Translate

Showing posts with label bus. Show all posts
Showing posts with label bus. Show all posts

Sunday, April 26, 2015

सुलभ नसे जे !


भारतातील प्रवासातली एकमेव व मला जाणवलेली उणीव कोणती असेल तर ती आहे, ठिकठिकाणच्या स्वच्छ व चांगल्या शौचालयांची.
भारतातील प्रवासातली एकमेव व मला जाणवलेली उणीव कोणती असेल तर ती आहे, ठिकठिकाणच्या स्वच्छ व चांगल्या शौचालयांची.
जागतिक महिला दिन आठवडयावर आलाय, त्या निमित्ताने आपल्याकडे स्त्री प्रवाशांसाठी असलेल्या शौचालयांची दैन्यवस्था आठवतेय आणि मी पार केलेल्या दिव्यांचीही आठवण येतेय.
प. बंगालमधल्या एका गावात आम्हाला जायचं होतं. त्यासाठी भल्या पहाटेच म्हणजे चारला उठून पाचला बाहेर पडलो होतो. कारण पुढे एक तासाचा रेल्वे व पाच तासांचा बसचाही प्रवास होता.
या सर्व प्रवासात माझी काय गोची होणार आहे हे मला घरातच लक्षात आलं होतं; पण त्याला नाइलाज होता, त्यामुळे ‘आलिया भोगासी असावे सादर’ या विचाराने मी पुढल्या संकटासाठी मानसिक तयारी ठेवली होती.
प. बंगालमधलं बर्धमान शहर हे जिल्ह्याचं शहर असलं तरी इथं अस्वच्छता व मागासलेपणा बोकाळलेला आहे. वर्षानुर्वष इथली स्थानिक माणसं अपु-या नागरी सुविधांच्या खाते-यात पडलेली आहेत हे तिथं स्पष्ट जाणवत होतं.
जिल्ह्याच्या शहरात एवढी घाण असेल तर प्रत्यक्ष ग्रामीण भागात काय स्थिती असेल याचा विचारच करायला नको. आम्ही बर्धमानला साडेसात वाजता पोहोचलो. चहा घ्यायची भरपूर तल्लफ आली होती. पण थंडीने आपला असरही दाखवला होता. निसर्गाची हाक आली होती.
रेल्वे स्टेशन काय किंवा बाहेर काय, कुठेही जाण्यायोग्य शौचालय नव्हतं. त्यात ती अगदी सकाळची वेळ. सर्वत्र कसा आळसावलेला परिसर. कुठेही मोठं हॉटेल नाही. शिवाय आमची बसही लागलेली होती. अखेर जागा मिळवायची असल्याने बसमध्ये एकदाचे चढून बसलो. त्यानंतर बस एवढी पॅक झाली की जाण्याचा दरवाजाही दिसेना. असा तो काठोकाठ भरलेल्या बसचा प्रवास सुरू झाला व मी सरळ झोपून गेले.
बिष्णूपूरला साडेबारा वाजता उतरलो तेव्हा पहिल्यांदा एका चांगल्याशा हॉटेलाकडे धाव घेतली. तिथला वेटर जेवणाची वेळ झाली असल्याने तुम्ही काय जेवण घेणार असं विचारू लागला. त्याला म्हटलं की बाबा रे, पहिल्यांदा बाथरूम दाखव कुठे आहे ती. तो म्हणाला, अशी काही हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्यांसाठी बाथरूम वगरे नाही; पण इथं वरती हॉस्टेल आहे, त्या पुरुषांची बाथरूम आहे.
तिथे तो मला घेऊन गेला व मला अक्षरश: स्वर्ग सापडल्याचा आनंद झाला. तो आनंद व्यक्त करून बाहेर येते तोच बाहेर एक पुरुष हातात धुण्याचे कपडे घेऊन उभा होता, तो आश्चर्याने पाहू लागला. त्याला बहुतेक माझं हे अतिक्रमण रुचलं नसावं. पण माझा नाइलाज होता.
