Translate

Showing posts with label jungle. Show all posts
Showing posts with label jungle. Show all posts

Wednesday, May 6, 2015

वेळ चुकवून पाहा..


बारा वर्ष, बारा महिने वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा संकल्प सोडा; पण एका अटीवर. कोणत्याही निश्चित वेळी एखाद्या ठिकाणी ठरवून जायचं नाही. शक्यतो वेळ चुकवायचीच. अनेकदा वेळ चुकल्याने तुमच्या अनुभवांना वेगळीच खोली मिळून जाते. काही अविस्मरणीय अनुभव येतात.
मी मागे म्हटलं होतं की ऋतुचक्राशी किंवा घडय़ाळाशी स्वत:ला बांधून घेऊ नका. अमुक वेळीच अमुक ठिकाणी जाईन असं म्हटलंत तर तुम्हाला जे दिसेल ते कदाचित घरातल्या फ्लॅट स्क्रीन टीव्हीएवढाच आनंद देणारं असेल. भटकायलाच जायचं असेल तर कोणत्याही ठिकाणी जायचा शिरस्ता पाळू नका. कुलूमनालीला मे महिन्यातच जाल तर इतर महिन्यांत तिथलं सौंदर्य थोडी कमी होतं? जसं दिवस उजाडल्यावर पक्षीनिरीक्षण कठीण असतं. पक्षी पाहायचे असतील, त्यांचं गाणं ऐकायचं असेल तर पहाटेसारखी अप्रतिम वेळ नाही. पण कधीतरी संध्याकाळीही घरटय़ात परतण्याची त्यांची लगबग पाहा. इतर वेळीही आवडती ठिकाणं अनुभवून बघा. ती तेवढीच सुंदर असतात. शिवाय ऑफ सीझनला जाण्याचे फायदे मिळतात ते वेगळेच. पण केवळ त्याचसाठी नाही तर ऋतूंमधलं वैविध्य पाहण्यासाठी जा. माझ्या अनुभवानुसार काही ठिकाणचे गाईड त्यांना जायचं नसेल तर ‘इस जगह मे जाना वेस्ट ऑफ टाइम है’ वगैरे ऐकवतात. अशा वेळी स्वत:चं लॉजिक लावा आणि निर्णय घ्या. इतर वेळचे दुस-या प्रांतातील ऋतू अनुभवून पाहा. काही ठिकाणी नक्कीच ते कठीण आहे; मात्र आपल्या नजरेला त्या त्या ठिकाणाचं एक रुटीन वैशिष्टय़ पाहायची सवय झाली आहे. ती मग मोडता येते. कधीतरी वेळाही चुकवून पाहा. त्यातही गंमत असते.
कॉब्रेटच्या जंगलात फिरताना एक दिवस मी खोलीवर थंडीत गुडूप झोपून गेले होते व साडेपाचला माझा ड्रायव्हर उठवायला आला. म्हणाला, आता फक्त अर्धा तासच उरलाय. तेवढा वेळच फिरून येऊ. म्हटलं ठीक आहे. सहाला बाहेर पडलो. गेलो सीताबनीच्या जंगलात. तिथं प्राण्यांचे अलर्ट कॉल सुरू होते. जंगलातून गाडय़ा परतत होत्या. वाटेत फॉरेस्टची माणसं भेटली. ती म्हणाली, ‘जास्त पुढं जाऊ नका. एकतर संध्याकाळ होऊन गेलीय. तुम्ही येणार तरी कधी परत आणि या एरियात वाघीण फिरतेय, हे कॉल तिच्यासाठीच आहेत.’ त्यावेळेस पायानं लंगडी झालेली एक वाघीण तिथं आसपासच्या गावात फिरत होती. मी परत मुंबईला आल्यानंतर बातमी कळली की, तिनं एका बाईला उचललं होतं. एव्हाना साडेसहा वाजून गेले होते.
