Translate

Sunday, April 26, 2015

पाऊस दाटलेला


पाऊस.. तुम्हा आम्हा सर्वाचाच आवडीचा. पावसाळा ऋतू सा-यांच्याच आवडीचा असावाच असंही काही नाही; पण ऋतू आवडीचा नसला तरी पावसातले काही क्षण तर अनेकांच्या निश्चितच आवडीचे असतात. विशेषत: ते प्रवासातले असतील तर ते खासच लक्षात राहतात.
बसमधून जाताना दुर्गापूरहून पुढे गेल्यावर वातावरण अचानक बदललं. घामटलेली हवा एकदम खूप सुखद व छान गार झाली. त्यामुळे बसमधल्या भयानक गर्दीकडेही माझं दुर्लक्ष झालं. पुढे जंगलाचा पट्टा लागला आणि मन अजूनच निवांत झालं. डोळेही निवले. बिष्णुपुरला उतरल्यावर एक क्षण आपण एखाद्या पुरातन नगरीतच उतरलोय, असा भास झाला. तिथं १५-२० मिनिटांच्या अंतराने अशी १६ व्या शतकातली अत्यंत अप्रतिम टेराकोटा मंदिरं आहेत.
दूरवर दिसणा-या मंदिरांकडे पाहतोय, एवढय़ातच पावसाचा शिडकावा अंगावर बसला म्हणून टांगा ठरवला आणि पुढे निघालो, पण पहिल्याच मंदिरापाशी उतरताना वरुणधारांचं जोरदार नर्तन सुरू झालं. जणू ही मंदिरं त्याच्या संगतीतच पाहावीत असा पण करूनच सोसाटय़ाचं थैमान घालत पाऊस चाल करून आला. अखेर आम्ही टांगा सोडला आणि पायी चालायला सुरुवात केली.
ही मंदिरं, त्यांचं कोरीवकाम, शिल्पकला, वास्तुरचना हे सर्व त्या पावसात पाहताना एक वेगळाच अनुभव आला. थोडा वेळ जास्त लागला, पण असं वाटलं की गेली चार-पाचशे वर्षाच्या पावसाला तोंड देत ही मंदिरं कशी उभी टिकून राहिली याचं एक प्रात्यक्षिकच जणू पाहायला मिळालं. वाटलं की, त्यांच्या रंध्रातून निसटणारं ते पाणीदेखील दरवेळी तितकंच पुरातन होऊन बाहेर पडत असेल.
धुवांधार पाऊस पडत असताना फिरण्याची मजा अशी काही औरच आहे. कौतुक म्हणून नाही सांगत, पण खरंच पावसाळ्यातलं फिरणं हे इतर दिवसांपेक्षा वेगळंच असतं. पावसाळा हा मनाला हुरहूर लावणारा ऋतू आहे, अशा पावसात जर प्रिय व्यक्तीपासून दूर कोणत्या ठिकाणी असाल तर आता तिथे कसा पाऊस पडत असेल याचे विचार नक्कीच मनात येऊ लागतात. पावसातला प्रवास प्रिय व्यक्तीसोबत असेल तर ठीक आहे; पण नसेल तर मन कधीचंच त्या मेघांवर स्वार होऊन पाहिजे तिथं पोहोचलेलं असतं.
मुंबईकर निसर्गप्रेमींची पाऊस सुरू झाला की, जवळच्या ट्रेकला किंवा जंगलात जायची लगबग सुरू होते. आंबोलीला जाणार का, येऊरला येणार का किंवा चोरला घाटाला जायचं का, अशा चर्चा भटक्यांना जागं करतात. मुंबईत राहून पाऊस अंगावर घेण्याची कल्पना अस्सल भटक्यांना सहन होत नसते. अर्थात, यात वन डे पिकनिकवालेही असतात, ज्यांची धाव एखाद्या रिसॉर्टपर्यंतच असते. इथं शहरात मात्र लोकलने जाताना बाहेरची हिरवाई, डोंगरावरले ढग पाहून मन कळवळत राहतं. अनेक जण पावसाळ्यात बाहेर पडणं टाळतातच.
खरं तर अडचणींनी भरलेला पावसाळ्यातला प्रवास तुम्हाला धडे शिकवून जातो. आपल्यापैकी कोकणात जाणा-या अनेकांनी गाडी दोन स्टेशनांच्या मध्ये पाच-सहा तास रखडल्यावर असा अनुभव घेतलाही असेल. पण काही जण अशा रखडलेल्या गाडीतूनही बाहेर उतरून मस्तपैकी टेहळण्याचा आनंद घेतात. तात्पर्य हेच की कुठेही किंवा कोणत्याही वाहनातून जात असाल; परंतु अडचणींमधूनही फिरण्याचा आनंद घेता येऊ शकतो. त्यातही एक वेगळी मजा आहे. जबलपूर स्टेशनला प्रवाशांना थांबण्यासाठी उत्तम खोल्या आहेत, याचा शोध अशाच एका रखडलेल्या प्रवासात लागला होता. मध्य प्रदेशमधल्या याच दिवसांत पावसाळी भटकंती घडली ती बांधवगडला गेल्यावर. एका संध्याकाळी आकाशातलं मळभ पाहून सर्वानीच सफारी अर्धवट ठेवून मागे फिरण्याची घाई सुरू केली.
आमच्या गाईडनं विचारलं की, तुम्ही परत जाणार का? अर्थातच आम्ही परतण्याच्या मूडमध्ये नव्हतो, म्हटलं मस्त पाऊस दाटून आलाय आणि अशा वेळी जंगल फिरण्याचा, ते अनुभवण्याचा मोका कोण सोडेल बरं..? पाऊस येत असताना खरंच अगदी ‘डिस्कव्हरी’ वगरे चॅनेलवर फास्ट एडिटिंग करून दाखवतात तसं भराभर वातावरण पालटत जातं. झाडांच्या सावल्या अधिकच गर्द होतात, आधीच संमिश्र गंधांनी भरलेल्या त्या अरण्यात मग मृद्गंधही येऊन मिसळतो आणि क्षणार्धात ते हिरवंगार जंगल ओलं कंच होऊन ठिबकू लागतं.
वाटेतली निथळणारी बांबूची बेटं नवे रंग दाखवू लागतात. असा कोणत्याही जंगलातला पाऊस अनुभवा आणि त्याची तोडही तुम्हीच शोधा, परंतु काही जंगलातला पाऊस मात्र तिथल्या रहिवाशांसाठी दुर्दैवी असतो. कारण तिथं येणारे पूर. काझीरंगाच्या जंगलात उभं असताना इथं काही दिवसांपूर्वीच पावसानं किती उत्पात घडवला असेल या विचाराने वाईट वाटून गेलं. काझीरंगा, मानस, पवित्रा, नामदफासारखी अरण्यं पावसात बाकीच्या दिवसांमध्ये जेवढं काही मिळवलं असेल ते हरवून मोकळी होतात. म्हणूनच तो प्रत्येक ठिकाणी सोज्वळ असतोच असं नाही.
कुर्गला जाताना छान वळणावळणाचा घाटरस्ता आहे. तसाच तो साता-याला जातानाही आहे. अशा घाटरस्त्यांची पावसाच्या दिवसांमध्ये श्रीमंती वेड लावणारी असते. खिडकी मिळाली असेल तर अधिकच बहार. मग खिडकीत बसून पावसाचे टपोरे थेंब नाकावर जोराने बसत असले आणि गार वारा अंगाला झोंबत असला तरीही (शेजारी खिडकी बंद करा हो, असं सांगत असतानाही वेळकाढूपणा करत) बाहेर पाहण्यातली मजा वेगळीच असते. अशा वेळी प्रवासाला किती वेळ लागतोय, याचा हिशेब आपण ठेवत नाही. कारण मन गुंगलेलं असतं.
पण हाच जर का उन्हाळा असेल तर आपण किती वैतागतो. खिडकीप्रेमी लोकांची प्रवासात आणखीच मजा येते. त्यांना कोणत्याही ऋतूत, कोणत्याही वाहनात कायम खिडकी हवीच असते, बाहेरची दृश्य पाहण्यासाठी. मग ती मिळवण्यासाठी त्यांचे विविध उपाय असतात. असो. तो एक वेगळा विषय आहे. अर्थात बाईकवरचा प्रवास असेल आणि तोही पावसातला तर अजूनच धमाल.
मग तर पावसाचे थेंब असले जोरदार लागतात की मुश्कील होते, पण तरीही प्रवासाचा मूड प्रसन्न करून सोडणारा पावसासारखा दुसरा ऋतू नाही हे आपलं माझं मत. कारण अनेक जण हिवाळ्यात प्रवासाला अधिक पसंती देतात, हे माहितेय मला. पावसानं फिरायला अडवलं तरीही तो मला नेहमीच भावलाय. अशीच एक लक्षात राहिलेली पाऊसवेळ होती ती ब्रह्मपुत्रेवरली.
बोटीवर असताना तुफान पावसाला सुरुवात झाली. मोठमोठे थेंब नाजूकपणा सोडून राक्षसी धसमुसळेपणा करत होते. जोरदार वारा बोटीला हलवत होता. त्या सटासटा लागणा-या मोठाल्या पावसाने आम्हा सर्वाना आत पळवलं. अर्थातच बोटीवर आचारी चहा-पकोडे करून द्यायला तयारच होते. वा-यामुळे विस्तव नीट राहत नव्हता, तरीदेखील त्यांनी कष्टाने प्रवाशांची हौस भागवली आणि त्या प्रवासाची लज्जत वाढवली.
भारत उष्ण कटिबंधीय प्रदेश असल्याने इथला पाऊसही लहरी आहे आणि विशेषत: तो पूर्वोत्तर भागात जास्त लहरी आहे. कोणत्या एखाद्या ऋतूमुळे तुमच्या अख्ख्या प्रवासाची दिशा बदलू शकते तर तो पाऊस आहे. एकाच वातावरणात आपल्याला उष्मा, थंडी आणि पाऊस असा सर्व अनुभव देण्यात तो वाक्बगार आहे. तरीही अनेकांच्या अविस्मरणीय प्रवासातला एक तरी प्रवास हा पावसातला असेलच असेल, अशी माझी खात्री आहे.
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=6,74,936,1346&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/01022015/Mumbai/Suppl/Page5.jpg

सोबतीला कुणी..


