आसामच्या छोट्या निसर्गरम्य
खेड्यांनी वेढलेलं काझीरंगा.. नजर जाईल तिथपर्यंत भातशेती व एलिफंट
ग्रास (हत्तीगवत) पसरलेलं. मध्येच नजरेला विसावा देण्यासाठी चहाचे मळे व दूरवर
दिसणा-या कार्बी अँगलॉँगच्या डोंगररांगा. या खेड्यांमधून जाता जाता काझीरंगाचं अरण्य नेमकं कधी सुरू होतं ते कळत नाही
पण शेतांमध्ये राबणा-या माणसांमध्ये अचानक गेंडे व हत्ती दिसायला लागले की समजायचं
काझीरंगात आलोयत. गेली कित्येक वर्ष आसाम
म्हटलं की इथे मानस
अभयारण्य , पवित्रा
अभयारण्य असूनही सर्वाधिक उल्लेख होतो तो फक्त काझीरंगाचाच. आसामच्या
पर्यटन विकासात अत्यंत महत्त्वाचं स्थान असणारं व युनेस्कोनं एकशिंगी गेंडय़ांसाठी
जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेलं काझीरंगा नॅशनल पार्क हे वन्यजीव अभ्यासक व
पर्यटक दोघांसाठीही अफाट खजिन्यासारखं आहे.
कधीतरी असे क्षण येतात जेव्हा आपण
खूप काळ एखाद्या गोष्टीसाठी थांबलेलो असतो, ती गोष्ट अगदी एका झटक्यात होऊन जाते. जंगलाचं
पानदेखील गेल्या दोन वर्षात न पाहिलेली मी, एखाद्या नशेखोर
माणसासारखी जंगलातल्या मातीमधून व पात्यांमधून येणारा तो अनोखा गंध श्वासामध्ये
मुरवून घेण्यासाठी वाट पाहत होते. जंगलात मुद्दामहून वाट चुकायला जाणारा शहरी
मनुष्य सहसा पश्चाताप करत नाही. माझ्यासारख्या अनेक भटक्या लोकांना हे पटत असेल.
त्यामुळे संधी मिळताच या वेळी दुसरी-तिसरीकडे न जाता थेट आसाममधल्या काझीरंगाचा रस्ता
पकडायचा हे मनाशी ठरवलेलं होतंच. त्यामुळे अनपेक्षित संधी मिळताच मी कोहरा या
काझीरंगामधल्या गावात उतरले होते. हातात कोणतंही बुकिंग वगैरे नव्हतं. पण असं सर्व
करायला लागलं की एक बरं होतं की आपली वाट आपणच आखतो व झापडबंद घोडय़ासारखे
ठरवलेल्या मार्गावरूनच जात नाही. भटकंतीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तो असाच येतो.
अगदी गोहाटीपासून कोहरापर्यंत येण्यासाठी बसचं तिकीटही माझ्याकडे नव्हतं. ते मी
आदल्या रात्री नऊ वाजता गोहाटीतल्या लॉजच्या नोकराला मदतीला घेऊन आसाम परिवहनच्या
बस स्टँडवर जाऊन बुक केलं होतं. ही सकाळी नऊ वाजता गोहाटीवरून सुटलेली बस नॉनस्टॉप
(एकच स्टॉप तोही पंधरा मिनिटांचा, नागाव गावात घेऊन) पाच
तासांनी कोहरामध्ये पोहोचली होती. सुदैवाने मित्राचं बीबीसीसाठी शूट सुरू होतं,
त्यांची टीम माझ्यासाठी वाटच पाहत होती. त्यांच्यामुळे अर्थातच
काझीरंगा अधिक वेगळ्या बाजूंनी पाहण्याची संधी मिळाली. पण एक आहे की, जंगलात तुम्ही कितीही फिरलात तरी जंगल कधीही पूर्णपणे वाचता येत नाही.
असल्या चार-पाच दिवसांच्या फे-यांमध्ये तर मुळीच नाही. पण शहरात राहून उबगलेल्या
मनाला थोडा तजेला मिळवून देण्यासाठी एवढा मुक्काम पुरेसा होतो. तसं अनेकदा
काझीरंगाचं जंगल ब्रह्यपुत्रेच्या पुरात बुडून गेलेलं टीव्हीवरील दृश्यांमध्ये
पाहिलेलं. पुराच्या पाण्यात पोहण्याचा व जीव वाचवण्याचा निकराचा प्रयत्न करणारे
प्राणी पाहून जीव गलबलून यायचा. त्या दृश्यांवरूनच काझीरंगाचा विस्तार किती अफाट
आहे याची कल्पना आली होती. आणि आता तर प्रत्यक्ष तिथेच उभे होते. तिथल्या आदिम
रहिवाशांची नजरभेट होईल या उत्सुकतेने.