ऐन डिसेंबरमधली ती भर्रकन काळोख पांघरून घेणारी संध्याकाळ. आम्ही तर नुकतेच जंगलात शिरलो होतो. तिथं सुंदरसा छोटा वळणावळणाचा घाटासारखा वाटणारा रस्ता आहे. अगदी पाहात राहावा असा. मात्र तो रस्ताही मागे केव्हाच काळोखात बुडत आलेला. तरी आम्ही शेवटल्या धूसर प्रकाशात गाडी जेवढी पुढे नेता येईल तेवढी नेली. भंडारपानी गेटच्या जवळ पोहोचल्यावर ड्रायव्हर म्हणाला, ‘‘मॅडम अब बस हो गया, अभी वापस चलेंगे. आप को डर नही लगता क्या?’’ मग आम्ही परतू लागलो. आता तर पूर्णच काळोख झालेला. पुन्हा एकदा झाडा-झुडपांमध्ये भास व्हायला लागले. गवताची पाती जरा जास्तच सळसळतायत असं वाटू लागलं. जीपच्या मागच्या रस्त्यावरून जरा मोठा आवाज आला की आम्ही चहूबाजूने पाहू लागलो. एकतर ती उघडी जीप. गार झोंबणारा वारा. तिच्यावर छतही नव्हतं. सीताबनीचं जंगलही एकाच भूप्रदेशात असल्यामुळे कॉब्रेटसारखंच गवताळ आणि म्हटलं तर मेन पार्कपेक्षा अधिकच मस्त. पण हे सर्व तेव्हा परतताना नव्हतं जाणवलं. कारण मनात भीती साचत चालली होती. अखेर आम्ही बफर झोनबाहेर गावच्या रस्त्याला लागलो व कंदील घेऊन चालणारे गावकरी भेटू लागले. तेव्हा कुठे हायसं वाटलं.
मध्यंतरी एका हिलस्टेशनला गेले होते. तेव्हा तिथं अजिबात गर्दी नव्हती. गावही कसं निवांत पडलं होतं. कोणालाच कसलीही घाईगर्दी नव्हती. माणसं बिझी नसल्यामुळे बोलायला मोकळी होती, मोकळी होऊन बोलत होती. चालाय-फिरायला रस्ते मोकळे होते. असाच निवांतपणा मिळाला तो पचमढीला. आम्ही नेमके पचमढी गाव बंद असणा-या दिवशी जाऊन पोहोचलो होतो. त्यामुळे एखादं पर्यटकांनी एरवी गजबजलेलं गाव शांतता कशी पांघरून घेतं, हे जाणवलं. जंगलात असताना कधीही ठरवून चालू नका की, आता या वेळेस आपल्याला अमुक एक प्राणी दिसेल. तसं कराल तर घोर अपेक्षाभंग होईल. उलट डोक्यात कोणत्याही कल्पना न ठेवता जाल तर नक्कीच काहीतरी पाहायला मिळेल. माझ्या जंगल सफरींमध्ये मला भालू, वाघ, बिबटय़ा, रानकुत्री हे सर्व असेच अचानक भेटले आहेत. नागझिराला गेल्यावर सर्वच जण रानकुत्र्यांच्या मागे होते. तिथं चिक्कार रानकुत्री दिसतात. भालूही दिसतात. पण आम्ही गेलो तेव्हा दोन-तीन दिवस भालू कुठे गडपच झाले होते. आणि अखेर जायच्या दिवशी सकाळी आमच्या समोर एक अस्वल कितीतरी वेळ येऊन चालत राहिले. बांधवगढला भेटलेल्या बामेरा मेल वाघासारखी.