प्रवासाला रंगत आणतो तो रस्ता, याच रस्त्याच्या सोबतीने आपण चालत असतो, निश्चित स्थळी पोहोचत असतो. प्रवासातल्या अनेक अनुभवांचा रस्ता साक्षीदार असतो. आपण अनेक अनुभवांविषयी बोलत असतो, मात्र रस्त्यांविषयी फार कमी बोलतो.
‘‘इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे..’’ परवा हे गाणं ऐकताना अचानक रस्त्याबद्दलचे विचार मनात आले. खरंच आपण इतका प्रवास करत असतो, पण या सा-यात रस्ता हा नेहमीच थोडासा साईड अ‍ॅक्टरसारखा बाजूला राहतो, तो पायाखाली असल्याने फारसा उल्लेखात राहत नाही. फार फार तर त्या रस्त्यावरून जाताना वेगळं काही दिसलं असेल तर तो आठवणीत राहतो किंबहुना एखादा रस्ता खराब असला तरच तो जास्त लक्षात राहतो. रस्ता खरं तर ‘मूड चेंजर’च असतो. कारण इथूनच आपला प्रवास सुरू होत असतो आणि इथेच तो संपत असतो. प्रवासातलं जे काही नाट्य असतं, त्यातलं बरंचसं रस्त्यावरच घडत असतं. तुमचा प्रवास हेच तुमचं ध्येय असतं, असं म्हटलं जातं. हे ध्येय गाठण्यात रस्त्याखेरीज योग्य असा जोडीदार कोणीच नाही. कारण भले जोडीला कोणी असो वा नसो, रस्ता तर नेहमीच तुमच्यासोबत राहतो. तोच तुम्हाला दिशा दाखवतो आणि पाहिजे तिथे नेऊनही सोडतो. अर्थात या प्रवासाशी आणि रस्त्याशी तुमचं नातं किती जुळलेलं आहे यावर हे अवलंबून असतं. कवी रॉबर्ट फ्रॉस्टने म्हटलंय, ‘‘आय टूक द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय.’’ त्याप्रमाणेच म्हणजे अस्सल भटके हे नेहमी मळलेल्या वाटेनं न जाता, कमी माणसं गेली असतील त्या रस्त्यानेच जाणं पसंत करतात; परंतु असे रस्तेही नेहमीच भेटतील असं नसतं.
सोबतीला कोणी असो वा नसो, प्रवासात तुम्ही जितके तल्लीन व्हाल, तितकाच आनंद तुम्हाला मिळत जातो. तसंच रस्ता उजाड असो किंवा सुंदर निसर्गदृश्यांनी भरलेला, आपला प्रवास हा आपण त्याच्यात किती मिसळून गेलोय यावर त्यातला आनंद अवलंबून आहे. तुम्ही रडत-खडत जाल तर पूर्ण रस्ता अन् प्रवासही तुम्हाला तसाच वाटू शकतो. आनंदात असाल तर तुम्हाला आनंदच मिळत जाईल. हैदराबादच्या वैराण माळरानासारख्या रस्त्यावरून बस धावत असताना आमचं तिथल्या शतकानुशतकं निश्चल होऊन विसावणा-या भल्यामोठय़ा कातळांकडे काही दिवसांनंतर लक्षही जायचं नाही. अनेकदा खाली उतरून त्यांना हात लावायचा मोह व्हायचा पण ते शक्य नसायचं. हे रस्ते सृष्टीसौंदर्याने भरलेले नव्हते पण मित्रमंडळी सोबत असल्याने त्यांचं उजाडलेपण फारसं निराश करू शकलं नाही. असाच होता एक डोंगररस्ता, मनालीच्या बिजली महादेव डोंगरावर जाणारा. पूर्ण मनाली भटकून झाल्यावर डोंगर चढण्याची कोणाची फारशी तयारी नव्हती. पण गावकरी वर जाऊन या असं सांगत होते. म्हटलं पाहू या तरी असं वर काय आहे ते, असं म्हणत म्हणत चांगले साडेतीन-चार तास वर चढून गेलो. काहीजणांनी अध्र्या वाटेत विश्रांती घेतली. पण वर गेल्यावर पायपीटीचं सार्थक व्हावं इतका अप्रतिम नजारा तिथं होता. वर मोठं पठार पसरलेलं होतं. तिथं बिजली महादेवाचं सुंदर मंदीर होतं. या डोंगरावरच्या पठारावरून मनालीचा सारा आसमंत दिसत होता. तिथून पाय निघत नव्हता. अर्थातच इतका सुंदर देखावा पाहिल्यावर खाली येताना पायांना थकवा फार कमी जाणवला. हीच तर गंमत असते. काहीतरी हवं असलेलं मिळणार आहे या ओढीने आपण रस्ता चालत असतो, त्यामुळे आपोआपच तो रस्ता किंवा पायवाटदेखील आपल्याला छान वाटत असते. अनेकदा एखाद्या तळ्याकडे जाणारी वाट ही अशीच ओढ लावणारी असते. कुर्गला एका तळ्याकडे नेणारी पायवाट ही अशीच गर्द झाडीतून जाणारी होती. बराच वेळ सुमारे तासभर चालल्यावर एक तळं व धबधबा समोर आला. पण त्याला पाहून वाटलं की यापेक्षा ही पायवाटच किती सुंदर होती. माथेरानचा शार्लोट लेकही असाच भ्रमनिरास करणारा ठरला. तिथं जाणारा जंगलातला रस्ता इतका रम्य होता, ऐन दुपारीही गर्द झाडीमुळे तिथं उन जाणवत नव्हतं. मात्र तळं सर्वसाधारण होतं किंवा तसं ते वाटलं. असाच एकदा सुखद धक्का बसला तो माल्रेश्वरच्या नदीवर जाताना. बराच वेळ धडपडत उतरती पायवाट चालत गेल्यावर समोर अचानक नदी आली. नदीच्या पात्राभवती दुतर्फा हिरवीगच्च डोंगररांग. आवाज फक्त पक्ष्यांचा व नदीच्या पाण्याचा. बाकी काही नाही. अगदी बसून ध्यान करता येईल इतकी शांतता. इतका सुंदर देखावा फक्त बियासच्या काठी पाहायला मिळालेला.
अनेकदा जंगलांमधून जाणारे रस्ते हे खडतर असतात. जंगलातल्या रस्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं फुटणा-या वाटा. परंतु राष्ट्रीय अभयारण्यांमध्ये तसं एकट्याला कोणी सोडतही नाही. अपवाद फक्त संशोधकांचा. इतर जंगलांमध्ये एकट्याने फिरणार असाल तर वाटा लक्षात राहतील याची सोय तुमची तुम्हीच करायची. कारण एकिकडे वाटेनं जाताना पुढय़ात काय-कोण येतंय हे पाहत आपण चाललेलो असतो आणि त्यातच वाट चुकली तर बिलामतच ओढवायची. कॉब्रेटच्या जंगलात आमची जीप वाटेत एका उतारावर बंद पडली. ड्रायव्हरनं नाईलाजानं उतरायला सांगितलं. कारण सुरक्षेच्या कारणामुळे पर्यटकांना सफारीत उतरवता येत नाही. मला तर ते हवंच होतं. मग थोडा वेळ गाईडसोबत त्या जंगलातल्या रस्त्यावर चाललो.
ड्रायव्हर भीत होता कारण आम्ही मागे एका टस्करला टाकून आलो होतो. तो ही आमच्या मागूनच चरत चरत येत होता आणि हत्तीच्या रस्त्यावर चालताना शंभर टक्के अलर्ट राहावं लागतं. जंगलांमध्ये फिरताना एक सावधगिरी नेहमी पाळायची असते. तशी सूचनादेखील कुठेकुठे लिहिलेली असते की तुमच्या मार्गात एखादा वन्यप्राणी आला तर त्याला त्याच्या रस्त्याने तुमच्या अगोदर जाऊ द्या. अर्थात आमच्यासारख्यांना कोणीतरी वाटेत येणं अपेक्षितच असतं. असं अनेकदा रानकुत्री, गवे, हत्तींचा कळप, अस्वलं यांना आम्ही आनंदाने जाऊ दिलेलं आहे. त्यांना त्यांच्या अधिवासात पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. मात्र आजही काही अभयारण्यांच्या बाजूच्या गावांमधून जाणा-या रस्त्यांवर ही शिस्त पाळली जात नाही व त्या रस्त्यांवरून पलीकडे जाणारे वन्यजीव हकनाक सुसाट धावणा-या वाहनाखाली बळी जातात तेव्हा भयंकर वाईट वाटतं. नागरहोलेच्या रस्त्यावरून जाताना आम्हांला रानकुत्री भेटली होती. नागरहोलेच्या जंगलातल्या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिथली विशालकाय प्राचीन वाटणारी झाडं आणि या झाडांच्या मध्ये लटकणारी मोठाली कोळ्यांची जाळी. या उंचच उंच झाडांकडे पाहताना मन गुंगून जातं. कधी असंही होतं की खालचा रस्ता विसरून जावा म्हणून देखील आपण बाहेर पाहू लागतो. नागालँडमध्ये फिरताना रस्त्यांची दुर्दशा झालेली दिसली. पण रस्त्यांच्या या डुगडुग अवस्थेला विसरायला लावणारा निसर्ग तिथं आहे. नागालँडला दुसरं कोकण म्हणता येईल इतकं तिथल्या व कोकणच्या निसर्गात साम्य आहे. असेच अप्रतिम रस्ते होते कर्नाटकमधले. बेळगावपासून म्हैसूपर्यंत कुठेही जा, रस्तेही मुलायम व निसर्ग तर त्याहून सुंदर. काझीरंगाकडे जाताना गोहत्तीपासून तब्बल पाच तासांचा प्रवास आहे मात्र या प्रवासात एकदाही कंटाळा येत नाही इतकी सुंदर खेडी आजूबाजूला दिसत राहतात. आश्चर्य म्हणजे काझीरंगाचं वैशिष्ट्य असणारे गेंडे व हत्तीदेखील याच गावांच्या बाजूच्या शेतांमधून दिसत राहतात. वळणावळणाचे रस्ते मला नेहमीच आवडतात. पुढं काय आहे याची उत्सुकता लावणारे. तुम्हांलाही असेच छानशी सोबत देणारे रस्ते भेटले असतीलच.
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=682,70,1460,1606&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/08022015/Mumbai/Suppl/Page4.jpg

