Translate

Sunday, November 11, 2012

सुंदरबन सफारी

बोनबीबी आणि दक्षिण राय देवाच्या जंगलातला शिकारी दबक्या पावलानी येतो मात्र चालत येत नाही तर तो पोहोत येतो आणि ते देखील तब्बल २-३ कि.मी अंतर पार करून येतो. परत जाताना शिकारीचे ओझे देखील पाण्यातूनच घेऊन जातो. त्याच्याच दहशतीमुळे बोनबीबीच्या म्हणजे वनदेवतेच्या पायाशी हिंदू आणि मुस्लीम दोघेही एकत्र येतात. ती त्यांचे जगातल्या सर्वात शक्तिमान आणि धूर्त शिकाऱ्यापासून संरक्षण करेल अशी सुंदरबनमध्ये राहणाऱ्या स्थानिकांची घट्ट श्रद्धा आहे आणि म्हणूनच जंगलात मध गोळा करायला जाताना किंवा मासेमारीसाठी जाताना हे स्थानिक बोनबीबीला साकडं घालून जातात. पण तेवढयानेही भागले नाही तर संकटाला दूर ठेवण्यासाठी सुंदरबनच्या आसमंतात रात्री फटाके आणि ढोलाच्या आवाजाचे पडसाद उमटतात. तरीही इथला सर्वेसर्वा म्हणजे रॉयल बंगाल टायगर त्याची शिकार उचलतोच. सुंदरबनमधील गावागावातून वाघाने केलेल्या शिकारींचे किस्से ऐकायला मिळतात. इथला निसर्ग जेवढा लहरी आहे तेवढाच इथला माणूस आणि वाघ देखील चिवट इच्छाशक्तीचा आहे. त्यामुळेच पश्चिम बंगालमधील सुंदरबन जगातील एक आश्चर्य आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे.

सुंदरबनमध्ये प्रवेश करणारे बहुतांशी पर्यटक ‘रॉयल बंगाल टायगर’ दिसेल काय अशीच हुरहूर मनाशी बाळगून बोटीतल्या प्रवासाला सुरुवात करतात आणि या भटकंतीमधला खरा थरार हरवून बसतात. प्रवासाच्या सुरुवातीला सोबत करणारी किनाऱ्याला लगटून असणारी छोटी छोटी गावं कधीच मागे पडलेली असतात. आता जमिनीच्या सीमा नजरेला शोधाव्या लागतात आणि समोर फक्त गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आणि त्यांच्या अनेक उपनद्यांचा निळाशार कॅनव्हास अफाट पसरलेला असतो आणि तेव्हाच वर आकाशात भान हरपवून टाकणारा रंगांचा विलक्षण खेळ सुरु असतो. दुतर्फा हेन्ताल( गोलपाता) ,काकडा आणि सुंदरीच्या झाडांनी ( इथल्या स्थानिक भाषेत तिवरांना सुंदरीची झाडं म्हणतात. ती बहुसंख्येने इथे आहेत म्हणूनच हे सुंदरबन ) व्यापलेले किनारे , किनाऱ्यावर उन खात पहुडलेल्या आणि बोटीच्या आवाजाची चाहूल लागताच पाण्यात गडप होण्याऱ्या विशालकाय मगरी, हिरवळीच्या पट्ट्यामध्ये चरणारी हरणं, माकडं आणि इतर प्राणी, लाटांनी बनवलेले पुळणींचे विविध आकार आणि त्यावर बसलेले अनेक जातींचे पाणपक्षी, बांगलादेशच्या बाजूने येणारी मोठाली व्यापारी जहाजं असं सर्व पाहता पाहता विचारांना आणि नजरेला कोंदण उरत नाही पण या इंडियन अमेझॉनच्या प्रदेशाची अद्भूत सफर आत्ता कुठे सुरु झालेली असते. पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातले सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाचं जंगल निश्चितच बंगालच्या पर्यटन क्षेत्रासाठी सोन्याची खाण आहे. भारतीय सुंदरबन ९६२९ चौरस कि.मी इतक्या क्षेत्रफळावर अफाट पसरलेलं आहे. परंतु पूर्ण सुंदरबनचा मोठा म्हणजे २/३ हिस्सा बांगलादेशातही गेलाय. हुगळी, गोमर, दुर्गादुनी आणि गोमदी या चार नद्यांचा संगम जिथे होतो तो सुंदरबनमधला प्रदेश तर स्तिमित करून सोडतो.

सुंदरबनचा खरा प्रवास सुरु होतो तो गोद्खाली जेटीपासून. कधी कधी जे चित्र काना-डोळ्यांसमोर रेखाटले जातं त्यापेक्षा सत्य नेहमीच काहीतरी वेगळे असू शकते. सांगायचं कारण असं कि पर्यटन करताना भ्रमनिरास करणारे अनुभव नेहमीच येतात आणि सुंदरबनला भेट देण्याआधी देखील अशीच काहीशी भीती मनात होती. कोलकाता ते गोद्खाली गावापर्यंतच्या रस्ता नामक मातीच्या खड्डेयुक्त पट्ट्याने या भीतीला तडा जाऊ दिला नाही. नाही म्हणायला दुतर्फा अगदी केरळात असल्यासारखे नजारे होते पण खड्डे मात्र देवाचे नाव घ्यायला लावत होते. गोद्खालीपर्यंत कित्येक गावा-गावांमधून प्रवास होतो. पश्चिम बंगालचं खरं चित्र दाखवणारी ही छोटी गावं बाजूबाजूने दिसत राहतात. एका अर्थानं भारतातली प्रातिनिधिक गावं, गरीब तरी ही आनंदी. प्रत्येक घराची भातशेती, अंगणात बागडणारी बदकं आणि मासे असलेलं तळं असल्याशिवाय इथल्या गावातलं घर पूर्ण होत नाही. इथेच एकेकाळच्या प्रसिद्ध येझदी बाईकची सायकल रिक्षा केलेली पाहायला मिळाली. पश्चिम बंगालच्या गावा-गावात लोकप्रिय असणाऱ्या या सायकल रिक्षाला येझदी बाईकचं इंजिन जोडणाऱ्या भन्नाट डोक्याला मानलं पाहिजे. गोसाबा मार्केटपर्यंतचा सुमारे ३ तासांचा रस्त्यावरून होणारा प्रवास जरा त्रासदायक आहे पण एकदा का मोटारलॉन्चने नदीतून प्रवास सुरु झाल्यावर सर्व कंटाळा निघून जातो. फोटोग्राफर्ससाठी अक्षरशः नंदनवन असणाऱ्या या टायगर रिझर्वमध्ये शिरल्यावर भान हरपून जाते.