प्रवास करताना सतत मनात काहीतरी शोध असू द्यात. आजूबाजूच्या निसर्गाशी बोला, माणसांशी बोला. बरंच काही सापडेल. माझी काही वर्षापूर्वी बरीच इच्छा होती की हॉर्नबिल प्रत्यक्ष जंगलात पाहावे; पण योग आला नव्हता. असंच एकदा गावी माल्रेश्वरला गेलेले असताना माझ्या घराच्या समोरच्या झाडावर येऊन एका संध्याकाळी अवचित धनेश येऊन बसले व माझी इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर दांडेलीच्या जंगलातल्या दरीत विहरणारे हॉर्नबिलदेखील पाहिले. मला हा अमुक प्राणी-पक्षी पाहायचा आहे, हे तुम्ही निसर्गाला सांगू शकत नाहीत आणि निसर्ग काही माणूस नाही जो तुमचं ऐकेल; पण थोडा धीर दाखवला तर निश्चितच काहीतरी गवसतं. म्हणूनच त्यासाठी वेळकाळ ठरवून जाऊन उपयोगी नाही. हे जे अद्भुत असतं ते कधीही घडू शकतं. पश्चिम बंगालच्या अगदी ग्रामीण भागात असणारं एक खेडं बेलून. तिथं गेल्यावर माझा वन्यजीव संशोधक मित्र म्हणाला की, आता आपण संध्याकाळी बाहेर पडू. मी म्हटलं, अरे नाही असं कसं संध्याकाळी काळोखात बाहेर जाणार? मनात लहानपणापासून संध्याकाळी-रात्री वगरे मुद्दामहून शेतात, जंगलात जाऊ नये असं ठसवलेलं वर येऊ लागलं. अखेर त्याच्या आग्रहामुळे सुमारे साडेसहा-सातला शेतं ओलांडून जंगलात गेलो. तर शहरात कधी न पाहिलेल्या नवलाईच्या गोष्टी समोर येऊ लागल्या. संध्याकाळी घरटय़ात परतणारे अनेक पक्षी पाहायला मिळाले. कोल्हे, जंगल कॅट, मुंगूस व इतर अनेक जंगली निशाचर प्राणी त्यांच्या वेळेनुसार बाहेर पडत होते. ते पाहायला मिळाले. आम्ही एका ठिकाणी मुक्काम ठोकून बसलो. तिथून आम्हाला सारं काही दिसत होतं. समोर नदी होती. एरव्ही मी जंगल पाहिलं ते सूर्यास्ताआधीचं, दिवसाकाठी असं सुरक्षित वेळेत. पण हा अनुभव काही वेगळाच होता. ऑफबीट पायवाट पकडा, वेळ चुकवा आणि बिनधास्त जा. नेहमीच संकट येतं असं नाही, त्या दृष्टीने तयारी ठेवून मगच वाटल्यास पाऊल टाका. आपल्यापैकी अनेकांनी हे केलंही असेल. त्यांना जरूर यातली गंमत कळली असेलच.
Link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=684,74,2436,1040&id=story6&pageno=http://epaper.eprahaar.in/26012015/Mumbai/Suppl/Page4.jpg

