Translate

Showing posts with label Jim Corbett National Park. Show all posts
Showing posts with label Jim Corbett National Park. Show all posts

Thursday, April 23, 2015

सेलिब्रिटी वाघ व त्यांची अभयारण्ये!


भारतीय वन्य पर्यटनाचं सर्वात प्रमुख आकर्षण कोणतं असेल, तर ते आहे टायगर सफारी, म्हणजे जंगलामध्ये जाऊन वाघांना पाहणे. आजमितीला भारत हा जगाच्या पाठीवर वाघ उरलेल्या देशांपैकी एक महत्त्वाचा देश आहे, जिथे नसर्गिक अधिवासात २२२६ अशा अल्पसंख्येत का होईना, पण वाघ नावाचा प्राणी नमुन्यादाखल टिकून आहे. त्याचमुळे आज प्रत्येक वन्यजीव सहलींचा प्रमुख उद्देश हा केवळ पर्यटकांना वाघ दाखवणे हा झालेला आहे.
भारतातल्या एका प्रसिद्ध जंगलातली टायगर सफारी. हो, व्याघ्र अभयारण्यातील अशा सफारींना टायगर सफारी म्हणूनच लोक ओळखतात. कारण या सफारीचा उद्देशच मुळी लोकांना जास्तीत जास्त जवळून वाघ दाखवणे हा असतो. अशी सफारी सुरू होण्याआधी व्यवस्थित हवा तयार केली जाते. जंगलातील अमुक एका झोनमध्ये वाघ दिसलाय किंवा त्या दुस-या झोनमधली वाघीण तिच्या पिल्लांना घेऊन आताच पाणी प्यायला बाहेर पडली आहे वगरे गोष्टी त्यांच्या कानावर फेकल्या जातात.
जंगलात गेल्यावर कुठेतरी वाघाच्या पावलांचे ठसे दाखवले जातात. पर्यटकांची आतुरता ताणली जाते. त्यांच्यापैकी अनेकांनी वाघ अद्यापही प्रत्यक्ष पाहिलेला नसतो. त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा क्षण ठरणार असतो. त्याचसाठी तर ते एवढया लांब शहरातून आलेले असतात. एवढंच नाही तर केवळ वाघ पाहण्यासाठीच त्यांनी रिसॉर्ट व टूरचे २५-३० हजार रुपये भरलेले असतात. अशा पर्यटकांना नाराज करून चालत नाही. मग त्यासाठी वाघाचा माग काढला जातो.
तो जिथे असेल तिथपर्यंत त्याचा पाठलाग पुरवला जातो. तासन् तास जंगलात जिप्सी टेहळणी करत फिरतात, एकाच जागी थांबून राहतात व एकदा तो सापडला की मग जीप्स आणि हत्तींच्या गराडयात त्याला कोंडून एखाद्या सर्कशीतला दाखवावा त्याप्रमाणे पर्यटकांना वाघ दाखवला जातो. प्रथमच वाघ पाहत असाल तर निश्चितच या राजिबडया, उमद्या जनावराच्या तुम्ही प्रेमात पडता. त्याचं हे पहिलं दर्शन मनावर कायमचं कोरलं जातं. अधिकाधिक वाघांना आपण पाहिले पाहिजे, अशी इच्छा मनात उत्पन्न होते.
भारतातील सुमारे १६६ राष्ट्रीय अभयारण्यांपैकी ४७ ही व्याघ्र अभयारण्यं आहेत. त्यातील काही खास वाघांच्या सोप्या दर्शनासाठीच प्रसिद्ध झालेली आहेत. एखाद्या देवस्थानाला असावी तशी तिथे कायम गर्दी असते. यात हौशे-नवशे-गवशे सर्व असतात. मग अशा ठिकाणांहून तिथल्या वाघांच्या कथा देशभरात पसरत असतात.