या एका बाबतीत स्त्री नेहमीच भीडेस्तव पुरुषापेक्षा मागे पडते. तरीही आज गावोगावातून जाताना हायवेने असणा-या शेताच्या बांधावर किंवा एखाद्या मोठया झाडाच्या आडोशाने लघुशंकेला जाण्यासाठी स्त्रियांची तयारी असते. अन्यथा काहीच पर्याय नसतो.
येऊरच्या जंगलातदेखील हाच अनुभव आला. एक दिवस सात वाजताच आम्ही नेचर ट्रेलला सुरुवात केली होती. अर्थात त्यासाठी मी सहाला उठून घराबाहेर पडले होते. दिवस पावसाळ्याचे होते. त्यामुळे अर्थातच आम्ही चिंब भिजलो होतो. जंगलात फिरताना अंगावरच्या रेनकोटचा खूप फायदा झाला नव्हता.
त्यात गुडघ्याच्यावर पाणी असलेले ओढेही पार केले होते. त्यामुळे काही तासांनी आतून ‘आडोसा शोधच’ अशी जाणीव व्हायला लागली. मग आम्ही सर्व जणींनी जंगलातल्याच त्या मोठाल्या झाडाझुडूपांचा सहारा घेतला. ब-याचशा इतर मोठया जंगलांपेक्षा तुलनेने लहान असणा-या जंगलांमध्ये आज पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसते. दांडेलीच्या जंगलात त्यांनी छानसा नसíगक असा छोटा बांबू लावून आडोसा निर्माण केलाय.
फक्त आडोसाच, तिथं पाणी वगरे काही नाही. नागरहोलेच्या जंगलात एक पक्कं सिमेंटचं स्वच्छतागृह आढळलं. त्यावर जंगलच्या रहिवाशांनी खरोखरच राज्य सुरू केलं होतं. म्हणजे आतमध्ये मोठ्ठाली कोळ्याची जाळी व मधमाश्यांचं पोळं, त्यामुळे तिथं कोळी व मधमाश्यांनी आमचं स्वागत केलं. मग आम्ही कुठे साप वगरे दिसतो का हेही पाहून घेतलं व ते पाहता पाहताच विधी उरकून घेतले. अशी धर्मसंकटं बरेच वेळा आली. माझ्याच नाही तर भारतात फिरणा-या प्रत्येक स्त्रीपाशी असे अनुभव असतील.
आपण भारत प्रगतीकडे चाललेला देश म्हणतो खरे, पण या बाबतीतली प्रगती तरी अजून काही दृष्टिपथात नाही. भारतीय स्त्री एकवेळ तिचा स्वत:चा देश म्हणून समजून घेईल; पण बाहेरून येणा-या परदेशी स्त्रियांचं काय? अर्थातच, त्यांच्या लिखाणातून यासंबंधीचे शेरे वाचायला मिळतात व त्यांच्या मनात भारताविषयी काय प्रतिमा त्या घेऊन गेल्या आहेत हे देखील स्पष्ट होते.
मध्य प्रदेशातील एका गावात असेच एकदा प्रवासादरम्यान थांबलो असताना आम्ही स्वच्छतागृह शोधत होतो. ते काही सापडलं नाही म्हणून पोलीस चौकीत तरी निदान तिथल्या महिलांसाठी काही सोय असेल या हेतूने डोकावलो. तिथल्या एका महिलेने एक शाळेच्या वर्गासारखी दिसणारी खोली दाखवली. जी पुरेपूर घाण झालेली होती; पण नाइलाजाने आम्हाला त्याचा वापर करावा लागला. दुसरा पर्यायच नव्हता.
