Translate

Sunday, September 8, 2013

विष्णूपूरच्या बंगाली वृन्दावनात

                                                            



  उत्तराखंडमध्ये यावर्षीच्या जूनमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे प्रचंड वाताहत झाली परंतु केदारनाथाचेजारो वर्षांपूर्वीचे मंदिर निसर्गाच्या एवढ्या तडाख्यातून बचावून उभे आहे. लगेचच काही लोकांनी त्याला परमेश्वरी शक्तीचा अगाध महिमा अशी लेबले लावली तर काहींनी तेव्हाचे आणि आताचे वास्तुविशारद यांची तुलना सुरु केली. कारण काहीही असो, या मंदिराची बांधणी भक्कम आहे हे दिसून आले आणि आपल्या देशातल्या कितीतरी प्राचीन मंदिरे आणि वास्तू बांधणाऱ्या अनाम शिल्पकार आणि स्थापत्यकारांच्या कलेला तोड नाही हे सिद्ध झाले. मंदिरांवरील शिल्पकाम किंवा कोरीवकाम म्हणजे त्याकाळची माहिती देणारे एक सर्च इंजीनच. आपल्या सुदैवाने भारतात सर्वत्र पुरातन मंदिरांच्या देखण्या वास्तू अजूनही शाबूत आहेत. त्यापैकीच एक आहे मल्ल राजांचा वारसा सांगणारा सोळाव्या शतकातील विष्णुपूरचा टेराकोटा मंदिरांचा समूह. विष्णुपूर पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात कोलकाता शहरापासून सुमारे २०० कि.मी अंतरावर आहे. इसवी सन ९९४ पासून मल्ल राजांची राजधानी असलेले विष्णुपूर. इथली तीस देवळे भाजलेल्या मातीच्या विटांपासून बांधून काढली आहेत हे त्यांचे एक वैशिष्ट्य पण १६व्या शतकातील मल्ल राजांचा इतिहास, त्यांचा कलासक्तपणा,सौंदर्यदृष्टी,भक्तीभाव आणि एकूणच त्यांच्या राज्यकाळातील अनेक बारीकसारीक गोष्टी या टेराकोटा मंदिर समूहाच्या माध्यमातून आपल्याला समजतात. टेराकोटा या मूळ इटालियन शब्दाचा अर्थ भाजलेली जमीन किंवा माती असा होतो. मल्ल राजांच्या काळात टेराकोटा स्थापत्यशैली पूर्ण बंगालमध्ये फोफावली, विषेशतः बांकुरा, वर्धमान जिल्ह्यात अशी अनेक मंदिरं पाहायला मिळतात. बंगालमधली टेराकोटा मंदिरे पाहायला जगभरातून संशोधक,अभ्यासक आणि पर्यटक इथपर्यंत येतात. इतिहासातील कित्येक राजा-महाराजांनी त्यांच्या काळात स्वतःची ओळख मागे राहावी यासाठी देऊळे बांधून ठेवली आहेत. तशीच ही विष्णूपुरची देऊळे. हि ऐतिहासिक मंदिरे, या वास्तू आपल्याला इतिहास, वैभव, संस्कृती सांगायला उत्सुक आहेत म्हणूनच शतकानुशतके वादळवाऱ्यात टिकून आहेत. देवळांचे इतके अनन्यविध प्रकार भारतात आहेत कि एखाद्याने नुसती देवळं जरी पहायची ठरवली तर त्याचा अख्खा जन्म पुरणार नाही.
अनेकदा चित्रे वगैरे पाहून मूळ वास्तूची कल्पना येत नाही आणि प्रत्यक्ष पाहताना आपण इथे आलो हे बरेच केलं असं वाटायला लागतं. विष्णुपूरच्या देवळांबाबत माझं नेमकं हेच झालं. एखाद्या ठिकाणी गेल्यावर पाहण्यासारखं बरेच आहे असा स्थानिकांकडून देखील आग्रह होतो. ‘काय पाहावे’ यादीतील सर्वच पाहता पाहता खरोखरीच जिथे गेलं पाहिजे होतं अशी ठिकाणं मग राहून जातात आणि त्याची हुरहूर मनाला लागते. त्यामुळे पश्चिमबंगात( बंगाली उच्चारानुसार पोश्चिमबोंगात) फिरताना १०-१२ दिवसांमध्ये काय आणि किती पहायचे हा प्रश्न होताच. पण विष्णुपूरची टेराकोटा देवळं पहावीच असा सल्ला अनेकदा माझ्या कानांनी ऐकून झाला होता. टेराकोटाशी माझा संबध म्हणजे फक्त काही शोभेच्या वस्तू आणि खोट्या दागिन्यांपुरता. प्रत्यक्ष विष्णुपूरला जाऊन ठेपल्यावर त्या अप्रतिम कलाकारीने थक्क झाले. ते कोरीवकाम, नक्षीकाम आणि काळाच्या झपाट्यात भक्कम अखंड राहिलेले असं बांधकाम पाहून नेहमीप्रमाणे ‘आ’ वासला गेलाच. तिथली प्रत्येक वास्तू विलोभनीय आहे आणि केवळ देवावरील प्रेमापायी आपल्या पूर्वजांनी इतकं काही सुघड निर्माण करून ठेवलं आहे हे अनाकलनीयच आहे. बंगालच्या स्थापत्यकलेच्या इतिहासात या मंदिरांना मोठं महत्व आहे. दक्षिण भारतासारखे इथे मोठे कातळ आणि दगड सापडत नाहीत त्यामुळेच दगडांना पर्याय म्हणून या भाजलेल्या मातीच्या विटांचा वापर करून इथली मंदिरे बांधली गेली आणि अश्या प्रकारे टेराकोटा शिल्पकलेचा उदय बंगालमध्ये झाला. अनेक शतके इस्लामी आधिपत्याखाली काढल्यानंतर सोळाव्या शतकाच्या आसपास बंगालमध्ये वैष्णव पंथाने पर्यायाने हिंदूधर्माच्या प्रभावाने पुन्हा अंमल दाखवायला सुरुवात केली. त्याच सुमारास विष्णुपूरमध्ये श्रीकृष्णाची देऊळे अस्तित्वात येत होती. साहजिकच टेराकोटा देवळांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या देवळांच्या बांधणीवर इस्लामी स्थापत्यशैलीची झाक आहे. विष्णुपूरची ही देऊळे बंगालमधील १३व्या अणि १४व्या शतकातील मशिदी अणि ओरिसातील मंदिरे यांच्यापासून प्रभावित होऊन निर्माण झालेल्या शैलीत बांधली असल्याचेही काहींचे मत आहे. काही संशोधकांच्या मते कृष्णभक्त मल्ल राजांनी वृंदावन-मथुरेच्या धर्तीवर स्वतःच्या राज्यात मंदिरे असावीत म्हणून विष्णुपूर मंदिरांची निर्मिती केली. मंदिरांच्या भिंतींवर केलेल्या कोरिवकामात महाभारत, रामायण यातील गोष्टी आहेत खेरीज श्रीकृष्णाच्या जीवनातील काही कथा, भगवान बुद्ध ,चंडीदेवी अणि राक्षस वध, योद्धा, शिकारी, व्यापारी, निसर्ग, पशु-प्राणी, सामान्य जनांच्या दैनंदिन गोष्टी हे सर्वदेखील या नक्षीकामात कोरलेले दिसते. मुळात कोणत्याही प्रकारचे ज्ञान जेव्हा फक्त लिखित आणि मौखिक होते तेव्हाच्या प्राचीन आणि ऐतिहासिक काळात ज्ञानाच्या प्रसारासाठी शिल्पकारांनी आपल्या कलेचा अतिशय समर्पक वापर केलेला दिसतो. विविध देशांमधील शिल्प आणि कोरीवकामात साम्य आढळत असल्यामुळे आता संशोधकही अचंबित होत आहेत. विष्णुपूर मंदिरांच्या कोरीवकामातही अशी साम्य आढळली आहेत. येथील कोरीवकामात अनेक पौराणिक, ऐतिहासिक,धार्मिक आणि सामाजिक संदर्भ असलेल्या गोष्टींचे चित्रण आहे आणि याच वेगळेपणामुळे ही टेराकोटा मंदिरे भारतीय शिल्पकलेचा अत्यंत महत्वाचा नमुना म्हणून जगप्रसिद्ध आहेत.
विष्णुपूरची सैर एखाद्या टाईम कॅप्सूलप्रमाणेच आहे. वर्धमानवरून चार तासांचा बसचा प्रवास करून मी इथे पोहोचले. पुढे विष्णुपूरच्या गल्ल्यांमधून सायकल रिक्षा ओढत नेईल तिथे उतरून मंदिरे पाहण्याचा कार्यक्रम सुमारे ४-५ तास चालू होता. हा सायकल रिक्षा भाग सोडला तर हि मंदिरे थेट मल्ल राजांच्या काळातच नेऊन उभी करतात. कोणतीही प्राचीन देवळे किंवा शिल्प ही आरश्याप्रमाणेच असतात कारण त्यांच्यावरून त्याकाळच्या सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज येतो. विष्णुपूरच्या देवळांची शिल्पकलाही अद्भुत आहे. या सर्व मंदिरांची स्थापत्यशैली भारतात पाहायला मिळणाऱ्या इतर मंदिरांपेक्षा अत्यंत वेगळी आहे आणि हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. देऊळ म्हटले कि त्यात देवाच्या मूर्ती असणं हे ग्राह्य धरलं जातं पण ज्यात मूर्तीच नाहीत अशी फक्त देवांच्या विश्रांतीसाठी बांधलेली देऊळे( शय्यागृह) देखील इथे आहेत. हि टेराकोटा देऊळे आणि वास्तू भक्तीप्रिय मल्ल राजांनी श्रीकृष्ण आणि श्रीविष्णूला समर्पित केलेली आहेत. देऊळे बांधताना साध्या रचनेत आणि आजूबाजूला मोकळी जागा सोडून बांधली आहेत. जास्तीत जास्त प्रजेने तिथे यावे, जमून देवांची भक्ती-आराधना करावी हा त्यामागील हेतू होता. वैष्णवपंथ देखील साध्या जीवन राहणीला महत्व देतो त्यामुळे सामान्य नागरिकांची घरं जशी, तशीच त्यांना हि मंदिरं वाटावीत म्हणून त्यांची बांधणी साधीच ठेवली गेली.