पण विचार करा की आजघडीला देशात जेवढे वाघ लोकप्रिय आहेत, त्यांची संख्या फक्त २५च्या आसपास आहे. त्यातही काही पिल्ले आहेत. उदाहरणार्थ रणथंबोरमधील टी १९ व तिची पिल्ले, बांधवगढचा बामेरा मेल, कान्हाचा मुन्ना, ही सर्व यादी काही २५-३०च्या वर जायची नाही. मग प्रश्न असा पडतो की देशात २२२६ वाघ असताना केवळ निवडकच वाघ लोकांना माहीत का व्हावेत? या विषयाकडे फार कमी वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष गेलेले आहे.
अभयारण्यांची भटकंती करताना दरवेळेस हा प्रश्न मला सतावतो की पर्यटक त्याच त्याच निवडक लोकप्रिय झालेल्या व्याघ्र अभयारण्यांना का भेट देत आहेत? ४७ व्याघ्र अभयारण्यं असतानाही पर्यटक काही निवडकच ८-१० व्याघ्र अभयारण्यांना भेट देतात. हा सर्व लोकांनी व प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीचा परिणाम आहे. त्यामुळे देशातील बाकीची व्याघ्र अभयारण्ये ही पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेली आहेत.
महसुलाअभावी त्यांचा विकास पुरेसा होत नाहीये. अर्थात यात चांगली एक गोष्ट घडते ती म्हणजे तिथल्या वाघांची पर्यटकांपासून सुटका होते. त्यांना त्यांच्या स्वत:च्या जंगलात मनमोकळं वावरायला मिळतं.
शिका-यांसारखे त्यांच्या मागावर राहणारे पर्यटक तिथे नसतात. तिथल्या पर्यावरणाची हानी कमी होते. मात्र यातली दुसरी तोटयाची गोष्ट म्हणजे अशा जंगलांमध्ये तस्करांचा वावर वाढतो. जिथे पर्यटकांची फारशी चहलपहल नसते तिथे त्यांना वावरायला, चोरटी शिकार करायला रान मोकळं मिळतं.
पर्यटकांची जिथे गर्दी असते तिथे निदान दिवसाढवळ्या तरी असे प्रकार घडत नाहीत; परंतु ही अभयारण्यं एकीकडे पर्यटकांच्या गर्दीपासून मुक्त राहतात तर दुसरीकडे देशातील काही मोजक्याच व्याघ्र अभयारण्यांमध्ये पर्यटकांची, फोटोग्राफर्सची, वन्यजीव अभ्यासकांची गर्दी उसळलेली असते. ही व्याघ्र अभयारण्यं जणू सेलिब्रिटी पार्कस् बनली आहेत. या पार्कचे सेलेब म्हणजे प्रमुख आकर्षण आहेत ते तिथले वाघ. ज्यातील काही मोजक्याच वाघांची माहिती आतापर्यंत आपल्याला आहे.
वास्तविक २ हजारांच्या आसपास वाघ देशातील जंगलात असताना केवळ मोजक्याच वाघांवर पर्यटकांचे लक्ष केंद्रित असणं ही खरं तर चुकीचीच गोष्ट. पण ती घडते आहे. यामुळे त्या वाघांच्याही जीवनाला धोका पोहोचतो आहे. सदासर्वदा हे निवडक वाघ, त्यांचे कुटुंब यांच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत टाकला जातो. गर्दी त्यांच्यापासून हटतच नाही. या वाघांना नावंही देण्यात आली आहेत. जणू काही हे अभयारण्य नसून एखादी सर्कसच असावी.
बांधवगढ, कान्हा, कॉर्बेट, ताडोबा, पेंच, रणथंबोर अशा काही निवडक व्याघ्र अभयारण्यांमधील वाघांचे अक्षरश: लाखो फोटो आज इंटरनेटवर पाहायला मिळतात. कारण इथल्या वाघांना पाहिलं नसेल असा माणूस मिळणं विरळच! या अभयारण्यांपर्यंत जाणं इतर व्याघ्र अभयारण्यांच्या तुलनेने सोपं असल्यामुळे पर्यटक तिथेच वारंवार जातात.