भारतातल्या बहुतांशी ग्रामीण भागात महिलांसाठी स्वच्छतालयंच नाहीत व असली तरीही त्यांची दुरवस्थाच असते. शहरी व निमशहरी भागातही फार काही चांगली स्थिती नाही हेही मी अनुभवलंय. रेल्वेतून फिरताना तर या समस्येचा गंभीरपणा विसरायला लावणारे हास्यास्पद अनुभव येतात. प्रथम वर्गाचा वातानुकूलित डबा असेल तरच भारतीय रेल्वेत चांगलं शौचालय तुमच्या नशिबी येऊ शकतं. नाही तर इतर वर्गाच्या शौचालयातही दाटीवाटीने माणसं बसलेली दिसतात.
तुम्ही कुटुंब किंवा महिला असलेल्या ग्रुपसोबत प्रवास करत असाल तर परिस्थिती थोडीफार सांभाळता येते. कोणी सामानावर नजर ठेवू शकतं, तर दुसरं कोणी आपल्यासोबत येऊ शकतं किंवा स्वच्छतागृहाचा शोध घेऊ शकते. मात्र आपल्या देशात एकटयाने प्रवास करणा-या स्त्रीची अशा बाबतीत फारच कुचंबणा होते. ही वेळ माझ्यावरही अनेकदा ओढवली आहे.
विचार करा, भारतीय असल्यामुळे मी सहजच िहदी भाषेचा वापर करून मला पाहिजे ते शोधू शकते, मात्र आपल्या देशात फिरायला आलेल्या एखाद्या विदेशी पर्यटक पाहुणीची काय स्थिती होत असेल! कर्नाटकात माझ्या वहिनीसोबत फिरताना आम्हाला याची खूप जाणीव झाली. पण फक्त कर्नाटकच नव्हे तर आपल्या देशातील पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणा-या व तसं महत्त्व नसलेल्या देखील अनेक मोठया व छोटया शहरांत महिलांसाठी चांगल्या स्वच्छतागृहांची आत्यंतिक गरज आहे. तशी ती पुढील काळात मिळोत व आपला प्रवास सुखाचा होवो हीच येणा-या आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी शुभेच्छा !
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=2,1510,1466,2266&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/01032015/Mumbai/Suppl/Page4.jpg

Thursday, April 23, 2015

बाव-या मनासाठी


कोणत्याही प्रवासात असताना नेहमीच एक प्रश्न पडतो किंबहुना तो पडलाच पाहिजे की, आपण इथे का आलो आहोत? हा प्रश्न किंवा इतरही काही प्रश्न तुम्हाला प्रवासात पडत असतील तर तुमचा आत्मसंवाद सुरू आहे समजा. तो सुरू असेल तर तुम्ही निव्वळ पर्यटक असण्याच्या पुढच्या पायरीवर पोहोचता.
इयरफोनमधून सुरू असणा-या रेडिओची खरखर वाढत जाते, निवेदिकेचा आवाज कापरा होत होत हळूहळू बंदच होतो, कानातला विरंगुळा संपलाय म्हटल्यावर नजरेला तरी काही सापडतंय का ते पाहायला आपण बाहेर पाहू लागतो. झरझर बाहेर दिसणारं सर्वकाही आपल्याशी छत्तीसचा आकडा धरून उलटं पळत जातं, स्थिर वस्तूही हलत असल्याचा भास होऊ लागतो, नजर कुठे टिकवून राहताच येत नाही.
एखाद्या घराच्या भिंतीवर काय लिहिलंय वाचू म्हटलं तरी अक्षरं भिंतीवरून उडी मारून गायब होतात आणि गाडीला वेग आल्याचं एकदा मनाला पटल्यावर आपण आपलं हलतं डोकं आणि डोळे यांना नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करू लागतो. सिमेंटच्या घरांचे ठोकळे मागे पडत जातात, अधूनमधून दिसणारे शेतीचे कोवळे लुसलुशीत तुकडेही विरळ होत जातात, मोकळी जमीन सुरू होते.