या सर्व मंदिरांची रचना वेगवेगळी असली तरी स्थापत्यशैली एकच आहे. हे मल्ल राजे कृष्णभक्त आणि या भक्तीपायीच त्यांनी टेराकोटा देऊळे बांधण्याचा सपाटा लावला. या मंदिरांचे स्थापत्यविशारद म्हणजे आचार्य आणि शिल्पकार ज्यांना सूत्रधार असेही म्हटले जायचे, त्यांना श्रीमंत जमीनदार, व्यापारी यांच्याकडे आश्रय मिळायचा. ते आपली कला मंदिर बांधणीतून दाखवत बंगालच्या अनेक गावांमधून फिरायचे. तेव्हापासूनच बंगालमधली मंदिर शिल्प-वास्तूकला टेराकोटामय झाली. त्यामुळेच बंगालच्या बांकुरा, हुगळी, वर्धमान आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये टेराकोटा शिल्पकलेचा प्रभाव आणि प्रसार दिसून येतो. ‘चाल’, ‘रत्न’ आणि ‘दालान’ अश्या तीन प्रकारे ही मंदिरे बांधली गेली आहेत. ‘चाल’ म्हणजे छताचे कोपरे अणि अशी दोन,चार किंवा आठ उतरते कोपरे असणारी छोटी मोठी देवळे इथे दिसतात. विष्णुपूरची मंदिरे देखील चाल पद्धतीने बांधलेली आढळतात. सामान्यतः बंगाली घरे ज्या धाटणीची असत त्याचप्रमाणे ही मंदिरे देखील बांधली जात. चाल किंवा चाला म्हणजे छप्पराचे उतरते निमुळते कोन, अश्या दोन कोनाच्या छप्पराला दुईचाला म्हटले जाते तशीच चौचाला, अटचाला मंदिरे देखील आहेत. बंगालमधील ग्रामीण भागात आज देखील अशा छप्परांची घरे आढळतात. ‘रत्न’ म्हणजे देवळावरील शिखर आणि त्यातही एक, तीन किंवा पाच शिखरांची मंदिरे इथे आहेत. ‘दालान’ या प्रकारात देवळावर सपाट छत असते. हि टेराकोटा मंदिरे भारतीय इतिहासातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा असाधारण वारसा आहेत. रसमंच ही इथली एक सभागृहासारखी प्रमुख वास्तू आहे. इ.स १६०० मध्ये मल्ल राजा वीर हंबीर याने रसमंच बांधले, जे या समूहातले सर्वात जुने मंदिर आहे. अनेक स्तंभांव उभे असलेले विटांच्या मनोहारी  बांधणीतले हे मंदिर अतिशय सुंदर आहे. वास्तविक हे भगवान श्रीकृष्णासाठी अर्पण केलेले शयनगृह आहे. त्रिकोणाकृती रचनेच्या मंदिराच्या जोत्यासाठी लेटेराईट स्टोन वापरण्यात आला आहे. दूरवरूनही डोळ्यात भरेल अश्या या मंदिराचे छप्पर उतरते आहे. फक्त बंगालच नव्हे तर पूर्ण भारतातदेखील या शैलीचे मंदिर आढळत नाही. मात्र या मंदिरावर कमळ इत्यादी फुलांखेरीज इतर कोणतीही खास शिल्पकला कोरलेली दिसत नाही. मुळात हे मंदिरच नसल्यामुळे इथे कोणतीही मूर्ती नाही पण १९३२ सालापर्यंत रास उत्सवाच्या वेळेस विष्णुपूरमधील इतर मंदिरातून दर्शनासाठी मूर्त्या इथे आणल्या जात. इथे एका छोट्याश्या टेकडीवर एका खोलीवजा बुरुजाचे भग्नावशेष आढळतात त्याला गुमगढ म्हणतात. त्याचा वापर नक्की कशासाठी पूर्वी होत असे याची माहिती त्यावर कोरलेली दिसत नाही आणि इतरत्र उपलब्ध देखील नाही. काहींच्या मते हा तुरुंग होता तर काहींच्या मते ते धान्य साठवण्याचे गोदाम होते. आता तिथे फक्त खिडक्या-दरवाजे नसलेले खिंडार बाकी आहे.
गुमगढवरून थोडेसे पुढे गेल्यावर श्यामराय मंदिर दिसते. इसवी सन १६४३ मध्ये मल्ल राजा रघुनाथ(दुसरा) याने हे मंदिर बांधले. पाच शिखरांचे हे पच्चुरा मंदिर अद्याप उत्तम स्थितीत आहे. या मंदिराच्या चोहोबाजूला त्रिकोणी कमानीचे दरवाजे आहेत. याच्या भिंतींवर महाभारत, रामायण, रास चक्र आणि राधा-श्रीकृष्ण यांच्याशी संबधित प्रसंग कोरलेले आहेत. श्यामराय मंदिराच्या पुढे दिसते ते केश्तोराय मंदिर. हे उंचच उंच मंदिर देखील आवर्जून पाहावे असे मंदिर आहे. जोरबंगला शैलीतल्या या मंदिराला दोन उतरत्या भाजणीची छत जोडून असल्यामुळे याला जोर (जोड )बंगला मंदिर असे म्हणतात. जोरबंगला म्हणजे संयुक्त छतांचे मंदिर. या जोडछतांच्या मध्ये एक छोटेसे शिखर आहे ज्याच्यामुळे छतांनादेखील आधार मिळाला आहे. टेराकोटा शैलीचा उत्तम नमुना म्हणजे हे इ.स १६५५ साली राजा रघुनाथसिंह(दुसरा) याने बांधलेले मंदिर आहे. या मंदिरात आत आणि बाहेर आढळणारे  कोरीवकाम देखील आकर्षक आहे. त्यात शरशय्येवर पडलेले भीष्माचार्य तसेच जहाजे आणि बोटी देखील दिसतात. पुढे दिसते ते एकच शिखराचे म्हणजे एक रत्न राधेश्याम मंदिर. याच्या भवताली उंच भिंतींची तटबंदी आहे आणि प्रवेशद्वारावर मुस्लीम स्थापत्यशैलीचा प्रभाव असणारी त्रिकोणी कमान आहे. इ.स. १७५८ मध्ये मल्ल राजा चैतन्यसिंह याने हे मंदिर बांधले. असे म्हटले जाते कि राज्याच्या खजिन्यात खडखडाट असतानाही केवळ मंदिर बांधण्याची परंपरा जपली जावी म्हणून राजाने हे मंदिर बांधले. एक शिखर असणारे दुसरे एक मंदिर म्हणजे राधालालजेऊ मंदिर, जे इ.स.१६५८ मध्ये मल्ल राजा बीरसिंह याने बांधले. राधेश्याम मंदिराच्या अगदी समोरच मृण्मयी मंदिर आहे. मंदिर जीर्ण झाले असल्यामुळे इथली मृण्मयीमातेची मूर्ती दुसरीकडे नव्या मंदिरात ठेवण्यात आली आहे. इथून पुढे गेल्यावर दोन मोठी प्रवेशद्वारे दिसतात. एक आहे तो बडा पत्थर दरवाजा, राजमहालाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार म्हणून हा दरवाजा सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराजे बीरसिंह यांनी बांधला. या दुमजली प्रवेशद्वाराच्या आत सैनिकांना बसण्याची जागा आहे. तिथेच जवळ एक छोटे प्रवेशद्वार आहे ते देखील याच काळात बांधले गेले होते. हि दोन्ही प्रवेशद्वारे राजघराण्याच्या एकेकाळच्या वैभवाची साक्ष देतात. जवळच सतराव्या शतकामध्ये बांधलेला एक दगडी रथ दिसतो.
मदन मोहन मंदिर हे इथले सर्वात प्रसिद्ध मंदिर. एक शिखराचे हे मंदिर इ.स १६९४ मध्ये मल्ल राजा दुर्जनसिंह यांनी बांधले. विष्णुपूरच्या सर्व मंदिरांमध्ये हे अतिशय सुंदर मंदिर म्हणून गणले जाते. भगवान विष्णू यांचा अवतार मदन मोहनाची मूर्ती या देवळात आहे. विष्णुपूरच्या काही मंदिरांमध्ये मूर्ती देखील आहेत आणि त्यांची पुजादेखील केली जाते त्यातले हे एक. मदन मोहन मंदिरात गेल्यानंतर मलाही पूजा करण्याची संधी मिळाली. पण इथल्या सर्वच मंदिरात अशा प्रकारे पूजा केली जात नाही. या मंदिराला दोन संयुक्त छते आहेत. सर्वात जुनी आणि प्रचंड दालमदल तोफ इथले आकर्षण आहे. इ.स १७४२ मधली हि तोफ ११२ क्विंटल वजनाची आणि ३.८ मीटर लांबी आणि ३० सेंटीमीटर व्यासाची आहे. मल्ल राजांच्या या मल्लभूमीवर अठराव्या शतकात मराठ्यांनी देखील आक्रमण केले होते. त्यावेळी हि तोफ वापरण्यात आली होती. एक शिखराचे छिन्नमस्त मंदिर लाईम आणि लेटेराईट स्टोनमधून बांधून काढले आहे. दुर्गेच्या या जीर्णशीर्ण मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. पुढे जवळ जवळ असणारी एक शिखरीय सात मंदिरे पाहायला मिळाली. यामध्ये नंदलाल मंदिर आणि जोरमंदिर यांचा समावेश आहे. जोरमंदिराच्या एकाच आवारात तीन छोटी मंदिरे आहेत, ती मल्ल राजा कृष्ण सिंग याने इ.स १७२६ मध्ये बांधली. राधागोविंद मंदिर देखील पाहण्यासारखे आहे. हे देखील इ.स १७२९ मध्ये मल्ल राजा कृष्ण सिंग यानेच बांधले. इथून जवळच इ.स १७३७ मध्ये बांधले गेलेले राधामाधव मंदिर आहे. दोन छते आणि एक शिखराचे हे मंदिर आहे. मल्ल राजा कृष्णसिंह याची पत्नी चूडामणीदेवी हिने हे देऊळ बांधले. याच रस्त्यावर पुढे कलाचंद मंदिर आहे. इ.स १६५६ मध्ये मल्ल राजा रघुनाथसिंह याने हे मंदिर बांधले परंतु आता याचे काही भग्न अवशेषच उरले आहेत.
ही सर्व मंदिरे पहाताना पायी चालण्याइतके अंतर आहे. तरीही वेळ वाचवण्यासाठी गावात उतरल्यावर एक सायकल रिक्षा सर्व मंदिरांच्या फेरफटक्यासाठी ठरवून घेतली की काम सोप्पे होते. मंदिर पाहण्याची सुरुवात रसमंचपासून करावी लागते कारण तिथेच सर्व मंदिरांसाठीचे प्रवेश तिकीट फी घेऊन दिले जाते. इतर पाहण्यासारखे म्हणजे गावातल्या वेस्ट बंगाल टुरिस्ट लॉजच्या बाजूचे विष्णुपूर संग्रहालय अर्थात आचार्य योगेशचंद्र पुराकीर्ती भवन आणि बालुचारी साड्या बनवणाऱ्या विणकरांची घरे. आपल्या गन्जीफा पत्त्यांच्या खेळाप्रमाणे इथे मल्ल राजे पूर्वी दशवतार हा पत्त्यांचा खेळ खेळायचे तसे पत्ते देखील दुकानात विकत मिळतात. विष्णुपूरमध्ये खरेदी करण्यासारखे फार काही नाही. भारतीय हस्तकलेचे प्रतिक म्हणून जिथेतिथे दिसणारे इथले टेराकोटाचे बांकुरा घोडे जगविख्यात आहेत. खास शंखापासून बनवलेल्या दागिने,शोभेच्या वस्तू आणि नक्षीचे कोरीवकाम केलेले शंखही इथे मिळतात. (बंगाली संस्कृतीत शंखाला खूप महत्वाचे स्थान आहे.) टेराकोटाच्या वस्तूंची तुरळक दुकाने इथे दिसतात. टेराकोटापासून बनलेली खेळणी, भांडी,दागिने,घोडे,हत्ती,कासवे असे काही प्राणी आणि इतर काही शोभेच्या वस्तू विकण्याचा जोडधंदा इथे चालतो. जोडधंदा म्हटले अशासाठी कि विष्णुपूरजवळच असणाऱ्या पंचमुरा या गावात ‘कुंभकार’ जातीच्या टेराकोटा कारागीरांची काही कुटुंबे राहतात. बंगालच्या इतरही काही जिल्ह्यांमधील गावात टेराकोटा कारागीर राहतात. टेराकोटा कला जगवण्याचा ही कुटुंबे प्रयत्न करत आहेत पण यातील उत्पन्न फारच कमी असल्याने पुढची पिढी उदरनिर्वाहाच्या इतर मार्गांकडे वळतेय आणि पर्यायाने टेराकोटा उद्योग देखील अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. इथल्या वस्त्रोद्योगालाही शतकांची परंपरा आहे. इथल्या बालुचारी साडीने विष्णूपुरचे नाव जगाच्या नकाशावर नेले. या साडीवर देखील टेराकोटा देवळांची नाजूक नक्षी पाहायला मिळते. अर्थातच अस्सल रेशीम असल्याने त्या खूप महागदेखील आहेत. ज्यांना संगीतकलेत रस आहे त्यांच्यासाठी विष्णुपूर अनोळखी नाही. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात विष्णुपूर घराणे तर प्रसिद्धच आहे. डिसेंबरमध्ये इथे विष्णुपूर मेळा आणि संगीत महोत्सव साजरा होतो.