आज माझ्या माहितीत असे अनेक जण आहेत ज्यांनी ताडोबाला ५० वेळा भेट दिली असेल, मात्र त्यांनी तामिळनाडूतील सत्या मंगलम राष्ट्रीय अभयारण्याचं किंवा छत्तीसगढमधील अचानक मार व्याघ्र अभयारण्याचं नावही ऐकले नसेल. किंवा ऐकले असेल तरी तिथे भेट दिलेली नसेल.
सत्या मंगलममध्ये सुमारे २० वाघ अस्तित्वात आहेत. निश्चित आकडा माझ्याकडे नाही; पण तिथे नक्कीच वाघ सुखाने नांदतायत. सांगायचा मुद्दा हा की त्याच त्याच व्याघ्र अभयारण्यांमध्ये जाऊन त्याच त्याच वाघांचे फोटो काढण्याचा, त्यांना त्रास देण्याचा हा सोस सोडून द्या. लक्षात ठेवा, पर्यटकांच्या सततच्या येण्या-जाण्यानेही अरण्यातील पर्यावरणाची हानी होत असते. तिथली शांतता नेहमीच भंग होत असते.
आपल्याकडील ४७ व्याघ्र अभयारण्यांपैकी जी फारशी प्रसिद्ध नाहीत, अशी अभयारण्यं निवडा, तिथे जा, तिथला निसर्ग व वन्यजीवन पाहा. पाहण्यासारखं, घेण्यासारखं खूप काही आहे आणि पर्यायही आहेत. पण गरज फक्त तिथे वळण्याची आहे. गरज आहे ती समतोल वागण्याची. त्याच त्याच सेलिब्रिटी व्याघ्र अभयारण्यांमध्ये होणा-या गर्दीवर उपाय हवाय.
आपल्याला व्याघ्र पर्यटनातून भरपूर देशी व विदेशी महसूल मिळतो. या देशी-विदेशी पर्यटकांना फारशा लोकप्रिय नसणा-या व्याघ्र अभयारण्यांकडे जाण्यासाठी उद्युक्त केलं तर तो महसूलही वाढेल. हाच या समस्येवरील उपाय आहे.
आपल्या देशात लाखोंनी वन्यजीवप्रेमी आहेत. या अभयारण्यांची चांगली प्रसिद्धी केली, तिथे पुरेशा सोयी केल्या तर पर्यटक तिथे वळतील. परदेशी पर्यटकही नवी अभयारण्यं पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनाही उत्तेजन मिळेल व पर्यायाने विदेशी चलन भारतात येण्यालाही.
नव्या ठिकाणी जा याचा अर्थ तुम्ही कान्हा अभयारण्य कधीच पाहिले नसेल तरीही तिथे जाऊ नका असा नाही, तर कान्हा पाहून झाल्यावर उत्तर प्रदेशातील पिलभित अभयारण्यालाही कधीतरी भेट द्या. आज जिम कॉर्बेट पार्क असणा-या रामनगरमध्ये रिसॉर्टची भरमसाट गर्दी आहे. अशीच गर्दी कान्हा, रणथंबोर इ. सेलिब्रिटी पार्कभवतीदेखील आहे.
२५ वर्षापूर्वी ही स्थिती अशी नव्हती. मात्र लोकांनी याच व्याघ्र अभयारण्यांना वारंवार लक्ष्य केल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. त्यामानाने सुंदरबनसारख्या दुर्गम भागातील वाघ सुखात आहेत. कारण ते तिवरांच्या जंगलाच्या आड लपलेले आहेत; परंतु पेंच, बंदीपूर, नागझिरा, बांधवगढ अशा अतिच लोकाश्रय लाभलेल्या अभयारण्यांना हे सुख नाही. तिथे कायम असणा-या गर्दीमुळे प्रवेश परवान्याची समस्या ओढवते.
नव्या अभयारण्यांकडे पर्यटक वळले तर तीदेखील कमी होतील. खरं तर प्रत्येकच अभयारण्यातील निसर्ग व वन्यजीवन, हे खूप सुंदर व अनुभवण्यासारखं आहे. या लेखाच्या निमित्ताने तुम्हीही एक नवी सुरुवात करा व सेलिब्रिटी सॅन्क्च्युअरी नसणा-या एखाद्या व्याघ्र अभयारण्याला भेट द्या.

