तसं नाही. गेंडय़ाला नजर कमी असली तरी त्याचे कान व नाक अत्यंत तीक्ष्ण आहेत व तो वरकरणी शांत राहून सुखासीन चरत असला तरी वेळेला गेंडा अत्यंत धोकादायक प्राणी आहे. सेंट्रल रेंज बरीचशी फिरून झाल्यावर मी वेस्टर्न रेंजला जायचं ठरवलं व त्याच संध्याकाळी सेंट्रल रेंजमध्ये चवताळलेल्या गेंडय़ाने पर्यटकांच्या जीपवर हल्ला करून जीप उलटी केली. परंतु हत्तीवरून किंवा जीपमधून फिरताना एकटय़ा गेंडय़ाला कॉर्नर करून जवळून पाहण्यासाठी त्याला चहूबाजूने हत्तींनी किंवा जीप्सीज्नी घेरल्यावर असे प्रसंग घडणं साहजिक आहे. इथल्या तळ्याकाठी व शेतात निवांत चरणारा गेंडा अधेमधे चहाच्या मळ्यांमध्येही शिरतो व चहामळ्यातील कामगारांची धावाधाव होते. इथल्या विस्तिर्ण गवताळ प्रदेशामुळे काझीरंगा गेंडय़ांसाठी नंदनवनच आहे. इथं एलिफंट ग्रास म्हणजे ज्यात अगदी हत्तीदेखील लपून राहू शकतो इतक्या उंचीचं गवत मुबलक आहे, त्यामुळे यात लपलेला गेंडा अगदी जवळ गेल्यावर अवचित उठून उभा राहिपर्यंत त्याचा अंदाजच येत नाही. त्यातही पिल्लासोबत फिरणारी आई असेल तर शक्यतो त्यांच्यापासून दूरच राहिलेलं बरं. त्यांच्याकडून अचानक हल्ला होण्याचा संभव असतो. पण काझीरंगात सध्या तरी गेंडा पाहण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. इथं गेल्या वर्षीच्या गणनेनुसार २२९० गेंडे आहेत. अर्थात त्यांच्यापैकी किती पोचर्सच्या रेडारवर याचा पत्ता तर खुद्द इथल्या सरकारलाही नाही अशी माहिती माझ्या बसमधील सहप्रवाशाने दिली होती. काझीरंगाच्या जंगलात मिलीभगत नाही तर दहशतीने चोरटी शिकार होते. एक तर काझीरंगामध्ये दाट व उंच गवतात लपलेले प्राणी पर्यटकांना पाहण्यासाठी शोधूनच काढावे लागतात. गाइड मदतीला असतात तरीही जीपमधून फिरताना गेंडय़ाखेरीज इतर पाहिजे तो प्राणी दिसेलच याची शाश्वती नाही. इथल्या सुजाण लोकांशी बोलताना जाणवलं की त्यांनाही गेंडय़ांची अशाप्रकारे चोरटी शिकार वाढत असल्याची खंत व हळूहळू भारतातून तो नामशेष होईल याची भीती आहे. शिवाय दर पावसाळ्यात येणा-या पुरामुळे असंख्य प्राण्यांनाही प्राण गमवावे लागतात, ही नैसर्गिक आपत्ती आहेच.
http://prahaar.in/wp-content/uploads/2014/01/kazirznga.jpgकाझीरंगात १०६हून अधिक वाघदेखील आहेत पण इथला वाघ दिसणं तसं दुरापास्तच. हे देखील चोरटय़ा शिकारीला बळी पडत आहेत. काझीरंगात वाघ पाहायचा असेल तर जंगल चाळण लावून पाहावं लागतं. परंतु काझीरंगाच्या वैभवात भर घालण्यासाठी इथं पेलिकन, बेंगाल फ्लोरिकनसारखे सुंदर व दुर्मीळ पक्षीदेखील आहेत. काझीरंगाचं जंगल वॉचटॉवरवर जाऊन पाहण्यापेक्षा तळ्याकाठी बसून आरामात पाहावं. अर्थात तळ्यावर उतरताना आधी आसपास गेंडा किंवा हत्ती नाही ना याची खात्री करून घ्यावी. तळ्यावर जाण्यासाठी योग्य वेळ म्हणजे संध्याकाळ होण्याच्या जरा आधीची. दिवसभर तहानलेले पक्षी व प्राणी याचवेळी सांजसावल्या पडत असताना तळ्यावर येतात. तेव्हा त्यांना जीव भरून पाहता येतं. काझीरंगात सोहोला, हारमोटी, मिहीमुख, काढपारा व फोलियामारी असे वॉचटॉवर्स आहेत. यातले काही तळ्यांच्या काठीच आहेत. काझीरंगाच्या जंगलात हत्ती व जंगली म्हशीदेखील पाहायला मिळतात. हत्ती तर भारतातल्या कोणत्याही जंगलात दिसतातच, त्यामुळे खरं तर हत्ती पाहण्यासाठी एवढी उत्सुकता नव्हती. परंतु फिरता फिरता आमच्या पुढय़ात हत्तीचं एक नाचरं पिल्लू आलं. या पिल्लाने आमचं चांगलंच मनोरंजन केलं. ते रस्त्यात मध्येच उभं असल्याने त्यानं आधी जावं मग आपण अशी जंगलची रितच आहे. पण हे पिल्लू झाडीमध्ये जाण्याऐवजी मध्येच छानपैकी पायांचा ताल धरून नाचत होतं, त्याचं कारण तर कळलं नाही पण त्याला पाहताना मात्र मजा आली. पाळीव हत्ती