मल्ल राजांच्या काळात हे टेराकोटा मंदिरांचे स्तोम बंगालमध्ये अधिकच वाढले पण आपल्याकडे अजूनही चांगल्या स्थितीत असलेली टेराकोटातून बांधलेली अनेक सुंदर देऊळे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,झारखंडमध्ये देखील आहेत. सर्वात प्राचीन असे सहाव्या शतकातील टेराकोटा मंदिर उत्तरप्रदेशातील कानपूर जवळ असलेल्या भीतरगाव येथे आहे. एकट्या बंगालमध्येच पाहायला गेले तर बांकुरा आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच दिनाजपूर, मुर्शिदाबाद, मालदा, वीरभूम, वर्धमान, हुगळी,पुरुलिया जिल्ह्यांमध्ये पुष्कळ टेराकोटा देऊळे पाहायला मिळतात. ती मंदिरे तर विष्णुपूरपेक्षा अधिक जुनी आहेत. परंतु वाईट स्थिती म्हणजे एवढे महत्वाचे ऐतिहासिक वैभव बाळगणाऱ्या दक्षिण बंगालमधील बांकुरा, वर्धमान, दुर्गापूर, विष्णुपूर अशा ठिकाणांना अजूनही शहरीकरणाच्या वाऱ्यांचा कोणताही फायदा झालेला दिसत नाही. महाराष्ट्रातील तालुका आणि जिल्हा पातळीवरील शहरांच्या तुलनेत तर ही शहरे जुनाट वाटतात, अर्थात त्याची राजकीय आणि सामाजिक कारणेही आहेत. गेली अनेक वर्षे विष्णुपूर मंदिराच्या ऐतिहासिक ठेव्याला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून भारत सरकार आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार प्रयत्नात आहे. अमेरिकन वकिलातीच्या सांस्कृतिक संवर्धन निधीतून देखील या मंदिरांच्या देखभालीसाठी अनुदान देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात विष्णुपूरला आजही अगदी जिल्हास्तरीय सुंदर गाव म्हणण्याचेही धाडस होत नाही. विष्णुपूर जेव्हा सर्व सोयीसुविधांनी युक्त बनेल तेव्हा निश्चितच या टेराकोटा देवळांच्या शहराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळेल अशी आशा आहे. एकूणच विष्णुपूर आज शतकांचा इतिहास कवेत घेऊन बसलेय. सर्वात जास्त सुरस माहिती-कथा कोणत्या काळात दडलेल्या असतात तर त्या नेहमीच भूतकाळात असतात, म्हणूनच इतिहासकालीन वास्तूसंशोधन किंवा अश्या वास्तू पर्यटक म्हणून जाऊन पाहणे हे खरे तर अत्यंत मनोरंजक आहे. खूपजणांच्या मते हा एक नीरस आणि कंटाळवाणा उद्योग आहे, पण अश्याच विचारांमुळे जेव्हा आपण एखाद्या पुरातन वास्तूसमोर उभे राहतो तेव्हा प्रत्यक्ष इतिहास आपल्यासमोर बोलका होतोय हि गोष्ट अनुभवणे आपण विसरून जातो. आपल्या देशात मंदिरे आणि किल्ले यांनी असाच लाखो पानांचा इतिहास आपल्यासाठी लिहून ठेवलाय पण आपण काय करतो, तर तिथे जाऊन त्या उत्तुंग वास्तूंच्या अंगावर काहीतरी बकाल आणि निरर्थक खरडवून ठेवतो. सगळ्याच इतिहासकालीन वस्तूंना पुरातत्व खात्याचे किंवा इतर प्रकारचे संरक्षण लाभू शकत नाही त्यामुळे होताहोईस्तो विष्णुपूरसारख्या या वास्तू इतिहास जपत आणि सांगत उभ्या राहतील. विष्णुपूरच्या मंदिरांना भविष्यात युनेस्कोकडून जागतिक दर्जाचे स्थळ असल्याचा मान कदाचित जाहीर होईल देखील पण आपापल्या गावात किंवा शहरात देखील अशा काही इतिहासकालीन वास्तू, वस्तू अथवा शिलालेख असल्यास त्यांची काळजी प्रथम तिथल्या नागरिकांनीच घेतली तर उत्तम कारण शेवटी अश्या प्रकारच्या इतिहास पर्यटनातून मिळणाऱ्या पैशांच्या उपयोगाने गावाचा देखील विकास होत असतो. त्यामुळे भारताच्या सांस्कृतिक पर्यटनात मोठा वाटा ऐतिहासिक पर्यटनाचा आहे हे विसरून चालणार नाही. 
विष्णुपूरला कसे जाल :- कोलकातापासून विष्णुपूर सुमारे २०० ते २५० कि.मी अंतरावर आहे. हावड्याहून विष्णुपूरला जाण्यासाठी आरण्यक एक्स्प्रेस,रूपाशी बांगला एक्स्प्रेस आणि पुरुलिया एक्स्प्रेस रेल्वेगाड्या आहेत. वेस्ट बंगाल टुरिस्ट लॉजखेरीज राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी बरेच पर्याय विष्णुपूरमध्ये उपलब्ध आहेत. ते फारसे चांगले नसले तरी अगदीच गैरसोयीत टाकणारे देखील नाहीत. विष्णुपूरला बसने देखील जाता येते. दुर्गापूर एक्स्प्रेसवेचा शेवटचा रस्ता सोनामुखी गावातून अत्यंत सुंदर हिरव्यागार जंगलातून जातो. दुतर्फा असलेली वनश्री मन अत्यंत प्रफुल्लित करते, अर्थात बसने जाण्याचा अनुभव खराब रस्त्यांमुळे काही सुखकर होत नाही, त्यामुळे एव्हढाच काय तो काही मिनिटांचा पट्टा मन रमवून प्रवासाचा शीण दूर करतो. विष्णुपूरमध्ये WBTDC च्या लॉजमध्ये राहण्याची आणि जेवण्याची चांगली व्यवस्था आहे आणि मंदिरे पाहण्यासाठी  त्यांचा मार्गदर्शकही मिळतो. 
Note- This blog article was earlier published in Marathi news daily 'Prahaar' , please read it through this link http://prahaar.in/collag/127153 and also give your suggestions. Thanks.