विस्तीर्ण जमीन, नदी, जमिनीसोबत धावणारं आकाश, झाडं, माळरानं, घाट, द-या, डोंगररांगा, कपारी, वळणांचे रस्ते, असा सारा प्रदेश सुरू होतो आणि आपली काही काळापुरती सगळ्या शहरी जगापासून सुटका होते. मोबाईलवर रेंज येतेय का याची दहावेळा चाचपणी केली जाते. अखेर त्याचा उपयोग निदान फोटोसाठी तरी करू असं म्हणून आपण बाहेरच्या दृश्यात मन रमवतो.
इतकं शांत राहायची सवय नसते ना आपल्याला, मग मन ‘चाळ’करी होऊ लागतं. कोणीतरी मुद्दामहून दूर लोटल्यागत आपण अस्वस्थ होत असतो. (इथं प्रवासात निवांत झोप येणारे सुदैवी). काय हवं असतं, काय करावं हे कळत नसतं. सहप्रवाशांशी बोलून झालेलं असतं, खाऊनपिऊनही झालेलं असतं, मोबाईलमधली नेहमीचीच गाणी ऐकण्यात आता रस उरलेला नसतो, हातातल्या पुस्तकापेक्षा बाहेरचा अनोळखी प्रदेश खुणावत असतो.
आपलं मन एक्झिट झोनमध्ये शिरलेलं असतं. प्रवासातली ही अवस्था अटळ असते, मग तुम्ही कुठेही असा, जहाजात, विमानात, रेल्वेत किंवा चारचाकी वाहनात. ही अस्वस्थता नसते, तर ती सुरुवात असते. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून तुम्ही नवं काही शोधायला, पाहायला, स्वीकारायला, जाणून घ्यायला, अनुभवायला बाहेर पडलेले असता. पुढे काय होणार याची पुरेशी माहिती नसते. तरीही छान वाटत असतं. त्या छान वाटण्याचीच ही सुरुवात असते.
मनाला घट्ट चिकटलेले विविध प्रकारच्या संवादांचे तुकडे वा-यासोबत बाहेर पडून उडून जातात. हे संवाद कोणाकोणाशी, कोणकोणत्या भावनांनी झालेले असतात. जसे ते दूर जातात, आपल्याला हलकं वाटू लागतं. सर्व ओझी डोक्यावरून बाजूला काढून ठेवल्यासारखी वाटतात.
एव्हाना मोबाईल बंद असला तरी त्याची गरज आहे असं वाटणं एकदमच कमी झालेलं असतं. खरं तर आपल्या गरजा अशा कमीच कशा राहतील असा नवाच विचार येऊ लागतो. गरजांसोबत त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी माणसं व त्या अनुषंगाने येणारे संवाद व इतर गोष्टीही कमी करता येतील का याचा विचार सुरू होतो. वाहनातून एकीकडे प्रवास सुरू असतो आणि मनातल्या विचारांनीही वेग घेतलेला असतो.
सुदैवच म्हणायचं की आपल्या जबाबदा-या, चिंता, काळज्या, विवंचना, अडचणी यांना व्यक्तीस्वरूप नाही, नाहीतर बाहेर जाताना त्यांनाही बांधून घेऊन जाणं भाग पडलं असतं! आपला आपल्याशी संवाद सुरू झालेला असतो, खूप वेगळं वाटत असतं; पण समाधानही वाटत असतं. प्रवासाला बाहेर पडण्याचा आपला निर्णय योग्यच होता हे मनाला सांगितल्यावर तेही सुखावत असतं.
सुंदरबनमधल्या एका नीरव रात्री माझ्या मनाने मला असंच सांगितलं होतं. ब्रह्मपुत्रा आणि गंगेच्या त्या विस्तीर्ण पात्रात (समुद्रच तो, कारण इथं मच्छीमारांच्या बोटी बरेचदा भरकटतात!) अतिशय संथ पाण्यात बोटीच्या डेकवर एकटयानेच चांदण्याखाली आरामात झोपले होते, रात्रीचे दोन वाजले होते बहुदा.