Sunday, April 26, 2015

सुलभ नसे जे !


भारतातील प्रवासातली एकमेव व मला जाणवलेली उणीव कोणती असेल तर ती आहे, ठिकठिकाणच्या स्वच्छ व चांगल्या शौचालयांची.
भारतातील प्रवासातली एकमेव व मला जाणवलेली उणीव कोणती असेल तर ती आहे, ठिकठिकाणच्या स्वच्छ व चांगल्या शौचालयांची.
जागतिक महिला दिन आठवडयावर आलाय, त्या निमित्ताने आपल्याकडे स्त्री प्रवाशांसाठी असलेल्या शौचालयांची दैन्यवस्था आठवतेय आणि मी पार केलेल्या दिव्यांचीही आठवण येतेय.
प. बंगालमधल्या एका गावात आम्हाला जायचं होतं. त्यासाठी भल्या पहाटेच म्हणजे चारला उठून पाचला बाहेर पडलो होतो. कारण पुढे एक तासाचा रेल्वे व पाच तासांचा बसचाही प्रवास होता.
या सर्व प्रवासात माझी काय गोची होणार आहे हे मला घरातच लक्षात आलं होतं; पण त्याला नाइलाज होता, त्यामुळे ‘आलिया भोगासी असावे सादर’ या विचाराने मी पुढल्या संकटासाठी मानसिक तयारी ठेवली होती.
प. बंगालमधलं बर्धमान शहर हे जिल्ह्याचं शहर असलं तरी इथं अस्वच्छता व मागासलेपणा बोकाळलेला आहे. वर्षानुर्वष इथली स्थानिक माणसं अपु-या नागरी सुविधांच्या खाते-यात पडलेली आहेत हे तिथं स्पष्ट जाणवत होतं.
जिल्ह्याच्या शहरात एवढी घाण असेल तर प्रत्यक्ष ग्रामीण भागात काय स्थिती असेल याचा विचारच करायला नको. आम्ही बर्धमानला साडेसात वाजता पोहोचलो. चहा घ्यायची भरपूर तल्लफ आली होती. पण थंडीने आपला असरही दाखवला होता. निसर्गाची हाक आली होती.
रेल्वे स्टेशन काय किंवा बाहेर काय, कुठेही जाण्यायोग्य शौचालय नव्हतं. त्यात ती अगदी सकाळची वेळ. सर्वत्र कसा आळसावलेला परिसर. कुठेही मोठं हॉटेल नाही. शिवाय आमची बसही लागलेली होती. अखेर जागा मिळवायची असल्याने बसमध्ये एकदाचे चढून बसलो. त्यानंतर बस एवढी पॅक झाली की जाण्याचा दरवाजाही दिसेना. असा तो काठोकाठ भरलेल्या बसचा प्रवास सुरू झाला व मी सरळ झोपून गेले.
बिष्णूपूरला साडेबारा वाजता उतरलो तेव्हा पहिल्यांदा एका चांगल्याशा हॉटेलाकडे धाव घेतली. तिथला वेटर जेवणाची वेळ झाली असल्याने तुम्ही काय जेवण घेणार असं विचारू लागला. त्याला म्हटलं की बाबा रे, पहिल्यांदा बाथरूम दाखव कुठे आहे ती. तो म्हणाला, अशी काही हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्यांसाठी बाथरूम वगरे नाही; पण इथं वरती हॉस्टेल आहे, त्या पुरुषांची बाथरूम आहे.
तिथे तो मला घेऊन गेला व मला अक्षरश: स्वर्ग सापडल्याचा आनंद झाला. तो आनंद व्यक्त करून बाहेर येते तोच बाहेर एक पुरुष हातात धुण्याचे कपडे घेऊन उभा होता, तो आश्चर्याने पाहू लागला. त्याला बहुतेक माझं हे अतिक्रमण रुचलं नसावं. पण माझा नाइलाज होता.
या एका बाबतीत स्त्री नेहमीच भीडेस्तव पुरुषापेक्षा मागे पडते. तरीही आज गावोगावातून जाताना हायवेने असणा-या शेताच्या बांधावर किंवा एखाद्या मोठया झाडाच्या आडोशाने लघुशंकेला जाण्यासाठी स्त्रियांची तयारी असते. अन्यथा काहीच पर्याय नसतो.
येऊरच्या जंगलातदेखील हाच अनुभव आला. एक दिवस सात वाजताच आम्ही नेचर ट्रेलला सुरुवात केली होती. अर्थात त्यासाठी मी सहाला उठून घराबाहेर पडले होते. दिवस पावसाळ्याचे होते. त्यामुळे अर्थातच आम्ही चिंब भिजलो होतो. जंगलात फिरताना अंगावरच्या रेनकोटचा खूप फायदा झाला नव्हता.