सुंदरबनचे कोअर, फक्त पर्यटकांसाठी आणि बफर असे तीन विभाग पाडण्यात आले आहेत कारण इथल्या सर्वच बेटांवर पर्यटकांना प्रवेश नाहीये. एकूण १०८ बेटांपैकी ५४ बेटांवर मानवी वस्ती आहे आणि फक्त अशा बेटांच्या आजूबाजूलाच प्रवाशांना फिरवले जाते. सजनेखाली इथं वनविभागाचं ऑफिस आहे तिथे गेल्यावरच गाईड दिला जातो. एकूण २१ गाईड आहेत ज्यापैकी वेळेला काहीच उपलब्ध असतात कारण अनेकदा हे गाईड तिथल्या रिसोर्टसाठी देखील काम करतात. त्यामुळे गाईड मिळणं मुश्कील असते आणि म्हणूनच बरोबर जर एखादा तज्ञ असेल तर उत्तमच ( तज्ञ सोबत असावाच कारण सुंदरबन एक भूलभुलैया आहे आणि माहितगार माणसाशिवाय कधी कधी बोटी भरकटत पार बांगलादेशच्या सीमेला जाऊन पोहोचतात. ) सजनेखालीला बोटीची आणि गाईडची नोंद झाल्यानंतरच सुंदरबन भ्रमंती सुरु होते. सजनेखालीला देखील वॉच टॉवर आणि सजनेखाली म्यान्ग्रोव इंटरप्रीटेशन सेंटर आहे. हा परिसर अगदीच माणसाळलेला असल्याने इथेच आजूबाजूला काही रिसोर्टस देखील आहेत. सजनेखाली,सुधन्यखाली, दोबांकी, नेतीधोपानी, बुरीर दाब्री, मारीच झापी, कुमीरमारी अश्या काही वॉच टॉवर्स आणि बेटांच्या बाजूने प्रवाशांना फिरवले जाते पण या फिरवण्यात देखील सहल संचालक लबाडी करतातच. अगदीच अनभिज्ञ असणाऱ्या हौशी प्रवाशांच्या कळपाला घेऊन वरवर तिथल्या तिथे गोल गोल फिरवले जाते, मघाशी म्हटल्याप्रमाणे सुंदरबन भूलभुलैया असल्यामुळे फिरताना सगळीकडे पाणीच पाणी आणि तिवरांची झाडी दिसत असल्यामुळे फारसा वेगळेपणा जाणवत नाही आणि त्यातून बोटीवर गाणी,खाणे-पिणे यात प्रवाशांना गुंगवून ठेवले जाते त्यामुळे बाहेर लक्ष गेलेच तरी कोणाच्या फारसं काही लक्षात येत नाही. सजनेखालीवरून बोट फिरत फिरत सुधन्यखाली,दोबांकी,नेतीधोपानी, बुरीर दाब्री इथल्या वॉच टॉवर्सकडे घेऊन जाते.

बुरीरदाब्रीचा रायमंगल वॉच टॉवर आणि सिमेंटच्या ठोकळ्यांवरून घेऊन जाणारा वॉक चुकवूच नये असा आहे कारण एकतर या वॉचटॉवरवरून अगदी समोरच बांगलादेशची सीमा आपल्याला दिसते अन् सभोवताल पसरलेलं घनदाट जंगल. वॉचटॉवरपर्यंत पोहोचण्यासाठी आधी एक केज वॉक करावा लागतो ज्यामध्ये दुतर्फा लोखंडी जाळी लावलेल्या चिखलमय मार्गावर सिमेंटचे दोन फ़ुट उंचीचे ब्लॉक्स बनवून ठेवले आहेत आणि अश्या सुमारे १००-१५० ब्लॉक्सवरून उड्या मारत मारत आपण बुरीरदाब्रीच्या वॉचटॉवरपाशी पोहोचतो. नेतीधोपानी आणि दोबांकीचे वॉचटॉवरही पाहण्यासारखे आहेत. बुरीरदाब्रीला आपण केज वॉक करतो तर दोबांकीला एका बंदिस्त पुलावरून तिवरांच्या जंगलात जाता येतं. या पुलाला दुतर्फा नायलॉनच्या जाळ्या लावून सुरक्षित केलं आहे. या ठिकाणी बरीच हरणं चरताना दिसतात आणि कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार तिथं वाघदेखील कधी कधी शिकारीसाठी येतो. अर्थातच सुंदरबनमध्येही वाघ पहायला मिळणं हे कठीणच आहे. नेतीधोपानी वॉचटॉवरच्या परिसरात एक चारशे वर्षांपूर्वीचे शिवमंदिर आहे पण आता त्याचे फक्त भग्नावशेषच पाहायला मिळतात.