खेळ छायाचित्रांचा


हल्ली काही गोष्टी घेतल्याशिवाय आपण प्रवास सुरूच करत नाही. कॅमेरा ही त्यातलीच एक गोष्ट. कॅमेरा आणि प्रवास यांचं नातं अतूटच होऊन गेलंय. पण ते खरंच तसं आहे का?
आपण एखाद्या छानशा पर्यटनस्थळी फिरायला गेलो आहोत. समोर रमणीय देखावा आहे. आपण तो पाहतोय, पण नीट आठवा.. काही सेकंदच किंवा मिनिटभर आपण तो आपल्या डोळ्यांनी पाहिलेला असतो. अनेकदा आपण तो कॅमे-याच्या डोळ्यांनीच बराच काळ पाहिलेला असतो.
कॅमेरा ही आपल्या बहुतेकांच्या प्रवासातली एक आवश्यक गोष्ट असते बहुधा. तशी ती असायलाही काही हरकत नाही. काही जण व्यवसायाच्या निमित्ताने कॅमेरा घेऊन फिरतात आणि काही हौसेसाठी. हेतू एकच. मनात जे रेखाटता येत नाही ते सारं काही आपण कॅमेराबद्ध करायचा आटोकाट प्रयत्न करत असतो. कॅमेरा हा जणू साठवणीची पेटीच होऊन जातो. आज गेली कित्येक दशकं कॅमेरा माणसाच्या प्रवासातला मूक सोबती होऊन गेलाय.
कॅमे-याच्या विविध प्रकारांनी कित्येकांचा प्रवासाचा आनंद द्विगुणित केलाय. स्वतंत्र कॅमेऱ्यांच्या जोडीला आता टॅब व मोबाईलमधले कॅमेरेही आहेत. अगदी डोक्यावर लावून फिरता येणारे गो-प्रो कॅमेराही आहेत. कॅमे-याची हौस आधुनिक अजिबात नाही, चित्रदृश्य स्मरणात साठवून ठेवण्याची ही भावना आदिम आहे. याआधीचा माणूस मनात, नजरेत चित्र साठवून ते नंतर गुहांमधल्या भिंतींवर, कपारींवर त्यानंतरच्या काळात कागदावर उतरवत होता.
माणसाची निरीक्षणशक्ती व त्याची इतर प्राण्यांपेक्षा थोडी जास्त असलेली चौकसबुद्धी त्याला चित्रकलेकडे घेऊन गेली. प्राचीन मानवाने व त्यानंतरही मानवाच्या कित्येक पिढय़ांनी या खंडातून त्या खंडात प्रवास केला. त्यावेळी त्याच्या हाती कॅमेरासारखी उपकरणं नव्हती. यावेळी त्याची स्मरणशक्ती, निरीक्षणशक्ती व रेखाटनकलाच त्याच्या कामी यायची. काही अनुभवांना तो शब्दांमध्ये बांधण्याचं कौशल्य शिकला, परंतु काही अनुभव त्याच्या लेखी शब्दातीत होते. अविस्मरणीय, अलौकिक व त्याच्या कल्पनेपलीकडचे होते.
अशा वेळी फिरणा-या या माणसाच्या मदतीला आली चित्रं. अर्थात, चित्रकला ही सर्वानाच येईल, अशीही कला नाही. त्यामुळे कॅमे-यासारखी उपकरणं फिरणा-या लोकांच्या बहुपयोगी पडली. दृश्यचित्रकलेचं हे हातात कुठेही घेऊन फिरता येण्यासारखं स्वरूप लोकप्रिय झालं.
माणसानं चित्रं काढायला सुरुवात केली ती स्वत:साठी, एक स्मरणचित्रं म्हणून; पण ही फक्त त्याची स्मरणचित्रं नव्हती तर ती त्याच्यासोबत राहणा-या समुदायासाठी ज्ञानाचा स्त्रोतही होता. त्याने फिरताना आजूबाजूला पाहिलेल्या वस्तूंची, प्राण्यांची, वनस्पतींची, निसर्गाची माहिती इतरांना करून द्यावी, त्यासाठी त्याने चित्रकलेचा आधार घेतला तो आजतागायत त्याने कायम ठेवलाय.
त्यासाठी लागणा-या साधनांमध्ये बदल जरूर होत गेले. मात्र उद्देश तोच होता. मानवी समुदायांपर्यंत माहिती पोहोचवणे. आज आपल्याला माहिती पोहोचवण्याची इतकी गरज उरलेली नाही, तरीही आपण स्मरणचित्रांसाठी कॅमे-यासारख्या उपकरणांचा वापर सुरू ठेवलाय. ही स्मरणचित्रं नेहमीच प्रवाशाला आनंद देत आली आहेत. किंबहुना आज काहीवेळा उलट स्थितीदेखील झालेली दिसते. पूर्वी मनुष्य नवल पाहण्यासाठी, ज्ञान किंवा व्यापारउदीमासाठी प्रवास करायचा. जे दिसेल ते स्मृतींमध्ये बांधून ठेवायचा प्रयत्न करायचा.
आज तो कॅमे-याच्या सोबतीने प्रवास करतो. कॅमे-याशिवाय त्याचं पाऊल हलत नाही. सर्वसाधारण पर्यटक कष्टाचे पैसे खर्च करून एखाद्या ठिकाणी जातात, त्यावेळी प्रत्येक दृश्य कॅमे-यात पकडण्याची त्यांची धडपड सुरू असते. डोळ्यांनी, मनाने समोरच्या दृश्याचा पूर्ण आस्वाद घेण्याआधीच, आपल्या डोळ्यांना फारशी संधी न देता आपण कॅमेरा बाहेर काढतो. यामुळे मनावर एखादी गोष्ट कोरली जातच नाही. एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथलं दृश्य पाहून आपल्याला तिथं नतमस्तक व्हावंसं वाटतं. इतकं ते दृश्य अप्रतिम असतं.
लेह-लडाखला किंवा अगदी हिमाचल प्रदेशात कुठेही गेल्यावर याची प्रचिती येते. आपण किती क्षुद्र असतो, याची जाणीव ताबडतोब आपल्याला होत असते. हीच भावना सह्याद्रीच्या रांगा पाहून किंवा नागझिराच्या जंगलात रूबाब चालवणारा वाघ पाहूनही होत असते. यावेळी आपण आधुनिक यंत्रांचा सहारा घेतो. अर्थात हे करूच नये असंही नाही. मात्र जिथे निसर्गाच्या सीमा पाळायच्या, तिथे त्या पाळल्या गेल्या पाहिजेत.
एखादं दृश्य किंवा परिसर खूप अभ्यासपूर्वक पाहिलंत, त्याला स्मरणबद्ध करण्याचा प्रयत्न केलात तर ते शक्यही होतं. अशावेळी आठवण म्हणून काही फोटो आणणं ही वेगळी गोष्ट. मात्र दरवेळी जिथे पाहू तिथे कॅमे-याचा क्लिकक्लिकाट करत बसायचं आणि मूळ आनंदाकडे दुर्लक्ष करायचं, हे ख-या फिरस्त्याचं काम नव्हे.
अशा कॅमेरापटूंनीच दोन-तीन वर्षापूर्वी वाईल्डलाईफ फोटोग्राफर्सवर संकट आणलं. वाघांना पर्यटकांच्या अतिप्रमाणामुळे, पर्यायाने त्यांच्या फोटो काढण्यामुळे त्रास होत असल्याचं सांगत व्याघ्र अभयारण्यांमध्ये चालणा-या फोटोग्राफीवर सरकारनं कडक बंधनं आणण्याचं ठरवलं होतं. ओल्याबरोबर सुकंही जळतं, तसा हा प्रकार होता. हौशे-नवशे-गवशे प्रकारातले सर्वसाधारण पर्यटक कोणताही प्राणी समोर दिसला की, त्याच्यावर कॅमे-याचं शस्त्र चालवतात.
परंतु हे शस्त्र चालवण्याचंही एक शास्त्र आहे, हे त्यांना कोणीतरी समजावून देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, कधीही हेलिकॉप्टर न पाहिलेल्या माणसाच्या अगदी जवळ ते येऊन उभं राहिलंय आणि त्याचा पंखा गरगरतोय, त्यावेळी ती व्यक्ती जेवढा घाबरेल तेवढीच भीती कॅमे-याची या प्राण्यांना वाटत असते. कॅमेराची प्राण्यांना सवय झालीय, अगदी जंगलातले वाघ-सिंह देखील माणसाळल्यासारखे कॅमेराला पोझ देतात असं काही लोक म्हणतात.
यावर विश्वास ठेवू नका. कित्येक उदाहरणं अशीही आहेत की, कॅमेरा पाहून प्राणी चवताळतात व पर्यटकांवर हल्ला करतात. हत्ती, गेंडा, सिंह, वाघ म्हणजे तुमच्या कॅमे-याकडे पाहून दात विचकणारं माकड नाही. अगदी तेदेखील मस्तीच्या मूडमध्ये असेल तर तुमचा कॅमेरा हिसकावून घेऊन पळून जातं. काझिरंगाच्या जंगलात मी असताना सेंट्रल रेंजमध्ये गेंडय़ाच्या जवळ जीप नेऊन फोटोगिरी करण्याचा आनंद घेणा-या पर्यटकांची गाडी गेंडय़ाने उलटवली होती. पिल्लं जवळ असणारी हत्तीण किंवा वाघीण, यांचे फोटो घेतानाही सावध राहणं गरजेचं असतं. कारण बहुतेक जंगली प्राणी नेहमीच आपल्या पिल्लांच्या संरक्षणाबाबत खूप सतर्क असतात.
त्यांना मानवाकडून धोका आहे असं जाणवलं तर हल्ला निश्चितच असतो. पिल्लांसोबत असलेली हत्तीण अनेकदा कॅमेरा पाहून झुडुपांमध्ये शिरलेली मी पाहिली आहे. कॅमे-याचा वापर करताना दुस-या सजीवाला त्रास होणार नाही इतपत असावा हे लक्षात ठेवून फोटोग्राफी केलीत तर निश्चितच तुम्ही प्रवासातून छानशा आठवणी घेऊन परताल.
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=692,82,1472,1600&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/15022015/Mumbai/Suppl/Page4.jpg

अतिथी देवो भव!