Tuesday, April 16, 2013

१५० दिवसांची सागरी साहसगाथा-Sagar Parikrama-2


                                                        
३१ मार्च २०१३ रोजी भारतीय नौदलाच्या म्हणजेच पर्यायाने भारताच्या खात्यात एक अभिमानास्पद जागतिक विक्रम जमा झाला. या विश्वविक्रमासाठी कोणतीही स्पर्धा घेतली गेली नव्हती किंवा इतर खेळांप्रमाणे कोणत्याही लांच्छनास्पद प्रकारे आता भारताकडून हा विक्रम हिसकावून घेतला जाईल अशी शक्यता देखील नाही, या उलट हा विक्रम करणाऱ्या तरुणाने धाडसाचा कहर केलाय आणि अवघ्या पाच  महिन्यात विनाथांबा कोणाच्याही मदतीशिवाय तेही एकट्याने म्हादेई या छोट्या शिडाच्या नौके(यॉट)मधून २१,६०० समुद्री मैलांची म्हणजेच ४१,४०० किलोमीटरची सागर परिक्रमा पूर्ण करून जगाला त्याची दखल घेणं भाग पाडले आहे. लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांच्या विजयी सागरस्वारीने भारतीय नौदलाच्या इतिहासात नवे मापदंड रोवले गेले आहेत. विश्वविक्रमांच्या नोंदी जरी कागदावर होत असल्या तरी त्यांना जन्माला घालण्यासाठी कोणत्याही संकटाना तडीपार भिरकावण्याची जिगर लागते आणि तरच ‘सागर परिक्रमा’ सारखे विक्रम जगाच्या नकाशावर घडतात. असं म्हणतात कि मिळालेल्या संधीचं सोनं करावं, संधी दुसऱ्यांदा चालून येत नाही वगैरे पण म्हादेई आणि अभिलाष यांच्या बाबतीत गोष्ट वेगळी होती, संधी दुसऱ्यांदा त्यांच्याकडे आली होती. यापूर्वी अभिलाष यांनी केप टाऊन ते गोवा प्रवासात म्हादेईची धुरा एकट्याने सांभाळली होती. बोटीतून एकट्याने जगप्रवास करण्याच्या ‘धाडसी’ अभिलाषेला तेव्हाच खतपाणी मिळाले होते पण कोणत्याही साहसाची ठराविक अशी रेसिपी कोणत्याही पुस्तकात लिहिलेली नसते कि ती वाचल्यावर एक छानसे सुंदर साहस साकारता येतं. अशा साहसगाथा नेहमी नेहमी लिहिल्या जात नाहीत आणि त्या प्रत्यक्षात उतरवताना कुठेही एकदा झालेली चूक निस्तरण्यासाठी आपण पुन्हा जिवंत राहूच याची खात्री देता येत नाही. एका क्षणी आपल्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ या पृथ्वीतलावर नाही अश्याच आत्मविश्वासाने आलेल्या आव्हानाला तोंड द्यावे लागते. याच वृत्तीने धाडस, साहस, कर्तबगारी, थरार इत्यादी पुस्तकी शब्दानाही फिकी पाडेल अशी हिंमत दाखवून भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी थेट समुद्रालाच आव्हान देत त्याच्यावर सत्ता काबीज करून १५० दिवसात सागर परीक्रमेचा विक्रम खिशात घातला. त्यांच्या या थरारक प्रवासाची खबर देश-विदेशात घेतली गेली कारण अश्या प्रकारे १५० दिवसात कोणत्याही बंदरावर न थांबता आणि अगदी संकटसमयी देखील कोणाचीही मदत न घेता पृथ्वीच्या परीघरेषेवरून जलप्रदक्षिणा करणारे अभिलाष जगातले ७९ वे आणि आशिया खंडातले दुसरे दर्यावर्दी ठरले आहेत. पण या सागर परीक्रमेमधला कोणताही टप्पा आता मी लिहित असलेल्या कोणत्याही शब्दाइतका सोपा निश्चितच नव्हता तर अक्षरशः सत्व पणाला लावून अभिलाष यांनी सागर परिक्रमा-२ पूर्ण केली आहे. ३३ वर्षीय अभिलाष हे देखील आजच्या युवा पिढीचेच प्रतिनिधी आहेत आणि दूरचित्र वाहिन्यांवर चालणारे थिल्लर रियालिटी शोज पाहून वायफळ रोमांच अंगावर उमटवून घेणाऱ्या आजच्या पिढीने नक्क्कीच त्यांचा हा जलप्रवास अभ्यासावा असा आहे. ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटाच्या कथेपेक्षाही चित्तथरारक या सागर प्रवासाची कथा आहे.  थोडक्यात ओळख करून घेऊ यात या ‘सागरी’ साहसगाथेची..
म्हादेई बोटीचे सुकाणू वैमानिकाच्या हाती
भारतीय नौदलाची एक परंपरा आहे, बोट दुसऱ्या कप्तानाच्या ताब्यात देताना ‘ऑल युअर्स’ असं म्हटलं जातं. गेल्या वर्षी अभिलाषच्या हातात बोटीचे सुकाणू सोपवताना अभिलाष यांचे गुरु कमांडर दिलीप दोंदे यांनीदेखील त्यांना हेच सांगितले होतं. पण बहुदा कमांडर दोंदे यांनी म्हादेईला देखील अभिलाषच्या बाबतीत ‘‘ऑल युअर्स’ असंच म्हटलं असावं कारण तेव्हापासून म्हादेईने आणि अभिलाषने एकमेकांची साथ संकटातही सोडलेली नाही. लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी हे नौदलाच्या वायुसेनेत वैमानिक आहेत मात्र त्यांचे सेलिंगचे ज्ञान आणि प्रेम पाहून एसपी-२ म्हणजे सागर परिक्रमा-२ साठी त्यांची निवड झाली. १ नोव्हेंबर २०१२ पासून सुरु झालेल्या सागर परिक्रमेच्या दुसऱ्या मोहिमेत मानसिक आणि शारीरिक बळाची कसोटी पाहणारे अनेक अवघड जीवावर बेतणारे प्रसंग आले मात्र म्हादेई आणि अभिलाष सर्व संकटांमधून तावून सुलाखून बाहेर पडले. याआधी नौदलाचे कमांडर दिलीप दोंदे यांनी केवळ चार बंदरांवर थांबे घेऊन आणि दोन मदतनिसांसह ( ज्यात अभिलाष यांनी म्हादेई नौकेची दुरुस्तीसाठी मदत केली होती ) २०१० साली जलप्रदक्षिणा पूर्ण केली होती. त्या अनुभवामुळेच सागर परिक्रमेच्या दुसऱ्या विनाथांबा मोहिमेसाठी अभिलाष यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. तब्बल पाच महिन्यांनी म्हादेई  नौकेच्या शिडाने वाऱ्याशी झुंज थांबवली आणि तिच्या कप्तानाच्या हातांनी देखील विश्रांती घेतली तेव्हा सागरानेही या दोघांच्या अथक जिद्दीला मनोमन सलाम ठोकला. भारतीय नौदलात प्रवेश केल्यापासून अभिलाष यांनी गेली १४ वर्षं जे सागर परिक्रमेचं स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाला अखेर सत्याची झळाळी मिळाली. विनाथांबा एकट्याने जगप्रदक्षिणा घालणारे जगातले पहिले नाविक ब्रिटनचे सर रॉबिन नॉक्स-जॉनस्टन यांनी अभिलाषचा विक्रम पूर्ण होण्याआधीच त्याचं अभिनंदन केले होते. साहसाला सीमा नसाव्यात म्हणूनच तर ते साहस ठरते असं अभिलाष यांचे मत आहे. सागर परिक्रमेच्या साहसात असणाऱ्या थरारापेक्षाही अनिश्चिततेचे आकर्षण वाटले म्हणूनच त्यांनी हे शिवधनुष्य उचलले. पाच महिने एकट्याने हा संपूर्ण जलप्रवास करण्याचेही आकर्षण देखील  आव्हान स्वीकारण्यामागे होते. झपाटलेपणाला कोणत्याही मर्यादा नसतात. एकदा का साहसाला सुरुवात केली कि हे झपाटलेपण अंगावर सतत बाळगूनच राहावं लागतं. त्यातच जर समोर खिजवणारा समुद्र प्रतिपक्षात असेल तर निश्चितच साहसाला सीमा उरत नाहीत. नेमके हेच त्यांच्या बाबतीत घडले.
यशाची सहनायिका ‘म्हादेई’
या पूर्ण सागर परिक्रमेत दोनच गोष्टीवर ओरखडे पडले नाहीत त्या म्हणजे म्हादेई बोट आणि अभिलाष यांचे मनोबल. किंबहुना समुद्रावरचे अत्यंत खराब हवामान आणि वादळ-वारे झेलूनही म्हादेई सुखरूप राहिली आणि म्हणूनच अभिलाष यांची जिद्ददेखील प्रखर राहिली. यामुळेच अभिलाष यांचे गुरु कमांडर दिलीप दोंदे या परीक्रमेचे पूर्ण श्रेय अभिलाष इतकेच म्हादेईला देखील देतात. म्हादेईची मजबूत बांधणी गोव्यातल्या दिवार आयलंडवर असलेल्या अक्वेरीस फायबरग्लास या कारखान्यात श्री. रत्नाकर दांडेकर यांच्या खास देखरेखीखाली झाली होती. वास्तविक सागर परीक्रमेसाठी खास धाटणीची बोट बांधण्यासाठी अनेक बड्या कंपन्यांना विचारण्यात आलं होते परंतु अगदी गोवा शिपयार्डसकट मोठमोठ्या कंपन्यांनी एक छोटीशी यॉट बांधण्यात आर्थिक फायदा नसल्याचं पाहिल्यावर भारतीय नौदलाची हि यॉट बांधणं नाकारलं होतं. पण रत्नाकर दांडेकर आणि त्यांच्या अक्वेरीस फायबरग्लासच्या टीमने हे आव्हान स्वीकारलं आणि चार वर्षांपूर्वी म्हादेई अस्तित्वात आली. आयएनएसव्ही म्हादेई ही एक ५६ फूटी यॉट प्रकारातली नौका आहे. बोटीचे रचनाचित्र नेदरलँड्सच्या व्हान दे स्टट डिझाईन ब्युरो या कंपनीकडून मागवण्यात आले होते. बोट बांधण्यासाठी सुमारे एक वर्ष दोन महिन्यांचा कालावधी लागला होता. दांडेकर यांचे व्यावसायिक कौशल्य आणि त्यांनी जीव लावून केलेल्या मेहनतीमुळेच म्हादेई अप्रतिमरित्या साकार झाल्याचं कमांडर दिलीप दोंदे सांगतात. म्हादेईचे इतके कौतुक होत असताना रत्नाकर दांडेकर यांनी मात्र म्हादेई बांधताना मी स्वतः बोटीच्या कप्तानाच्या जागी असल्याची कल्पना केली आणि त्यामुळेच म्हादेईची बांधणी इतकी मजबूत घडल्याचे सांगितले. कमांडर दिलीप दोंदे आणि लेफ्टनंट कमांडर अभिलाष यांची प्रत्येकी एकच वेळा जगप्रदक्षिणा झाली असली तरी म्हादेईने फक्त चार वर्षांच्या आयुष्यात दोनवेळा जगाचा फेरा केला आहे. त्यादृष्टीने म्हादेई या दोघांनाही सिनिअर ठरली आहे. म्हादेई एव्हढी कणखर नसती तर कदाचित आमच्यापैकी एकाच्या फोटोला नक्कीच हार लागला असता असं विनोदाने दोंदे सर सांगतात. म्हादेई मजबूत होती म्हणूनच आमच्या दोघांच्याही जगप्रदक्षिणा यशस्वी झाल्या असं त्यांना वाटतं. अख्ख्या सागर परिक्रमेवर आतापर्यंत सुमारे चार लाख रुपये खर्च झाले आहेत मात्र परिक्रमेची खरी नायिका म्हादेई हिच्या बांधणीवर सव्वा चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे जगात सर्वप्रथम विनाथांबा एकट्याने शिडाच्या नौकेतून विश्वजलप्रदक्षिणा घालणारे सर रॉबिन नॉक्स यांची ‘सुहैली’ हि बोट देखील मुंबईतच बांधण्यात आली होती आणि भारतीय हातांनीच बनवलेल्या म्हादेईतुन दोन जलप्रदक्षिणा पूर्ण झाल्याचा दोंदे यांना अभिमान वाटतो. आतादेखील तब्बल पाच महिन्यांच्या खडतर जलसफरीनंतर ती  पूर्वीइतकीच नवी दिसत असल्याचं दोंदे म्हणतात. चार वर्षांनी खरं तर इतर बोटी बऱ्याच जुन्या दिसायला लागतात पण म्हादेईकडे पाहून तिने चार वर्षात दोन सागर परिक्रमा पूर्ण केल्या असतील यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. अजूनही म्हादेई सेलिंग स्पर्धेत उतरू शकते असा विश्वास त्यांना वाटतो. म्हादेई आणि अभिलाष यांच्याशी कमांडर दोंदे यांचे एक वेगळेच तरल नाते आहे. म्हादेई दांडेकरांच्या कारखान्यात बांधायला घेतली तेव्हापासून ते सागर परिक्रमेची दुसरी फेरी पूर्ण होईपर्यंत कमांडर दोंदे सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. सागर परिक्रमेच्या मोहिमेची अथपासून इतिपर्यंत तयारी करण्याची जबाबदारीही कमांडर दोंदे यांनी निभावली होती. अर्थातच त्यांनी स्वतः १९ ऑगस्ट २००९ ते १९ मे २०१० या काळात सागर परिक्रमेची पहिली फेरी जिंकली होती त्यामुळे त्यांच्या अनुभवाची मोठीच शिदोरी अभिलाष यांच्या पाठीशी होती. याच पहिल्या मोहिमेतला म्हादेईलाच घेऊन केप टाऊन ते गोवा आणि रिओ दि जानेरो ते केप टाऊन हे अंतर कापण्याचा अनुभव अभिलाष यांच्या हाताशी होता.
 म्हादेईच्या नावामागील कथा
कर्नाटकातील म्हादेई नदी गोव्यात येताना मांडोवी नाव घेते आणि मांडोवीच्या परिसरात सत्तरी तालुक्यात सुमारे हजार वर्षांपूर्वीचे नौदेवीचे मंदिर पाहायला मिळते. जहाजांची हि संरक्षक देवता असल्याचे मानले जाते. त्यामुळे नौदेवी आणि मांडोवी नदीच्या नावावरून भक्तिभावाने बोटीचे नावदेखील म्हादेई ठेवण्यात आले.