त्यात गुडघ्याच्यावर पाणी असलेले ओढेही पार केले होते. त्यामुळे काही तासांनी आतून ‘आडोसा शोधच’ अशी जाणीव व्हायला लागली. मग आम्ही सर्व जणींनी जंगलातल्याच त्या मोठाल्या झाडाझुडूपांचा सहारा घेतला. ब-याचशा इतर मोठया जंगलांपेक्षा तुलनेने लहान असणा-या जंगलांमध्ये आज पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसते. दांडेलीच्या जंगलात त्यांनी छानसा नसíगक असा छोटा बांबू लावून आडोसा निर्माण केलाय.
फक्त आडोसाच, तिथं पाणी वगरे काही नाही. नागरहोलेच्या जंगलात एक पक्कं सिमेंटचं स्वच्छतागृह आढळलं. त्यावर जंगलच्या रहिवाशांनी खरोखरच राज्य सुरू केलं होतं. म्हणजे आतमध्ये मोठ्ठाली कोळ्याची जाळी व मधमाश्यांचं पोळं, त्यामुळे तिथं कोळी व मधमाश्यांनी आमचं स्वागत केलं. मग आम्ही कुठे साप वगरे दिसतो का हेही पाहून घेतलं व ते पाहता पाहताच विधी उरकून घेतले. अशी धर्मसंकटं बरेच वेळा आली. माझ्याच नाही तर भारतात फिरणा-या प्रत्येक स्त्रीपाशी असे अनुभव असतील.
आपण भारत प्रगतीकडे चाललेला देश म्हणतो खरे, पण या बाबतीतली प्रगती तरी अजून काही दृष्टिपथात नाही. भारतीय स्त्री एकवेळ तिचा स्वत:चा देश म्हणून समजून घेईल; पण बाहेरून येणा-या परदेशी स्त्रियांचं काय? अर्थातच, त्यांच्या लिखाणातून यासंबंधीचे शेरे वाचायला मिळतात व त्यांच्या मनात भारताविषयी काय प्रतिमा त्या घेऊन गेल्या आहेत हे देखील स्पष्ट होते.
मध्य प्रदेशातील एका गावात असेच एकदा प्रवासादरम्यान थांबलो असताना आम्ही स्वच्छतागृह शोधत होतो. ते काही सापडलं नाही म्हणून पोलीस चौकीत तरी निदान तिथल्या महिलांसाठी काही सोय असेल या हेतूने डोकावलो. तिथल्या एका महिलेने एक शाळेच्या वर्गासारखी दिसणारी खोली दाखवली. जी पुरेपूर घाण झालेली होती; पण नाइलाजाने आम्हाला त्याचा वापर करावा लागला. दुसरा पर्यायच नव्हता.
भारतातल्या बहुतांशी ग्रामीण भागात महिलांसाठी स्वच्छतालयंच नाहीत व असली तरीही त्यांची दुरवस्थाच असते. शहरी व निमशहरी भागातही फार काही चांगली स्थिती नाही हेही मी अनुभवलंय. रेल्वेतून फिरताना तर या समस्येचा गंभीरपणा विसरायला लावणारे हास्यास्पद अनुभव येतात. प्रथम वर्गाचा वातानुकूलित डबा असेल तरच भारतीय रेल्वेत चांगलं शौचालय तुमच्या नशिबी येऊ शकतं. नाही तर इतर वर्गाच्या शौचालयातही दाटीवाटीने माणसं बसलेली दिसतात.
तुम्ही कुटुंब किंवा महिला असलेल्या ग्रुपसोबत प्रवास करत असाल तर परिस्थिती थोडीफार सांभाळता येते. कोणी सामानावर नजर ठेवू शकतं, तर दुसरं कोणी आपल्यासोबत येऊ शकतं किंवा स्वच्छतागृहाचा शोध घेऊ शकते. मात्र आपल्या देशात एकटयाने प्रवास करणा-या स्त्रीची अशा बाबतीत फारच कुचंबणा होते. ही वेळ माझ्यावरही अनेकदा ओढवली आहे.
विचार करा, भारतीय असल्यामुळे मी सहजच िहदी भाषेचा वापर करून मला पाहिजे ते शोधू शकते, मात्र आपल्या देशात फिरायला आलेल्या एखाद्या विदेशी पर्यटक पाहुणीची काय स्थिती होत असेल! कर्नाटकात माझ्या वहिनीसोबत फिरताना आम्हाला याची खूप जाणीव झाली. पण फक्त कर्नाटकच नव्हे तर आपल्या देशातील पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणा-या व तसं महत्त्व नसलेल्या देखील अनेक मोठया व छोटया शहरांत महिलांसाठी चांगल्या स्वच्छतागृहांची आत्यंतिक गरज आहे. तशी ती पुढील काळात मिळोत व आपला प्रवास सुखाचा होवो हीच येणा-या आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी शुभेच्छा !
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=2,1510,1466,2266&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/01032015/Mumbai/Suppl/Page4.jpg