दुस-याच्या घरी एक दिवस-रात्र काढायची म्हटली तरी आजही कित्येकांच्या जीवावर येतं. रात्री दमूनभागून कधी एकदा स्वत:च्या घरी जाऊन पाठ टेकतोय असं आपल्याला होत असतं. स्वत:च्या घराशिवाय चैनच पडत नाही असंही काहींचं म्हणणं असतं. किंबहुना आपल्याकडल्या कित्येक म्हणी घराशी निगडित आहेत. अशा भारतीय पर्यटकाला प्रवासाला गेल्यावर होम स्टेचं आकर्षण वाटू लागलं आहे.
हे आमचं दुसरं घरच आहे किंवा घरच्यासारखी माणसं इथं भेटतात वगरे वाक्यं मला पूर्वी जाहिरातीच्या कात्रणातून कापून काढल्यासारखी वाटायची. कारण आपला एक अढळ विश्वास असतो की आपल्या घरासारखं ( मग ते कितीही छोटं-मोठं का असेना ) दुसरं घर मिळणं ही जवळजवळ अशक्यच गोष्ट असते. ते खरंही असतं म्हणा. कारण घर भिंतींनी नाही, तर आतल्या माणसांनी बनलेलं असतं. घराविषयीच्या व एकूणच कुटुंबपद्धतीबाबतच्या आपल्या भारतीयांच्या काही कल्पना अगदी ठाम आहेत. त्या टिकून आहेत म्हणूनच भारतीय संस्कृती आजतागायत टिकून आहे.
आपलं घर व घराचं वेगळेपण, प्रेम जपणारी आपण माणसं. आपलं घर ते आपलंच घर, दुस-यांच्या घरात ती भावना कशी येणार, असा सारा भावनिक मामला असताना भारतीय पर्यटन व्यवसायात होम स्टे यासारखी संकल्पना रुजणं थोडं अवघडच होतं. आजही आहे. परंतु आज होम स्टे कल्पनेचा विस्तार होतोय. वर म्हटलेलं माझं मत आज थोडंफार बदलू लागलं आहे.
काही दशकांपूर्वी केरळमध्ये पहिला होम स्टे सुरू झाला. परदेशातील बेड अँड ब्रेकफास्टसारखी ही कल्पना आहे. म्हणजे एखाद्याच्या घरी मुक्काम ठेवून आपण पर्यटन स्थळी फिरून यायचं. ही कल्पना खरी भारतीयांच्या मानसिकतेच्या अधिक जवळची. म्हणजे एखाद्या नातेवाईकाच्या घरी राहायला जाऊन तिथली आसपासची पर्यटनस्थळं पाहायची हा प्रकार काही आपल्याला नवीन नाही. पण इथे घर नातेवाईकांचं किंवा मित्र-मैत्रिणीचं नसणार तर दुस-या कोणा अपरिचित माणसाचं असणार. त्यामुळे पैसे देऊन का होईना, अशा घरात कसं राहायला जायचं याविषयी भारतीय पर्यटकांच्या मनात हजार प्रश्न उभे राहतात. पुन्हा त्या घराविषयी आपण कधी ऐकलेलं नसतं.
आता इंटरनेटनं सर्व काम सोपं केलंय. इथं निरनिराळ्या होम स्टेंचे रिवू वाचायला मिळतात. पण अगदी पूर्वी ही सोय नव्हती. होम स्टेचा मालक नक्की चांगलंच वागवेल की नाही, याची खात्री नसतानाही पैसे भरून परक्या घरात राहण्यापेक्षा हॉटेलात राहिलेलं परवडलं असा विचार आजही लोक करतात.
आपल्याकडे होम स्टेची संकल्पना रुजायला उशीर का झाला याच्या काही कारणांपैकी प्रमुख कारण हे की, भारतीयांची मानसिकता. हे घर आहे हॉटेल नाही, इथं वाट्टेल ते चालणार नाही, असा दम दिलेला आजही काही घरात ऐकू येतो. म्हणजे हॉटेल ही काहीतरी दुय्यम दर्जाची गोष्ट असावी हे आपल्या मनात खूप वर्षापासून बिंबवलं गेलंय. असं असताना आपण होम स्टे घरात सुरू करायचा, पर्यायाने घराचं हॉटेलच बनवायचं हेच मुळी कित्येकांना मान्य नव्हतं व नाहीये. परदेशातही होम स्टे आहेत. ते आपल्यासारखेच आहेत. पण आपल्याकडे मुळात होम स्टे सुरू झाला तो घरापासून दूर येणा-या पर्यटकाला घरासारखी जाणीव देणारं दुसरं घर त्याच्या प्रवासात मिळावं या उद्देशाने. असा अनुभव देताना प्रवाशाने त्या घरात समरस व्हावं, असं त्याला स्वत:हून वाटलं पाहिजे.
पण कोणा परक्याने आपल्या घरात आल्यावर कसं वागावं, यासाठी भारतीयांचे काही नियम आहेत. मग हे सर्व नियम होम स्टे कल्पनेत पाळले जाणार होते का? खासगीपणा जपला जाणार होता का? प्रवाशाला घरच्यासारखी आस्था व घरमालकाला पैसा मिळणार होता का? होम स्टे संकल्पनेविषयी अशा अनेक समजुती व गरसमज लोकांच्या मनात होते. आजही असतात. दुसरा अडसर होता तो प्रत्यक्ष घरमालकाच्या मनामध्ये. मध्यंतरी वेळासला गेले असताना याचा अनुभव आला. तिथं माडा-पोफळाच्या बागा आहेत, आमराया आहेत, विपुल निसर्गवैभव आहे.
वेळाससारखं गाव कासव पर्यटनाच्या निमित्ताने जगाला माहीत झालं. पण तिथं किंवा कोकणातल्या अनेक गावांमध्ये आज होम स्टे सुरू करून परक्या प्रवाशांना आपलं घर वापरू द्यायच्या मुद्दय़ावर द्विधा मन:स्थिती आहे. पर्यटनातून अर्थार्जन होऊ शकतं, हे काहींना समजलेलं आहे, त्याच लोकांनी होम स्टे सुरू केलेत. मात्र काहींच्या गळी अजून ही कल्पना उतरलेली नाही.
आपण आपल्या कुटुंबाचा खासगीपणा चार पैशांसाठी का बाजारात मांडावा, असा काहींचा आक्षेप असतो. याचं दुसरं कारण माझ्या निरीक्षणानुसार असं असू शकतं, ते म्हणजे आपण आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना जपतो. मग परका प्रवासी येऊन तिथं घरातल्या बायकांच्या आजूबाजूला वावरणार ही काहीजणांना काहीशी धोक्याची गोष्ट वाटू शकते. त्यात काही गर नाही. मात्र एकाच गावात अनेक घरं ही तिथल्या एखाद्या संस्थेच्या अंतर्गत होम स्टे सुरू करत असतील, तर अशा घरांना सुरक्षिततेचा फायदा मिळतो. त्यांच्यावर गावातल्या व संस्थेच्या लोकांची नजर राहते. पण एखाद्या गावात एका बाजूला असणा-या घरात होम स्टे सुरू असेल तर मालक व प्रवासी या दोघांनाही काळजी घ्यावी लागते. विशेषत: महिलांना.
होम स्टे इतर अनेक बाबतीत हॉटेलांपेक्षा सरस ठरतात. एखाद्या ठिकाणचं स्थानिक वैशिष्टय़, तिथल्या चाली-रिती, खाद्य व कुटुंब संस्कृती वगरे जाणून घ्यायची असेल तर होम स्टेला पर्याय नाही. म्हणूनच आज अनेक कुटुंबं त्यांचं फार्महाऊस वगरे होम स्टेमध्ये रूपांतरित करतात. इथं भारतीयांचा चाणाक्षपणा दिसतो. आपण जिथं राहणार नाही, अशी म्हणजे आपलं प्रत्यक्ष घर नसलेली जागा ते होम स्टेसाठी देतात.
पर्यटक आले की ही माणसं तिथं जाऊन राहतात. हॉटेलांपेक्षा इथं अधिक मोकळेपणा व घरगुती वातावरण असतं म्हणून होम स्टेची परंपरा आपल्याकडे सुरू झाली व तिच्या लोकप्रियतेचा फायदा उठवत अनेकांनी अव्वाच्या सवा भाव वसूल करणं सुरू केलं. अशा होम स्टेमध्ये चुकूनही फिरकू नका. इंटरनेटवरील परीक्षणांमध्ये प्रामाणिक मतं कोणती आहेत, याचा अंदाज घ्या. त्या होम स्टेची स्थानिक परिसरात चौकशी करा. मगच होम स्टे बुक करा. यातील बाकी निकष वैयक्तिक असतात. भारतीय पर्यटनाला प्रसिद्धी, महसूल व पर्यटक मिळवून देण्यात आज होम स्टे चांगलं काम करत आहेत.
आज ठिकठिकाणी होम स्टे उपलब्ध आहेत. होम स्टेमध्ये राहण्याविषयी पर्यटकांच्या मनात आता फारसे गरसमज नसतात. उलट भारतातील प्रांतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळेल म्हणून लोक होम स्टेची निवड करू लागले आहेत. त्यातही होम स्टेमध्ये राहणं हे अधिक उत्तम व खर्चाच्या दृष्टीनंही फायदेशीर ठरतंय म्हटल्यावर माझ्यासारख्यांनी अनेकदा होम स्टेला पसंती दिलीय. माझ्या अनुभवानुसार मनानं चांगली असणारी माणसं होम स्टेची मालक असतील तर नक्कीच अशा होम स्टेमध्ये खरोखर घरी राहिल्यासारखा अनुभव मिळतो. कर्नाटक, प. बंगाल, आसाम, कोकण अशा अनेक ठिकाणी मला चांगले मनासारखे होम स्टे म्हणजे घरं वाटय़ाला आली. असा एखादा उत्तम अनुभव तुम्हालाही मिळो.
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=18,1406,1464,2268&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/22022015/Mumbai/Suppl/Page4.jpg

सुलभ नसे जे !


