Translate

Tuesday, April 16, 2013

१५० दिवसांची सागरी साहसगाथा-Sagar Parikrama-2


                                                        
३१ मार्च २०१३ रोजी भारतीय नौदलाच्या म्हणजेच पर्यायाने भारताच्या खात्यात एक अभिमानास्पद जागतिक विक्रम जमा झाला. या विश्वविक्रमासाठी कोणतीही स्पर्धा घेतली गेली नव्हती किंवा इतर खेळांप्रमाणे कोणत्याही लांच्छनास्पद प्रकारे आता भारताकडून हा विक्रम हिसकावून घेतला जाईल अशी शक्यता देखील नाही, या उलट हा विक्रम करणाऱ्या तरुणाने धाडसाचा कहर केलाय आणि अवघ्या पाच  महिन्यात विनाथांबा कोणाच्याही मदतीशिवाय तेही एकट्याने म्हादेई या छोट्या शिडाच्या नौके(यॉट)मधून २१,६०० समुद्री मैलांची म्हणजेच ४१,४०० किलोमीटरची सागर परिक्रमा पूर्ण करून जगाला त्याची दखल घेणं भाग पाडले आहे. लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांच्या विजयी सागरस्वारीने भारतीय नौदलाच्या इतिहासात नवे मापदंड रोवले गेले आहेत. विश्वविक्रमांच्या नोंदी जरी कागदावर होत असल्या तरी त्यांना जन्माला घालण्यासाठी कोणत्याही संकटाना तडीपार भिरकावण्याची जिगर लागते आणि तरच ‘सागर परिक्रमा’ सारखे विक्रम जगाच्या नकाशावर घडतात. असं म्हणतात कि मिळालेल्या संधीचं सोनं करावं, संधी दुसऱ्यांदा चालून येत नाही वगैरे पण म्हादेई आणि अभिलाष यांच्या बाबतीत गोष्ट वेगळी होती, संधी दुसऱ्यांदा त्यांच्याकडे आली होती. यापूर्वी अभिलाष यांनी केप टाऊन ते गोवा प्रवासात म्हादेईची धुरा एकट्याने सांभाळली होती. बोटीतून एकट्याने जगप्रवास करण्याच्या ‘धाडसी’ अभिलाषेला तेव्हाच खतपाणी मिळाले होते पण कोणत्याही साहसाची ठराविक अशी रेसिपी कोणत्याही पुस्तकात लिहिलेली नसते कि ती वाचल्यावर एक छानसे सुंदर साहस साकारता येतं. अशा साहसगाथा नेहमी नेहमी लिहिल्या जात नाहीत आणि त्या प्रत्यक्षात उतरवताना कुठेही एकदा झालेली चूक निस्तरण्यासाठी आपण पुन्हा जिवंत राहूच याची खात्री देता येत नाही. एका क्षणी आपल्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ या पृथ्वीतलावर नाही अश्याच आत्मविश्वासाने आलेल्या आव्हानाला तोंड द्यावे लागते. याच वृत्तीने धाडस, साहस, कर्तबगारी, थरार इत्यादी पुस्तकी शब्दानाही फिकी पाडेल अशी हिंमत दाखवून भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी थेट समुद्रालाच आव्हान देत त्याच्यावर सत्ता काबीज करून १५० दिवसात सागर परीक्रमेचा विक्रम खिशात घातला. त्यांच्या या थरारक प्रवासाची खबर देश-विदेशात घेतली गेली कारण अश्या प्रकारे १५० दिवसात कोणत्याही बंदरावर न थांबता आणि अगदी संकटसमयी देखील कोणाचीही मदत न घेता पृथ्वीच्या परीघरेषेवरून जलप्रदक्षिणा करणारे अभिलाष जगातले ७९ वे आणि आशिया खंडातले दुसरे दर्यावर्दी ठरले आहेत. पण या सागर परीक्रमेमधला कोणताही टप्पा आता मी लिहित असलेल्या कोणत्याही शब्दाइतका सोपा निश्चितच नव्हता तर अक्षरशः सत्व पणाला लावून अभिलाष यांनी सागर परिक्रमा-२ पूर्ण केली आहे. ३३ वर्षीय अभिलाष हे देखील आजच्या युवा पिढीचेच प्रतिनिधी आहेत आणि दूरचित्र वाहिन्यांवर चालणारे थिल्लर रियालिटी शोज पाहून वायफळ रोमांच अंगावर उमटवून घेणाऱ्या आजच्या पिढीने नक्क्कीच त्यांचा हा जलप्रवास अभ्यासावा असा आहे. ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटाच्या कथेपेक्षाही चित्तथरारक या सागर प्रवासाची कथा आहे.  थोडक्यात ओळख करून घेऊ यात या ‘सागरी’ साहसगाथेची..