Friday, July 1, 2011

बांधवगढ सफारी


                                          

आयुष्यात अद्वितीय म्हणजे काय हे नेमकं अनुभवलं बांधवगढच्या सफारीत( madhyapradesh-Bandhavgarh)...जंगलच्या राजाला इतक्या जवळून पाहायला मिळणं हे खरं तर भाग्यातच असावं लागतं, कारण कॉर्बेटला पाच सफारी करूनही मला वाघ काही दिसला नव्हता ( अर्थात कॉर्बेटचे जंगल इतकं अविस्मरणीय आहे की त्यापुढे मग मला निदान तेव्हा तरी वाघ नाही दिसला याचं दुःख झालं नव्हतं आणि मी स्वतः एकट्याने केलेली ती पहिली जंगल यात्रा होती तेव्हा त्याचंही थ्रील होतंच.) इथे पोस्ट करत असलेला लेख लिहिलंय माझ्या भावानं,म्हणजे शैलेंद्रनं पण ही ट्रिप दादा,वहिनी,मी आणि माझी भाची अपूर्वा,असे चौघे मिळून सॉलिड एन्जॉय केली होती. त्यावेळी पहिल्यांदा वाघ पाहिला, अगदी स्वतःच्या नजरेनं आणि मग पुन्हा पुन्हा त्याला पाहण्यासाठी जंगलात धाव घेतली. हा सोबतचा लेख वाचा आणि वाघाला पाहण्याचं थ्रील काय असतं ते समजून घ्या.

http://www.prahaar.in/collag/25052.html

This article on Tigers in Bandhavgarh,MadhyaPradesh,India was published in Prahaar on 30 May 2010.  

Tuesday, June 7, 2011

माझी कॉर्बेटकथा !

                                                          
'रुद्रप्रयागचा नरभक्षक', 'टेम्पल टायगर', 'कुमाऊंचे दिवस' अशी अनेक पुस्तकं, त्यातल्या जिम कॉर्बेट या धाडसी ब्रिटिश अधिकाऱ्यानं केलेल्या शिकारकथा आणि त्यातलं जंगलाचं वर्णन वाचून अंगावर काटा येत असे, पण या शिकारकथा नुसत्या वाचून काही समाधान होत नव्हतं. मग ठरवलं की जिम कॉर्बेटची ही कर्मभूमी म्हणजे आताच्या उत्तरांचलमधलं जिम कॉर्बेट नैशनल पार्क कसं आहे ते पाहायचेच.