भारतातील प्रवासातली एकमेव व मला जाणवलेली उणीव कोणती असेल तर ती आहे, ठिकठिकाणच्या स्वच्छ व चांगल्या शौचालयांची.
भारतातील प्रवासातली एकमेव व मला जाणवलेली उणीव कोणती असेल तर ती आहे, ठिकठिकाणच्या स्वच्छ व चांगल्या शौचालयांची.
जागतिक महिला दिन आठवडयावर आलाय, त्या निमित्ताने आपल्याकडे स्त्री प्रवाशांसाठी असलेल्या शौचालयांची दैन्यवस्था आठवतेय आणि मी पार केलेल्या दिव्यांचीही आठवण येतेय.
प. बंगालमधल्या एका गावात आम्हाला जायचं होतं. त्यासाठी भल्या पहाटेच म्हणजे चारला उठून पाचला बाहेर पडलो होतो. कारण पुढे एक तासाचा रेल्वे व पाच तासांचा बसचाही प्रवास होता.
या सर्व प्रवासात माझी काय गोची होणार आहे हे मला घरातच लक्षात आलं होतं; पण त्याला नाइलाज होता, त्यामुळे ‘आलिया भोगासी असावे सादर’ या विचाराने मी पुढल्या संकटासाठी मानसिक तयारी ठेवली होती.
प. बंगालमधलं बर्धमान शहर हे जिल्ह्याचं शहर असलं तरी इथं अस्वच्छता व मागासलेपणा बोकाळलेला आहे. वर्षानुर्वष इथली स्थानिक माणसं अपु-या नागरी सुविधांच्या खाते-यात पडलेली आहेत हे तिथं स्पष्ट जाणवत होतं.
जिल्ह्याच्या शहरात एवढी घाण असेल तर प्रत्यक्ष ग्रामीण भागात काय स्थिती असेल याचा विचारच करायला नको. आम्ही बर्धमानला साडेसात वाजता पोहोचलो. चहा घ्यायची भरपूर तल्लफ आली होती. पण थंडीने आपला असरही दाखवला होता. निसर्गाची हाक आली होती.
रेल्वे स्टेशन काय किंवा बाहेर काय, कुठेही जाण्यायोग्य शौचालय नव्हतं. त्यात ती अगदी सकाळची वेळ. सर्वत्र कसा आळसावलेला परिसर. कुठेही मोठं हॉटेल नाही. शिवाय आमची बसही लागलेली होती. अखेर जागा मिळवायची असल्याने बसमध्ये एकदाचे चढून बसलो. त्यानंतर बस एवढी पॅक झाली की जाण्याचा दरवाजाही दिसेना. असा तो काठोकाठ भरलेल्या बसचा प्रवास सुरू झाला व मी सरळ झोपून गेले.
बिष्णूपूरला साडेबारा वाजता उतरलो तेव्हा पहिल्यांदा एका चांगल्याशा हॉटेलाकडे धाव घेतली. तिथला वेटर जेवणाची वेळ झाली असल्याने तुम्ही काय जेवण घेणार असं विचारू लागला. त्याला म्हटलं की बाबा रे, पहिल्यांदा बाथरूम दाखव कुठे आहे ती. तो म्हणाला, अशी काही हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्यांसाठी बाथरूम वगरे नाही; पण इथं वरती हॉस्टेल आहे, त्या पुरुषांची बाथरूम आहे.
तिथे तो मला घेऊन गेला व मला अक्षरश: स्वर्ग सापडल्याचा आनंद झाला. तो आनंद व्यक्त करून बाहेर येते तोच बाहेर एक पुरुष हातात धुण्याचे कपडे घेऊन उभा होता, तो आश्चर्याने पाहू लागला. त्याला बहुतेक माझं हे अतिक्रमण रुचलं नसावं. पण माझा नाइलाज होता.
या एका बाबतीत स्त्री नेहमीच भीडेस्तव पुरुषापेक्षा मागे पडते. तरीही आज गावोगावातून जाताना हायवेने असणा-या शेताच्या बांधावर किंवा एखाद्या मोठया झाडाच्या आडोशाने लघुशंकेला जाण्यासाठी स्त्रियांची तयारी असते. अन्यथा काहीच पर्याय नसतो.
येऊरच्या जंगलातदेखील हाच अनुभव आला. एक दिवस सात वाजताच आम्ही नेचर ट्रेलला सुरुवात केली होती. अर्थात त्यासाठी मी सहाला उठून घराबाहेर पडले होते. दिवस पावसाळ्याचे होते. त्यामुळे अर्थातच आम्ही चिंब भिजलो होतो. जंगलात फिरताना अंगावरच्या रेनकोटचा खूप फायदा झाला नव्हता.
त्यात गुडघ्याच्यावर पाणी असलेले ओढेही पार केले होते. त्यामुळे काही तासांनी आतून ‘आडोसा शोधच’ अशी जाणीव व्हायला लागली. मग आम्ही सर्व जणींनी जंगलातल्याच त्या मोठाल्या झाडाझुडूपांचा सहारा घेतला. ब-याचशा इतर मोठया जंगलांपेक्षा तुलनेने लहान असणा-या जंगलांमध्ये आज पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसते. दांडेलीच्या जंगलात त्यांनी छानसा नसíगक असा छोटा बांबू लावून आडोसा निर्माण केलाय.
फक्त आडोसाच, तिथं पाणी वगरे काही नाही. नागरहोलेच्या जंगलात एक पक्कं सिमेंटचं स्वच्छतागृह आढळलं. त्यावर जंगलच्या रहिवाशांनी खरोखरच राज्य सुरू केलं होतं. म्हणजे आतमध्ये मोठ्ठाली कोळ्याची जाळी व मधमाश्यांचं पोळं, त्यामुळे तिथं कोळी व मधमाश्यांनी आमचं स्वागत केलं. मग आम्ही कुठे साप वगरे दिसतो का हेही पाहून घेतलं व ते पाहता पाहताच विधी उरकून घेतले. अशी धर्मसंकटं बरेच वेळा आली. माझ्याच नाही तर भारतात फिरणा-या प्रत्येक स्त्रीपाशी असे अनुभव असतील.
आपण भारत प्रगतीकडे चाललेला देश म्हणतो खरे, पण या बाबतीतली प्रगती तरी अजून काही दृष्टिपथात नाही. भारतीय स्त्री एकवेळ तिचा स्वत:चा देश म्हणून समजून घेईल; पण बाहेरून येणा-या परदेशी स्त्रियांचं काय? अर्थातच, त्यांच्या लिखाणातून यासंबंधीचे शेरे वाचायला मिळतात व त्यांच्या मनात भारताविषयी काय प्रतिमा त्या घेऊन गेल्या आहेत हे देखील स्पष्ट होते.
मध्य प्रदेशातील एका गावात असेच एकदा प्रवासादरम्यान थांबलो असताना आम्ही स्वच्छतागृह शोधत होतो. ते काही सापडलं नाही म्हणून पोलीस चौकीत तरी निदान तिथल्या महिलांसाठी काही सोय असेल या हेतूने डोकावलो. तिथल्या एका महिलेने एक शाळेच्या वर्गासारखी दिसणारी खोली दाखवली. जी पुरेपूर घाण झालेली होती; पण नाइलाजाने आम्हाला त्याचा वापर करावा लागला. दुसरा पर्यायच नव्हता.
भारतातल्या बहुतांशी ग्रामीण भागात महिलांसाठी स्वच्छतालयंच नाहीत व असली तरीही त्यांची दुरवस्थाच असते. शहरी व निमशहरी भागातही फार काही चांगली स्थिती नाही हेही मी अनुभवलंय. रेल्वेतून फिरताना तर या समस्येचा गंभीरपणा विसरायला लावणारे हास्यास्पद अनुभव येतात. प्रथम वर्गाचा वातानुकूलित डबा असेल तरच भारतीय रेल्वेत चांगलं शौचालय तुमच्या नशिबी येऊ शकतं. नाही तर इतर वर्गाच्या शौचालयातही दाटीवाटीने माणसं बसलेली दिसतात.
तुम्ही कुटुंब किंवा महिला असलेल्या ग्रुपसोबत प्रवास करत असाल तर परिस्थिती थोडीफार सांभाळता येते. कोणी सामानावर नजर ठेवू शकतं, तर दुसरं कोणी आपल्यासोबत येऊ शकतं किंवा स्वच्छतागृहाचा शोध घेऊ शकते. मात्र आपल्या देशात एकटयाने प्रवास करणा-या स्त्रीची अशा बाबतीत फारच कुचंबणा होते. ही वेळ माझ्यावरही अनेकदा ओढवली आहे.
विचार करा, भारतीय असल्यामुळे मी सहजच िहदी भाषेचा वापर करून मला पाहिजे ते शोधू शकते, मात्र आपल्या देशात फिरायला आलेल्या एखाद्या विदेशी पर्यटक पाहुणीची काय स्थिती होत असेल! कर्नाटकात माझ्या वहिनीसोबत फिरताना आम्हाला याची खूप जाणीव झाली. पण फक्त कर्नाटकच नव्हे तर आपल्या देशातील पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणा-या व तसं महत्त्व नसलेल्या देखील अनेक मोठया व छोटया शहरांत महिलांसाठी चांगल्या स्वच्छतागृहांची आत्यंतिक गरज आहे. तशी ती पुढील काळात मिळोत व आपला प्रवास सुखाचा होवो हीच येणा-या आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी शुभेच्छा !
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=2,1510,1466,2266&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/01032015/Mumbai/Suppl/Page4.jpg

Friday, April 24, 2015

सारे प्रवासी घडीचे, ग्राहक कायमचे!


प्रवास करणं हे खरं तर एक निमित्त असते; पण या निमित्ताने आपल्या पदरी अनेक बरे-वाईट अनुभव पडत असतात. एखादी उत्तम सहल लक्षात राहते तेव्हा तिच्यापाठी असेच काही चांगले अनुभव असतात व तसेच एखाद्या प्रवासातून चांगलाच धडाही आपल्याला मिळून जातो. १५ मार्च म्हणजे आजच्या जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्ताने अशा अनुभवांची ही उजळणी.
सारे प्रवासी घडीचे हेच सत्य असतं कारण हल्ली आपला प्रवास हा फक्त आपला नसून तो साकार करण्यामागे कितीतरी जण खपत असतात. गेली काही दशकं पर्यटन व्यवसायाला जगभरात भरभराट लाभलेली दिसतेय. त्सुनामी, महापूर, भूकंपासारखी मोठी नसर्गिक हादरवणारी आपत्ती किंवा एखादा सांसर्गिक रोग अशा कारणांनी काही काळापुरता पर्यटन व्यवसाय जरूर मंदावतो मात्र पुन्हा तरारतो. त्याचं श्रेय तुमच्या-
आमच्यासारख्या प्रवाशांनाच जातं. आपण या पर्यटन व्यवसायाचे ग्राहक असतो. हल्लीच्या काळात पैसे खर्च करायची तयारी असेल तर प्रवासासारखा दुसरा आनंद नाही. आजच्या ग्राहककेंद्रित जगात पर्यटन व्यवसायानं ग्राहकाचं पर्यायाने प्रवाशांचं मूल्य व त्यांची आवडनिवड चांगलीच जोखली आहे. म्हणूनच अनेक पर्यटन कंपन्या, विमान कंपन्या, क्रूझ कंपन्या, रेल्वे, हॉटेल्स इ. प्रवाशांना त्यांचं उत्पादन अत्यंत आकर्षक वाटेल अशी प्रलोभनं दाखवत विकतात.
इथे ग्राहक हा त्याच्या घराबाहेर देखील राजा असतो. शिवाय त्याला निवडीमध्ये वैविध्य असतं. परंतु याच ग्राहक राजाने आपला प्रवास व सहल संस्मरणीय करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक असते.
होतं काय की आपण रोजच्या नोकरी-धंद्याच्या, कामाच्या कंटाळवाण्या कटकटीतून सुटणार या आनंदात असलेला पर्यटक ग्राहक गरसोय किंवा फसवणूक झाली तरी होता होईतो सहन करत दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असतो.
प्रवासात असताना कशाला हवाय झमेला असं त्याला वाटत असतं. मात्र आपल्याच फायद्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. याचं सर्वात साधं उदाहरण म्हणजे एसी रूम.
आपण एसी रूम बुक करतो आणि तिथे गेल्यावर आपल्याला सांगण्यात येतं की साहेब, रूम एसी बंद पडलाय. मेकॅनिकला बोलावलंय. आपण दुसरी रूम द्या म्हटलं तर दुस-या सर्व रुम्स भरलेल्या असतात, हे आपल्यालाही दिसत असते.
अशा वेळी आपल्याला नाइलाजाने एसीचं भाडे भरून नॉन एसी झालेल्या रूममध्ये राहावं लागतं. भाडं मात्र तेच लागतं, कारण हॉटेलचे नियम बदलता येत नाहीत, असं कारण सांगितलं जातं. हॉटेलांमधील सोयीसुविधा नेहमी व्यवस्थित सुरू आहेत की नाही याची माहिती गेल्या गेल्या घेणं व फोनवरूनही घेणं गरजेचं आहे. नाहीतर होते ना फसगत..
ग्राहक असूनही फसले जाण्याची वेळ आपल्यावर प्रवासात अनेकदा येत असते. याचा असाच एक अनुभव नागपूरहून मुंबईला येत असताना एकदा आम्हाला आला.
रेल्वेचा जेवणासाठीचा माणूस किती लोकांना जेवण हवंय याची यादी घेऊन गेला. आम्हीही आम्हाला जेवणाचा कोणता प्रकार हवाय हे त्याला सांगितलं. काही वेळाने जेवण वाटप झालं. इतर माणसं जेवायला लागली.
आमचे डिनर बॉक्स काही येईनात आणि तो यादी घेऊन जाणारा मनुष्यही फिरकेना. अखेर आम्हीच शोधाशोध करून त्याला पकडलं तेव्हा जेवण संपलंय असा साक्षात्कार त्यानं घडवला. भांडून उपयोग नव्हता.
एका स्टेशनवर रात्री अकरा वाजता जे काही मिळेल ते घेतलं आणि जेवलो. अर्थात त्याच्याकडून पैसेही परत घेतले. एका ठिकाणी रस्त्यावरचा प्रवास होता, ऐनवेळी सहल संयोजकाने जास्तीची माणसं कोंबली व माझी अवस्था खुराडयातील कोंबडीसारखी झाली. पुढचे चार तास मी दरवाजाला चिकटून आता बाहेर पडते की नंतर पडते अशा भीतीत प्रवास केला. वादावादी शक्य नव्हती. मला इच्छित स्थळी जायचंच होतं, त्यामुळे अत्यंत दाटीवाटीत बसण्याचा पर्याय स्वीकारावा लागला.
पर्यटन कंपनीकडून प्रवास व सहल करणार असाल तर आपल्याला हव्या त्या गोष्टी काळजीपूर्वक पाहाव्या लागतात, इथेही माझी एकदा घाईघाईत फसगत झाली होती. सर्वसाधारणत: जंगलांमध्ये फिरताना जिप्सीज वापरल्या जातात. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करताना मी वाहन काय आहे ते पाहिलं नाही आणि पर्यटन कंपनीने फिरण्यासाठी कॅन्टर वापरला.
ज्यांना जिप्सी आणि कॅन्टरच्या अनुभवातला फरक माहितेय त्यांना माझ्या म्हणण्याचा अर्थ बरोबर कळेल. शक्यतो कोणत्याही अभयारण्यात छत मोकळं असणा-या जिप्सीजमधून फिरावं त्यामुळे जंगल मोकळेपणाने वाचता येतं. तुम्हाला खाली उतरून भटकण्याची संधी मिळणार असेल तर त्यासारखी दुसरी गोष्ट नाही. पण कॅन्टरमधून फक्त नवख्यांनीच फिरावं.
असं नवख्यासारखं जंगल पाहण्याची वेळ माझ्याच चुकीमुळे माझ्यावर आली. पण काही वेळा तुमचा नाइलाजही होतो. एके ठिकाणी जाताना मला जेट एअरवेजचं शॉर्ट सीटर विमान मिळालं होतं. आणि त्यातही माझ्या वाटयाला आली ती सीट होती अगदी शेवटची, जिला पुढे लेग रेस्ट व मागे हेड रेस्टसाठी जागाच उपलब्ध नव्हती.
ही माहिती मला तिकीट बुकिंग करताना देण्यात आली नव्हती. पण सुदैवाने विमानात ब-याच जागा रिकाम्या होत्या व छोटंच विमान असल्यामुळे क्लासबिसचा काही प्रश्न नव्हता, त्यामुळे मला आरामात सीट बदलून मिळाली व प्रवास छान झाला.
नेहमीच वाईट अनुभव येतात, असं नाही तर कधीकधी चांगले देखील अनुभव असतात. एकदा पुण्याला जाताना आमची बस वाशीजवळ बंद पडली, त्यावेळी ड्रायव्हर व कंडक्टर यांची बस दुरुस्त होत नाही असं दिसल्यावर आमची दुस-या बसमध्ये सोय करून दिली. त्यांनी प्रवाशांना वा-यावर सोडलं नाही हे महत्त्वाचं.
अन्यथा आमच्यावर भांडण्याची वेळ आली असती. खरं तर तुम्ही स्वत: कशा प्रकारचे पर्यटक व व्यक्ती आहात यावर तुमचा प्रवास, सहल कशी होते हे बरेचसे अवलंबून असतं. चांगल्याचं वाईटात रूपांतर करणं हे अखेर आपल्याच हाती असतं.
तर अशा प्रकारच्या अनुभवांना तोंड देताना पर्यटकामधला ग्राहक देखील जागृत असावा लागतो. हल्ली खूप ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषं दाखवली जातात. त्यात नको असलेली स्थळं किंवा हॉटेल्स पण यादीत घातली जातात.
अशावेळी तुम्ही पर्यटकासोबत ग्राहकही आहात हे लक्षात ठेवा. घाईत किंवा काही वाक्यांचा अर्थ न कळल्यामुळे असे अनुभव आपल्याला प्रवासादरम्यान येत असतात. यात तुमची फसवणूक करणारा कोणीही असू शकतं, मग तो टूर एजंट असेल किंवा पर्यटन कंपनी किंवा रिसॉर्ट मालक. चुकीची सुरुवात आपल्याकडून होत नाही ना याचं भान बाळगावं आणि प्रवास आनंदाचा करावा.
Here is the link for published article- http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=8,952,756,2276&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/15032015/Mumbai/Suppl/Page4.jpg