म्हादेई बोटीचे सुकाणू वैमानिकाच्या हाती
भारतीय नौदलाची एक परंपरा आहे, बोट दुसऱ्या कप्तानाच्या ताब्यात देताना ‘ऑल युअर्स’ असं म्हटलं जातं. गेल्या वर्षी अभिलाषच्या हातात बोटीचे सुकाणू सोपवताना अभिलाष यांचे गुरु कमांडर दिलीप दोंदे यांनीदेखील त्यांना हेच सांगितले होतं. पण बहुदा कमांडर दोंदे यांनी म्हादेईला देखील अभिलाषच्या बाबतीत ‘‘ऑल युअर्स’ असंच म्हटलं असावं कारण तेव्हापासून म्हादेईने आणि अभिलाषने एकमेकांची साथ संकटातही सोडलेली नाही. लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी हे नौदलाच्या वायुसेनेत वैमानिक आहेत मात्र त्यांचे सेलिंगचे ज्ञान आणि प्रेम पाहून एसपी-२ म्हणजे सागर परिक्रमा-२ साठी त्यांची निवड झाली. १ नोव्हेंबर २०१२ पासून सुरु झालेल्या सागर परिक्रमेच्या दुसऱ्या मोहिमेत मानसिक आणि शारीरिक बळाची कसोटी पाहणारे अनेक अवघड जीवावर बेतणारे प्रसंग आले मात्र म्हादेई आणि अभिलाष सर्व संकटांमधून तावून सुलाखून बाहेर पडले. याआधी नौदलाचे कमांडर दिलीप दोंदे यांनी केवळ चार बंदरांवर थांबे घेऊन आणि दोन मदतनिसांसह ( ज्यात अभिलाष यांनी म्हादेई नौकेची दुरुस्तीसाठी मदत केली होती ) २०१० साली जलप्रदक्षिणा पूर्ण केली होती. त्या अनुभवामुळेच सागर परिक्रमेच्या दुसऱ्या विनाथांबा मोहिमेसाठी अभिलाष यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. तब्बल पाच महिन्यांनी म्हादेई  नौकेच्या शिडाने वाऱ्याशी झुंज थांबवली आणि तिच्या कप्तानाच्या हातांनी देखील विश्रांती घेतली तेव्हा सागरानेही या दोघांच्या अथक जिद्दीला मनोमन सलाम ठोकला. भारतीय नौदलात प्रवेश केल्यापासून अभिलाष यांनी गेली १४ वर्षं जे सागर परिक्रमेचं स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाला अखेर सत्याची झळाळी मिळाली. विनाथांबा एकट्याने जगप्रदक्षिणा घालणारे जगातले पहिले नाविक ब्रिटनचे सर रॉबिन नॉक्स-जॉनस्टन यांनी अभिलाषचा विक्रम पूर्ण होण्याआधीच त्याचं अभिनंदन केले होते. साहसाला सीमा नसाव्यात म्हणूनच तर ते साहस ठरते असं अभिलाष यांचे मत आहे. सागर परिक्रमेच्या साहसात असणाऱ्या थरारापेक्षाही अनिश्चिततेचे आकर्षण वाटले म्हणूनच त्यांनी हे शिवधनुष्य उचलले. पाच महिने एकट्याने हा संपूर्ण जलप्रवास करण्याचेही आकर्षण देखील  आव्हान स्वीकारण्यामागे होते. झपाटलेपणाला कोणत्याही मर्यादा नसतात. एकदा का साहसाला सुरुवात केली कि हे झपाटलेपण अंगावर सतत बाळगूनच राहावं लागतं. त्यातच जर समोर खिजवणारा समुद्र प्रतिपक्षात असेल तर निश्चितच साहसाला सीमा उरत नाहीत. नेमके हेच त्यांच्या बाबतीत घडले.
यशाची सहनायिका ‘म्हादेई’
या पूर्ण सागर परिक्रमेत दोनच गोष्टीवर ओरखडे पडले नाहीत त्या म्हणजे म्हादेई बोट आणि अभिलाष यांचे मनोबल. किंबहुना समुद्रावरचे अत्यंत खराब हवामान आणि वादळ-वारे झेलूनही म्हादेई सुखरूप राहिली आणि म्हणूनच अभिलाष यांची जिद्ददेखील प्रखर राहिली. यामुळेच अभिलाष यांचे गुरु कमांडर दिलीप दोंदे या परीक्रमेचे पूर्ण श्रेय अभिलाष इतकेच म्हादेईला देखील देतात. म्हादेईची मजबूत बांधणी गोव्यातल्या दिवार आयलंडवर असलेल्या अक्वेरीस फायबरग्लास या कारखान्यात श्री. रत्नाकर दांडेकर यांच्या खास देखरेखीखाली झाली होती. वास्तविक सागर परीक्रमेसाठी खास धाटणीची बोट बांधण्यासाठी अनेक बड्या कंपन्यांना विचारण्यात आलं होते परंतु अगदी गोवा शिपयार्डसकट मोठमोठ्या कंपन्यांनी एक छोटीशी यॉट बांधण्यात आर्थिक फायदा नसल्याचं पाहिल्यावर भारतीय नौदलाची हि यॉट बांधणं