सागर परीक्रमेसाठी सुसज्ज म्हादेई...
पूर्णतः भारतीय बनावटीच्या म्हादेईचे शीड केप टाऊन येथील नॉर्थ सेल कंपनीकडून बनवून घेण्यात आले होते. डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरखेरीज पवनउर्जेवर चालणारा जनरेटरदेखील मदतीला होता. गरज लागल्यास सौरउर्जा यंत्रणाही बसवण्यात आली होती. बोटीच्या तळाशी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंपाची सोय बोटीवर आहे. तसेच कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी छोटी सनशेड बोटीवर एका बाजूला टाकण्यात आली होती. संपर्कासाठी एफबी-५०० हि अत्यंत महागडी यंत्रणा बसवण्यात आली होती.
म्हादेईच्या कप्तानाविषयी थोडेसे..
मूळचे केरळचे असणारे लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी हे भारतीय नौसेनेच्या वायुदलात २००१ साली वैमानिक म्हणून दाखल झाले. त्यांचे वडील निवृत्त लेफ्टनंट कमांडर व्हि.सी. टॉमी यांच्यामुळेच लहान वयातच अभिलाष यांची समुद्राशी ओळख झाली. अभिलाष वयाच्या सातव्या वर्षापासून पोहायला शिकले आणि कित्येकवेळा ते कुटुंबियांची नजर चुकवून समुद्रावर पोहायला जायचे. काहीसे अबोल, शांत आणि निगर्वी असले तरीही अभिलाष निडर आहेत त्यामुळेच हि परिक्रमा त्यांनी निभावून नेली. डॉर्निअर विमान चालवण्यात ते अत्यंत कुशल आहेत. मात्र नौकानयनात त्यांना फार पूर्वीपासूनच रस होता आणि त्यांनी नौदलात आल्यानंतर २००४ सालापासून यॉट सेलिंगला व्यावसायिकरित्या सुरुवात केली. खरे तर त्यांनी विमान चालवणे शिकण्याच्याही आधी यॉट सेलिंगचे धडे घेतले आणि कार ड्रायव्हिंग तर त्यांनी या दोन्हीनंतर आत्मसात केले. अभिलाष यांना वाचनाची खूप आवड आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे रोजच्या कंटाळवाण्या वाटणाऱ्या जगण्यातला नर्मविनोद हेरण्याचेही कसब आहे. त्यांना सेलिंगखेरीज फोटोग्राफी आणि गिटार वाजवण्याची देखील आवड आहे. आहाराने सध्या शाकाहारी असलेल्या अभिलाषची वेळप्रसंगी मांसाहाराला ना नसते.

सागर परिक्रमा-२ मधील परीक्षा घेणारे क्षण....
अभिलाष यांच्या मते वादळानंतर हेलकावणाऱ्या साउथ पैसिफिकच्या समुद्रात भर पावसात २५ मीटर उंच डोलकाठीवर चढून शीड बदलणे हा खरेतर आततायीपणाच होता. मात्र शीड अश्या प्रकारे फाटलेल्या अवस्थेत असताना बोट पुढे नेणे म्हणजे महामूर्खपणा झाला असता. परिस्थिती अशी होती कि डोलकाठीवर चढले किंवा नाही चढले तरीदेखील या ना त्या प्रकारे जीवावर बेतणारच होते. त्यामुळे वाघ म्हटले तरी खाणार आणि वाघोबा म्हटले तरी खाणार असा विचार करून अभिलाष निर्धार करून त्या उंच डोलकाठीवर चढले. हा सर्व नाट्यमय ’पराक्रम’ पार पाडण्यासाठी त्यांना सुमारे एक-दीड तास लागला होता. परंतु डोलकाठीच्या टोकावर पोहोचल्यानंतर एक प्रकारच्या अनोख्या चैतन्याचा आपल्यात वावर होतो आहे असेच क्षणभर अभिलाष यांना वाटले. तिथून समुद्रावर दूरपर्यंत नजर जात होती आणि तो नजारा त्यांच्यासाठी आजही अविस्मरणीय आहे. खाली उतरून या चढाई प्रसंगाचा व्हिडीओ पाहिल्यावर मात्र अभिलाष यांना आपण किती अशक्य कोटीतले साहस केले आहे याची जाणीव झाली आणि त्यांच्या अंगावर त्या आठवणीने आजही शहारे उमटतात. ऑस्ट्रेलियाजवळून जाताना म्हादेई मोठ्या वादळात सापडली त्यावेळी ते खरेच खूप धास्तावून गेले होते. महाभयंकर वादळात बोट चालवताना त्यांच्या जीवाचं पाणी पाणी झालं होतं परंतु त्यानंतर इतकी भयानक संकट झेलली कि त्या तुफानी वादळाचं आता त्यांना काहीच वाटत नाही. या दोन संकटांनीच त्यांची खरी सत्वपरीक्षा पाहिल्याचे अभिलाष सांगतात.
बोटीवरील अडचणींचा सामना...

तुफानी वादळे, ४०-५०-६० समुद्री मैलाच्या वेगाने वाहणारे झंजावाती वारे, समुद्रावरील अफाट काळामिच्च अंधार, समुद्री चाच्यांची भीती, दहा मजली इमारतीइतक्या उंचीच्या लाटा, भयानक उष्ण आणि थंड तापमानाचे प्रदेश अश्या बोटीच्या बाहेरील सर्व नैसर्गिक संकटांपुढे त्यांना बोटीच्या आतमध्ये उद्भवणाऱ्या अडचणी कमी त्रासदायक वाटायच्या. अर्थात याला अपवाद फक्त शीड फाटण्याचा प्रसंग होता. बोटीच्या इंजिनरूम मधली तेलगळती, जनरेटरमधील सतत बिघडणारे ऑईल प्रेशर, इंजिनाच्या कुलर यंत्रणेचा पंप आणि लीड सेन्सरमधील बिघाड, खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणाऱ्या यंत्राने केलेली हाराकिरी, फाटलेली स्लीपिंग ब्याग अश्या कितीतरी अडचणी येत होत्या. एकदा तर बोटीवरील सर्व घड्याळ्यांनी संप पुकारला आणि विविध वेळा दाखवायला सुरुवात केली तेव्हा अभिलाष यांची तारांबळ उडाली होती. मात्र सर्वात कठीण होते ते पाण्याचे दुर्भिक्ष्य ! २० मार्चला म्हादेईने विषुववृत्त ओलांडले पण त्याआधी १७ मार्चला बोटीवरील सुमारे २०० लिटरहून अधिक पाणी दूषित झाले आणि त्यामुळे पाण्याचा शेवटचा घोट संपण्याआधी म्हादेई मुंबईच्या किनाऱ्यावर परत नेण्याचे आव्हान अभिलाष यांच्यासमोर उभे राहिले. 

सफरीतील काही आनंदाचे मैल...
या मोहिमेवर असताना पाच महिने अभिलाष यांना बाहेरच्या जगात चालणारी सर्व हौस-मौज स्वप्नवतच होती. आधार होता तो फक्त त्यांच्या आवडत्या पॉपकॉर्नचा. बोटीवरील कोणतीही अडचण निस्तरली कि अभिलाष लगेचच पॉपकॉर्नच्या पिशवीकडे धाव घ्यायचे. अशी पॉपकॉर्न खाण्याची संधी त्यांना अनेकदा मिळत होती. त्यापैकीच एक होता २६ जानेवारीचा दिवस जेव्हा अभिलाष यांनी केप हॉर्नला वळसा घालून बोटीवर भारताचा तिरंगा फडकवला. केप हॉर्नला यशस्वीरीत्या घातलेला वळसा हा या मोहिमेतील एक महत्वाचा टप्पा होता. वर्षअखेरीस आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार २०१३ साली म्हादेईने आंतरराष्ट्रीय प्रमाणरेषा पहिल्यांदा पार केली पण सहा तासातच दुसऱ्यांदा देखील प्रमाणरेषा पार केली त्यामुळे भारतीय प्रमाणवेळेनुसार अभिलाष हे नववर्षाचे स्वागत करणारे आणि त्याचबरोबर मावळत्या वर्षाला निरोप देणारे पहिले भारतीय ठरले. काही समुद्रपक्षी आणि डॉल्फिन्स यांच्या अनोख्या सहवासात अभिलाष यांनी त्यांचा वाढदिवस देखील ५ फेब्रुवारीला बोटीवर साजरा केला. अश्या कित्येक मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण अनुभवांची नोंद अभिलाष यांच्या ब्लॉगवर  http://sagarparikrama2.blogspot.in/ वाचायला मिळते. सागर परिक्रमेवर लक्ष ठेवून असणाऱ्या चाहत्यांसाठी हा ब्लॉग ते या खडतर प्रवासातही वेळ मिळेल तेव्हा अपडेट करीत होते. तसेच फेसबुक आणि ट्विटरवरून देखील ते सर्वांशी संवाद साधत होते.
अभिलाष यांचे मनोबल टिकवणारा योग...
भल्याभल्या दर्यावर्दींचाही आत्मविश्वास उलथवून टाकणाऱ्या बेभान समुद्रात अभिलाष यांनी विचलित न होता नेहमीच थंड डोक्याने तारतम्य ठेवून अचूक निर्णय घेतले. कितीही प्रतिकूल हवामानात आणि समस्यांमध्येही त्यांच्या मनशक्तीला खिंडार पडले नाही याचे सर्व श्रेय त्यांनी योगाभ्यास आणि ध्यानधारणेला दिले आहे. बोटीवर असताना कमीतकमी अर्धा तास योगाभ्यास आणि ध्यानधारणा करण्याचा रिवाज त्यांनी सुरु ठेवला होता. त्यामुळेच त्यांना या महाकठीण मोहिमेचे दडपण जाणवलं नाही उलट अडचणी आणि आव्हानांकडे नेहमीपेक्षा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता आलं. ‘प्रहार’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले कि योगाभ्यास विरक्तीची भावना जोपासायला मदत करतो त्याचाही मला पाच महिने सर्वांपासून दूर राहताना फायदाच झाला. एकटेपणाच्या भावनेचं ओझंदेखील योगाच्या मदतीनेच कमी झालं. योगाभ्यासामुळेच मी अनेकदा विविध भास होत असताना देखील सतर्क राहिलो, अचूक निर्णय घेऊ शकलो आणि माझ्यावर बाह्यपरिस्थितीचा फारसा परिणाम मी फारसा होऊ देत नव्हतो त्यातही मला योगाभ्यासच हाताशी आला. आता म्हादेईपासून विलग राहावे लागणार आहे पण माझ्या या भावनिक गुंतवणुकीतून बाहेर पडायला मला योगाभ्यासाचीच मदत होईल असा विश्वास त्यांना वाटत आहे. कोइमतूरमधील इशा फाउंडेशन योगा सेंटरमधून त्याने योग आणि ध्यानधारणेचा अभ्यास केला आहे.