सुंदरबनला गेल्यावर एकवेळ वाघ नाही दिसला तरी चालेल ( कारण तो इतर जंगलातही दिसतोच ) पण अफाट पसरलेल्या भारताच्या या ‘अमेझॉन’ मधून छोट्याश्या नावेतून स्वतः वल्हं मारत जाण्याचा जाण्याचा अनुभव खरेच अमेझिंग आहे. किनाऱ्यावर असलेल्या ‘चारघेरी चार’ गावात छोट्या होडक्यांमधून पोहोचण्याच्या आधी, किनारा अर्धा तासभर दूर असताना ( म्हणजे खरे तर किनारा सुरक्षित असा नजरेच्या टप्प्यात असताना ! ) आमच्या हातात वल्हं सोपवलं गेलं आणि नावाड्यांनी चक्क विश्रांती घेतली. अर्थातच वल्हं चालवताना आमची होणारी त्रेधा पाहून त्यांचीदेखील छान करमणूक झाली. आम्ही वल्हं मारताना नावाड्यांची आम्हाला कळू न देता काहीतरी कुजबुज सुरु होती, पण आमच्या होडीत मी सोडल्यास कोणीच बंगाली समजणारे नव्हते त्यामुळे ( मी सोडून !) कोणीच घाबरले नाही. नावाड्यांनी जवळपास मगर पाहिली होती पण हे जर आम्हाला कळले असते तर आम्ही घाबरलो असतो म्हणूनच त्यांनी मगर पाहिल्याची आम्हाला गंधवार्ता देखील लागू दिली नाही. सुंदरबनला गेल्यावर मोटरबोटीतून प्रवास अनिवार्य आहे अन्यथा दुसरा पर्याय नाहीच. पाण्यात तरंगण्यापासून ब्रेक हवा असेल तर सरळ रिसोर्टवर परतायचे नाहीतर चिखलातून चालत किनाऱ्यावरल्या गावात शिरायचे. ‘चारघेरी चार’ गावात जाताना मडफ्ल्याट म्हणजे रेतीच्या गाळातून चालण्याचा भन्नाट अनुभव घेतला. गाळामधली रेती चिकणमातीसारखी पांढरी आणि चमकणारी असते. पण अश्या या घट्ट चिखलात गुडघ्यापर्यंत पाय रुतला कि बाहेर काढणं अतिशय कठीण होऊन बसतं. त्यातच आतमधून पायाला स्पर्श होणारा खेकडा आहे कि समुद्री वनस्पती या भीतीने पाय वर काढण्यासाठी जोर लावत किनारा ते गाव असा मडवॉक पार पडतो. या चिखलात पाऊल टाकण्याआधी हातभर अंतर चालायला कितीसा वेळ लागतोय असं वाटलं होतं पण नंतर हेच अंतर पार करताना अशी धमाल आली कि एव्हढेसे अंतर चालायलाच अर्धा तास लागला. अश्या या चिखलातून पाय रुतवत आणि वर काढण्याचा व्यायाम करतच गावात पोहोचलो. इथे पाण्यात भयानक मोठ्या मगरींचं वास्तव्य आणि काठावरल्या जंगलात वाघासारखं अत्यंत हिंस्त्र श्वापद त्यामुळेच सुंदरबन आजही मोठ्या प्रमाणावर निर्मनुष्य आहे. आहेत ती गावंदेखील खूप मोठी नाहीतच. एका गावात फारतर २०-३० घरं असतात. गावाच्या किनाऱ्यावर होड्या आणि बोटींच्या येण्या-जाण्याकरिता जेट्टी म्हणजे धक्का बांधलेला असतो. काही गावात तर अश्या जेट्टीचीही सोय नसते,तर तिथे फक्त सिमेंटचे दगड बसवून पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायवाट केलेली असते. पश्चिम बंगालमध्ये भावी काळात येणारं आणि सध्या असलेलं सरकार केव्हा तरी भलं करेल अश्या आशेत इथले गावकरी अजूनही दिवस काढतायत. ऐन पावसाळ्यात तर यांच्यासाठी अजूनच हलाखीचे दिवस. पावसाळ्यापूर्वी गावकरी छोट्या होड्या-नावांमधून आवश्यक साधन-सामुग्रीचा जमेल तसा साठा करून ठेवतात. अशीच ने-आण एरव्हीदेखील रोजच्या प्रवासात चालते. मग अगदी बाळंतीण असू देत वा शाळकरी मुलं, रोजच्या प्रवासासाठी मग होडीशिवाय पर्याय नाही. २००९ साली आलेल्या ‘आयला’ वादळानं इथल्या गावकऱ्यांचे जीवन पुरतं उध्वस्त केले ज्याच्या परिणामाच्या धक्क्यातून ते आता सावरलेयत खरे पण आर्थिक नुकसानाची भरपाई अजूनही काहीजणांपर्यंत पोहोचलेली नाही. आज ना उद्या कोणतं तरी सरकार आपला त्राता बनेल याची ते वाट पाहतायत. भाजीपाला,तांदळाची शेती,गाई-गुरांचं पालन तसेच मत्स्यपालन हाच त्यांचा उदरनिर्वाह. काही गावकरी जंगलात मध गोळा करण्याचं धाडस दाखवतात पण हा मध गोळा करून विकण्याचा धंदा खुपच जोखमीचा कारण तसेही गावात वाघाचे हल्ले होत राहतात त्यात मध गोळा करायला किंवा चोरट्या शिकारीसाठी प्रत्यक्ष जंगलात जायचं म्हणजे वाघाच्या जाळ्यात आयतेच सापडणं. वाघांचे हल्ले आणि वादळी हवामान यामुळे या गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन सतत धोक्याच्या रडारवर असते. या ग्रामीण भागात वीजपुरवठा नाही. अतिशय दुर्गम ठिकाणी असणाऱ्या या गावांचा पावसाळ्यात तर जगाशी संपर्कच संपतो.

इथल्याच स्थानिकांमधून मग गाईड तयार होतात. त्यातलेच काही जण बोटी किंवा लॉन्च भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. दीपंकर मंडल, मृत्युन्जय, निरंजन रपतानसारखे अनेक स्थानिक गाईड इथं नावाजलेले आहेत. फक्त गाईडगिरी करणं हाच त्यांचा व्यवसाय नाही तर त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या लॉन्चदेखील असतात. अनेकदा हे सर्व रिसोर्टशी किंवा शहरातील एखाद्या टूर ऑपरेटरशी बांधील असतात. वनखात्याचे एकूण २७ गाईड उपलब्ध असतात, पण सिझनच्या वेळेस एकही गाईड मिळत नाही. आमचा गाईड होता अमर रपतान- गाईड नंबर १९. सुंदरबनमधील अवाढव्य प्रदेशात फिरण्यासाठी नावाड्याना मार्ग ठरवून दिलेले आहेत. त्यातूनच मग पर्यटक बोटी फिरतात. बोटीने सुंदरबनमध्ये फिरण्याचा आणि दिवसरात्र बोटीवरच काढण्याचा अनुभव विलक्षण असतो, कारण या मोटर बोटी म्हणजे लक्झरी क्रुझ नव्हेत. हवामान ठीक असेल तरच मोटरबोटी बाहेर काढल्या जातात. पाउस इथे अवकाळी आहे त्यामुळे असा पाउस आणि वादळी हवा असेल तर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटी बाहेर काढण्याचा धोका कोणी पत्करत नाही. मुख्य म्हणजे अश्या वातावरणात वाघ दिसण्याची शक्यता अजिबात नसते आणि तसेही सुंदरबनला जाऊन पाण्यात पोहणारा वाघ दिसेल अशी अपेक्षा ठेवली तर प्रचंड निराशा होईल कारण सुंदरबनमधला वाघ कान्हा किंवा बांधवगढ जंगलातल्या वाघांसारखा सहजगत्या दृष्टीस पडणं म्हणजे चमत्कारच. तरीही लॉन्चवर काही दिवस राहण्याचा अनुभव घेण्यासारखा आहे किंबहुना जर हा अनुभव घ्यायचा नसेल तर इतक्या लांबपर्यंत तंगडतोड करत जाणेच व्यर्थ आहे.