नाकारलं होतं. पण रत्नाकर दांडेकर आणि त्यांच्या अक्वेरीस फायबरग्लासच्या टीमने हे आव्हान स्वीकारलं आणि चार वर्षांपूर्वी म्हादेई अस्तित्वात आली. आयएनएसव्ही म्हादेई ही एक ५६ फूटी यॉट प्रकारातली नौका आहे. बोटीचे रचनाचित्र नेदरलँड्सच्या व्हान दे स्टट डिझाईन ब्युरो या कंपनीकडून मागवण्यात आले होते. बोट बांधण्यासाठी सुमारे एक वर्ष दोन महिन्यांचा कालावधी लागला होता. दांडेकर यांचे व्यावसायिक कौशल्य आणि त्यांनी जीव लावून केलेल्या मेहनतीमुळेच म्हादेई अप्रतिमरित्या साकार झाल्याचं कमांडर दिलीप दोंदे सांगतात. म्हादेईचे इतके कौतुक होत असताना रत्नाकर दांडेकर यांनी मात्र म्हादेई बांधताना मी स्वतः बोटीच्या कप्तानाच्या जागी असल्याची कल्पना केली आणि त्यामुळेच म्हादेईची बांधणी इतकी मजबूत घडल्याचे सांगितले. कमांडर दिलीप दोंदे आणि लेफ्टनंट कमांडर अभिलाष यांची प्रत्येकी एकच वेळा जगप्रदक्षिणा झाली असली तरी म्हादेईने फक्त चार वर्षांच्या आयुष्यात दोनवेळा जगाचा फेरा केला आहे. त्यादृष्टीने म्हादेई या दोघांनाही सिनिअर ठरली आहे. म्हादेई एव्हढी कणखर नसती तर कदाचित आमच्यापैकी एकाच्या फोटोला नक्कीच हार लागला असता असं विनोदाने दोंदे सर सांगतात. म्हादेई मजबूत होती म्हणूनच आमच्या दोघांच्याही जगप्रदक्षिणा यशस्वी झाल्या असं त्यांना वाटतं. अख्ख्या सागर परिक्रमेवर आतापर्यंत सुमारे चार लाख रुपये खर्च झाले आहेत मात्र परिक्रमेची खरी नायिका म्हादेई हिच्या बांधणीवर सव्वा चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे जगात सर्वप्रथम विनाथांबा एकट्याने शिडाच्या नौकेतून विश्वजलप्रदक्षिणा घालणारे सर रॉबिन नॉक्स यांची ‘सुहैली’ हि बोट देखील मुंबईतच बांधण्यात आली होती आणि भारतीय हातांनीच बनवलेल्या म्हादेईतुन दोन जलप्रदक्षिणा पूर्ण झाल्याचा दोंदे यांना अभिमान वाटतो. आतादेखील तब्बल पाच महिन्यांच्या खडतर जलसफरीनंतर ती  पूर्वीइतकीच नवी दिसत असल्याचं दोंदे म्हणतात. चार वर्षांनी खरं तर इतर बोटी बऱ्याच जुन्या दिसायला लागतात पण म्हादेईकडे पाहून तिने चार वर्षात दोन सागर परिक्रमा पूर्ण केल्या असतील यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. अजूनही म्हादेई सेलिंग स्पर्धेत उतरू शकते असा विश्वास त्यांना वाटतो. म्हादेई आणि अभिलाष यांच्याशी कमांडर दोंदे यांचे एक वेगळेच तरल नाते आहे. म्हादेई दांडेकरांच्या कारखान्यात बांधायला घेतली तेव्हापासून ते सागर परिक्रमेची दुसरी फेरी पूर्ण होईपर्यंत कमांडर दोंदे सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. सागर परिक्रमेच्या मोहिमेची अथपासून इतिपर्यंत तयारी करण्याची जबाबदारीही कमांडर दोंदे यांनी निभावली होती. अर्थातच त्यांनी स्वतः १९ ऑगस्ट २००९ ते १९ मे २०१० या काळात सागर परिक्रमेची पहिली फेरी जिंकली होती त्यामुळे त्यांच्या अनुभवाची मोठीच शिदोरी अभिलाष यांच्या पाठीशी होती. याच पहिल्या मोहिमेतला म्हादेईलाच घेऊन केप टाऊन ते गोवा आणि रिओ दि जानेरो ते केप टाऊन हे अंतर कापण्याचा अनुभव अभिलाष यांच्या हाताशी होता.
 म्हादेईच्या नावामागील कथा
कर्नाटकातील म्हादेई नदी गोव्यात येताना मांडोवी नाव घेते आणि मांडोवीच्या परिसरात सत्तरी तालुक्यात सुमारे हजार वर्षांपूर्वीचे नौदेवीचे मंदिर पाहायला मिळते. जहाजांची हि संरक्षक देवता असल्याचे मानले जाते. त्यामुळे नौदेवी आणि मांडोवी नदीच्या नावावरून भक्तिभावाने बोटीचे नावदेखील म्हादेई ठेवण्यात आले.

सागर परीक्रमेसाठी सुसज्ज म्हादेई...
