Translate

Friday, September 25, 2015

मैलांमागची स्वप्नं



प्रत्येकाच्या जगण्याला काहीएक अर्थ असतो, त्याचप्रमाणे एकेकाच्या प्रवासालाही काही अंत-उगम असतो, उद्दिष्ट असतं. प्रत्येकाच्या प्रवासाला काही एक वेगवेगळा उद्देश असतो. व्यक्तीनुसार बदलत जाणारी आवड लक्षात घेऊन हल्ली पर्यटनाची व्याख्याही बदलत चालली आहे. भटकंती करणा-यांप्रमाणेच पर्यटन व्यावसायिक कंपन्या देखील नवनवीन कल्पनांच्या व जागांच्या शोधात आहेत.

CANOE-WHANGANUI-1200अरण्याचं वेड मला लावलं ते जिम कॉर्बेट यांच्या रोमांचक पुस्तकांनी. त्यांची पुस्तकं वाचताना आपण त्या उत्तरांचलच्या गढवाल-कुमांऊच्या प्रदेशातच फिरतो आहोत, असं वाटत असे. शाळकरी वयापासून जिम कॉर्बेट यांची इंग्रजी-मराठी अनुवादित जंगल कथांची सर्व पुस्तकं वाचून काढलेली होती. त्यामुळे त्यांच्या थरारक साहसी शिकारकथांचं गारुड मनावर होतं.
जिम कॉर्बेट हे जिथं राहिले, ज्या भारतीय माणसांनी त्यांच्यावर जीव लावला, जिथल्या नरभक्षक वाघ व बिबटय़ांनी कॉर्बेट यांना एक पटाईत शिकारी बनवलं, ज्या कुमांऊच्या प्रदेशात कॉर्बेट रमले त्या प्रदेशाची ओळख करून घेण्याची इच्छा मनात दाटून राहिलेली होती. जिम कॉर्बेट यांच्या स्मृतीखातर उत्तरांचलच्या प्रदेशात राष्ट्रीय उद्यान बनवण्यात आलं. जंगलकथा भरपूर वाचल्या असल्या तरीही कधी जंगलात पाऊल टाकलं नव्हतं. त्यामुळे सोबत कोण येणार असं विचारत विचारत एक दोघांना तयारही केलं होतं.
ऐनवेळी वन्यजीवनाची फारशी आवड नसणा-या या मित्रमंडळींनी काढता पाय घेतला आणि अस्मादिक एकटेच पोहोचले जंगलात! मुंबई ते दिल्ली पुन्हा दिल्ली ते रामनगर हा सर्व प्रवास खूपच मजेशीर व अविस्मरणीय होता. एकटयाने केला म्हणून नव्हे तर या प्रवासात कित्येक अशा गोष्टी घडल्या, ज्यामुळे या लांबलचक प्रवासाचा अजिबात कंटाळा आला नाही.
दोन दिवसांच्या प्रवासानंतर अखेर जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा इतक्या लांबवर आल्याचं सार्थकच झाल्यासारखं वाटलं, इतकं हे कॉर्बेटचं जंगल मोहात पाडणारं आहे. एकतर जंगल हा प्रकार कसा असतो ते कधी पाहिलं नव्हतं व मला वाटतं हे प्रत्येकाबाबत घडत असते. पुढे देशातील अनेक अरण्यांबाबत गोष्टी वाचनात येऊ लागल्या व प्रत्येक ठिकाणी आपण जावं असं वाटू लागलं. पण प्रत्येकच वेळी कोणी सोबत असतं असं नाही होत, त्यामुळे पाठंगुळीला सामान बांधून पाहिजे तिथे जायचं असं ठरवलं.
कुठल्या तरी क्षणी आपण सर्व सग्यासोबत्यांची साथ न घेता एकटयानेच चालू लागतो, त्यांच्या बरोबर असण्याची-नसण्याचीही आपल्याला फिकीर वाटत नाही, इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत आपली तगमग होत राहते; परंतु या प्रवासाच्या व पाहिजे ते मिळवल्याच्या आनंदात आपल्या मागे घरी राहिलेल्यांचाही आपल्याला विसर पडतो. पुढे-पुढे अट्टल फिरस्ते बनल्यावर घरच्यांनाही याची सवय होते.