जिम कॉर्बेट नैशनल पार्क रामनगर गावापासून सुरु होतं आणि याच गावात मोठ्या संख्येनं देशी-विदेशी पर्यटक उतरतात. जंगलात प्रवेश करण्याआधी वनखात्याची परवानगी आवश्यक असते. राहण्याची सोय आणि ही परवानगी अशी दोन्ही कामं मी मुंबईतूनच करून ठेवली होती. भारतीय रेल्वेच्या कृपेनं दिल्लीहून संध्याकाळी पाचला सुटलेली माझी गाडी रात्री एकच्या सुमारास म्हणजे फक्त साडेतीन तास उशिरा पोहोचली. तिथे अश्या अपरात्री माझ्यासाठी ताटकळत राहिलेल्या जिप्सी ड्रायव्हरपासून ते रिसोर्ट व्यवस्थापकापर्यंत सर्वांचेच मग मी आभार मानले.
जंगल सफारी सकाळी सहापासूनच सुरु होतात. पार्क पहाटे पाच वाजताच खुलं आणि संध्याकाळी पाच वाजता बंद होतं.ठिकठिकाणी चितळे, माकडं, काळवीट,सांबर, डुक्कर, मोर आणि अन्य विविध प्रकारचे प्राणी-पक्षी पाहायला मिळतात. नद्यांच्या काठावर मगरी आणि सुसरीही सुस्तावून पडलेल्या दिसतात.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी दिसणारी 'टर्माईट हिल्स' म्हणजे वारूळ.
जंगलात अजिबात प्रदूषण नसल्याची खात्रीच ही वारूळ देतात. या अभयारण्यात अजूनही काही गावं राहती आहेत ( आपल्या संजय गांधी नैशनल पार्कमध्ये काही कातकरी पाडे आहेत, तशीच ही गावं.) या गावांमध्ये वीजही नाही. पण इथल्या रहिवाशांना वर्षानुवर्षं राहिल्यामुळे जंगली श्वापदांचे फारसं भय वाटत नाही. १५ जून ते १५ नोव्हेंबर या काळात पार्क बंद असतं. गर्दीचा काळ हा साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी आणि एप्रिल ते मे महिन्याचा. सध्या पार्कमध्ये १६४ वाघ आहेत. मात्र कॉर्बेटसारख्या सुमारे हजार चौरस मैलांच्या परिसरात विस्तारलेल्या या जंगलात जाऊन लगेच वाघ दिसेलच अशी अपेक्षा ठेऊ नका. कारण हा जंगलचा राजा अतिशय लहरी आणि चतुर आहे. वाघ पाहण्याची खरोखर इच्छा असेल तर जास्त दिवसांचा मुक्काम हवाच. पण वाघ नजरेला पडलाच नाही म्हणून काही इथं येणारे वन्यप्रेमी निराश होऊच शकत नाहीत. रात्रीचं जंगल कसं दिसतं, काय बोलतं हे अनुभवायचं असेल तर इथल्या ढिकालाच्या जुन्या फोरेस्ट रेस्ट हाउसवर अवश्य मुक्काम करा, नव्हे कराच.
या जंगलामधल्या ढिकाला, बिजरानी, झिरनासारख्या विभागात फिरताना बऱ्याच ठिकाणी 'कॉल वेटिंग' वर थांबलेले पर्यटकांचे गट भेटतात. 'कॉल वेटिंग' म्हणजे शहरी माणसांची समजूत होईल की, फोनवरचं 'कॉल वेटिंग',पण जंगलाची डिक्शनरी वेगळी आहे, वाघ ज्या एरियात प्रवेश करतो, तेव्हा माकडं, सांबर खाकरून इशारा देतात, हरणं चौखूर उधळतात आणि पक्षीदेखील ओरडून संकेत देतात. या सर्व प्रकाराला अलर्ट कॉल म्हणतात आणि अश्या वेळी त्या एरियात जाऊन वाघाची वाट पाहत थांबणं म्हणजे 'कॉल वेटिंग. फक्त वाघ आणि वाघच पाहणार असं ठरवून आलेले पर्यटक, अशा ठिकाणी दुर्बिणीला डोळे लावून बसलेले असतात. इथं जंगलात फिरण्याचे परमिट लागतं. आतमध्ये फिरण्यासाठी बाराशे ते दोन हजार रुपये दरानं जिप्सी भाड्यानं मिळतात.