पूर्णतः भारतीय बनावटीच्या म्हादेईचे शीड केप टाऊन येथील नॉर्थ सेल कंपनीकडून बनवून घेण्यात आले होते. डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरखेरीज पवनउर्जेवर चालणारा जनरेटरदेखील मदतीला होता. गरज लागल्यास सौरउर्जा यंत्रणाही बसवण्यात आली होती. बोटीच्या तळाशी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंपाची सोय बोटीवर आहे. तसेच कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी छोटी सनशेड बोटीवर एका बाजूला टाकण्यात आली होती. संपर्कासाठी एफबी-५०० हि अत्यंत महागडी यंत्रणा बसवण्यात आली होती.
म्हादेईच्या कप्तानाविषयी थोडेसे..
मूळचे केरळचे असणारे लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी हे भारतीय नौसेनेच्या वायुदलात २००१ साली वैमानिक म्हणून दाखल झाले. त्यांचे वडील निवृत्त लेफ्टनंट कमांडर व्हि.सी. टॉमी यांच्यामुळेच लहान वयातच अभिलाष यांची समुद्राशी ओळख झाली. अभिलाष वयाच्या सातव्या वर्षापासून पोहायला शिकले आणि कित्येकवेळा ते कुटुंबियांची नजर चुकवून समुद्रावर पोहायला जायचे. काहीसे अबोल, शांत आणि निगर्वी असले तरीही अभिलाष निडर आहेत त्यामुळेच हि परिक्रमा त्यांनी निभावून नेली. डॉर्निअर विमान चालवण्यात ते अत्यंत कुशल आहेत. मात्र नौकानयनात त्यांना फार पूर्वीपासूनच रस होता आणि त्यांनी नौदलात आल्यानंतर २००४ सालापासून यॉट सेलिंगला व्यावसायिकरित्या सुरुवात केली. खरे तर त्यांनी विमान चालवणे शिकण्याच्याही आधी यॉट सेलिंगचे धडे घेतले आणि कार ड्रायव्हिंग तर त्यांनी या दोन्हीनंतर आत्मसात केले. अभिलाष यांना वाचनाची खूप आवड आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे रोजच्या कंटाळवाण्या वाटणाऱ्या जगण्यातला नर्मविनोद हेरण्याचेही कसब आहे. त्यांना सेलिंगखेरीज फोटोग्राफी आणि गिटार वाजवण्याची देखील आवड आहे. आहाराने सध्या शाकाहारी असलेल्या अभिलाषची वेळप्रसंगी मांसाहाराला ना नसते.

सागर परिक्रमा-२ मधील परीक्षा घेणारे क्षण....
अभिलाष यांच्या मते वादळानंतर हेलकावणाऱ्या साउथ पैसिफिकच्या समुद्रात भर पावसात २५ मीटर उंच डोलकाठीवर चढून शीड बदलणे हा खरेतर आततायीपणाच होता. मात्र शीड अश्या प्रकारे फाटलेल्या अवस्थेत असताना बोट पुढे नेणे म्हणजे महामूर्खपणा झाला असता. परिस्थिती अशी होती कि डोलकाठीवर चढले किंवा नाही चढले तरीदेखील या ना त्या प्रकारे जीवावर बेतणारच होते. त्यामुळे वाघ म्हटले तरी खाणार आणि वाघोबा म्हटले तरी खाणार असा विचार करून अभिलाष निर्धार करून त्या उंच डोलकाठीवर चढले. हा सर्व नाट्यमय ’पराक्रम’ पार पाडण्यासाठी त्यांना सुमारे एक-दीड तास लागला होता. परंतु डोलकाठीच्या टोकावर पोहोचल्यानंतर एक प्रकारच्या अनोख्या चैतन्याचा आपल्यात वावर होतो आहे असेच क्षणभर अभिलाष यांना वाटले. तिथून समुद्रावर दूरपर्यंत नजर जात होती आणि तो नजारा त्यांच्यासाठी आजही अविस्मरणीय आहे. खाली उतरून या चढाई प्रसंगाचा व्हिडीओ पाहिल्यावर मात्र अभिलाष यांना आपण किती अशक्य कोटीतले साहस केले आहे याची जाणीव झाली आणि त्यांच्या अंगावर त्या आठवणीने आजही शहारे उमटतात. ऑस्ट्रेलियाजवळून जाताना म्हादेई मोठ्या वादळात सापडली त्यावेळी ते खरेच खूप धास्तावून गेले होते. महाभयंकर वादळात बोट चालवताना त्यांच्या जीवाचं पाणी पाणी झालं होतं परंतु त्यानंतर इतकी भयानक संकट झेलली कि त्या तुफानी वादळाचं आता त्यांना काहीच वाटत नाही. या दोन संकटांनीच त्यांची खरी सत्वपरीक्षा पाहिल्याचे अभिलाष सांगतात.
बोटीवरील अडचणींचा सामना...