सुंदरबन नैसर्गिकरित्या विलक्षण शांत प्रदेश आहे, शांतता इतकी नीरव कि पाण्यात सुळकन मासा जरी गेला तरी आवाज ऐकू येतो. सुंदरबन त्रिमितीत अनुभवण्याची गोष्ट आहे. जमीन, आकाश आणि पाणी यांचं एखाद्या ठिकाणी किती महत्व असू शकते हे इथे आल्यावरच कळते. गेली शेकडो वर्षं इथल्या निर्मनुष्य बेटांवर रॉयल बंगाल वाघाचं वर्चस्व होतं पण आता याच आदिम प्रदेशात माणसांची धांगडधिंगा घालणारी पावलं रुतायला लागली आहेत. तसे म्हटले तर जमिनीवरल्या जंगलाचे नियम या प्रदेशातील जंगलाला लावता येत नाहीत कारण इथली माणसे, वाघ, इतर पशु-प्राणी आणि जैव-विविधता यावर फक्त निसर्गाचीच हुकुमत चालते. सुंदरबनमध्ये असे म्हटले जाते कि जमिनीवर वाघाच्या तावडीतून सुटलात तर मगरी पाण्यात तुमची खबर घेतीलच एकूणच काय दोन्हीही ठिकाणी इथला मनुष्य शिकाऱ्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. तरीही कोणत्याही भीतीला न जुमानता पर्यटक इतक्या दुर्गम ठिकाणी येऊन सुंदरबनसारख्या अतिशय मनोहारी प्रदेशाची वाट लावतच आहेत. वाघांच्या चोरट्या शिकारी इथे जास्त होत नाहीत पण इथल्या पर्यावरणाची मात्र गेली कित्येक वर्षे इमानदारीत नासधूस केली जाते आहे. किनाऱ्यावरच्या संरक्षक जाळ्यांमध्ये अडकून राहिलेल्या जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलच्या थाळ्या याची साक्ष देतात. रिसोर्टवर आणि लॉन्चवर वाजवले जाणारे कर्कश संगीत यामुळे इथली शांतता तडीपार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र इथला निसर्ग आणि प्राणी देखील अतिशय लहरी आहेत त्यामुळेच माणसाची सुंदरबनमध्ये फारशी सत्ता चालत नाही आणि म्हणूनच बोनबिबिच्या कृपेने सुंदरबनचे वाघ देशातल्या इतर जंगलांपेक्षा अधिक सुरक्षित आहेत.

सुंदरबनच्या सफरीसाठी लक्षात ठेवा :

कसे जाल? कोलकाता शहरातून सोनाखाली, नामखाना, सागर आयलंड किंवा बक्खाली येथे बाय रोड जाऊन पुढील जलप्रवास सुरु करता येतो.

कुठे राहाल? साजनेखाली टुरिस्ट लॉज, दयापूर, पाखीराला.

काय पाहाल? सागर आयलंड, बक्खाली, कॅनिंग, साजनेखाली, दोबांकी, सुधन्यखाली,लोथीआन आयलंड, नेतीधोपानी, भागबतपूर, सुंदरकती, बुरीरदाब्री, हालीडे बेट, कलशद्वीप बेट,कुमीरमारी, मोरीचझापी इत्यादी.

एकूण प्रवास तास किती? बाय रोड ३-४ आणि जलप्रवास ३-४ तास असा मिळून एका दिवसात ७ ते ९ तासांची भटकंती होतेच.
Way to Sunderban,West Bengal-
From City of Kolkata, reach to Sonakhali, Namkhana, Sagar Island or Bakhali by road and then travel by launch to Sajanekhali,Dayapur or Pakhirala. There are some resorts near Sajanekhali and also the WBTDC tourist lodge is available at Sajanekhali. It takes around 3-4 hours from Kolkata to Godkhali jetty.
                                              
( सुंदरबन माझ्या आतापर्यंतच्या सर्व जंगल सफारीमधला सर्वात अविस्मरणीय असा अनुभव होता. तिथे प्राणी पाहायला तर मिळालेच पण इतक्या दुर्गम प्रदेशात माणसं कशी निसर्गाशी मिळतं-जुळतं घेऊन राहतात हे देखील पाहायला मिळालं. सुंदरबनमध्ये वाघ पहिल्याच खेपेत दिसणं फार भाग्याची गोष्ट आहे पण युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळालेलं हे जंगल अनुभवणं हे देखील तितकेच सुंदर आहे आणि खरे तर भारतीय जंगलाचा एक वेगळा प्रकार म्हणून हे जंगल आणि हा प्रदेश पाहिलाच पाहिजे. सुंदरबनच्या काही आठवणी माझ्या पुढील लेखात वाचायला मिळतील, त्यासाठी कृपया खालील लिंक क्लिक करा. )
http://epaper.prahaar.in/detail.php?cords=20,100,1478,1598&id=story2&pageno=http://epaper.prahaar.in/11112012/Mumbai/Suppl/Page8.jpg

Monday, July 2, 2012

दांडेलीच्या जंगलात..

                                                         
दांडेलीच्या जंगलाबद्दल पहिल्यापासूनच कुतूहल होतं आणि तसंही कर्नाटकावर मी फिदाच आहे कारण कर्नाटकचा निसर्ग अत्यंत श्रीमंत आणि लोभसवाणा आहे, म्हणूनच दांडेलीला येणार का असा मित्राचा फोन आल्यानंतर नाही म्हणायचा सवालच नव्हता. माझ्यासोबत माझी भाचीदेखील (अपूर्वा) येणार होती त्यामुळे अजूनच मजा येणार होती. या ट्रीपच्या निमित्ताने कराड शहराची थोडी ओळख झाली आणि याचे श्रेय कराडच्या डॉक्टर कल्पना चावला विज्ञान केंद्राचे संचालक संजय पुजारी यांनाच आहे. त्यांच्यामुळेच खरं तर दांडेलीला जाण्याची संधी मिळाली कारण त्यांनी केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या सहलीत आम्ही देखील सामील झालो होतो. कराडमध्ये रात्री पोहोचल्यामुळे शहरात फारसे फिरता आले नाही पण इथल्या प्रसिद्ध पाटील मेसच्या लज्जतदार जेवणाची चव घेता आली. या कराड भेटीतच नीलिमा देशपांडे यांच्यासारख्या सुहृद मिळाल्या. दांडेलीचं जंगल नक्कीच अनुभवण्यासारखे आहे, विशेषतः जंगलातील एका पॉईंटवरून धुक्यात लपेटलेली सातपुडा पर्वतराजी पाहणं खूप मनोरम वाटते. एकूणच दांडेली जंगलाचा हा फेरफटका अविस्मरणीय ठरला, त्याचाच हा एक मी लिहिलेला रिपोर्ट दैनिक प्रहारमध्ये प्रसिद्ध झालाय. जरूर वाचा आणि प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद !
 Way to Dandeli-Anshi Tiger Reserve Forest, Karnataka- 

The nearest city to Dandeli is Belgaum, which is about 90km away by road. Belgaum is conncted to Mumbai and Bangluru by railway, domestic flights and by road. From Belgaum, one can reach to Dandeli by bus or taxi. There are many resorts and nature camps are available for stay near Dandeli forest.