निसर्गात कोणतीही घटना घडण्यामागे एखादे कारण असते, त्याप्रमाणे प्रवास घडून येण्यामागेही एखादे कारण प्रत्येकाचे असते. कोणाला एखाद्या लिखाणातील वर्णन पाहून एखाद्या ठिकाणी जावेसे वाटते तर कधी वीर सावरकरांसारखी एखादी व्यक्ती अनेकांच्या अंदमान भेटीला कारण ठरलेली असते. कधी फुलपाखरांच्या अभ्यासासाठी भीमतालसारख्या सुंदर ठिकाणी भेट दिली जाते तर कधी केवळ फक्त छंद म्हणून निरनिराळ्या ठिकाणच्या देवळांना भेट दिली जाते.
कोणाला एखादी परिक्रमा पूर्ण करायची असते. प्रत्येकाचे उद्देश वेगवेगळे असतात. प्रवासाला कसं स्वरूप द्यायचं हेही आपल्यावरच अवलंबून असतं. काही जणांना खर्च होणा-या पैशांचं समाधान देईल, असा प्रवास म्हणजे व्हॅल्यू ट्रॅव्हल करायला आवडतं. व्हॅल्यू ट्रॅव्हल म्हणजे थोडंफार बजेट ट्रॅव्हलसारखाच प्रकार. फक्त यात पैशांची मर्यादा फिरणारा बाळगत नाही, त्याला फक्त त्याने खर्च केलेल्या पैशांमध्ये प्रवासातली सर्व वैशिष्टय़ं दिसणार आहेत की नाही याची काळजी असते. अनेक टूर कंपन्यांकडे अशाच व्हॅल्यू ट्रॅव्हलचे पर्याय असतात. त्यांचा उद्देशच मुळी अशा व्हॅल्यू ट्रॅव्हलर्सना म्हणजे ‘काळजीवाहू’ पर्यटकांना वेचण्याचा असतो.
‘१२ हजारांत मध्य प्रदेशातील १२ विख्यात ठिकाणं पाहा’ अशा जाहिराती वाचून सहलीवर जातात ते असेच पर्यटक असतात. अशा पर्यटकांना रोज उठल्यावर एका शहरातलं फिरणं पूर्ण करून दुसरं शहर लवकरात लवकर गाठायचं असतं. तशी आखणीच मुळी केलेली असते. मग त्या नियोजनात कुठे काही पुढे-मागे झालं की सहलीचा बोजवारा तर उडतोच, शिवाय अशा सहलींमध्ये व्यवस्थांचे गोंधळ, तडजोडी, धावाधाव हे ठरलेलंच असतं.
अर्थात, अशा सहली काही चुकीच्या आहेत असं नाही. पण एखाद्या मंदिराबाहेर बसलेल्या साधूबाबाने सांगितलेलं जीवनाचं तत्त्वज्ञान आणि जे. कृष्णमूर्तीनी सांगितलेलं जीवनसार यात जेवढा फरक असतो तेवढाच अशा सहलींमध्ये व इतर मनमोकळ्या प्रवासांमध्ये असतो. फक्त वीकेंडच मोकळा मिळणा-या, अहोरात्र कामात गढलेल्या हल्लीच्या पिढीसाठी ‘शॉर्ट ब्रेक्स’ नावाच्या सहली अनेक कंपन्यांनी सादर केलेल्या आहेत. ज्यात पटकन जाऊन येता येईल अशा ठिकाणी सहल नेली जाते. हे शॉर्ट ब्रेक्सही थोडेफार व्हॅल्यू ट्रॅव्हलसारखेच. वेळेत बसवलेलं गणितच.
एखादा प्रवास हा आपण फक्त निव्र्याज आनंदासाठी करत असतो. मनात काहीही नसतं. काहीही पाहायचं नसतं. कुठेही फिरायचं नसतं, साईटसिईंग करायचं नसतं. फक्त साधासरळ प्रवास करत त्याची मजा अनुभवयाची असते. आपले सोबती कोण असतील, काही अडचणी येतील का, पैसे पुरतील का, पाहिजे त्या सोयीच मिळतील का अशा फुटकळ चिंता वा-यावर सोडून देऊन असा प्रवास करायचा असतो. त्यातला आनंदानुभव घ्यायचा असतो. एखाद्या वेळेस वाटतं की शहर सोडून निवांत कुठेतरी अज्ञातवासात जाऊन राहावं.