तुफानी वादळे, ४०-५०-६० समुद्री मैलाच्या वेगाने वाहणारे झंजावाती वारे, समुद्रावरील अफाट काळामिच्च अंधार, समुद्री चाच्यांची भीती, दहा मजली इमारतीइतक्या उंचीच्या लाटा, भयानक उष्ण आणि थंड तापमानाचे प्रदेश अश्या बोटीच्या बाहेरील सर्व नैसर्गिक संकटांपुढे त्यांना बोटीच्या आतमध्ये उद्भवणाऱ्या अडचणी कमी त्रासदायक वाटायच्या. अर्थात याला अपवाद फक्त शीड फाटण्याचा प्रसंग होता. बोटीच्या इंजिनरूम मधली तेलगळती, जनरेटरमधील सतत बिघडणारे ऑईल प्रेशर, इंजिनाच्या कुलर यंत्रणेचा पंप आणि लीड सेन्सरमधील बिघाड, खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणाऱ्या यंत्राने केलेली हाराकिरी, फाटलेली स्लीपिंग ब्याग अश्या कितीतरी अडचणी येत होत्या. एकदा तर बोटीवरील सर्व घड्याळ्यांनी संप पुकारला आणि विविध वेळा दाखवायला सुरुवात केली तेव्हा अभिलाष यांची तारांबळ उडाली होती. मात्र सर्वात कठीण होते ते पाण्याचे दुर्भिक्ष्य ! २० मार्चला म्हादेईने विषुववृत्त ओलांडले पण त्याआधी १७ मार्चला बोटीवरील सुमारे २०० लिटरहून अधिक पाणी दूषित झाले आणि त्यामुळे पाण्याचा शेवटचा घोट संपण्याआधी म्हादेई मुंबईच्या किनाऱ्यावर परत नेण्याचे आव्हान अभिलाष यांच्यासमोर उभे राहिले. 

सफरीतील काही आनंदाचे मैल...
या मोहिमेवर असताना पाच महिने अभिलाष यांना बाहेरच्या जगात चालणारी सर्व हौस-मौज स्वप्नवतच होती. आधार होता तो फक्त त्यांच्या आवडत्या पॉपकॉर्नचा. बोटीवरील कोणतीही अडचण निस्तरली कि अभिलाष लगेचच पॉपकॉर्नच्या पिशवीकडे धाव घ्यायचे. अशी पॉपकॉर्न खाण्याची संधी त्यांना अनेकदा मिळत होती. त्यापैकीच एक होता २६ जानेवारीचा दिवस जेव्हा अभिलाष यांनी केप हॉर्नला वळसा घालून बोटीवर भारताचा तिरंगा फडकवला. केप हॉर्नला यशस्वीरीत्या घातलेला वळसा हा या मोहिमेतील एक महत्वाचा टप्पा होता. वर्षअखेरीस आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार २०१३ साली म्हादेईने आंतरराष्ट्रीय प्रमाणरेषा पहिल्यांदा पार केली पण सहा तासातच दुसऱ्यांदा देखील प्रमाणरेषा पार केली त्यामुळे भारतीय प्रमाणवेळेनुसार अभिलाष हे नववर्षाचे स्वागत करणारे आणि त्याचबरोबर मावळत्या वर्षाला निरोप देणारे पहिले भारतीय ठरले. काही समुद्रपक्षी आणि डॉल्फिन्स यांच्या अनोख्या सहवासात अभिलाष यांनी त्यांचा वाढदिवस देखील ५ फेब्रुवारीला बोटीवर साजरा केला. अश्या कित्येक मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण अनुभवांची नोंद अभिलाष यांच्या ब्लॉगवर  http://sagarparikrama2.blogspot.in/ वाचायला मिळते. सागर परिक्रमेवर लक्ष ठेवून असणाऱ्या चाहत्यांसाठी हा ब्लॉग ते या खडतर प्रवासातही वेळ मिळेल तेव्हा अपडेट करीत होते. तसेच फेसबुक आणि ट्विटरवरून देखील ते सर्वांशी संवाद साधत होते.
अभिलाष यांचे मनोबल टिकवणारा योग...
भल्याभल्या दर्यावर्दींचाही आत्मविश्वास उलथवून टाकणाऱ्या बेभान समुद्रात अभिलाष यांनी विचलित न होता नेहमीच थंड डोक्याने तारतम्य ठेवून अचूक निर्णय घेतले. कितीही प्रतिकूल हवामानात आणि समस्यांमध्येही त्यांच्या मनशक्तीला खिंडार पडले नाही याचे सर्व श्रेय त्यांनी योगाभ्यास आणि ध्यानधारणेला दिले आहे. बोटीवर असताना कमीतकमी अर्धा तास योगाभ्यास आणि ध्यानधारणा करण्याचा रिवाज त्यांनी सुरु ठेवला होता. त्यामुळेच त्यांना या महाकठीण मोहिमेचे दडपण जाणवलं नाही उलट अडचणी आणि आव्हानांकडे नेहमीपेक्षा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता आलं. ‘प्रहार’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले कि योगाभ्यास विरक्तीची भावना जोपासायला मदत करतो त्याचाही मला पाच महिने सर्वांपासून दूर राहताना फायदाच झाला. एकटेपणाच्या भावनेचं ओझंदेखील योगाच्या मदतीनेच कमी झालं. योगाभ्यासामुळेच मी अनेकदा विविध भास होत असताना देखील सतर्क राहिलो, अचूक निर्णय घेऊ शकलो आणि माझ्यावर बाह्यपरिस्थितीचा फारसा परिणाम मी फारसा होऊ देत नव्हतो त्यातही मला योगाभ्यासच हाताशी आला. आता म्हादेईपासून विलग राहावे लागणार आहे पण माझ्या या भावनिक गुंतवणुकीतून बाहेर पडायला मला योगाभ्यासाचीच मदत होईल असा विश्वास त्यांना वाटत आहे. कोइमतूरमधील इशा फाउंडेशन योगा सेंटरमधून त्याने योग आणि ध्यानधारणेचा अभ्यास केला आहे.