एकांतप्रिय दर्यावर्दी
अभिलाष यांच्याच शब्दात सांगायचं तर जमिनीवरल्या जगात असतो तेव्हा आपण विनाकारण बारीकसारीक गोष्टी मनाला लावून घेत असतो. आता सागर परिक्रमा पूर्ण केल्यानंतर तर मला जगातील थोडक्यात जमिनीवरील ९९ टक्के गोष्टी फिजूल वाटायला लागल्या आहेत. एकांतात राहिल्यामुळेच या गोष्टींची जाणीव झाली. त्यामुळेच कदाचित सागर परिक्रमा पूर्ण करून मी फार मोठा विक्रम केलाय असं वाटत नाही. पण निश्चितच भारतीय नौदलाच्या इतिहासासाठी हि एक अभिमानास्पद गोष्ट आहे असे सांगत अतिशय विनम्रपणे भारतीय नौसेनेचे अत्यंत कुशल वैमानिक लेफ्टनंट कमांडर अभिलाष त्यांनी केलेल्या विक्रमाची तारीफ करून घेणं टाळत होते. हा पूर्ण जलप्रवास एकट्याने तेही कोणाच्याही मदतीशिवाय करायचा असल्यामुळे प्रथम त्यांना घरातून आईचा खूप विरोध झाला. पण शेवटी लाडक्या मुलाने आईला या सफारीसाठी मनवलेच. परंतु पहिल्यापासूनच थोडं अबोल आणि मनस्वी असणाऱ्या अभिलाष यांना मुळात एकटे राहण्याचं आकर्षणच आहे. इतके दिवस एकटे राहताना तुमच्या मनात काय विचार येत होते असा प्रश्न त्यांना नेहमीच विचारला जायचा. ‘’मला पर्याय दिल्यास पुढील वेळी मी इंटरनेटशिवायच सागर परिक्रमा करेन कारण मला हा असा सर्व कोलाहलापासून दूर निवांत एकटेपणाच अधिक भावतो. खरंतर मी असंच राहणं जास्त पसंत करतो आणि मला एकटे असण्याचं नवल मुळात वाटतच नाही. अशावेळी तुम्हाला वेगळ्या ध्यानधारणेची गरज भासत नाही. त्यामुळे पाच महिने म्हादेईवर एकटे राहण्याची कल्पना उलट मला जास्तच आवडली होती.’’ भारतीय नौसेनेचे अत्यंत कुशल वैमानिक लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी ‘प्रहार’ला दिलेल्या मुलाखतीत एकटे राहण्यामागील त्यांचा विचार मांडला होता. म्हादेई बोटीवर संपर्कासाठी एफबी-५०० हि अत्यंत महागडी यंत्रणा बसवण्यात आली होती. काही कोटी रुपयांची ही संपर्क आणि दळणवळण व्यवस्था उपग्रहाद्वारे देण्यात आली होती. दर मिनिटाला अंदाजे २,५०० रुपये इतके तिचा वापर केल्यास खर्च होतात. या व्यवस्थेचा आवश्यक तेवढाच वापर करून अभिलाष या मोहिमेत सर्वांच्याच संपर्कात राहिले. शेवटच्या टप्प्यात असताना त्यांनी काही प्रसारमाध्यमांनाही मुलाखती दिल्या. लगेच तासनतास बकाल मुलाखतींचे अनावश्यक रतीब घालणाऱ्या टीव्हीवाहिन्या डोळ्यासमोर आणू नका जरी त्यांचं कामदेखील उपग्रहांद्वारेच चालतं कारण मोठमोठ्या उद्योगसमूहांचं आणि जाहिराती देऊन पुरस्कृत करणाऱ्या कंपन्यांचं ( आणि कोण जाणे कोणा कोणाचं !) त्यांना आर्थिक पाठबळ असतं. तेव्हा तिथे तुम्हाला दिसणाऱ्या प्रत्येक फ्रेममागे वाहिनीला लाखोवारी पैसे आधीच मिळालेले असतात. सागर परिक्रमा करताना मात्र अभिलाष आणि म्हादेई यांना अनेक बंधन पाळावी लागली त्यापैकी इंटरनेट आणि इतर संपर्क सुविधांचा कमीतकमी वापर हे बंधन अभिलाष यांनी स्वतःहूनच घालून घेतलं होतं. त्यांना एकटे राहण्याची सवय होत गेली आणि हे बंधन पाळणंदेखील सोपं होत गेलं. कित्येकवेळा बोटीवरील इतर कामांमुळे आणि बाहेरील दृश्य भान हरपवून टाकणारं असल्यावर बोटीवर संगणक आणि इंटरनेट असल्याचाही विसर पडायचा असं अभिलाष यांनी सांगितलं.
सागर परिक्रमा म्हणजे काय ?
लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांच्या आधी कमांडर दिलीप दोंदे यांनी २००९ ते २०१० या काळात १६५ दिवसात चार विश्रांतीथांबे घेत सागर परिक्रमा-१ पूर्ण केली होती. परंतु विनाथांबा आणि कोणाच्याही मदतीशिवाय सागर परिक्रमेचे साहस अंगावर घेण्यासाठी समुद्राला पुरून उरेल इतक्या धैर्याची गरज आहे. कारण या प्रकारच्या परिक्रमेत कोणत्याही परिस्थितीमध्ये बंदरावरून किंवा समुद्रावरील इतर बोटींची मदत घेता येत नाही. दुसरी अट म्हणजे केवळ शिडाच्या सहाय्याने बोट चालवत इंजिनाचा वापर न करता २१,६०० समुद्री मैलांचे अंतर कापणे अपेक्षित असते. परिक्रमेची सुरुवात जिथून होते तो किनारा सोडताना आणि परत त्या किनाऱ्याजवळ पोहोचल्यानंतरच इंजिनाची सुविधा वापरता येते. परिक्रमेच्या मार्गात तीन केप्सच्या उत्तरेने जात ( केप हॉर्न, केप ऑफ गुड होप आणि केप लिऊविन ) रेखावृत्त आणि विषुववृत्त (दोन वेळा) पार करावे लागतात. या मार्गात कोणत्याही कालव्यातून बोट काढता येत नाही.  
म्हादेईवरची मेजवानी
म्हादेईवर सुमारे ६०० लिटर गोड्या पाण्याचा आणि १५० किलो अन्नाचा साठा देण्यात आला होता. काही खाद्यपदार्थांची पाकिटे म्हैसूरच्या संरक्षण दलाच्या अन्न प्रयोगशाळेत बनवण्यात आली होती. दिवसाला अभिलाष यांनी निदान ५०० ग्राम अन्न खावे अशी त्यांना सूचना होती. अन्नामध्ये इन्स्टट खीर,भाज्या, व्हेज पुलाव, चिकन खिमा, पॉपकॉर्न, कॅडबरी चॉकलेट, ड्राय आईसक्रिम,गोड हलवा, भात, बटाटे,मक्याचे दाणे, बिस्किटं, खारवलेले पोहे, मासे आणि लिंबाच्या फोडी, लोणचे इत्यादींचा समावेश होता तर द्रवपदार्थात फळांचे रस, ताक, शीतपेये आदींचा समावेश होता. मात्र सततच्या परिश्रमाने अभिलाष यांचे पहिल्याच काही दिवसात १० किलो वजन कमी झाले होते.
परिक्रमेची सांगता..
म्हादेईने अपेक्षित वेळेतच म्हणजे १५० दिवसात ३१ मार्च २०१३ रोजीच परिक्रमा पूर्ण करून मुंबईच्या किनाऱ्याला स्पर्श केला. मात्र राष्ट्रपतींकडून कार्यक्रमासाठी पाच दिवसांनंतरची वेळ मिळाल्याने म्हादेई एक आठवडा आधीच मुंबईला पोहोचल्याची गोष्ट गुप्त ठेवण्यात आली. गेल्या सहा एप्रिल रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांचा सत्कार करण्यात आला . या सागर परिक्रमेमध्ये डोलकाठी तुटण्यापासून ते अगदी पाण्याचा तुटवडा, अश्या अनेक संकटांनी अभिलाष यांचा निग्रह विचलित करण्याचा प्रयत्न केला. परंतु अभिलाष हे जीवावर बेतू शकणाऱ्या अनेक कसोटीच्या क्षणांना केवळ मनोबलाच्या जोरावरच तोंड देत होते. आपल्या परीक्रमेचं श्रेय मात्र या सुपरहिरोने म्हादेई आणि तिची देखभाल करणारे मोहम्मद इस्लाम आलम यांना दिलं आहे. म्हादेईला सागर परिक्रमेवर निघण्याआधीचे वर्षंभर मोहम्मद आलम यांनी म्हादेईला तळहाताच्या फोडासारखं जपून तिची निगराणी ठेवली. त्यामुळेच म्हादेई मजबूत राहून तिनं सागर परिक्रमा-२ निभावण्यात मोलाची साथ दिल्याचं अभिलाष सांगतात. सागर परीक्रमेचे तीन आधारस्तंभ नौदलाचे माजी ध्वजाधिकारी व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी, कमांडर दिलीप दोंदे आणि म्हादेईचे शिल्पकार रत्नाकर दांडेकर यांच्याशिवाय हि परिक्रमा तडीस गेलीच नसती असंदेखील अभिलाष यांनी सांगितलं. त्याचबरोबर अभिलाष यांनी ‘सागर परिक्रमा-२’ चे पूर्ण श्रेय नौदलातील एअरफोर्सच्या दलाला (ज्यांनी वैमानिकांची कमतरता असूनही सागर परीक्रमेसाठी अभिलाष यांना हुरूप दिला ), त्यांची आई श्रीमती वल्सा, व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी, कमांडर दिलीप दोंदे, बोटीचे कर्ताधर्ता रत्नाकर दांडेकर आणि म्हादेईच्या सागर परिक्रमेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला समर्पित केले आहे.
शाळांमध्ये पोहोचली सागर परिक्रमा-२
इंटरनेटवर शोधल्यास फक्त सागर परीक्रमा-२ साठी सुमारे ७०,८०० रिझल्ट्स सापडतात. पण त्याहीपेक्षा अधिक कष्ट घेऊन मुंबईच्या स्वप्नाली धाबुगडे हिने सागर परिक्रमेला शाळाशाळांमध्ये पोहोचवण्याचे मोठे काम केले आहे. तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी मुंबई आणि जळगाव येथील हर एक शाळेत जाऊन इयत्ता ७वी ते ९वी मधील विद्यार्थ्यांना सागर परिक्रमेच्या मोहिमेची सखोल आणि सचित्र माहिती दिली. त्यांच्या या ‘सागर परिक्रमा जागरुकता अभियाना’मुळे आत्तापर्यंत सुमारे ३ हजारांहून अधिक मुलांना या धाडसी मोहिमेची ध्वनीचित्रफितीतून माहिती मिळाली आहे. या अभियानात मुलांना मोहिमेचा हेतू, म्हादेई बोटीची रचना, पृथ्वीवरील खंड, प्रवासाचे सागरी मार्ग, हवामान आणि समुद्राशी निगडीत इतर भौगोलिक माहिती देण्यात येते. सध्याच्या शाळांच्या सुट्ट्या संपल्यानंतर या अभियानाचे वर्ग पुन्हा सुरु होतील. भारतीय नौदलाच्या जनसंपर्क खात्यानेही या अभियानाचे कौतुक केले आहे. सागर परिक्रमेची शालेय विद्यार्थ्यांना माहिती द्यायची असल्यास इच्छुकांनी sailwithmhadei@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा.
सागर परिक्रमा-३ कधी ?
पाच महिन्यांच्या या अविश्रांत मोहिमेनंतर केवळ दोन दिवसांच्या रजेनंतर अभिलाष सेवेत पुन्हा रुजू झाले आहेत. वरिष्ठांनी परवानगी दिल्यास पुन्हा एकदा सागर परिक्रमेवर जायचीदेखील त्यांची तयारी आहे. नौसेनेला आता प्रतीक्षा आहे ती तिसऱ्या सागर परिक्रमेची आणि यावेळी नौदलातून युवकांनी विशेषतः महिला अधिकाऱ्यांनी पुढं यावं असं वरिष्ठांना वाटत आहे. त्यामुळे पुढील यशस्वी सागर परिक्रमेची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याची नौदलात चर्चा सुरु झाली आहे. विनाथांबा सागर परिक्रमेची ही दुसरी मोहीम फत्ते झाल्यामुळे भारतीय नौसेनेतही उत्साहाचं वारं पसरलं आहे.
सागर परिक्रमा-२-जिद्द आणि स्फूर्तीचा धडा
सागर परिक्रमा-२ साठी चार लाखाहून कमी रुपये खर्च झाले आहेत. वास्तविक आजकाल देशात लग्नसोहळ्यांवर होणारे अनावश्यक खर्च आणि आयपीएल सारखे निरर्थक क्रिकेट सामने यांच्या खर्चाच्या तुलनेत हा खर्च अत्यंत क्षुल्लक आहे. अशा निरुपयोगी खेळांच्या सामन्यांमधून युवा पिढीला वास्तविक कोणतीही स्फूर्ती मिळत नाही मात्र सागर परिक्रमा-२ने यश मिळवल्यामुळे भारतीय नौसेनेतही नव्या चैतन्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. भारतीय नौदलाच्या सागर परीक्रमा-२ या साहसी जलसफरीला लाखो भारतीयांनी पाठींबा दिला. यात सर्वधर्मीय लोक होते म्हणूनच एकत्र आल्यास भारतीयांमध्ये खूप मोठी मजल मारण्याची ताकद आहे असंही अभिलाष यांना वाटते. देशासाठी गर्व ठरलेल्या अभिलाष यांच्या विश्वविक्रमाने नव्या युगाची नांदी सुरु झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. आज कुछ तुफानी करते है असे म्हणत निव्वळ चित्रपट आणि जाहिरातीतून थराराची चव घेण्यापेक्षा देशाची शान वाढवू शकणाऱ्या साहसांकडे युवा पिढीने जरूर वळावे हा अभिलाष यांचा संदेश गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारण शेवटी ‘डर के आगे जीत है’ हे देखील खरेच आहे !