आताशा अज्ञातवास हा कोणालाही मिळणं मुश्कीलच, पण त्यातल्या त्यात जिथे पर्यटकांची गर्दी नसेल, स्थानिक लोकांखेरीज फारशी कोणाला ज्याची माहिती नसेल अशी ठिकाणं आपल्या देशात अजूनही आहेत. फक्त थोडं चौकस राहून त्यांचा शोध घ्यावा लागतो.
हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक अशा कित्येक राज्यात सुंदरशी गावं आहेत जिथपर्यंत कोणाचीच नजर गेलेली नाही. अशा ठिकाणांची माहिती फक्त आजूबाजूच्या लोकांकडूनच मिळत असते किंवा वाटेवरून जाताना अशी ठिकाणं नजरेस पडतात. त्यांची माहिती मिळवून एखादी छानशी सुट्टी तिथे घालवता येणं शक्य आहे. असा मुक्तछंदी प्रवास काही जण स्वत:च्या आवडीच्या वाहनानेही करतात. रोड ट्रिप त्यातल्याच. मग काही जण बाईक घेतात किंवा अगदी सायकलवरून देखील काही जण सफर करतात.
हल्ली काही जण स्वत:ची यॉट घेऊन समुद्र सफरही करतात. यॉटिंग करत-करत मुंबई-गोवा, मुंबई-कोची वगैरे छोटी अंतरं जाता येतात. काही जण आराम मिळवणं म्हणजे लीशर ट्रॅव्हलव्यतिरिक्त स्वत:च्या छंदांसाठीही प्रवास करतात. ज्यात प्रामुख्याने छंदासाठीचा अभ्यास समाविष्ट असतो. त्यात येतात फिल्ड ट्रिप्स. निसर्ग अभ्यासक, इतिहासाचे किंवा वास्तुकलेचे अभ्यासक, विज्ञान संशोधक यांच्यासाठी अशा फिल्ड ट्रिप्स महत्त्वाच्या असतात. याचा फायदा असा की अशा फिरण्यातून अभ्यास तर होतोच, शिवाय जनसंपर्कही वाढतो, निरनिराळ्या लोकांना भेटण्याची संधी मिळते.
पर्यटनाच्या क्षेत्रातला नवा टप्पा म्हणजे थीम बेस्ड् ट्रॅव्हल. ही थीम ठिकाणांची, शहरांची नाही तर तुमच्या आवडीप्रमाणे सहलीचं, पर्यटनाचं नियोजन केलं जातं. तुम्ही संगीतकार असाल तर संगीत क्षेत्राशी संबंधित ठिकाणी नेलं जातं, तिथे काही संवाद-अभ्यास होतो. काहींना खाद्यप्रकारांची आवड असेल तर उत्कृष्ट खाद्यसंस्कृती असलेल्या ठिकाणी त्यांना नेलं जातं. प्रत्येकाच्या प्रेरणेनुसार प्रवासामागे अशी खूप काही कारणं असू शकतील. मुळात कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारी सहल करायची की आरामात रमत-गमत फिरायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न.
Print Friendly
Tags:  |  | 

वाघ आहे म्हणूनच..



रणथंबोरच्या जंगलात तळ्याकाठी ती चार रुबाबदार पिल्लं, (खरं तर वाघाचे बच्चे, कारण साधारण एक वर्षाचे झाल्यावर वाघाचे बच्चे हे गोंडस पिल्लं वगैरे म्हणण्याला लायक राहात नाहीत. कारण त्यांच्यातला देखणा वाघ आकार घेत असतो.) त्यांच्या तेवढयाच उमद्या दिसणा-या, आईभोवताली खेळत होती. काही प्राणी पाहिल्यावर आपल्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. वाघ हा त्यातलाच एक. 
tigerजंगलातल्या खेपा अधिकाधिक वाढू लागल्या तसं लक्षात आलं की वाघ दृष्टीस पडणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही. एकतर वाघ संख्येने उरलेत थोडके व त्यातच तो एकांतप्रिय प्राणी, कुठे तरी गवतात दडून राहणारा, त्यामुळे तो प्रत्येक वेळीच दिसेल असं नाही.
वाघाचं दर्शन हे खरोखरीच सुखावणारं आहे, वेड लावणारं आहे; पण म्हणून दरवेळीच हे सुख मिळेल असं नाही. त्याचं येणं हे अंगावर थरार उमटवणारं आहे. तो आला की आपल्यापुढे स्तब्धपणे पाहण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. (अर्थात अनेक जण वाघ पाहतानाही घरात असल्यासारखी कचकच करतात ती गोष्ट वेगळी!)