Tuesday, August 9, 2011

मनाचा वारू अफाट...जंगलात सुसाट

                                                             
एकदा का तुम्ही जंगलात पाऊल टाकलात कि जंगलाची नशा चढलीच समजा...जंगलं भासमय असतात..ती मोहात पडतात..वेड लावतात..तुमच्यावर जादुगिरी करतात..रूपं बदलतात..हे असं जंगल भटकंतीचं वेड लागलं ना कि मनुष्य नाद्खुळा होतोय बघा..मग तुम्ही कोणत्याही ठिकाणी असा..जंगलाची साद तुम्हाला मनात ऐकू येते..त्या हिरव्यागार वाटभुली, ते कानोसे घेणं, चाहुलीवर पहारा ठेवणं, ती शोधाशोध आणि ते लपंडाव, थर्राट शिकारी आणि रात्रीच्या गप्पा..सर्वच अगदी कसे हवंहवंसं..तरी हि रान तिथे दूर...आणि इथे शहरात फक्त भास आणि श्वासच !

हा सोबतचा व्हिडिओ मी स्वतः एडिट केलाय..एडिटिंग मधली मजा आणखी काही वेगळीच असते..हे तर अगदी साधे एडिट आहे..पण जरूर पहा..मजा येईल..नक्की :)


Tuesday, June 7, 2011

माझी कॉर्बेटकथा !

                                                          
'रुद्रप्रयागचा नरभक्षक', 'टेम्पल टायगर', 'कुमाऊंचे दिवस' अशी अनेक पुस्तकं, त्यातल्या जिम कॉर्बेट या धाडसी ब्रिटिश अधिकाऱ्यानं केलेल्या शिकारकथा आणि त्यातलं जंगलाचं वर्णन वाचून अंगावर काटा येत असे, पण या शिकारकथा नुसत्या वाचून काही समाधान होत नव्हतं. मग ठरवलं की जिम कॉर्बेटची ही कर्मभूमी म्हणजे आताच्या उत्तरांचलमधलं जिम कॉर्बेट नैशनल पार्क कसं आहे ते पाहायचेच.