काझीरंगा ४७० चौरस किलोमीटर इतकं पसरलेलं आहे. भारतीय वन्यजीवांतील
बिग फाइव्हपैकी चार म्हणजे हत्ती, वाघ, बिबटय़ा व गेंडा हे
काझीरंगात आढळतात. तसं म्हटलं तर काझीरंगा ज्यांच्यासाठी ओळखलं जातं त्या
गेंडय़ांचं दर्शन बागुरी रेंजमधील गावांपासूनच सुरू होतं. कोहराला पोहोचण्याआधी
लागते ती बुरापहार व बागुरीची रेंज. त्याच वाटेवर बाजूला जाणारी आगरतोलाची रेंजपण
आहे. बागुरी गाव काझीरंगाच्या चार रेंजेसपैकी एक. काझीरंगा चार रेंजमध्ये विभागलेलं
आहे. आगरतोली, बुरापहार, कोहरा व
बागुरी. यापैकी बुरापहारमध्ये होणा-या चोरटय़ा शिकांरीमुळे त्याची थोडी दुष्किर्ती
झाली आहे व अजूनही इथं अशा शिकारी होतच असतात. त्यामुळे पर्यटकांना शक्यतो ही रेंज
मनमोकळेपणे पाहता येत नाही. इथल्या चोरटय़ा शिकारीला आळा बसावा म्हणूनच खरं तर ही
रेंज काझीरंगा अरण्यात वाढवण्यात आली. पण परिणाम उलटाच झाला. गावातल्या लोकांमध्ये
फारसा उत्साह नसल्यामुळे इथं पर्यटक फारसे जात नाहीत. शिवाय सेंट्रलचा विस्तारच
एवढा मोठा आहे की हौशी पर्यटकांची भूक भागवण्यासाठी सेंट्रलची रेंज पुरेशी होते.


काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ३७ काझीरंगातून जातो. त्यापैकी वेळ वाचवणारे मार्ग म्हणजे
विमानाने थेट गोहाटी किंवा जोरहाट किंवा तेझपूपर्यंत जायचं. अन्यथा रेल्वेने तिथं
पोहोचायचं. तिथून बसने कोहरापर्यंत यायचं. तेझपूर किंवा जोरहाटपासून बसने
काझीरंगापर्यंत पोहोचायचं असेल तर किमान तीन ते चार तास लागतात. थेट गोहाटीवरून
कोहराला जाण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. किमान वेळ देण्याचं कारण म्हणजे केवळ
आसामच नाही तर पूर्ण पूर्वाचलातच रस्त्यांची कामं सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही
ठिकाणी पोहोचण्याची निश्चित वेळ देता येत नाही. कोहरा, बागुरी व आगरतोली रेंजमध्ये फॉरेस्टची रेंज ऑफिसेस आहेत. तिथं जीप व
गाइडचं बुकिंग करता येतं. शिवाय आसाम पर्यटन खात्यातील माणसं खूप कार्यतत्पर आहेत.
तिथल्या कोणत्याही फोन नंबरवर फोन केल्यास एका फोनवरच तुम्हाला सर्व माहिती मिळते
व तुमची सर्व सोय होऊ शकते.
काझीरंगात
राहण्याची सोय
काझीरंगाला यायचं म्हणजे कोहरा गावात उतरायचं. कोहराच्या आसपास बरीच गेस्ट हाउसेस व रिसॉर्टस आहेत. वनखात्याचीही तीन रेस्ट हाउसेस पर्यटकांसाठी उपलब्ध असतात. त्यांचं बुकिंग खूप आधी करावं लागतं. ते नाहीच मिळालं तर वाइल्ड ग्रास रिसॉर्ट, आयोरा रिसॉर्ट, इकोरा गेस्ट हाउस ,-हायनो गेस्ट हाउस व इतरही काही पर्याय आहेत. यांचे दर दिवसाला माणशी नऊशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत.
काझीरंगाला यायचं म्हणजे कोहरा गावात उतरायचं. कोहराच्या आसपास बरीच गेस्ट हाउसेस व रिसॉर्टस आहेत. वनखात्याचीही तीन रेस्ट हाउसेस पर्यटकांसाठी उपलब्ध असतात. त्यांचं बुकिंग खूप आधी करावं लागतं. ते नाहीच मिळालं तर वाइल्ड ग्रास रिसॉर्ट, आयोरा रिसॉर्ट, इकोरा गेस्ट हाउस ,-हायनो गेस्ट हाउस व इतरही काही पर्याय आहेत. यांचे दर दिवसाला माणशी नऊशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत.

काझीरंगा अरण्य पाहताना हत्तीवरल्या सफारीचा अनुभव जरूर घेण्यासारखा आहे. भारतातील इतर जंगलांमध्ये (उत्तरांचलचं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क सोडल्यास) हत्तीवरून दाट गवताळ जंगलात फिरण्याची अशी मजा येत नाही. शिवाय हत्तीवर असल्यामुळे दाट गवतात लपलेले प्राणी हुडकून पाहता येतात. काझीरंगात पहाटे पाचपासून ते सहा वाजेपर्यंत ही सफारी मिळते. त्याचा दर माणशी ५७५ रुपये आहे. हत्तीवर तिघांना बसावं लागतं. पण एकटय़ालाच बसून फिरायचं असल्यास तसंही बुकिंग करता येतं, मात्र ते पर्यटकांच्या संख्येवर अवलंबून असतं. सेंट्रल रेंजमध्ये सध्या आठ-दहा पाळीव हत्ती आहेत.
This article is published in Marathi news daily 'Prahaar' on 5th January, 2014. here is the link- http://prahaar.in/collag/171624