वाघाच्या बछडय़ांचं ते गवतात बागडणं, आईच्या अंगावर लोळणं, तिला सतावणं, झुडपांमध्ये लपाछपी खेळणं, एकमेकांशी मस्ती करणं, पाण्यात डुबकी मारणं हे सर्व पाहताना कमालीचा थरार वाटत तर होताच; पण एकीकडे खूप वाईटही वाटत होतं.
गराडा घालून उभ्या असणा-या माणसांबद्दल अनभिज्ञ असणा-या या पिल्लांचं आयुष्य निसर्गावर नाही तर त्याच्या भोवतालच्या माणूस नावाच्या भयानक, वाघापेक्षा हिंस्त्र प्राण्यावर अवलंबून आहे हा विचार मनाला घाबरवत होता. व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर नेहमी एक पोस्ट वाचायला मिळते, एका चित्रात एक ग्रेट व्हाईट शार्क पोहताना दाखवलाय व त्याच्या बाजूला लहानसा दिसणारा माणूस पोहतोय.
चित्रात लिहिलंय की तुम्ही पाहताय तो जगातला सर्वाधिक हिंस्त्र प्राणी आहे व त्याच्या उजव्या बाजूला शांतपणे पोहतोय तो ग्रेट व्हाईट शार्क आहे. या संदेशामधून माणसाने आजवर जगातल्या कित्येक प्रजातींची किती अमाप हानी केलीय हे लक्षात येतं. ग्रेट व्हाईट शार्क हा समुद्रातला उत्तम शिकारी, परंतु माणूस हा त्याच्याही पेक्षा हिंस्त्र शिकारी. त्याचप्रमाणे वाघ हा जमिनीवरला सर्वोत्तम शिकारी, जंगलचा राजा, मात्र माणसाने वाघांनाच नष्ट करून त्याचा हा किताब पायदळी तुडवलाय.
‘आपण जगातले सर्व वाघ संपवलेत..’ हे वाक्य लिहिलं जाईल तो काळ फारसा दूर नाही. ३,२०० या वाघांच्या आत्ताच्या आकडयातले ३, २ चे आकडे पुसले जाऊन फक्त शून्य वाघ उरतील, त्यासाठी खूप काळ लागणार नाहीये. १९१३ सालापर्यंत आशिया खंडात एक लाखाहून अधिक वाघ होते, यावर विश्वास बसणं आताच्या पिढीतल्या कोणाहीसाठी कठीण आहे. मागील शंभर वर्षात ९७ टक्के वाघ विविध कारणांनी नाहीसे झाले.
आज पूर्ण जगात मिळून फक्त ३,२०० जंगलात खुले फिरणारे वाघ उरलेत. त्यातील किती जण तस्करांच्या बंदुकीच्या निशाण्यावर आहेत हे माहीत नाही. हा आकडा खूपच भयावह व दुर्दैवी आहे. नुकताच जागतिक वाघ दिवस जगातल्या अनेक ठिकाणी, अनेक संस्थांनी विविध कार्यक्रम करून साजरा केला.
२०१० साली सेंट पीट्सबर्ग टायगर समिटमध्ये ग्लोबल टायगर डे दरवर्षी २९ जुलैला असेल, अशी घोषणा करण्यात आली. खुल्या जंगलात राहणा-या वाघांना अधिक संरक्षण मिळावं, त्यांचं संवर्धन व्हावं यासाठी हा दिवस ठरवण्यात आला आहे. यंदा फक्त ३,२०० वाघ या दिवसाचे मानकरी होते.
आपण भारतीय त्यामानाने सुदैवीच म्हणायला पाहिजेत की आज इथे आपल्या मुलांना दाखवण्यासाठी जंगलांमध्ये थोडे तरी वाघ शिल्लक आहेत. किंबहुना भारतीय पर्यटनाला ‘ग्लॅमर’ मिळवून दिलं ते वाघांनीच. ‘इन्क्रेडिबल इंडिया टुरिझम’च्या महसुलातील अत्यंत महत्त्वाचा वाटा वाघ उचलतो.