नाचताना नेहमीच सर्कशीत बघितले मात्र या जंगली हत्तीच्या पिल्लाला रस्तात असं मध्येच उभं राहून नाचताना पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. त्याला सोडून पुढं आल्यावर गवताळ मैदानात बारशिंगा (स्वॅम्प डिअर) हरणांची मोठी फौजच चरत उभी होती. त्यातच काही भेकरं पण होती. दोन-तीन फुटबॉल ग्राउंडएवढय़ा मोठय़ा अशा त्या हिरव्यागार गवताळ प्रदेशात एकाचवेळी गेंडा, हरणं, भेकरं, जंगली म्हशी, रानटी डुक्कर असे प्राणी एकत्र चरताना पाहायला मिळण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. त्यातच जवळ तळं किंवा पाणथळ असेल तर काही पक्षीदेखील या समूहात उतरलेले दिसतात. जगभरातून पर्यटक भारतातली जंगलं पाहण्यासाठी का येत असावेत याचं कारण काझीरंगात डोळ्यांदेखतच दिसतं. गवताळ प्रदेशानं व्यापलेलं काझीरंगा विविध प्रकारच्या व सवयींच्या प्राण्यांसाठी राहण्याचं एक अत्यंत उत्तम अरण्य आहे. एका अर्थाने दक्षिण आफ्रिकेच्या मोठमोठय़ा गवताळ जंगलांना भारताकडून मात देणारं काझीरंगा.. खरोखरीच एकदा अनुभवलंच पाहिजे असं.
http://prahaar.in/wp-content/uploads/2014/01/kaziranga-deer.jpgकाझीरंगाला कसं जाल?
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. राष्ट्रीय महामार्ग ३७ काझीरंगातून जातो. त्यापैकी वेळ वाचवणारे मार्ग म्हणजे विमानाने थेट गोहाटी किंवा जोरहाट किंवा तेझपूपर्यंत जायचं. अन्यथा रेल्वेने तिथं पोहोचायचं. तिथून बसने कोहरापर्यंत यायचं. तेझपूर किंवा जोरहाटपासून बसने काझीरंगापर्यंत पोहोचायचं असेल तर किमान तीन ते चार तास लागतात. थेट गोहाटीवरून कोहराला जाण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. किमान वेळ देण्याचं कारण म्हणजे केवळ आसामच नाही तर पूर्ण पूर्वाचलातच रस्त्यांची कामं सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी पोहोचण्याची निश्चित वेळ देता येत नाही. कोहरा, बागुरी व आगरतोली रेंजमध्ये फॉरेस्टची रेंज ऑफिसेस आहेत. तिथं जीप व गाइडचं बुकिंग करता येतं. शिवाय आसाम पर्यटन खात्यातील माणसं खूप कार्यतत्पर आहेत. तिथल्या कोणत्याही फोन नंबरवर फोन केल्यास एका फोनवरच तुम्हाला सर्व माहिती मिळते व तुमची सर्व सोय होऊ शकते.
काझीरंगात राहण्याची सोय
काझीरंगाला यायचं म्हणजे कोहरा गावात उतरायचं. कोहराच्या आसपास बरीच गेस्ट हाउसेस व रिसॉर्टस आहेत. वनखात्याचीही तीन रेस्ट हाउसेस पर्यटकांसाठी उपलब्ध असतात. त्यांचं बुकिंग खूप आधी करावं लागतं. ते नाहीच मिळालं तर वाइल्ड ग्रास रिसॉर्ट, आयोरा रिसॉर्ट, इकोरा गेस्ट हाउस ,-हायनो गेस्ट हाउस व इतरही काही पर्याय आहेत. यांचे दर दिवसाला माणशी नऊशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत.
http://prahaar.in/wp-content/uploads/2014/01/elephant-1.jpgजंगलात हत्तीवरुन सफारी
काझीरंगा अरण्य पाहताना हत्तीवरल्या सफारीचा अनुभव जरूर घेण्यासारखा आहे. भारतातील इतर जंगलांमध्ये (उत्तरांचलचं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क सोडल्यास) हत्तीवरून दाट गवताळ जंगलात फिरण्याची अशी मजा येत नाही. शिवाय हत्तीवर असल्यामुळे दाट गवतात लपलेले प्राणी हुडकून पाहता येतात. काझीरंगात पहाटे पाचपासून ते सहा वाजेपर्यंत ही सफारी मिळते. त्याचा दर माणशी ५७५ रुपये आहे. हत्तीवर तिघांना बसावं लागतं. पण एकटय़ालाच बसून फिरायचं असल्यास तसंही बुकिंग करता येतं, मात्र ते पर्यटकांच्या संख्येवर अवलंबून असतं. सेंट्रल रेंजमध्ये सध्या आठ-दहा पाळीव हत्ती आहेत.
 This article is published in Marathi news daily 'Prahaar' on 5th January, 2014. here is the link- http://prahaar.in/collag/171624