The edited article about Sagar Parikrama-2 by Lt.Cdr.Abhilash Tomy was published in 'Prahaar' news daily on 14th April,2013, you may like to read that so here is the link http://prahaar.in/collag/81141  

Sunday, March 24, 2013

With Olive Riddley turtles on Velas beach


                                                             
कासविणीने पाठ फिरवलेल्या अंड्यांमधून बाहेर येऊन ज्यांचे डोळे आणि पावले देखील अजून विकसित झालेली नाहीत अशी इवलाली पिल्ले कोणत्याही मदतीशिवाय मुलायम रेतीमधून अथांग सागराकडे धाव घेतात आणि त्यावेळी एकप्रकारे इच्छाशक्ती कशी सकारात्मक असली पाहिजे याचे प्रात्यक्षिकच जणू आपल्याला मिळते. कारण या पिल्लांना पाण्याचा स्पर्श ही माहित नसतो तरीदेखील भवताली शिकारी सागरी पक्षी आणि प्राणी त्यांचा घास घ्यायला टपलेले असताना फक्त समुद्राकडेच जायचे आहे या उपजत जाणिवेमुळे ही पिल्ले सागराच्या लाटांवर स्वार व्हायचे धाडस करतात. लाटा त्यांना निर्दयीपणाने पुन्हा किनाऱ्यावर भिरकावून देतात पण या पिल्लांची पाण्याकडे जाण्याची आस जबर असते त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून कासवांची ही पिल्ले शेवटी समुद्र गाठतातच. अर्थात ऑलिव्ह रिडले कासवाच्या अशा हजार पिल्लांपैकी काहीच पिल्ले जिवंत राहतात आणि त्यांची मोठी कासवे होतात. कोकणच्या किनारपट्टीला ऑलिव्ह रिडले प्रजातींच्या कासवांची वीण होते हे १२ वर्षांपूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणात माहिती झाले आणि त्यानंतर चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने कासवांच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठी पुढाकार घेतला. ऑलिव्ह रिडले ही कासवाची जात वन्यजीव कायद्याच्या शेड्यूल एकमध्ये मोडतात थोडक्यात सांगायचे तर त्यांना वाघाइतकाच संरक्षण दर्जा आहे. संस्थेने जे बीज रोवले त्याची फळे आज किनाऱ्यावरील वेळास, दिघी, मारळ सारख्या काही गावांना पर्यटन विकासाच्या रुपाने चाखायला मिळत आहेत. कासव जत्रेच्या निमित्ताने वेळासला भेट देता आली आणि पर्यटन विकासात कोकणातील सागर किनारा लाभलेल्या गावांच्या यादीत आता वेळासनेही आपलं खाते उघडले आहे हे लक्षात आले. वेळासची कासव जत्रा या संकल्पनेला आता सात वर्षे झाली आहेत. सागरी किनाऱ्याचे आकर्षण असले तरीही कासव संवर्धनासारख्या गोष्टीकडे पर्यटकांचे लक्ष आणि स्वारस्य वळवणे ही सोपी गोष्ट नाही. पुन्हा पर्यटक इथे आल्यानंतर त्यांना शिस्तीमध्ये ठेवून कासवांची पिल्ले दाखवून कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या चार गोष्टी सांगणे हे त्याहून ही कठीण काम आहे. सह्याद्री निसर्ग मित्र आणि वेळासचे गावकरी यांनी गेली सात वर्षे परस्पर सहकार्याने ही कासव जत्रा चालवली आहे.

आपल्या देशात वाघ,सिंह किंवा डॉल्फिन पाहायला चला म्हटल्यावर सहलींना चांगला प्रतिसाद मिळतो. अश्या सहलींना जाण्यासाठी कुटुंब, निसर्गप्रेमी, भटके पर्यटक,वन्यजीव अभ्यासक, हौशी फोटोग्राफर असे सारेच उत्सुक असतात. या साऱ्यांनी काढलेल्या फोटोंनी फेसबुक इत्यादी सोशल मिडिया ओसंडून वाहत असतो. अर्थातच यातला बिझनेसचा भाग सोडून दिला तर कधी कोणी एव्हढ्याच हौशीने किंवा तळमळीने मगरी, कासवे किंवा माळढोक, गिधाडे असे प्राणी-पक्षी पाहायला जाणे जरा मुश्कीलच आहे. म्हणूनच अश्या परिस्थितीत सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमध्ये सुमारे सहा वर्षे नेटाने टिकाव धरलेल्या समुद्री कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्पाला आता लोकांकडून मिळणारा बराचसा प्रतिसाद आणि मदत खूप महत्वाची ठरते आहे. या प्रकल्पाला राज्य शासन, पर्यावरण आणि वन खात्याचेही सहकार्य आहे. यामध्ये स्थानिकांनाही सामावून घेण्यात आले आहे, कारण कोणतीही वन्यजीव संवर्धन मोहीम ही स्थानिकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होत नाही. प्राण्यांचे संवर्धन आणि संरक्षण प्रकल्प म्हणजे फक्त वन्यप्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील लोकांचेच काम अशी काहीशी समजूत आहे. जे पर्यटक डॉल्फिन किंवा सर्पउद्यान पाहायला जातील, ते पर्यटक कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्प पाहायला जातीलच असे नाही. त्यामुळेच सह्याद्री निसर्ग मित्रने चालवलेले प्रयत्न आणि आता त्याचा वेळासच्या पर्यटन विकासात होणारा उपयोग महत्वाचे ठरतात. देशात टायगर टूरिझम वगळता अन्य वनचर अथवा जलचरांसाठी वेगळे प्रयत्न करून पर्यटकांना सामावून घेणारे विशेष प्रकल्प फारसे नाहीत आणि त्या अनुषंगाने आयोजित केल्या जाणाऱ्या सहलीदेखील नाहीत. आपल्याकडे ज्या काही मोजक्याच ठिकाणी डॉल्फिन दिसतात तिथे सहली नेल्या जातात. आपल्याकडे अश्या प्रकारच्या संवर्धन आणि संरक्षण प्रकल्पांना सहल म्हणून भेट देण्याची आवड रुजलेली नाही त्यामुळेच सह्याद्री निसर्ग मित्रचा हा कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्प उल्लेखनीय ठरतो. म्हणूनच वेळासच्या कासव जत्रेमधली ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची पिल्ले कशी दिसतात या उत्सुकतेपोटी यावर्षी वेळासला जायचे ठरवले.