तसे वाघ रशिया, चीन, नेपाळ, थायलंड, बांगलादेश, कंबोडिया, म्यानमार, दक्षिण कोरिया, लाओस, इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम व भूतान येथे देखील आहेत. पण जगात इतर कोणत्याही देशापेक्षा जंगलात मोकळ्या फिरणा-या वाघांची संख्या आपल्या देशातच जास्त आहे त्यामुळे साहजिकच वाघ या दुर्मीळ ठरलेल्या प्राण्याला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटकांना इथे यावं लागतं.
मात्र ही स्थितीदेखील फार दिवस टिकेल याची शाश्वती नाही. याचं कारण आपल्याकडचं वाघांच्या अवैध शिकारीचं प्रमाण. अर्थात, या सर्वात सकारात्मक बाजू म्हणजे भारत व जगातील इतर देशांमधून अनेक व्यक्ती व संस्था या वाघांचं संवर्धन व संरक्षणासाठी पुढे येत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण वाघांचं संरक्षण करायचं असेल तर त्यांच्या आजूबाजूला राहणारी माणसं व वाघांमध्ये सुसंवाद जोडला जाणं अत्यंत गरजेचं आहे. या दोघांनीही एकमेकांचं अस्तित्व आनंदाने स्वीकारून तडजोड करून राहणं आवश्यक आहे. जंगलांच्या आसपास राहणा-या या माणसांना वाघाचा थेट सामना करावा लागतो. इथे शहरात राहून वाघ बचाव
मोहिमेबद्दल लिहिणं सोपं असतं, मात्र वाघाचा वावर असलेल्या परिसरातून बॅटरी वा कंदील घेऊन चालत जाण्याचं धारिष्टय़ आपल्यापैकी शहरात राहणारे किती जण दाखवू शकतात? त्यामुळे वाघांच्या संवर्धनाचे उपाय सांगताना, ते प्रत्यक्षात आणताना फिल्ड वर्क, तिथल्या लोकांशी संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं आहे.
आज जगातील कित्येक नामवंत मंडळी, मोठया संस्था या वाघांच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. भरपूर पैसा ओतत आहेत. पण फक्त म्हणूनच वाघ जिवंत आहेत असं नाही, तर वाघांसोबत प्रत्यक्ष जंगल शेअर करणा-या माणसांमुळे देखील ते जिवंत आहेत.
वाघांच्या नष्ट होण्यामागील एक मोठं कारण म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास नाहीसा होणं हे आहे. वाघांसाठी जंगलच उरलं नाही तर त्यांचं आसरा व खाद्याविना नष्ट होणं हे स्वाभाविकच आहे. वाघांच्या अस्तित्वासाठी आवश्यक जैविक साखळी तिथं प्रत्यक्ष राहणारा माणूस टिकवतो. तिथला वनाधिकारी टिकवतो. जंगलासाठी महसूल उत्पन्न करणारा पर्यटक टिकवतो.
तिथले (शिका-यांची नजर न पडलेले) प्राणी टिकवतात. वाघ नाहीसे होण्यासाठी वातावरणातील बदल हे सुद्धा मोठं कारण ठरलं आहे, विशेषत: पश्चिम बंगालमधील सुंदरबनातील वाघांवर याचा जास्त परिणाम होतो आहे. आज सुंदरबनात वाघ पाहायला मिळणं अत्यंत कठीण आहे. तिवरांच्या जंगलाचा नाश, तसंच पाण्याची वाढती पातळी अशा काही कारणांमुळे इथे वाघांची संख्या कमी होते आहे.
आज वाघ आययूसीएन संस्थेने रेड लिस्टमध्ये दुर्मीळ या प्रकारात समाविष्ट केला आहे. उद्या तो अत्यंत दुर्मीळ, त्यानंतर नामशेष अशा प्रकारांमध्ये जायला वेळ लागणार नाही. अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे वाघाच्या नामशेष होण्याची वाट पाहणारे देखील जगात लाखोंनी आहेत. याला कारण वाघाच्या शरीराच्या भागांची तस्करी, वाघाच्या शरीराचे मिशांपासून ते नखांपर्यंत सर्व भाग अवैधरित्या खरीदले जातात व उपयोगात आणले जातात. हा व्यापार खूप मोठा आहे आणि वाघांच्या या घटत्या संख्येचंही ते एक मोठं कारण आहे. वाघाच्या शरीराचे भाग लाखो रुपये देऊन काही श्रीमंत ग्राहकांनी संग्रहात ठेवलेले आहेत. जसजशी वाघांची संख्या कमी होते आहे तसतशी या ‘अमूल्य’ संग्रहाची किंमत वाढते आहे. त्यांच्या नामशेष होण्यावर सट्टा लावणारे देखील आहेत. नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिव्हल साजरा होतो,
मात्र हे पक्षी अति शिकारीमुळे तिथून नाहीसे झालेत. आता हॉर्नबिल पक्ष्यांची निशाणी फक्त तिथल्या लोकांच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये उरली आहे. या पक्ष्यांप्रमाणेच वाघांवरही अशी वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा वाघ फक्त दिवाणखान्यातील त्याचं कातडं, त्याच्या अंगापासून बनवलेली औषधं, दागिने, कपडे अशा वस्तूंमधून उरेल.