जिम कॉर्बेट नैशनल पार्क रामनगर गावापासून सुरु होतं आणि याच गावात मोठ्या संख्येनं देशी-विदेशी पर्यटक उतरतात. जंगलात प्रवेश करण्याआधी वनखात्याची परवानगी आवश्यक असते. राहण्याची सोय आणि ही परवानगी अशी दोन्ही कामं मी मुंबईतूनच करून ठेवली होती. भारतीय रेल्वेच्या कृपेनं दिल्लीहून संध्याकाळी पाचला सुटलेली माझी गाडी रात्री एकच्या सुमारास म्हणजे फक्त साडेतीन तास उशिरा पोहोचली. तिथे अश्या अपरात्री माझ्यासाठी ताटकळत राहिलेल्या जिप्सी ड्रायव्हरपासून ते रिसोर्ट व्यवस्थापकापर्यंत सर्वांचेच मग मी आभार मानले.
जंगल सफारी सकाळी सहापासूनच सुरु होतात. पार्क पहाटे पाच वाजताच खुलं आणि संध्याकाळी पाच वाजता बंद होतं.ठिकठिकाणी चितळे, माकडं, काळवीट,सांबर, डुक्कर, मोर आणि अन्य विविध प्रकारचे प्राणी-पक्षी पाहायला मिळतात. नद्यांच्या काठावर मगरी आणि सुसरीही सुस्तावून पडलेल्या दिसतात.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी दिसणारी 'टर्माईट हिल्स' म्हणजे वारूळ.
जंगलात अजिबात प्रदूषण नसल्याची खात्रीच ही वारूळ देतात. या अभयारण्यात अजूनही काही गावं राहती आहेत ( आपल्या संजय गांधी नैशनल पार्कमध्ये काही कातकरी पाडे आहेत, तशीच ही गावं.) या गावांमध्ये वीजही नाही. पण इथल्या रहिवाशांना वर्षानुवर्षं राहिल्यामुळे जंगली श्वापदांचे फारसं भय वाटत नाही. १५ जून ते १५ नोव्हेंबर या काळात पार्क बंद असतं. गर्दीचा काळ हा साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी आणि एप्रिल ते मे महिन्याचा. सध्या पार्कमध्ये १६४ वाघ आहेत. मात्र कॉर्बेटसारख्या सुमारे हजार चौरस मैलांच्या परिसरात विस्तारलेल्या या जंगलात जाऊन लगेच वाघ दिसेलच अशी अपेक्षा ठेऊ नका. कारण हा जंगलचा राजा अतिशय लहरी आणि चतुर आहे. वाघ पाहण्याची खरोखर इच्छा असेल तर जास्त दिवसांचा मुक्काम हवाच. पण वाघ नजरेला पडलाच नाही म्हणून काही इथं येणारे वन्यप्रेमी निराश होऊच शकत नाहीत. रात्रीचं जंगल कसं दिसतं, काय बोलतं हे अनुभवायचं असेल तर इथल्या ढिकालाच्या जुन्या फोरेस्ट रेस्ट हाउसवर अवश्य मुक्काम करा, नव्हे कराच.
या जंगलामधल्या ढिकाला, बिजरानी, झिरनासारख्या विभागात फिरताना बऱ्याच ठिकाणी 'कॉल वेटिंग' वर थांबलेले पर्यटकांचे गट भेटतात. 'कॉल वेटिंग' म्हणजे शहरी माणसांची समजूत होईल की, फोनवरचं 'कॉल वेटिंग',पण जंगलाची डिक्शनरी वेगळी आहे, वाघ ज्या एरियात प्रवेश करतो, तेव्हा माकडं, सांबर खाकरून इशारा देतात, हरणं चौखूर उधळतात आणि पक्षीदेखील ओरडून संकेत देतात. या सर्व प्रकाराला अलर्ट कॉल म्हणतात आणि अश्या वेळी त्या एरियात जाऊन वाघाची वाट पाहत थांबणं म्हणजे 'कॉल वेटिंग. फक्त वाघ आणि वाघच पाहणार असं ठरवून आलेले पर्यटक, अशा ठिकाणी दुर्बिणीला डोळे लावून बसलेले असतात. इथं जंगलात फिरण्याचे परमिट लागतं. आतमध्ये फिरण्यासाठी बाराशे ते दोन हजार रुपये दरानं जिप्सी भाड्यानं मिळतात.