किती का वाजलेले असेनात, अशा नितळ शांततेत तुम्हाला भान राहत नाही. हो, एवढी गूढरम्य शांतताही आपल्याला गुंगवून टाकू शकते. मग कधी भासही होतात. अशावेळी मनावरचा हक्कसोडून देण्यासाठी देखील खूप पराकाष्ठेचे प्रयत्न करावे लागतात. तरच त्या क्षणाशी आपण एकरूप होऊ शकतो. आम्ही गावांपासून, किनाऱ्यांपासून चांगलेच दूर आलो होतो. त्यामुळे तिथले आवाजही नव्हते.
यापेक्षा अप्रतिम जगात काही नसावं असं त्याक्षणी मला वाटलं. ही भावना तुम्हालासुद्धा अनुभवता येऊ शकते किंवा तुम्ही अनुभवली देखील असेल. असं म्हणतात की प्रवासाचं कधी ध्येय ठेवू नये, जे दिसतंय ते मनात उमटवत जावं, साठवून घ्यावं. त्यामुळे मी ब-याच ठिकाणी असे क्षण अनुभवले आहेत. त्यात कॉब्रेटमधला रामगंगेचा काठ होता, दांडेलीमधलं जंगल व प्राचीन वृक्षराजीत लपून गेलेली दरी होती, धरमशालेतलं त्रियुंडचं पठार होतं, अशा काही जागा होत्या, जिथे मी माझं मन सोडून आले.
आपण प्रवासाला बाहेर का पडतो तर आपल्याला रोजच्या रहाटगाडग्यातून विरंगुळा हवा असतो, विश्रांतीचे चार क्षण पाहिजे असतात. शरीराला आरामाची आवश्यकता असते, त्याहूनही जास्त ती मनाला असते. याच मनावर, मेंदूवर आपण कारण-अकारण अनेक ओझी रोज रोज चढवत असतो.
हीच ओझी, बंधनं उतरवून टाकण्यासाठी प्रवास हे एक अतिशय योग्य निमित्त असतं. त्यातून तुम्हाला एकटयाने असे काही क्षण काही घालवत, स्वत:शी संवाद करायची संधी मिळाली तर मग काय..दुधात साखरच जणू ! तुमच्या आवडीचं शहर, गाव, ठिकाण कोणतंही असू देत, मग ते पठार असू देत, किल्ला असू देत, सागरकिनारा असू देत किंवा डोंगर असू देत, तुम्हाला निर्विकार होता येईल अशी एखादी जागा नक्कीच तिथे असेल.
त्यासाठी खूप लांबच, एकांतात गेलं पाहिजे असं नाही. एखाद्या छानशा नदीकाठी बसूनदेखील तुम्ही हा संवाद सुरू करू शकता. ज्यांना प्रवासाची आवड आहे, कंटाळा येत नाही अशांसाठी प्रवासासारखा दुसरा गुरू नाही. मग तुमच्या पायाखालची जमीनच तुमचं गुरुकुल बनतं. तुमची नेहमीचीच नजर, तीही चौकटीतून बाहेर पडते.
निर्बुद्धासारखे एका चाकोरीत धावणारे आपण, प्रवासात असताना तृषार्त होऊन फिरतो. आपल्याभवतीचं जग हे असं आहे याची नव्याने जाणीव होऊ लागते. आत्मसंवाद झाल्याने आयुष्यात काय हवं आहे, काय नको, काय चुकतंय, आपली दिशा कोणती याचं भान येऊ लागतं. खरं तर प्रवास हे केवळ निमित्त असतं, पण पायाखालची वाट सोडल्याशिवाय काही उत्तरं मिळत नसतात. तेव्हा तुम्हीही शोधा असंच एखादं निमित्त !
Here is the link for published article  http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=12,1402,1466,2260&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/29032015/Mumbai/Suppl/Page4.jpg