The link below will take you to my article published in news daily ‘Prahaar’ on 7th July 2012. It is about Dandeli-Anshi Tiger Reserve in Karnataka state of India. I spent three days in this absolutely fabulous forest, one of the Indian forests where river rafting is also available. For more details about DATR, you can contact me through comments. Thanks a lot.
http://www.prahaar.in/madhyantar/madventure/66208.html


Friday, May 18, 2012

मार्लेश्वर

                                                             
माझं आजोळ म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातलं मार्लेश्वर गाव. छोटं सुंदर टिपिकल कोकणातलं गाव. खूप वर्षांनी आजोळी जाण्याचा यंदा योग आला आणि त्यानिमित्ताने श्री क्षेत्र मार्लेश्वरासाठी चार ओळी आपसूकच लिहिल्या गेल्या, जे खरं तर इतक्या वर्षात जमलं नव्हतं. गावाची ओढ काय असते ते प्रत्येक अस्सल कोकणी मनुष्यच जाणतो, नेमक्या त्याच भावना हा लेख लिहिताना होत्या. सोबतची सकाळ ई-पेपरची लिंक कृपया क्लिक करा आणि माझा लेख वाचा, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. विशेष सूचना- या लेखात नजरचुकीने धनेश पक्ष्याऐवजी रॉबिन पक्ष्याचा फोटो छापला गेला आहे. त्याबद्दल माफी असावी.
Way to Marleshwar, District-Ratnagiri,State-Maharashtra
Marleshwar is accessible by road only from Sangameshwar, Ratnagiri or Chiplun railway station of Konkan railways. Kindly note that no straight bus facility is available for Marleshwar so one has to change 2 buses while traveling to Marleshwar. Bus route- Ratnagiri to Sangameshwar then Sangameshwar to Deorukh and then Deorukh to Marleshwar. From Chiplun, its Chiplun to Deorukh and then Deorukh to Marleshwar. Accommodations are available in Deorukh and Ratnagiri.
http://72.78.249.107/Sakal/8May2012/Normal/Mumbai/MumbaiToday/page8.htm


Tuesday, February 21, 2012

I rebel for….

                                                          
''Kothai tomi?''.. ''Aami belune ache’’…that is the most usual answer you will get if you call Tanmoy Ghosh, the founder of irebelasia.org which is based in Belun. After many long hour phone conversations with him I decided to hop in this opportunity to see the interiors of rural West Bengal when he invited me to see the work and projects started by his NGO’ irebelasia.org’. This was my first time to visit any wildlife related organization to see their work so closely. Tanmoy started irebel with few determined intentions in his mind. Now irebel is growing well and has been working to constraint illegal hunting & deforestation, changing farmers mind towards use of chemical pesticides & fertilizers, documentation & monitoring of threatened species, rehabilitation of birds & animals, creating new forests of indigenous trees and plantations etc.

Though a small village based organization, I realized the importance of its presence in rural side because the team irebel is really working hard from the grass route level. They have started this work at the right hour to voice the need of wildlife & eco-conservation. It is more difficult when you take the challenge of educating co-villagers about all these things. Still in rural India many primary facilities are inadequate so telling natives to ignore the jungle cat or fox housing in their paddy fields is just like a stupidity according to villagers. But tanmoy and his team at irebel have been doing this since last 14 years. Not only they are engaged in wildlife activities but now irebel is also playing lead role in providing financial, medical & educational conveniences to these villagers.

The villagers of this picturesque small village have learned a new language of wildlife care and eco-conservation and they love it too. Few years ago Tanmoy and his naturalist friends have started working seriously on the grasslands of Belun for the first ever bio-diversity park of village. Belun villagers are now considering the need of interdependence of birds & animals with their lives and obviously the significant efforts done by irebel team for the mass awareness campaigning for eco & wildlife conservation, these people have understood the need of bio-diversity forest and they are also helping irebel team for this.

Being a tiny remote village of west Bengal, Belun may not have luxurious lifestyle facilities but indeed Belun is a quiet, beautiful & serene natural habitat for many birds & animals. This petite village near Shiblun of Burdwan district of west Bengal is surrounded by Ajay and Hooghly River’s confluence and also has its very own small river-the Shibai, which is a primary source of water for farming & cultivation here. Like any typical village in west Bengal, Belun too had witnessed severe damages to houses, croplands, wildlife habitats by the annual flooding of these three rivers. Katwa town is nearly 12 Km from Belun, which is actually the advantage for irebel’s work.

Belun is encircled with enormous treasure of wildlife & forest. It was for the first time I trailed through the thickest & 7-8 ft high grasslands here and enjoyed it a lot. Initially Belun is a natural habitat for 200 species of birds, both resident and migratory birds & also animals like jungle cats, jackals, hyenas etc can be spotted in nearby forest. irebel team is creating new grassland & wetland habitats for birds and also protecting them. irebel is developing interest among village youth towards nature studies and helping them to become naturalist. Palash Ghosh is the boy who is perusing his M.A in nature studies, is also leading the naturalist team of irebel. This team is taking initiative in close monitoring of the bird & animal population, their behavior, nesting habits, reproduction & other physiological activities. irebel has developed its own financial support by giving tourists a weekend gate away option at Belun. With excellent eco-village kind of facilities for stay & food, this lovely nature hub has much more to give. It is just 175 km by road from Kolkata and other options like train, bus are also available to reach Belun. Once reach Belun, you can make it a base point and visit nearby places like Kalyanpur ghat or Nayachar for Gangetic dolphins, Attahas Tala for open billed stork, flying fox , Chot pukur for terrapins, Bengal fox & migratory birds, & Musharu-the snake village etc.

Tanmoy and his team at irebel have many plans to treasure this beauty of Belun and also focusing on the financial up gradation of villagers too, that is why tanmoy believes in people’s participation in preserving this natural wealth is very important and to create awareness among them is irebel’s prominent aim. Irebel team is working on conservation of critically endangered Ghariyal (Gavialis gangeticus) as the continuous research & monitoring work is going on. Irebelasia is lucky to have all its team working so enthusiastically and always ready to run on their toes for any project work & guests. Team is engaged mainly with outdoor research projects throughout the year, Sanjoy Ghosh is also one of the backbone of irebel from Belun. irebel team is lucky to always incomplete without a scrupulous inspiration it gets from Lee Ann Merril, who is intergovernmental Coordinator for water & land resources in US. I liked the longing for knowledge in every irebelian, be it a just a volunteer or a field activist. Santu, Prakash, Ajoy, Biplab, Ganesh & many others, who are really working hard for irebelasia and it is just because of all the team effort, irebel is growing towards an encouraging future.

Eco and wildlife conservation and mass awareness does not always need showy glossy presentations in media with catchy taglines or support by so called wildlifers, it just needs a direct hit on aim with all the dedication & love for nature. Tanmoy Ghosh’s team is doing exactly that. I think India needs many more tanmoy’s to preserve the wildlife wealth of this country. To visit Belun or for more information about irebel (institute for research on ecology and biodiversity to enunciate our liability protect your environment and ensure our existence.) please contact on Tanmoy Ghosh tanmoywildphoto@gmail.com.
Way to Belun in Burdwan district of West Bengal.

Nearest railhead to Belun is Katwa and Bandel near Kolkata in India. To reach Belun, journey to Siblun from Katwa junction or Bandel.

Thursday, January 12, 2012

बहु खुब्बच नागझिरा !