एकांतप्रिय दर्यावर्दी
अभिलाष यांच्याच शब्दात सांगायचं तर जमिनीवरल्या जगात असतो तेव्हा आपण विनाकारण बारीकसारीक गोष्टी मनाला लावून घेत असतो. आता सागर परिक्रमा पूर्ण केल्यानंतर तर मला जगातील थोडक्यात जमिनीवरील ९९ टक्के गोष्टी फिजूल वाटायला लागल्या आहेत. एकांतात राहिल्यामुळेच या गोष्टींची जाणीव झाली. त्यामुळेच कदाचित सागर परिक्रमा पूर्ण करून मी फार मोठा विक्रम केलाय असं वाटत नाही. पण निश्चितच भारतीय नौदलाच्या इतिहासासाठी हि एक अभिमानास्पद गोष्ट आहे असे सांगत अतिशय विनम्रपणे भारतीय नौसेनेचे अत्यंत कुशल वैमानिक लेफ्टनंट कमांडर अभिलाष त्यांनी केलेल्या विक्रमाची तारीफ करून घेणं टाळत होते. हा पूर्ण जलप्रवास एकट्याने तेही कोणाच्याही मदतीशिवाय करायचा असल्यामुळे प्रथम त्यांना घरातून आईचा खूप विरोध झाला. पण शेवटी लाडक्या मुलाने आईला या सफारीसाठी मनवलेच. परंतु पहिल्यापासूनच थोडं अबोल आणि मनस्वी असणाऱ्या अभिलाष यांना मुळात एकटे राहण्याचं आकर्षणच आहे. इतके दिवस एकटे राहताना तुमच्या मनात काय विचार येत होते असा प्रश्न त्यांना नेहमीच विचारला जायचा. ‘’मला पर्याय दिल्यास पुढील वेळी मी इंटरनेटशिवायच सागर परिक्रमा करेन कारण मला हा असा सर्व कोलाहलापासून दूर निवांत एकटेपणाच अधिक भावतो. खरंतर मी असंच राहणं जास्त पसंत करतो आणि मला एकटे असण्याचं नवल मुळात वाटतच नाही. अशावेळी तुम्हाला वेगळ्या ध्यानधारणेची गरज भासत नाही. त्यामुळे पाच महिने म्हादेईवर एकटे राहण्याची कल्पना उलट मला जास्तच आवडली होती.’’ भारतीय नौसेनेचे अत्यंत कुशल वैमानिक लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी ‘प्रहार’ला दिलेल्या मुलाखतीत एकटे राहण्यामागील त्यांचा विचार मांडला होता. म्हादेई बोटीवर संपर्कासाठी एफबी-५०० हि अत्यंत महागडी यंत्रणा बसवण्यात आली होती. काही कोटी रुपयांची ही संपर्क आणि दळणवळण व्यवस्था उपग्रहाद्वारे देण्यात आली होती. दर मिनिटाला अंदाजे २,५०० रुपये इतके तिचा वापर केल्यास खर्च होतात. या व्यवस्थेचा आवश्यक तेवढाच वापर करून अभिलाष या मोहिमेत सर्वांच्याच संपर्कात राहिले. शेवटच्या टप्प्यात असताना त्यांनी काही प्रसारमाध्यमांनाही मुलाखती दिल्या. लगेच तासनतास बकाल मुलाखतींचे अनावश्यक रतीब घालणाऱ्या टीव्हीवाहिन्या डोळ्यासमोर आणू नका जरी त्यांचं कामदेखील उपग्रहांद्वारेच चालतं कारण मोठमोठ्या उद्योगसमूहांचं आणि जाहिराती देऊन पुरस्कृत करणाऱ्या कंपन्यांचं ( आणि कोण जाणे कोणा कोणाचं !) त्यांना आर्थिक पाठबळ असतं. तेव्हा तिथे तुम्हाला दिसणाऱ्या प्रत्येक फ्रेममागे वाहिनीला लाखोवारी पैसे आधीच मिळालेले असतात. सागर परिक्रमा करताना मात्र अभिलाष आणि म्हादेई यांना अनेक बंधन पाळावी लागली त्यापैकी इंटरनेट आणि इतर संपर्क सुविधांचा कमीतकमी वापर हे बंधन अभिलाष यांनी स्वतःहूनच घालून घेतलं होतं. त्यांना एकटे राहण्याची सवय होत गेली आणि हे बंधन पाळणंदेखील सोपं होत गेलं. कित्येकवेळा बोटीवरील इतर कामांमुळे आणि बाहेरील दृश्य भान हरपवून टाकणारं असल्यावर बोटीवर संगणक आणि इंटरनेट असल्याचाही विसर पडायचा असं अभिलाष यांनी सांगितलं.