तुम्ही कोण?


पर्यटक, मग तो हौशी वा नवखा असो किंवा अगदी दर आठवडयाला घराच्या बाहेर वीकेंड घालवणारा, प्रत्येकाची काही ना काही आवडनिवड असतेच. कुठे जायचं, काय पाहायचं हे सर्व ठरवूनच बहुतेक वेळा आपण प्रवासाला सुरुवात करत असतो. परंतु फिरण्यासाठी इतकी विविध आकर्षण असतात की अनेकदा काय पाहावं हेच कळत नाही. या सा-या गुंत्यातून अगदी पर्यटकालाही ‘कोहम’ असा प्रश्न पडतो.
टूर कंपन्यांसोबत जाऊन इथली-तिथली देवळं पाहणा-या भाविकांसाठी अख्खा जन्म अपुरा पडेल इतकी देवळं भारतात आहेत, असं मी कधीतरी गमतीने म्हणते.
अर्थात, यात कुठेही मस्करीचा भाग नाही; पण भारतातली मंदिरांची पुरातन स्थापत्यशैली व कोरीवकाम हे खरंच इतकी अप्रतिम व प्रेक्षणीय आहे की कोणत्याही प्रांतात जा, तिथली निदान १० प्रमुख देवळं तरी पाहण्यासारखी असतातच असतात.
तुमच्या सहलीत पाहण्याच्या प्रेक्षणीय स्थळांमधून काढून टाकता येणं अशक्य असं एखादं तरी देऊळ प्रत्येक प्रांतात असतंच. याचा अनुभव मला दक्षिणेत आला तसाच राजस्थानातही आला.
कितीही पाहायचं नाही म्हटलं तरीही इथली देवळं व राजवाडे, महाल यांची अत्यंत मनमोहक वास्तुशैली व कारागिरी ही आपल्याला त्यांच्याकडे खेचून नेतेच.
परंतु राजवाडे-महाल किंवा देवळं पाहणं ही माझी आवड नक्कीच नाही. मला शिल्पकला व वास्तुरचना यात काही विशेष असेल तर पाहायला आवडतं, मात्र फिरायला गेल्यावर उठसूट तेच पाहीन असंही नाही.
ही झाली माझी आवड. तर प्रत्येक पर्यटकाची स्वत:ची अशी काही खास आवडनिवड असते. ज्यात त्याला त्याच्या पसंतीची ठिकाणं पाहायला आवडतात. कोणाला जंगलं आवडतात तर कोणाला द-याखो-या, कोणाला सागरकिनारे आवडतात तर कोणाला ग्रामीण विभागात फेरफटका मारायला. शक्यतो स्वत:ला आवडेल त्या ठिकाणीच जाण्याचा पर्यटकांचा कल असतो. उदाहरणार्थ शिल्पकला पाहण्यात रुची असणारा पर्यटक हा तशाच ठिकाणी जाईल.
आपल्याला नेहमीच्या आयुष्यात न मिळू शकणा-या अशा गोष्टींकडे आपला प्रवास सतत सुरू असतो. हे केवळ दैनंदिन आयुष्यासाठीच नव्हे तर पर्यटनासाठीही लागू होतं. भारतात राहणारा पर्यटक सतत बारा महिने ऊन-घाम-गर्दी याला तोंड देत असतो.
मग त्याला युरोप-अमेरिकेसारख्या थंड हवेच्या प्रदेशांची भुरळ पडते. तिथे घालवलेले दिवस मोजकेच असले तरी ते त्याच्यासाठी अविस्मरणीय होतात. अशा प्रकारे आपल्या भोवतालच्या परिस्थितीवरही आपली फिरण्याची आवड ठरत असते.
तशीच ती स्वभावावरही अवलंबून असते. साहसी वृत्तीचा असलेला पर्यटक त्याला पॅराग्लायिडग, स्कुबा डायिव्हग, बंजी जंपिग, सी-ग्लायिडग असे काही साहसी, रोमांचक खेळ खेळायला मिळतील अशा ठिकाणांना प्राधान्य देतो. निसर्गप्रेमाची व वन्यजीवनाची आवड असल्यामुळे माझ्या यादीत जंगल जवळपास असलेली स्थळं भरपूर असतात.
मात्र हे झालं सर्व वैयक्तिक. आपण बरेचदा टूर कंपन्यांसोबतही फिरायला जात असतो. काही वेळा तो प्रदेश आपल्याला अनोळखी असतो. तेव्हा मात्र टूर एजंट व गाईड सांगेल ती स्थळं आपल्याला पाहावी लागतात. त्याला नाइलाज असतो. हे स्थलदर्शन आपल्या हातात नसतं, त्यामुळे इच्छा नसेल तरीही आपल्याला त्या ठिकाणी जावंच लागतं.
मी भारतातली बरीचशी देवळं याचमुळे पाहिलेली आहेत. अर्थात ग्रुपसोबत गेल्यामुळे ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही. असो. परंतु आता पूर्वीसारखे टिपिकल थंड हवेची स्थळं, धबधबे वगरे पाहणारे पर्यटक राहिलेले नाहीत. त्यांच्याही आवडी, मागण्या बदलत चालल्या आहेत. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांसमोर नवी पर्यटन स्थळं शोधून काढण्याचं आव्हान समोर उभं राहिलेलं आहे.
अशीच एक नवी टूम निघाली आहे ती युद्धग्रस्त किंवा तणावग्रस्त भागांना भेट देण्याची. जर्मनी, रशिया, जपान वगरे देशात जाऊन जागतिक महायुद्धांचे अवशेष व स्मारकं पाहण्याची आजही लोकांना आवड आहेच.
मात्र नव्या पिढीने यात अजूनच भर घातलीय. इस्रयल, काबूल, अफगाणिस्तान, इजिप्त वगरेसारख्या ठिकाणी जाऊन तिथलं जनजीवन, संस्कृती आदी पाहण्यात हल्ली लोकांना रस निर्माण झाला आहे.
जागतिक घडामोडींचे पडसाद आपल्या वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, मासिकं इत्यादी माध्यमातून उमटत असतात. याचं अत्यंत रंजक पद्धतीनं वर्णन व चित्रण केलं जातं. त्यामुळे तिथल्या लोकांबाबत जगातील नागरिकांना सहानुभूती निर्माण तर होतेच, शिवाय त्यांना जाऊन एकदा प्रत्यक्ष पाहावं किंवा भेटावं असंही ब-याच जणांना वाटत असतं.
मात्र अशा तणावग्रस्त भागात एकटयाने फिरू शकणारे धाडसी पर्यटक फार कमी असतात. सर्वामध्येच एवढे धाडस नसते. अशांसाठी मग आता टूर कंपन्यांनीच पॅकेजेस जाहीर केलेली आहेत. अगदी आपलं काश्मीरही यात येतंच की.
कारण आपल्यासाठी ती एक सर्वसाधारण सहल असली तरी भारताबाहेरून येणा-या पर्यटकासाठी ती निश्चितच एक साहसी सहल असते. कारण त्याने टीव्हीवर काश्मीरसंबंधीचं वृत्तांकन पाहिलेलं असते, त्यासंबंधी वाचलेले असते.
असाच एक प्रकार देशाच्या टोकाच्या सीमाभागात जाण्या-या पर्यटकांचा असतो. कोणत्याही देशाच्या अशा शेवटच्या सीमाभागात फिरणं हे इतर पर्यटनस्थळी फिरण्यापेक्षा थोडं जास्त जोखमीचं असतं.
कारण आज अनेक देशांमध्ये प्रांतीय, धार्मिक वाद सुरू आहेत. अशा ठिकाणी तणाव असण्याची शक्यता बरेचदा असते. त्यामुळे देशाच्या सीमाभागात जाऊन प्रत्यक्ष सीमा पाहता आल्या तर नक्कीच ते पर्यटकांना आवडतं.
आता त्यासाठी वाघा बॉर्डरला जाणारे लाखो पर्यटक आपल्याकडे आहेत. पण तो झाला संरक्षित व जनतेला पाहण्यासाठी कायदेशीररित्या खुला असलेला सीमाभाग. परंतु अनेकांना इंफाळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, प. बंगाल, काश्मीर इत्यादी भागात जाऊन तिथल्या सीमेनजीकच्या गावांनाही भेट द्यायला आवडतं.
तिथे जाऊन सीमा पाहणं हा अर्थातच एक पूर्णपणे वेगळा अनुभव असतो. त्यात तुमच्यासोबत जाणकार व्यक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे, शिवाय विशेष परवानगीही लागते. अन्यथा नुसताच निरुद्देश इकडे-तिकडे पाहत फिरणारा पर्यटक घुसखोर म्हणून मारला जाऊ शकतो.
तर अशा प्रकारे पर्यटकांच्या यादीमध्ये काही वेगळीच पर्यटनस्थळं असू शकतात. अशा ठिकाणी एकदा तरी जायला मिळावं यासाठी जातीचा पर्यटक कसोशीचे प्रयत्न करत असतो.
मात्र नेहमीच आपल्या आवडीचे पाहायला मिळेलच असं नाही. तेव्हा आजूबाजूला दिसणा-या गोष्टींमध्येही खूप काही सापडतं. एखादं ठिकाण तुमच्या खास पसंतीस उतरलं नसेल तर तिथे थीम फोटोग्राफी करा.
कोणत्याही ठिकाणी निसर्ग हा आपल्यासोबत असतोच. त्यातल्या थीम्स शोधा. परिसरातील लोकांमध्ये, इतर जीवनामध्ये थीम शोधा. त्यानेही समाधान होत नसेल तर तिथलं लोकजीवन पाहा, तिथली गाणी ऐका, लोकांशी बोला, स्थानिक खाद्यपदार्थ चाखा, चालीरितींची माहिती करून घ्या. स्थानिक वाहनांमधून प्रवास करा. तिथली भाषा अवगत करण्याचा प्रयत्न करा.
तिथं एखादी स्थानिक वस्तू छोटयाशा दुकानात जाऊन खरेदी करा. यातून तो प्रदेश तुम्हाला समजत जातो. कोणत्याही शहराची-गावाची माहिती घ्यायची म्हणजे इंटरनेट किंवा पुस्तक, नकाशे उघडून पाठ करायचं असं नाही तर तिथं प्रत्यक्षात गेल्यावर जे दिसतेय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.
यामुळे तुम्ही पर्यटक म्हणून समृद्ध व्हाल. कदाचित मग पुढल्या वेळी तुम्ही अमुकच एका ठिकाणीच मी जाईन म्हणून हट्ट धरणार नाही. एकदा का पर्यटक म्हणून अनुभवसंपन्न झालात की ‘वसुधव कुटुंबकम’चा प्रत्यय तुम्हाला जरुर येईल.
Here is the link for published article- http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=6,1406,1462,2266&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/22032015/Mumbai/Suppl/Page4.jpg