हे पार्क संपूर्ण पाहायचं तर कमीत कमी आठवडा हवाच.  संपूर्णपणे एकट्याने केलेली  ही माझी पहिलीच जंगल सफारी होती त्यामुळे ती अधिकच रोमांचक झाली.  हा सर्व वन्यप्रदेश अत्यंत सुंदर आणि विशेष म्हणजे प्रदूषणमुक्त आहे.त्यामुळे मोकळा श्वास घेणं काय असतं हे अनुभवण्यासाठी इथं एकदा आलंच पाहिजे आणि हो..सोबत चांगला कॅमेरा मात्र हवाच.
कसे जाल कुठे राहाल
रामनगरमध्ये ६० हुन अधिक असे स्वस्त आणि महागडे देखील टूरिस्ट लॉज आणि रिसोर्ट आहेत. जवळ पंतनगरला विमानतळ आहे. हल्द्वानीलाही तो लवकरच होईल. दिल्ली- पंतनगर विमानप्रवास करून मग पुढं कोणत्याही वाहनानं रामनगरला ३-४ तासात पोहोचता येतं. दुसरा पर्याय म्हणजे दिल्ली-रामनगर उत्तराखंड संपर्क क्रांती एक्स्प्रेस पकडावी आणि थेट कॉर्बेट पार्क जंगलाच्या दारात उतरावं.
भेट सीताबनीची...
सीताबनीला उशीरच म्हणजे संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहचले. वाटेतच एक नरभक्षक वाघ याच भागात फिरत असल्याचं पेट्रोलिंगसाठी निघालेल्या वन अधिकाऱ्यांकडून समजलं. सीताबनी हा कॉर्बेटच्या अगदी बाजूलाच लागून असलेला घनदाट असा बफर झोन आहे. उंचच उंच देवदार वृक्षांच्या जंगलामधून जाणारा नागमोडी वळणाचा रस्ता या प्रवासातले थ्रील वाढवत होतं. या वाघानं काही दिवसांपूर्वीच गावातल्या एका बाईवर हल्ला केला होतं. हा भाग बघायची तीव्र इच्छा आणि ड्रायव्हरनं दिलेल्या पाठींब्यामुळं मी शेवटपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात चांगलाच अंधार झाला आणि प्रत्येक गवताच्या पात्यामागे मला वाघ असल्याचा भास होत होतं. सोबतीला ड्रायव्हर गावात येणाऱ्या वाघांचे किस्से सांगत होता. हट्टाने घेतलेला निर्णय अंगाशी येतो की काय असे वाटू लागलं होतं..अंगावर काटा येत होता..उघडी जिप्सी आणि त्यात मी आणि ड्रायव्हर असे दोघेच जण..पर्यटक म्हणून वाघ मला सूट देईल असे काहीच नव्हतं. वाटेत परतणारा एक गट भेटला, त्यानाही वाघाची चाहूल लागली होती म्हणूनच ते ही वेगानं गावाकडे परतत होते. मग शेवटच्या गेटपर्यंत जाण्याचा निर्णय रद्द करून मी देखील ड्रायव्हरला जिप्सी परत वळवायला सांगितली.
कॉर्बेटच्या प्रवासात वाघ नाहीतरी हत्तीच्या पाठलागाला पाठ( !) देताना जीव कसा गोळा होतो, हे मात्र मला कळलेच. हत्तीच्या शोधात आम्ही जिप्सी दाट गवतात घातली. काही अंतर जाताच एक तस्कर( सुळेवाला हत्ती ) त्या गवतामधून उगवला आणि जोरानं चीत्कारून त्यानं आम्ही आल्याचं अजिबात आवडलं नसल्याचं सांगून टाकलं. गाईड ऐकायला तयार नव्हता. त्याला हत्तीच्या अधिक जवळ जायचं होतं. जीप थोडी पुढं सरकताच त्या हत्तीनं दाणदाण पाय आपटून जीपच्या दिशेनं मोर्चा वळवला. मग आमच्या ड्रायव्हरनं कशीबशी जिप्सी मागं वळवली आणि आम्ही तिथून सुंबाल्या केला !
P:S २०११ च्या व्याघ्रगणनेत कॉर्बेट पार्क मध्ये २९५ वाघ असल्याचं समजतं. लेखात नमूद केलेली संख्या ही २००८ सालची आहे.

Note:- This article was earlier published in Marathi news daily 'Prahaar' on 17th January 2009.Link is not available in archives.