आधीच आडवळणावर असलेल्या एखाद्या गावाला अचानक पहिल्यांदाच भेट द्यायचे ठरले तर ठरलेल्या मुक्काम पोस्टवर पोहोचेपर्यंत जो खटाटोप करावा लागतो तो सर्व वेळासच्या प्रवासात घडला. वेळासला पोहोचताना बऱ्याचजणांची ‘जाते थे जापान पहुँच गये चीन’ अशी अवस्था होते कारण इथे दोन विरुद्ध दिशांना असणारी दोन वेळास गावे आहेत. एक आहे बाणकोट(आगरी) वेळास तर दुसरे आहे साधे वेळास. गोरेगाव-श्रीवर्धन-म्हसळा नंतर एक हरिहरेश्वरला जाणारा तर दुसरा दिघीला जाणारा असे दोन फाटे फुटतात. गोरेगाववरून आंबेत घाटात उतरूनही वेळासपर्यंत पोहोचता येते पण तो लांबचा रस्ता आहे, पण हरिहरेश्वर-बागमंडला असा रस्ता धरून नंतर जेटीने फेरीबोटीव्दारे नदी पार करून गेल्यास बाणकोट वेळासला कमी वेळात जाता येते. कासव मित्र मंडळाच्या किंवा सह्याद्री निसर्ग मित्रच्या माहिती स्थळावर कोठेही दोन वेळास गावे अस्तित्वात असल्याचा आणि हरिहरेश्वर- बागमंडला रस्त्याने व्हाया फेरीबोटीने येण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचा उल्लेख केलेला नसल्याने आमच्या प्रवासात  बाणकोटी हिसका बसला  याचे कारण म्हणजे आम्ही दुसऱ्याच वेळासचा रस्ता धरला होता. जेटीवरून फेरीबोटीने जायचे असल्यास त्यांच्या काही ठराविक वेळादेखील माहिती असणे आवश्यक आहे. पण गावात पोहोचल्यानंतर जेव्हा परदेशी पर्यटक पाहिले तेव्हा कोकणच्या किनारपट्टीवर असणाऱ्या एका लहानशा गावात फक्त कासवांची पिल्ले पाहण्यासाठी कुठूनतरी सातासमुद्रापलीकडून आलेल्या त्यांचे आणि सह्याद्री निसर्ग मित्रच्या प्रयत्नांचेही कौतुक करावेसे वाटले. गेली वीस वर्षे रत्नागिरी,रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने ऑलिव्ह रिडले कासवे, शेषारी गरुड, गिधाडे आणि भारतीय पाकोळ्या यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न चालवले आहेत.

ऑलिव्ह रिडले कासव मादी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान वेळासच्या किनाऱ्यावर येऊन अंडी घालते. साधारण ४५ ते ५५ दिवसांचा उबवण काळ लोटल्यानंतर पिल्ले बाहेर येतात. पर्यटकांना पिल्ले पाहता यावीत यासाठी वेळास येथे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान कासव जत्रा घेतली जाते. सुमारे महिनाभर चालणाऱ्या कासव जत्रेत सामील होण्यासाठी दर रोज इथे सुमारे पाचशे पर्यटक येतात. या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते त्यासाठीच मग वेळाससारख्या ठिकाणी स्थानिकांची मदत घेतली जाते. सागरी कासवे, विशेषतः ऑलिव्ह रिडले जातीच्या दुर्मिळ कासवांची वीण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा, मोचेमाड, आरवली, तळाशील, केळूस, मुणगे आणि बागायतवाडी, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर आणि मारळ तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील तवसाळ, करडे, गुहागर, कोळथरे, मुरूड, दाभोळ, केळशी, आंजर्ला, वेळास या किनाऱ्यांवर आढळून आली आहे. येथील स्थानिकदेखील या प्रकल्पामध्ये आवडीने सहभागी होत आहेत कारण कासव पर्यटनामुळे त्यांचाही फायदा होतो आहे. सह्याद्री निसर्ग मित्रला वनखात्याकडूनही सहाय्य मिळते. कासवांची पिल्ले पाहण्यासाठी जमा झालेल्या पर्यटकांमध्ये फोटो काढण्यासाठी चढाओढ लागते आणि अश्या वेळी ही तळहाताएव्हढी पिल्ले कोणाच्याही पायाखाली येऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी कासव जत्रेच्या दिवसातही वनखात्याने बेशिस्त पर्यटकांवर जरब बसवण्यासाठी एक सहाय्यक द्यावा अशी मागणी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने केली आहे. कासव जत्रा आयोजित करताना त्याचे व्यावसायिकीकरण होणे अटळ आहे त्यामुळेच पर्यटन अथवा इतर कामांसाठी किनाऱ्यांचा विकास करताना तेथील जैविक विविधतेला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

येत्या काही वर्षात वेळास येथे कायमस्वरूपी कासव संशोधन आणि संरक्षण केंद्र उभारण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्रचे प्रयत्न सुरु असल्याचे वेळास कासव जत्रेचे समन्वयक रामाशिष जोशी यांनी सांगितले. त्यासाठी सुमारे नऊ लाख रुपयांची गरज आहे. त्यासंबधीची आणि या प्रकल्पाविषयीची सर्व माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संस्थेला अभ्यासू कार्यकर्त्यांचीही गरज आहे. स्थानिकांचा सहभाग आणि पर्यटन विकास या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर कासव संरक्षण आणि संवर्धनाचा हा संस्थेचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी प्रयोग आहे. वेळासच्या कासव मित्र मंडळाचा देखील एक ब्लॉग आहे जो पुरेसा अपडेट नसतो. कासव जत्रेला हजेरी लावणाऱ्या पर्यटकांसाठी गावातल्या काही घरांमध्ये निवास-भोजनाची सोय केली जाते मात्र प्रत्यक्ष जत्रेच्या काळात यातील किती घरे पाहुण्यांचे बुकिंग घेण्यासाठी उपलब्ध आहेत याची माहिती दोन्ही संकेतस्थळांवर दिली जात नाही. तरीदेखील दोन्ही माहितीस्थळावरून इतर बरीचशी माहिती मिळू शकते. कासव जत्रेच्या निमित्ताने उजेडात आलेले वेळासदेखील आता झपाट्याने बदलत आहे. गावाचा पर्यटन आणि आर्थिक विकास होण्याचे महत्व स्थानिकांच्या लक्षात आले आहे आणि त्यादृष्टीने त्यांच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. प्रकल्पात सहभागी झालेल्या इतर गावांनादेखील आर्थिक विकासाचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. वेळासला जाताना रस्त्याला अत्यंत देखणी अशी सागरी किनार आहे आणि प्रत्यक्ष वेळासला देखील सुंदर समुद्र किनारा आहे. फोटोग्राफी टुरीझम या नव्याने फोफावत चाललेला प्रकारातील पर्यटकांचा वेळाससारख्या गावांना फायदा होऊ शकतो.

वेळास गाव कोणत्याही कोकणी गावासारखेच अगदी साधे आणि स्वच्छ गाव आहे, पण कासव संरक्षण आणि संवर्धन प्रकल्प तसेच कासव जत्रेमुळे वेळासला नवे वलय प्राप्त झाले आहे. याच प्रकल्पामुळे वेळास आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आणि त्याचा फायदा पर्यटन विकासाच्या दृष्टीने आता वेळासला होतो आहे. या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या वेळास आणि इतरही गावांना रोजगाराच्या अनेक संधी मिळाल्या आहेत. अर्थात पर्यटन विकास क्षेत्रात अश्या वेळी नेहमीच संधीचा गैरफायदा न घेता आणि योग्य मार्गाने पर्यटकांची लुबाडणूक न करता गावाचा आर्थिक विकास आणि पर्यटन विकास या दोन्ही गोष्टी समांतर चालतील हे पहायचे असते. दुर्दैवाने रोजगाराची उत्तम संधी मिळालेली असतानाही वेळासचे काही गावकरी पर्यटकांचा गैरफायदा घेताना दिसले. कासवांची पिल्ले पूर्णपणे नैसर्गिक स्थितीत जन्म घेत असल्याने ते पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्याची गरज नसताना वेळासचे उपसरपंच आणि काही तरुण हे पर्यटकांकडून दर दिवशी प्रत्येकी पन्नास रुपये उकळताना दिसले. विशेष म्हणजे या शुल्काचा कोणताही उल्लेख माहितीस्थळावर केलेला नाही. त्यामुळे अनपेक्षितरित्या मागण्यात आलेल्या या शुल्काचा काही पर्यटकांनी तीव्र निषेध देखील केला. वास्तविक कोकणी पदार्थ आणि वस्तू, कासव स्मृती चिन्हे यांची विक्री तसेच कासव जत्रेसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी होम स्टेची सोय, सहल आणि प्रकल्प मार्गदर्शक अशा काही माध्यमातून गावकऱ्यांना चांगला पैसा मिळू शकतो. सध्या गावातल्या १९ घरांमध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय केली जाते. गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांनाही कासव संवर्धन प्रकल्पातून चांगला रोजगार मिळतो. पर्यटन विकास आणि रोजगार संधी महत्वाच्या आहेतच, परंतु व्यावसायिक वृत्ती प्रमाणाबाहेर वाढली तर काहीच वर्षात कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्पाचा मूळ हेतू बाजूला पडून या कासव जत्रेचा ‘इव्हेंट’ बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात पर्यटन विकास होण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

कोकणी घरात आणि कोकणी वातावरणात राहण्याचा अस्सल अनुभव मात्र वेळासमध्ये मिळतो. गावातली घरे अतिशय सुंदर आणि  पारंपरिक  पद्धतीची आहेत तसेच माणसेदेखील मोकळ्या मनाची आहेत. इथे पहिल्यांदाच येणाऱ्या परदेशी आणि देशी पाहुण्यांना आकर्षित करण्यासाठी सागर किनारा, माड, काजू आणि पोफळीच्या बागा, आमराया, फणस, रातांबे, विहिरी, शेते अश्या असंख्य गोष्टी आहेत, फक्त नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे. याबाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा केव्हाच प्रगत झाला आहे, आता वेळ उर्वरित कोकणाची आहे. महाराष्ट्राच्या कोकणपट्टीला सुदैवाने सागरी किनाऱ्यांनी संरक्षण आणि वैभवही दिले आहे. त्यातही मनशांती देणारे काही स्वच्छ किनारे अजूनही गर्दीपासून सुरक्षित आहेत. वेळास सध्या तरी फक्त कासव जत्रेच्या मोसमातच गजबजत आहे. अजून तरी वेळासचा किनारा पर्यटकांनी आक्रमून टाकलेला नाही. वेळासच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोबाईल संपर्क क्षेत्राबाहेर राहण्याची मोकळीक अनुभवता आली. कोणतेही बंधन नसताना फेरफटका करण्याची मजा केवळ शहरी नोकरदार पर्यटकच जाणो. उसळत्या लाटांमधून पुढे कचरा न येता अजून तरी इथे फेसाची स्वच्छ शुभ्र फुलेच उमलत आहेत आणि सुरूच्या बनामधून पावले थेट मऊ मुलायम रेतीकडे धाव घेताना फेरीवाले आडवे येत नाहीत. विशेषतः कासवांच्या पिल्लांसाठी तरी वेळासच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या गाजेला साद द्यायला हरकत नाही.

Please do read my article 'Velas chya kinarya varun' published on 24/03/2013 in Marathi news daily 'Prahaar',to read click on the link
 http://epaper.prahaar.in/24032013/Mumbai/Suppl/Page8.pdf