Thursday, April 23, 2015

बाव-या मनासाठी


कोणत्याही प्रवासात असताना नेहमीच एक प्रश्न पडतो किंबहुना तो पडलाच पाहिजे की, आपण इथे का आलो आहोत? हा प्रश्न किंवा इतरही काही प्रश्न तुम्हाला प्रवासात पडत असतील तर तुमचा आत्मसंवाद सुरू आहे समजा. तो सुरू असेल तर तुम्ही निव्वळ पर्यटक असण्याच्या पुढच्या पायरीवर पोहोचता.
इयरफोनमधून सुरू असणा-या रेडिओची खरखर वाढत जाते, निवेदिकेचा आवाज कापरा होत होत हळूहळू बंदच होतो, कानातला विरंगुळा संपलाय म्हटल्यावर नजरेला तरी काही सापडतंय का ते पाहायला आपण बाहेर पाहू लागतो. झरझर बाहेर दिसणारं सर्वकाही आपल्याशी छत्तीसचा आकडा धरून उलटं पळत जातं, स्थिर वस्तूही हलत असल्याचा भास होऊ लागतो, नजर कुठे टिकवून राहताच येत नाही.
एखाद्या घराच्या भिंतीवर काय लिहिलंय वाचू म्हटलं तरी अक्षरं भिंतीवरून उडी मारून गायब होतात आणि गाडीला वेग आल्याचं एकदा मनाला पटल्यावर आपण आपलं हलतं डोकं आणि डोळे यांना नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करू लागतो. सिमेंटच्या घरांचे ठोकळे मागे पडत जातात, अधूनमधून दिसणारे शेतीचे कोवळे लुसलुशीत तुकडेही विरळ होत जातात, मोकळी जमीन सुरू होते.
विस्तीर्ण जमीन, नदी, जमिनीसोबत धावणारं आकाश, झाडं, माळरानं, घाट, द-या, डोंगररांगा, कपारी, वळणांचे रस्ते, असा सारा प्रदेश सुरू होतो आणि आपली काही काळापुरती सगळ्या शहरी जगापासून सुटका होते. मोबाईलवर रेंज येतेय का याची दहावेळा चाचपणी केली जाते. अखेर त्याचा उपयोग निदान फोटोसाठी तरी करू असं म्हणून आपण बाहेरच्या दृश्यात मन रमवतो.
इतकं शांत राहायची सवय नसते ना आपल्याला, मग मन ‘चाळ’करी होऊ लागतं. कोणीतरी मुद्दामहून दूर लोटल्यागत आपण अस्वस्थ होत असतो. (इथं प्रवासात निवांत झोप येणारे सुदैवी). काय हवं असतं, काय करावं हे कळत नसतं. सहप्रवाशांशी बोलून झालेलं असतं, खाऊनपिऊनही झालेलं असतं, मोबाईलमधली नेहमीचीच गाणी ऐकण्यात आता रस उरलेला नसतो, हातातल्या पुस्तकापेक्षा बाहेरचा अनोळखी प्रदेश खुणावत असतो.
आपलं मन एक्झिट झोनमध्ये शिरलेलं असतं. प्रवासातली ही अवस्था अटळ असते, मग तुम्ही कुठेही असा, जहाजात, विमानात, रेल्वेत किंवा चारचाकी वाहनात. ही अस्वस्थता नसते, तर ती सुरुवात असते. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून तुम्ही नवं काही शोधायला, पाहायला, स्वीकारायला, जाणून घ्यायला, अनुभवायला बाहेर पडलेले असता. पुढे काय होणार याची पुरेशी माहिती नसते. तरीही छान वाटत असतं. त्या छान वाटण्याचीच ही सुरुवात असते.
मनाला घट्ट चिकटलेले विविध प्रकारच्या संवादांचे तुकडे वा-यासोबत बाहेर पडून उडून जातात. हे संवाद कोणाकोणाशी, कोणकोणत्या भावनांनी झालेले असतात. जसे ते दूर जातात, आपल्याला हलकं वाटू लागतं. सर्व ओझी डोक्यावरून बाजूला काढून ठेवल्यासारखी वाटतात.
एव्हाना मोबाईल बंद असला तरी त्याची गरज आहे असं वाटणं एकदमच कमी झालेलं असतं. खरं तर आपल्या गरजा अशा कमीच कशा राहतील असा नवाच विचार येऊ लागतो. गरजांसोबत त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी माणसं व त्या अनुषंगाने येणारे संवाद व इतर गोष्टीही कमी करता येतील का याचा विचार सुरू होतो. वाहनातून एकीकडे प्रवास सुरू असतो आणि मनातल्या विचारांनीही वेग घेतलेला असतो.
सुदैवच म्हणायचं की आपल्या जबाबदा-या, चिंता, काळज्या, विवंचना, अडचणी यांना व्यक्तीस्वरूप नाही, नाहीतर बाहेर जाताना त्यांनाही बांधून घेऊन जाणं भाग पडलं असतं! आपला आपल्याशी संवाद सुरू झालेला असतो, खूप वेगळं वाटत असतं; पण समाधानही वाटत असतं. प्रवासाला बाहेर पडण्याचा आपला निर्णय योग्यच होता हे मनाला सांगितल्यावर तेही सुखावत असतं.
सुंदरबनमधल्या एका नीरव रात्री माझ्या मनाने मला असंच सांगितलं होतं. ब्रह्मपुत्रा आणि गंगेच्या त्या विस्तीर्ण पात्रात (समुद्रच तो, कारण इथं मच्छीमारांच्या बोटी बरेचदा भरकटतात!) अतिशय संथ पाण्यात बोटीच्या डेकवर एकटयानेच चांदण्याखाली आरामात झोपले होते, रात्रीचे दोन वाजले होते बहुदा.
किती का वाजलेले असेनात, अशा नितळ शांततेत तुम्हाला भान राहत नाही. हो, एवढी गूढरम्य शांतताही आपल्याला गुंगवून टाकू शकते. मग कधी भासही होतात. अशावेळी मनावरचा हक्कसोडून देण्यासाठी देखील खूप पराकाष्ठेचे प्रयत्न करावे लागतात. तरच त्या क्षणाशी आपण एकरूप होऊ शकतो. आम्ही गावांपासून, किनाऱ्यांपासून चांगलेच दूर आलो होतो. त्यामुळे तिथले आवाजही नव्हते.
यापेक्षा अप्रतिम जगात काही नसावं असं त्याक्षणी मला वाटलं. ही भावना तुम्हालासुद्धा अनुभवता येऊ शकते किंवा तुम्ही अनुभवली देखील असेल. असं म्हणतात की प्रवासाचं कधी ध्येय ठेवू नये, जे दिसतंय ते मनात उमटवत जावं, साठवून घ्यावं. त्यामुळे मी ब-याच ठिकाणी असे क्षण अनुभवले आहेत. त्यात कॉब्रेटमधला रामगंगेचा काठ होता, दांडेलीमधलं जंगल व प्राचीन वृक्षराजीत लपून गेलेली दरी होती, धरमशालेतलं त्रियुंडचं पठार होतं, अशा काही जागा होत्या, जिथे मी माझं मन सोडून आले.
आपण प्रवासाला बाहेर का पडतो तर आपल्याला रोजच्या रहाटगाडग्यातून विरंगुळा हवा असतो, विश्रांतीचे चार क्षण पाहिजे असतात. शरीराला आरामाची आवश्यकता असते, त्याहूनही जास्त ती मनाला असते. याच मनावर, मेंदूवर आपण कारण-अकारण अनेक ओझी रोज रोज चढवत असतो.
हीच ओझी, बंधनं उतरवून टाकण्यासाठी प्रवास हे एक अतिशय योग्य निमित्त असतं. त्यातून तुम्हाला एकटयाने असे काही क्षण काही घालवत, स्वत:शी संवाद करायची संधी मिळाली तर मग काय..दुधात साखरच जणू ! तुमच्या आवडीचं शहर, गाव, ठिकाण कोणतंही असू देत, मग ते पठार असू देत, किल्ला असू देत, सागरकिनारा असू देत किंवा डोंगर असू देत, तुम्हाला निर्विकार होता येईल अशी एखादी जागा नक्कीच तिथे असेल.
त्यासाठी खूप लांबच, एकांतात गेलं पाहिजे असं नाही. एखाद्या छानशा नदीकाठी बसूनदेखील तुम्ही हा संवाद सुरू करू शकता. ज्यांना प्रवासाची आवड आहे, कंटाळा येत नाही अशांसाठी प्रवासासारखा दुसरा गुरू नाही. मग तुमच्या पायाखालची जमीनच तुमचं गुरुकुल बनतं. तुमची नेहमीचीच नजर, तीही चौकटीतून बाहेर पडते.
निर्बुद्धासारखे एका चाकोरीत धावणारे आपण, प्रवासात असताना तृषार्त होऊन फिरतो. आपल्याभवतीचं जग हे असं आहे याची नव्याने जाणीव होऊ लागते. आत्मसंवाद झाल्याने आयुष्यात काय हवं आहे, काय नको, काय चुकतंय, आपली दिशा कोणती याचं भान येऊ लागतं. खरं तर प्रवास हे केवळ निमित्त असतं, पण पायाखालची वाट सोडल्याशिवाय काही उत्तरं मिळत नसतात. तेव्हा तुम्हीही शोधा असंच एखादं निमित्त !
Here is the link for published article  http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=12,1402,1466,2260&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/29032015/Mumbai/Suppl/Page4.jpg