सागर परिक्रमा म्हणजे काय ?
लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांच्या आधी कमांडर दिलीप दोंदे यांनी २००९ ते २०१० या काळात १६५ दिवसात चार विश्रांतीथांबे घेत सागर परिक्रमा-१ पूर्ण केली होती. परंतु विनाथांबा आणि कोणाच्याही मदतीशिवाय सागर परिक्रमेचे साहस अंगावर घेण्यासाठी समुद्राला पुरून उरेल इतक्या धैर्याची गरज आहे. कारण या प्रकारच्या परिक्रमेत कोणत्याही परिस्थितीमध्ये बंदरावरून किंवा समुद्रावरील इतर बोटींची मदत घेता येत नाही. दुसरी अट म्हणजे केवळ शिडाच्या सहाय्याने बोट चालवत इंजिनाचा वापर न करता २१,६०० समुद्री मैलांचे अंतर कापणे अपेक्षित असते. परिक्रमेची सुरुवात जिथून होते तो किनारा सोडताना आणि परत त्या किनाऱ्याजवळ पोहोचल्यानंतरच इंजिनाची सुविधा वापरता येते. परिक्रमेच्या मार्गात तीन केप्सच्या उत्तरेने जात ( केप हॉर्न, केप ऑफ गुड होप आणि केप लिऊविन ) रेखावृत्त आणि विषुववृत्त (दोन वेळा) पार करावे लागतात. या मार्गात कोणत्याही कालव्यातून बोट काढता येत नाही.  
म्हादेईवरची मेजवानी
म्हादेईवर सुमारे ६०० लिटर गोड्या पाण्याचा आणि १५० किलो अन्नाचा साठा देण्यात आला होता. काही खाद्यपदार्थांची पाकिटे म्हैसूरच्या संरक्षण दलाच्या अन्न प्रयोगशाळेत बनवण्यात आली होती. दिवसाला अभिलाष यांनी निदान ५०० ग्राम अन्न खावे अशी त्यांना सूचना होती. अन्नामध्ये इन्स्टट खीर,भाज्या, व्हेज पुलाव, चिकन खिमा, पॉपकॉर्न, कॅडबरी चॉकलेट, ड्राय आईसक्रिम,गोड हलवा, भात, बटाटे,मक्याचे दाणे, बिस्किटं, खारवलेले पोहे, मासे आणि लिंबाच्या फोडी, लोणचे इत्यादींचा समावेश होता तर द्रवपदार्थात फळांचे रस, ताक, शीतपेये आदींचा समावेश होता. मात्र सततच्या परिश्रमाने अभिलाष यांचे पहिल्याच काही दिवसात १० किलो वजन कमी झाले होते.
परिक्रमेची सांगता..
म्हादेईने अपेक्षित वेळेतच म्हणजे १५० दिवसात ३१ मार्च २०१३ रोजीच परिक्रमा पूर्ण करून मुंबईच्या किनाऱ्याला स्पर्श केला. मात्र राष्ट्रपतींकडून कार्यक्रमासाठी पाच दिवसांनंतरची वेळ मिळाल्याने म्हादेई एक आठवडा आधीच मुंबईला पोहोचल्याची गोष्ट गुप्त ठेवण्यात आली. गेल्या सहा एप्रिल रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांचा सत्कार करण्यात आला . या सागर परिक्रमेमध्ये डोलकाठी तुटण्यापासून ते अगदी पाण्याचा तुटवडा, अश्या अनेक संकटांनी अभिलाष यांचा निग्रह विचलित करण्याचा प्रयत्न केला. परंतु अभिलाष हे जीवावर बेतू शकणाऱ्या अनेक कसोटीच्या क्षणांना केवळ मनोबलाच्या जोरावरच तोंड देत होते. आपल्या परीक्रमेचं श्रेय मात्र या सुपरहिरोने म्हादेई आणि तिची देखभाल करणारे मोहम्मद इस्लाम आलम यांना दिलं आहे. म्हादेईला सागर परिक्रमेवर निघण्याआधीचे वर्षंभर मोहम्मद आलम यांनी म्हादेईला तळहाताच्या फोडासारखं जपून तिची निगराणी ठेवली. त्यामुळेच म्हादेई मजबूत राहून तिनं सागर परिक्रमा-२ निभावण्यात मोलाची साथ दिल्याचं अभिलाष सांगतात. सागर परीक्रमेचे तीन आधारस्तंभ नौदलाचे माजी ध्वजाधिकारी व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी, कमांडर दिलीप दोंदे आणि म्हादेईचे शिल्पकार रत्नाकर दांडेकर यांच्याशिवाय हि परिक्रमा तडीस गेलीच नसती असंदेखील अभिलाष यांनी सांगितलं. त्याचबरोबर अभिलाष यांनी ‘सागर परिक्रमा-२’ चे पूर्ण श्रेय नौदलातील एअरफोर्सच्या दलाला (ज्यांनी वैमानिकांची कमतरता असूनही सागर परीक्रमेसाठी अभिलाष यांना हुरूप दिला ), त्यांची आई श्रीमती वल्सा, व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी, कमांडर दिलीप दोंदे, बोटीचे कर्ताधर्ता रत्नाकर दांडेकर आणि म्हादेईच्या सागर परिक्रमेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला समर्पित केले आहे.