काकडनाला, चोरखमारा रस्ता, टायगर रोड, लिंक रोड,घाटमारा रस्ता, थाडेझारी, गौरगल्ली, वाकडा बेहेडा, बंदरचूआ गेट,चितळ मैदान,पिटेझरी रस्ता, अंधारबन, तळं नंबर १ ते ७, आम्बेझरी, तिरोडा रस्ता हे सर्व राहण्याचे पत्ते आहेत पण माणसांचे नाहीत तर वाघ, गवे, रानकुत्री, अस्वलं,बिबट अशा जंगली प्राण्यांचे...आणि हे सर्व पत्ते शोधण्यासाठी तुम्हांला नागझिरापर्यंत पोहोचावंच लागेल. त्यातही मारुती चितमपल्ली आणि व्यंकटेश माडगुळकर यांचे लेख आणि पुस्तके वाचण्याचा चस्का तुम्हांला लागला असेल तर तुम्ही नागझिरापर्यंत जरुर पोहोचणारच. नागपूरहून जवळच म्हणजे दीड-दोन तासात भंडारा जिल्ह्यात साकोली रोडवरून आत गेल्यावर पिटेझरी गावातून पुढे नागझिरा अभयारण्य सुरु होतं. गाईड सुभाष किचकने आमचं पिटेझरी गेटवरच स्वागत केलं. गेटपासून पुढे आत नवा रस्ता बांधण्याचे काम सुरु आहे तेव्हा जीपला थोडा त्रास होईल असा इशाराही दिला. अर्थात एकदा जंगलात शिरल्यावर आजूबाजूला काय दिसतंय हे पाहण्यात लक्ष असल्यामुळे खालचा खडबडीत रस्ता आम्हाला जाणवलाच नाही ( आणि रस्त्यांमध्ये खड्डे असतातच हा समज पुण्या-मुंबईच्या खड्डेयुक्त रस्त्यांनी पक्का केला आहे. )
नागझिरानं रानकुत्र्यांसाठी लौकिक कमावला असला तरी नागझिरा नुसतंच जंगल नाही तर व्याघ्र अभयारण्य ही आहे. त्यामुळे इथल्या जंगलात प्रवेश केल्यावर आपण वाघाच्या जंगलात आलोयत हे जाणवल्याखेरीज राहत नाही. नागझिराचा विस्तार फार मोठा नाही त्यामुळे जीपनं एका दिवसात अख्खं रान आरामात पाहून होतं, पण ते नुसतं ‘पाहणं’ झालं, पण नागझिराच्या रानाशी खास हितगुज करायचं असेल तर वेळच काढला पाहिजे. आमच्या ‘जीप्सिज आउटडोअर्स’सोबत पहिल्यांदाच जंगल पाहण्याऱ्या ९ ते १४ वयोगटातल्या माणसांच्या पिल्लांचाही चमू होता, त्यामुळे आम्ही देखील निवांत सवड काढून गेलो होतो. नागझिऱ्याच्या रानात शिरल्यानंतर काही मिनिटातच गवे दिसले होते त्यामुळे मुलांची टोळीही प्रचंड खुश झाली आणि आमचा जीव भांड्यात पडला. गाड्यांची चाहूल लागताच गव्यांचा कळप रस्त्याच्या मध्यातून चौखूर उधळला. कधीही गवे न पाहिलेल्या आमच्यासाठी हे दृश्य केवळ अविस्मरणीय होतं. फोटोग्राफीसाठी तर ही संधी उत्तमच होती. ताडोबाला गव्यांनी दाट गवताच्या आडून आडून चुटपुटते दर्शन दिलं होतं. आता मात्र मन भरून या सुंदर राजबिंड्या प्राण्याला अगदी जवळून पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. गव्यांच्या कळपात छोटी पिल्लं आणि गाभण मादीही होत्या, अशा कळपाचा नायक आणि त्याच्या आधिपत्याखाली कळप रानात कसे वावरतात हे जवळून पाहता आलं. गव्यासारखा ऐटबाज आणि डौलदार शरीरयष्टी असणारा प्राणी नाही हे पटलं. ताडोबाला असताना एकांड्या गव्याला पाहण्याची संधी मिळाली होती, पण तो जास्त वेळ समोर ठाकला नव्हता. पण इथं नागझिरामध्ये रानात शिरल्यावर काही वेळातच गवे दिसले आणि पुढले काही दिवस कसे जातील याचा ट्रेलरच मिळाला.
आमच्यासोबतच्या या शहरी मुलांनी आतापर्यंत आयुष्यात कधीही जंगलातलं पानही पाहिलेलं नव्हतं आणि अश्या मुलांना घेऊन थेट नागझिरासारख्या शहरी सुख-सोयींचा लवलेश ही नसणाऱ्या अस्सल जंगलात नेऊन आठवडा काढण्याचं आव्हान पुण्याच्या रोहन तावरेनं घेतलं होतं. पहिल्या दिवसापासूनच सर्व मुलं एवढी समजूतदारपणे जंगलात राहण्याचा अनुभव एन्जॉय करत होती की आम्ही मुलांना मनोमन धन्यवादच दिले. हे इथं सांगणं यासाठी महत्वाचं आहे कारण नागझिरामध्ये निवासाची आणि खानपानाची सोय आहे पण निवास गृहांमध्ये वीज नाहीये त्यामुळे काळोख झाल्यावर कंदिलाच्या प्रकाशावरच सारा कारभार करायचा. इथे संध्याकाळी अंधार झाल्यानंतर कर्मचारी अतिथीगृहाच्या प्रत्येक खोलीबाहेर एक-एक कंदील आणून ठेवतात. अर्थात जिथे विजेचे दिवेच नाहीत तिथे विजेवर चालणारे पंखेही नाहीत. असा सर्व विजेशिवायचा कारभार पण त्यातही एक मजा आहे जी शहरात राहून मुळीच कळणार नाही. कोणत्याही पर्यटन प्रकारात सर्वात कमी तयारी न्यावी लागत असेल तर ती जंगलासारख्या ठिकाणी, काही जण याच्याशी सहमत होणार नाहीत पण खरं तर जिथं कोणतंही बंधन नाही आणि जिथे आपल्या असण्याला फारसे महत्वच नसतं तिथे शहरी जामानिमा नेण्याचं काही कारणच नसतं. नागझिराची गोष्टही काही वेगळी नाही उलट तिथे तर अशी बंधन नसण्यातही एक प्रकारच थरार वाटतो कारण नागझिरामध्ये भर जंगलाच्या मध्यात आजूबाजूला प्राण्यांची चाहूल असताना संध्याकाळ आणि रात्रीदेखील सोबत फक्त रॉकेलच्या वातीवरला लालटेनच असतो. अर्थात जंगल परिसराला डिस्टर्ब न करता खऱ्या जंगलात राहण्याचा फील घ्यायचा असेल तर याचीही तयारी हवीच आणि हेच तर खरं नागझिरा जंगलाचं आकर्षण आहे.