सहप्रवासी


प्रवासाची खरी गंमत येते ती सहप्रवाशांसोबत. मग ते अनोळखी असोत किंवा ओळखीचे. थोडय़ाच काळासाठी आपले अनुभव, आपली सुख-दु:खं त्यांच्यासोबत वाटून घेताना आपण त्यांच्याशी दीर्घकाळाचं नातंच जणू जोडत असतो.
आपल्याकडे एक जुनी म्हण आहे की ‘केल्याने देशाटन, मनुजा येतसे शहाणपण’, अर्थात ही संस्कृत आधारित म्हण आहे. तिचा अर्थ असा की अगदी प्राचीन काळापासून प्रवासाचं, त्यातून मिळणा-या ज्ञानाचं महत्त्व आपल्या पूर्वजांनाही माहीत होतं. त्या काळी अनेक साधू-तपस्वी हे एकतर एकटयाने भ्रमणाला बाहेर पडत किंवा त्यांच्यासोबत त्यांचा शिष्यगण असे.
इतिहासाची पानं उलटली तर अनेक संशोधक हे असे फिरस्ते असल्यामुळेच त्यांना देशोदेशींची माहिती मिळालेली दिसते. इब्न बतुता, हुआंग झँग, असे काही विदेशी फिरस्ते तथा पंडित त्याकाळी भारतात येऊन गेले, देशोदेशी फिरले.
देशोदेशीचं नवल पाहणं हीच यांची मोठी कामगिरी असे. मग हे ज्ञान पुस्तक लिहून किंवा मौखिक गोष्टी सांगून लोकांना दिलं जात असे.
आजकाल हे काम इंटरनेट करतं. लोक प्रवासाला जाऊन येतात आणि मग त्याबद्दलच्या कित्येक गोष्टी आपल्या सग्यासोबत्यांना सांगण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. अशा तऱ्हेने आजकाल प्रत्येकच जण इब्न बतुता झालेला आहे. प्रवासाला बाहेर पडण्याचं प्रत्येकाकडे वेगवेगळे निमित्त असते.
कोणी चंदरतालला ट्रेकिंग करायला जातं तर कोणी रंगनथिट्ट पक्षी अभयारण्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी जातं, कधी कोणाला बोधगयाला जाऊन भगवान गौतम बुद्धांना ज्या झाडाखाली आत्मज्ञान मिळालं तो बोधी वृक्ष पाहण्याची उत्सुकता असते तर कोणाला महाबलीपुरमच्या मंदिरावरील अद्भुत शिल्पकला पाहायची असते. मात्र हे प्रवासाचं ध्येय निरनिराळं असलं तरी आपल्याला सतत भेटत राहतात ती माणसं.
विविध रंग, रूप, स्वभाव, भाषा यांचं मिश्रण घेऊन ही माणसं आपल्याला भेटतात आणि आपला प्रवास रंगतदार बनवतात. हाच तर कोणत्याही प्रवासाचा यूएसपी असतो. किंबहुना अशा व्यक्ती आणि वल्ली भेटल्याशिवाय प्रवासाची मजाच येत नाही. म्हणून तर कुठेही प्रवास करताना आपण सहप्रवासी कोण आहेत हे आधी पाहत असतो.
ते चांगले असतील तर पुढे सहप्रवाशांमुळे वेळ चांगला जाणार हे समजून आपला मूडही छान होतो. सहप्रवाशांशी ओळख होण्यासाठी वेळ लागत नाही. त्यासाठी अगदी लहानसं निमित्तही पुरतं. अशीच एकदा विमानतळावर मला एक गृहिणी भेटली, तिचा हा पहिलाच विमान प्रवास होता. त्यामुळे विमानात आपापली सीट कशी शोधायची हे तिला माहीत नव्हते  (हे अर्थातच पहिल्या विमान प्रवासात मलाही माहीत नव्हतं) तेव्हा मी तिला मदत केली आणि आमची ओळख झाली. अनेकदा एकटयाने प्रवास करताना सहप्रवासी वयस्कर असतील तर ते माझ्याकडे सहानुभूतीनेच पाहतात. मी एकटीच अमुक एका ठिकाणापर्यंत कशी जाणार याची त्यांना काळजी वाटते.
तेव्हा मला गंमत वाटते व छानही वाटते. कधीकधी तर घरी यायचे आमंत्रणही मिळते एवढी छान ओळख होऊन जाते. अशाच एका विमान प्रवासात माझ्या शेजारी सुतारकामासाठी बाळगतात तशी कंतानची पिशवी घेऊन आलेला एक कामगार येऊन बसला.
खूपच साध्या कपडयातला असा तो माणूस होता. सोबत त्याचे काही सहकारी देखील होते. त्यांना कुठे बसावं हे कळत नव्हतं म्हणून ते थोडे भांबावले. मी त्यांना त्यांच्या सीट्स दाखवल्या. पण माझ्या मनातील कुतूहल शमत नव्हते.  ही साधी माणसं विमानाने कुठे जात असावीत असा प्रश्न माझ्या मनात आला. कारण अजूनही खूप निकड असल्याखेरीज आपण मध्यमवर्गीय विमानासारख्या महागडया प्रवासावर पैसे खर्च करत नाही, तेव्हा ही श्रमिक माणसं विमानातून कुठे व का चालली आहेत हे मला जाणून घ्यायचं होतं.
माझ्या शेजारी बसलेल्या कामगाराला विचारल्यावर त्याने सांगितलं की एका बडया कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट दुस-या शहरात सुरू होता व तिथे त्यांना तात्काळ या माणसांची गरज होती त्यामुळे कंपनीने हा प्रवासखर्च केला होता.
काही का असेना, त्या निमित्ताने विमानप्रवास करण्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. असंच लक्षात राहिलेले एक जोडपे भेटले रामनगरला जाताना. तिथं जिम कॉब्रेट नॅशनल पार्क आहे. दिल्लीहून आम्ही रामनगरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसलो. यातली पत्नी ही अँग्लोइंडियन होती तर पती अमेरिकन. हे दोघेही काबूल युनिव्हर्सटिीमध्ये कामाला होते.
मुलांना घेऊन ते तिच्या माहेरी शिवपुरीला चालले होते. त्यांच्याकडून अफगाणिस्तान व काबूलमधल्या ब-याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. मी पत्रकार असल्याचं कळल्यावर त्यांची उत्सुकता अधिकच वाढली. मग नेहमीप्रमाणे गप्पा सुरू झाल्या. गाडी तीन तास उशिरा रामनगरला पोहोचली, मात्र त्यांच्या सहवासामुळे ते दु:ख थोडं कमी झालं.
अशी खूप मंडळी आपल्याला प्रवासात भेटत असतात. विशेष म्हणजे एखाद्या परक्या ठिकाणी भेटणारी ही मंडळी आपल्या गावातूनच आलेली असली तर त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो. अर्थात हे सर्व आपल्या मनोव्यापारांशी निगडित आहे, अन्यथा आपल्या गावातली तरीही अनोळखी माणसं एखाद्या परक्या प्रदेशात भेटल्यावर आपल्याला का आनंद व्हावा हा प्रश्नच आहे.
परंतु प्राचीन काळात गटागटाने फिरणा-या आदीमानवाला त्याच्या गटातील माणसांबरोबर जी सुरक्षिततेची भावना वाटत असावी, तीच या आनंदापाठी असावी असं वाटतं. एकदा का आपला आनंद या अनोळखी मंडळींसोबत आपण शेअर केला की ती आपलीच माणसं होऊन जातात.
ही देखील समूहनिर्मितीचीच एक प्रक्रिया आहे. असाच आनंद मला व माझ्या वहिनीला, नागरहोलेच्या जंगलात फिरताना आमच्या विभागात राहणारी मंडळी भेटल्यावर झाला होता. मग गप्पांची, खाण्यापिण्याची देवाणघेवाण झाली. जंगलात फिरण्याचा आनंद द्विगुणित झाला. मात्र प्रत्येकच वेळी असा अनुभव येतो असं नाही. माणसं वेगवेगळ्या प्रकारची असतात.
कोहिमाजवळच्या किसामा गावात हॉर्नबिल फेस्टिव्हलमध्ये फिरताना अचानक माझ्या समोर िहदीमिश्रित मराठीत बोलणारी मंडळी आली. मी उत्सुकतेने त्यांची चौकशी केली, तर ही माणसं मुंबईहूनच आली होती. पण त्यांनी पुढे बातचीत करण्यात काही स्वारस्य दाखवलं नाही.
धागा न जोडताच तो तोडून ही माणसं गर्दीत मिसळून गेली. पण माझ्यासोबत काही स्थानिक माणसं होती, त्यांच्यामुळे मुंबईच्या माणसांनी पाठ फिरवल्याचं काहीच वाटलं नाही. अशा निरुत्साही लोकांमुळे आपण आपल्या आनंदाला कधीच दूर करू नये.
ही प्रवास आणि आयुष्यातली एक समानता आहे, कितीही वाईट अनुभवांनी आपलं जीवन झाकोळलं गेलं तरी त्यांना विसरून जाऊन आपण पुढे चालत राहावं. नाहीतर जीवनातील ख-या आनंदाला आपण पारखे होतो. त्याचप्रमाणे सहप्रवासी कसेही असोत, आपला प्रवास कसा छान होईल हे आपण पाहावं.
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=4,1508,1456,2258&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/05042015/Mumbai/Suppl/Page4.jpg