शाळांमध्ये पोहोचली सागर परिक्रमा-२
इंटरनेटवर शोधल्यास फक्त सागर परीक्रमा-२ साठी सुमारे ७०,८०० रिझल्ट्स सापडतात. पण त्याहीपेक्षा अधिक कष्ट घेऊन मुंबईच्या स्वप्नाली धाबुगडे हिने सागर परिक्रमेला शाळाशाळांमध्ये पोहोचवण्याचे मोठे काम केले आहे. तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी मुंबई आणि जळगाव येथील हर एक शाळेत जाऊन इयत्ता ७वी ते ९वी मधील विद्यार्थ्यांना सागर परिक्रमेच्या मोहिमेची सखोल आणि सचित्र माहिती दिली. त्यांच्या या ‘सागर परिक्रमा जागरुकता अभियाना’मुळे आत्तापर्यंत सुमारे ३ हजारांहून अधिक मुलांना या धाडसी मोहिमेची ध्वनीचित्रफितीतून माहिती मिळाली आहे. या अभियानात मुलांना मोहिमेचा हेतू, म्हादेई बोटीची रचना, पृथ्वीवरील खंड, प्रवासाचे सागरी मार्ग, हवामान आणि समुद्राशी निगडीत इतर भौगोलिक माहिती देण्यात येते. सध्याच्या शाळांच्या सुट्ट्या संपल्यानंतर या अभियानाचे वर्ग पुन्हा सुरु होतील. भारतीय नौदलाच्या जनसंपर्क खात्यानेही या अभियानाचे कौतुक केले आहे. सागर परिक्रमेची शालेय विद्यार्थ्यांना माहिती द्यायची असल्यास इच्छुकांनी sailwithmhadei@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा.
सागर परिक्रमा-३ कधी ?
पाच महिन्यांच्या या अविश्रांत मोहिमेनंतर केवळ दोन दिवसांच्या रजेनंतर अभिलाष सेवेत पुन्हा रुजू झाले आहेत. वरिष्ठांनी परवानगी दिल्यास पुन्हा एकदा सागर परिक्रमेवर जायचीदेखील त्यांची तयारी आहे. नौसेनेला आता प्रतीक्षा आहे ती तिसऱ्या सागर परिक्रमेची आणि यावेळी नौदलातून युवकांनी विशेषतः महिला अधिकाऱ्यांनी पुढं यावं असं वरिष्ठांना वाटत आहे. त्यामुळे पुढील यशस्वी सागर परिक्रमेची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याची नौदलात चर्चा सुरु झाली आहे. विनाथांबा सागर परिक्रमेची ही दुसरी मोहीम फत्ते झाल्यामुळे भारतीय नौसेनेतही उत्साहाचं वारं पसरलं आहे.
सागर परिक्रमा-२-जिद्द आणि स्फूर्तीचा धडा
सागर परिक्रमा-२ साठी चार लाखाहून कमी रुपये खर्च झाले आहेत. वास्तविक आजकाल देशात लग्नसोहळ्यांवर होणारे अनावश्यक खर्च आणि आयपीएल सारखे निरर्थक क्रिकेट सामने यांच्या खर्चाच्या तुलनेत हा खर्च अत्यंत क्षुल्लक आहे. अशा निरुपयोगी खेळांच्या सामन्यांमधून युवा पिढीला वास्तविक कोणतीही स्फूर्ती मिळत नाही मात्र सागर परिक्रमा-२ने यश मिळवल्यामुळे भारतीय नौसेनेतही नव्या चैतन्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. भारतीय नौदलाच्या सागर परीक्रमा-२ या साहसी जलसफरीला लाखो भारतीयांनी पाठींबा दिला. यात सर्वधर्मीय लोक होते म्हणूनच एकत्र आल्यास भारतीयांमध्ये खूप मोठी मजल मारण्याची ताकद आहे असंही अभिलाष यांना वाटते. देशासाठी गर्व ठरलेल्या अभिलाष यांच्या विश्वविक्रमाने नव्या युगाची नांदी सुरु झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. आज कुछ तुफानी करते है असे म्हणत निव्वळ चित्रपट आणि जाहिरातीतून थराराची चव घेण्यापेक्षा देशाची शान वाढवू शकणाऱ्या साहसांकडे युवा पिढीने जरूर वळावे हा अभिलाष यांचा संदेश गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारण शेवटी ‘डर के आगे जीत है’ हे देखील खरेच आहे !

The edited article about Sagar Parikrama-2 by Lt.Cdr.Abhilash Tomy was published in 'Prahaar' news daily on 14th April,2013, you may like to read that so here is the link http://prahaar.in/collag/81141