भरगच्च चांदण्यांच्या मऊसर् उजेडात अतिथीगृहासमोरच्या छोट्याश्या मोकळ्या मैदानात बसून जंगलातून येणारे प्राण्यांचे आवाज ऐकत गप्पांची ( अर्थात हळू आवाजातल्या ) महफिल जमवण्यातला आनंद काही वेगळाच आहे. भर जंगलात मध्यभागी (कोअर एरियात) आणि तळ्याकाठी राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नागझिरामध्ये जायलाच हवं. मध्यरात्रीनंतर हळूच खिडकीबाहेर समोर कंदिलाच्या प्रकाशात पाहिलं तर चरता चरता विश्रामकुंजापर्यंत आलेली हरणं,रानडुक्करं,सांबर असे काही प्राणी दिसतात. विश्रामकुंजाजवळच्या या हिरवळीच्या थोडसं उजव्या अंगालाच सुंदर तलाव आहे. अनेकदा तळ्याकाठी रात्री पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचीही चाहूल लागते. रात्री तळ्याच्या बाजूच्या खोलीत झोपायला आमच्यातल्या काही मुली घाबरल्या आणि आम्हाला खोली बदलायला लागली. त्यांनी खोली बदलणार का विचारल्यावर म्हटलं की हे म्हणजे नेकी और पूंछ पूंछ झालं की..मग नंतर तळ्याकडून येणारे आवाज ओळखण्याची स्पर्धा लावण्यात रात्र गेली.
अतिथीगृहाच्या मागे असलेला तळ्याचा काठ म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी एकदम अप्रतिम निवांत जागा..इथं कोणत्याही झाडाखाली आरामात बसायचं आणि समोर तळ्यावर येणाऱ्या विविध पक्ष्यांच्या निरीक्षणात गुंतून जायचं. पक्षी अभ्यासकांसाठी तर ही खासच जागा आहे. ‘निलय’समोर असलेलं मध्यवर्ती तळं म्हणजे या जंगलातली चावडी आहे. कित्येकदा रानकुत्र्यांच्या शिकारी इथेच येऊन संपतात. रानकुत्र्यांनी केलेली अशीच एक चित्तथरारक शिकार आमच्या डोळ्यांदेखतच या तळ्यातच त्यांनी संपवली होती. ही लाईव्ह शिकार आमच्या टीमला पाहायला मिळाली. वरच्या डोंगराकडे गेलेल्या आमच्या अर्ध्या टीमने रानकुत्र्यांच्या टोळीला शिकारीच्या शोधात फिरताना पाहिलं होतं. त्याच टोळीने एक हरीण मादी आणि तिच्या पाडसाला हेरलं होतं. त्यांनाच पळवत पळवत तळ्याकाठपर्यंत आणून रानकुत्र्यांनी शिकारीचा दि एंड केला होता. नागझिराची युएसपी रानकुत्री आहेत याची डोळ्यादेखत खात्रीच पटली होती. असे शिकारीचे अनेक क्षण आम्हाला नागझिराच्या भटकंतीत अनुभवायला मिळाले.
महाराष्ट्रात ज्यांच्याविषयी अधिक लिहिलं गेलंय अशा जंगलांपैकी नागझिरा एक आहे. मराठीत मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगुळकर, किरण पुरंदरे अशा काही लेखकांनी अभ्यास,संशोधन आणि मोठ्या मेहनतीनं नागझिरासंबधी अप्रतिम पुस्तकं लिहिली आहेत. नागझिराला जाऊ इच्छिणाऱ्यांनी ही पुस्तकं जरूर वाचावीत. ताडोबा किंवा कान्हा वगैरे सारख्या जंगलांच्या तुलनेत नागझिरा जंगलाचा विस्तार अगदीच लहानसा आहे, पण इथं वन्यजीवांचे वैविध्य एकवटलं आहे. वाघ, गवे,सांबर, हरीण, रानकुत्री , अस्वल, भेकर,बिबट्या असे अनेक प्राणी आणि शेकडो पक्ष्यांच्या जाती पाहायला मिळतात. तरीही देशातील इतर जंगलांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातलं हे वैभव नागपूरपासून जवळ असूनही सरकार आणि पर्यटकांकडून दुर्लक्षित राहिलं आहे. मुळात महाराष्ट्रातल्या कुठल्याच जंगलाचं देशातल्या इतर अभयारण्यांप्रमाणे मार्केटिंग होताना दिसत नाही. टीव्हीवर येणाऱ्या ‘इनक्रेडीबल इंडिया’च्या जाहिरातींमध्ये गुजरात, मध्यप्रदेश, केरळ,गोवा आघाडीवर दिसतात. इतर ठिकाणीही उत्तरांचलचे जिम कॉर्बेट, मध्यप्रदेश मधलं कान्हा आणि बांधवगढ, आसामचं काझीरंगा, राजस्थानचं रणथंबोरसारख्या जंगलाचं भरपूर मार्केटिंग आणि जाहिरातबाजी होताना दिसते ( जे त्या त्या राज्यातले प्रवासी, टूर ऑपरेटर्स आणि राज्य सरकारचा पर्यटन विभाग करतात ) पण आपल्याकडे याबाबतीत सर्व आनंदच आहे.
गरुडाने( चेन्जेबल हॉक ईगलने ) केलेली शिकार देखील नागझिरामध्ये पहायला मिळाली. वास्तविक आम्ही भालुच्या शोधात चितळ मैदानाच्या पुढे गेलो होतो जो आम्हाला पुढे दिसलाच. इथल्या टाक्यावर भर उन्हामध्ये तुडुंब पाणी पिऊन सावलीला बसलेली ७-८ रानकुत्र्यांची एक टोळी पण आम्हाला भेटली. त्यानंतर झाडांच्या फांद्यांवर अगदी मिसळून गेलेला हा अत्यंत रुबाबदार गरुड आम्हाला दिसला. आमच्या गाडीच्या आवाजाला न घाबरता हा गरुड वेगात हवेतून काहीतरी घेऊन एका झाडाखाली उतरला. थोडं अधिक निरखून पाहिल्यावर कळलं की तो एक साप होता,इतका त्या सापाचाही रंग मातीशी मिसळलेला होता. या गरुडानं शिकारीचे तुकडे केले आणि त्यावर थोडी माती पसरली आणि तो पुन्हा झाडावर जाऊन बसला. बहुधा त्याला आमची चाहूल लागली होती. त्याला सोडून आम्ही पुढे निघालो. वाटेत एका छोट्याश्या तळ्यावर मगरीचं पिल्लू स्वतःला उन्हात शेकवत बसलेलं दिसलं.