हे पार्क संपूर्ण पाहायचं तर कमीत कमी आठवडा हवाच.  संपूर्णपणे एकट्याने केलेली  ही माझी पहिलीच जंगल सफारी होती त्यामुळे ती अधिकच रोमांचक झाली.  हा सर्व वन्यप्रदेश अत्यंत सुंदर आणि विशेष म्हणजे प्रदूषणमुक्त आहे.त्यामुळे मोकळा श्वास घेणं काय असतं हे अनुभवण्यासाठी इथं एकदा आलंच पाहिजे आणि हो..सोबत चांगला कॅमेरा मात्र हवाच.
कसे जाल कुठे राहाल
रामनगरमध्ये ६० हुन अधिक असे स्वस्त आणि महागडे देखील टूरिस्ट लॉज आणि रिसोर्ट आहेत. जवळ पंतनगरला विमानतळ आहे. हल्द्वानीलाही तो लवकरच होईल. दिल्ली- पंतनगर विमानप्रवास करून मग पुढं कोणत्याही वाहनानं रामनगरला ३-४ तासात पोहोचता येतं. दुसरा पर्याय म्हणजे दिल्ली-रामनगर उत्तराखंड संपर्क क्रांती एक्स्प्रेस पकडावी आणि थेट कॉर्बेट पार्क जंगलाच्या दारात उतरावं.
भेट सीताबनीची...
सीताबनीला उशीरच म्हणजे संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहचले. वाटेतच एक नरभक्षक वाघ याच भागात फिरत असल्याचं पेट्रोलिंगसाठी निघालेल्या वन अधिकाऱ्यांकडून समजलं. सीताबनी हा कॉर्बेटच्या अगदी बाजूलाच लागून असलेला घनदाट असा बफर झोन आहे. उंचच उंच देवदार वृक्षांच्या जंगलामधून जाणारा नागमोडी वळणाचा रस्ता या प्रवासातले थ्रील वाढवत होतं. या वाघानं काही दिवसांपूर्वीच गावातल्या एका बाईवर हल्ला केला होतं. हा भाग बघायची तीव्र इच्छा आणि ड्रायव्हरनं दिलेल्या पाठींब्यामुळं मी शेवटपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात चांगलाच अंधार झाला आणि प्रत्येक गवताच्या पात्यामागे मला वाघ असल्याचा भास होत होतं. सोबतीला ड्रायव्हर गावात येणाऱ्या वाघांचे किस्से सांगत होता. हट्टाने घेतलेला निर्णय अंगाशी येतो की काय असे वाटू लागलं होतं..अंगावर काटा येत होता..उघडी जिप्सी आणि त्यात मी आणि ड्रायव्हर असे दोघेच जण..पर्यटक म्हणून वाघ मला सूट देईल असे काहीच नव्हतं. वाटेत परतणारा एक गट भेटला, त्यानाही वाघाची चाहूल लागली होती म्हणूनच ते ही वेगानं गावाकडे परतत होते. मग शेवटच्या गेटपर्यंत जाण्याचा निर्णय रद्द करून मी देखील ड्रायव्हरला जिप्सी परत वळवायला सांगितली.
कॉर्बेटच्या प्रवासात वाघ नाहीतरी हत्तीच्या पाठलागाला पाठ( !) देताना जीव कसा गोळा होतो, हे मात्र मला कळलेच. हत्तीच्या शोधात आम्ही जिप्सी दाट गवतात घातली. काही अंतर जाताच एक तस्कर( सुळेवाला हत्ती ) त्या गवतामधून उगवला आणि जोरानं चीत्कारून त्यानं आम्ही आल्याचं अजिबात आवडलं नसल्याचं सांगून टाकलं. गाईड ऐकायला तयार नव्हता. त्याला हत्तीच्या अधिक जवळ जायचं होतं. जीप थोडी पुढं सरकताच त्या हत्तीनं दाणदाण पाय आपटून जीपच्या दिशेनं मोर्चा वळवला. मग आमच्या ड्रायव्हरनं कशीबशी जिप्सी मागं वळवली आणि आम्ही तिथून सुंबाल्या केला !
P:S २०११ च्या व्याघ्रगणनेत कॉर्बेट पार्क मध्ये २९५ वाघ असल्याचं समजतं. लेखात नमूद केलेली संख्या ही २००८ सालची आहे.

Note:- This article was earlier published in Marathi news daily 'Prahaar' on 17th January 2009.Link is not available in archives.