जंगलात फिरताना अनेकदा जळालेल्या लाकडांचे काळेठिक्कर ओंडके लांबवरून पाहून अस्वल असल्याचा भास व्हायचा. अस्वलाच्या बाबतीत नागझिरा खूप लकी ठरलं. साकोली वॉच टॉवरच्या रस्त्यावर, गौरगल्ली, निलयच्या पुढील वळणावर, बंदरचूआ गेटवरून पुढे आतमध्ये अशी आमची अनेकदा भालुशी गाठभेट झाली. खरं तर निलयच्या पुढल्या रस्त्याला अनेकदा मादी अस्वल पाहिलं होतं पण ती नेहमी झाडांमध्ये पळून जायची. शेवटी तर अस्वलाच्या अश्या छुमंतर होत दिसण्याचाही कंटाळा आला होता. तरीदेखील अगदी निघायच्या दिवशी शेवटल्या सफारीपर्यंत अस्वलाचा शोध घेत आम्ही चितळ मैदानाच्याही बरेच आत पोहोचलो होतो आणि तिथल्या शेवटल्या टाक्यावर आमची आणि अस्वलाची गाठभेट झालीच. हा नर भालू आम्हाला पाहून अजिबात बुजला नाही उलट त्याने आरामात टाक्यावर पाणी प्यायले, चालता चालता जमिनीत खणून खाद्य मिळवलं आणि बरेच अंतर तो आम्हाला समांतर चालत राहिला पण तेवढ्यात समोरच्या वळणावरून एक खाजगी गाडी भरधाव येतानाचा आवाज त्यानं ऐकला आणि तो बाजूच्या रानात पळाला.
बंदरचूआ गेटवर अजून एक विलक्षण अनुभव पाहायला मिळाला. तिथं वानरांची टोळी बसलेली होती. आमच्या जीपचा घर्र आवाज आल्यावर सर्व माकडं झाडावर सुरक्षित ठिकाणी पळाली,पण या गडबडीत एक नवजात पिल्लू खालीच राहिलं. ते वर गेलेल्या आईकडे पाहून केविलवाण्या चेहऱ्याने चिं चिं चीत्कारू लागलं पण त्याची आई आमच्या जीपला पाहून खाली यायला घाबरत होती, तेवढ्यातच एका अनुभवी प्रौढ माकडिणीने एका झेपेतच त्या पिल्लाला जीप समोरून दूर केलं. वानरांच्या कुटुंबकाबिल्यात नाती कशी घट्ट असतात ते या निमित्तानं पाहायला मिळालं.
नागझिरा पर्यटन संकुलाजवळ फिरणारी माकडं जंगलातील इतर माकडांच्या तुलनेत कमी बुजरी आणि रानटी आहेत. पर्यटकांच्या जवळ वावरणाऱ्या या टोळ्यांमधले हुप्पे आणि तरुण नर पर्यटकांसमोर शक्तीप्रदर्शन करून दाखवतात तेव्हा पहायला मजा येते. आम्हीही असाच प्रकार पाहिला. एखाद्या डिस्कव्हरीसारख्या वाहिनीला शूट करून पाठवावा अशी अचाट कसरत एका वानराने करून दाखवली. संकुलाच्या आवारात एक पिंप पडलेले होते आणि बाजूला फलकाचे दोन खांब होते. त्यांचा वापर करून हा वानर अक्षरशः मल्लखांब खेळत होता. गम्मत म्हणजे प्रत्येक फेरी झाल्यावर तो विजयाच्या मुद्रेने पर्यटकांकडे पहायचा. त्याचा हा खेळ जवळपास १० मिनिटे चालला होता.
नागझिराचा विस्तार इतर अरण्यांच्या तुलनेत छोटेखानी असला तरी हाच त्याचा प्लस पॉईंट देखील आहे. कारण इथं राज्यातील इतर जंगलांमध्ये दिसणारे बहुतेक सर्व पशु-पक्षी आहेत आणि विस्तार कमी असल्याने ते समोर येण्याचे चान्सेसही अधिक असतात. अर्थात याला अपवाद फक्त वाघाचा आहे. वाघ हा तसा सहजासहजी म्हणजे ‘चला आलोच आहोत अभयारण्यात तर वाघ पाहूनच जाऊ’ अश्या वल्गनेत दिसणारा प्राणी बिलकुल नाही. पण नागझिरा आणि आसपासच्या चोरखमारा, उमरझरी, सोनेगाव गावांमधून असा थोडासा का होईना कॉरिडॉर इथल्या वाघांना उपलब्ध आहे आणि त्यामुळेच नागझिरा व्याघ्र अभयारण्यांच्या यादीत सामील आहे. लाईट्स नाहीत, मोबाईल रेंज नाही, टेलिफोन नाही,वर्तमानपत्रं नाहीत, शहरांचा वाण लागलेली गावं नाहीत अशा पूर्णपणे नैसर्गिक वन्य अधिवासात थोडक्यात शुद्ध अरण्यात राहण्याची संधी नागझिरा तुम्हांला देतं. शहरी सुखसुविधांना सरावलेली आमच्या सोबतची मुलं तिथं एक क्षणतरी काढतील की नाही याची शंका होती, पण नागझिराच्या जंगलानं अशी काही जादू मुलांवर केली की मुलं निघताना परत येण्याचे प्लान्स बनवू लागली होती.
कोणत्याही जंगलात जाऊन प्राणी पाहण्यासाठी शक्यतो हिवाळ्याचा उत्तरार्ध आणि उन्हाळा हे उत्तम कालावधी असतात. रानोमाळ भटकण्याची तयारी असली तरी विदर्भातल्या या नंदनवनात जाण्यासाठी तिथला कडक उन्हाळा आणि भयंकर थंडी या दोहोंना तोंड देण्याची तयारी ठेवूनच गेलेलं बरं. हळदु पॉइंटला गेल्याच महिन्यात एका वाघिणीने तीन छोट्या पिल्लांसह दर्शन दिलंय. रानातल्या झुळकेसारखी एव्हाना ही खबर नागझिराकडे कान-डोळे लावून बसलेल्या रानसरुंपर्यंत येऊन पसरलीय. चार-पाच महिने पाऊस झेलून रान पुन्हा एकदा घट्ट-मुट्ट झाले आहे. पर्यटकांचा इतके महिने वास आणि त्रास दोन्ही नसल्यामुळे रान आणि प्राणी दोन्ही बेफिकीरीत आहेत. प्राण्यांना त्यांच्या सहजवासात गुरफटून गेलेले असताना पाहण्याची हीच योग्य वेळ आहे. नंतर पुन्हा एकदा जंगल पर्यटकांनी गजबजेल आणि प्राणी अधिक सजगपणे वावरू लागतील.

Above article was published on 8th January 2012  in Marathi news daily 'Prahaar',link to published article:-http://www.prahaar.in/collag/53913.html
Way to Nagzira Wildlife Sanctuary, District-Gondiya,State-Maharashtra.
Nearest city to Nagzira is Nagpur and Bhandara in Maharashtra. Nagpur is well connected with domestic flights. Buses etc are available from Gondia,Bhandara,Sakoli,Tirora and Nagpur. Nearest railway stations are Nagpur,Gondiya,Bhandara road,Saundad and Tirora.