सुदैवाने भारतीयांवर अजून अशी वेळ आलेली नाहीये. आपल्या जंगलांमध्ये वाघांचा मुक्त संचार आजही आहे. परंतु आज प्रत्येक वेळी भारतीय जंगलांमध्ये मुक्त संचार करणारा वाघ पाहिल्यानंतर हा थरार, हा रोमांच पुन्हा एकदा अनुभवता येईल की नाही, असा प्रश्न मनात उभा राहतो.
Print Friendly
Tags:  |  |  |  |  | 

माती असशी, मातीत मिळशी !

कधीकधी अभ्यासानिमित्ताने कुठे कुठे जंगलात जायची संधी मिळते. कधी असाच एखादा फेरफटका असतो. कारण काहीही असो, जंगलाकडून येणा-या हाकांना साद नाही द्यायची म्हणजे दुर्दैवच. अशा काही जंगलांमध्ये आपल्याकडे एवढी घनगर्द हिरवाई टिकून आहे की, आपण कुठे पोहोचलो आहोत याचं नवल वाटावं. त्या हिरवाईकडे पाहता पाहता मन गुंगून जातं.
Jungleडोंगराच्या शिखरावर पोहोचण्याची कोण घाई लागलेली असते. वर झटापट का चढायचं, तर तिथे आपल्याशी स्पर्धा करत ढग आपल्यापुढे वरवर पळत असतात. बरं, त्यांच्यावर नजर टिकवावी तर खाली अथांग दरी पसरलेली असते. पाऊल चुकलं तर आपलं भविष्य समाप्त हे निश्चित. पण कधी वाटतं की ही खाई एवढी आदिम आणि तिच्या हिरवाईने एवढी भारून टाकतेय.
कधी बेपत्ता व्हायचंच असेल तर इथेच व्हावं. एखाद्या समुद्राकडे पाहतानाही असाच विचार मनात येतो. ही प्रेरणादेखील आदिमची असावी. स्वत:च्या उत्क्रांतीचा गाजावाजा करणा-या माणसाला त्याचा पूर्ण थांगपत्ता तरी कुठे लागलाय, एवढंच असतं तर आजच्या दुनियेत समोरच्या माणसाला ओळखणंही सहज सोपं झालं असतं. त्यामुळेच कदाचित अथांगाची, जे माहीत नाही ते जाणून घ्यायची ही ओढ असावी. मग अशा हिरवाईने चारीठाव बहरून आलेल्या द-याखो-यांना पाहिलं की ही ओढ कुतूहल निर्माण करते.
जिथे जाऊ शकत नाही तिथे जायची ही ओढ असते. निसर्गातून येऊन निसर्गातच पुन्हा मिसळून जाण्याची ही प्रेरणा सर्वामध्येच असते. फक्त ती प्रत्येकाला अमलात आणता येते असं नाही. ज्यांना येते त्यांचं आयुष्य झळाळून उठतं. अंशी-दांडेलीच्या जंगलासमोर उभं राहिल्यावर असेच विचार मनात येत होते. सभोवार आपण उभे आणि अरण्याने चहूबाजूंनी हिरव्या हातांनी आपल्याला कवटाळलेलं असतं.
आपल्यालाही दूर उभ्या असलेल्या वनराईला स्पर्श करता यावा असं वाटतं. परंतु ते शक्य नसतं. मग वाटून जातं की आपण तिथलेच कोणी स्थानिक आदिवासी असतो तर किती बरं झालं असतं. या जंगलाशी आपसूकच नातं जुळलं असतं. गडचिरोलीचं जंगल असो किंवा तामिळनाडूमधलं, इथल्या स्थानिकांनाही हेवा करावा अशी संपत्ती लाभलेली आहे. ते शतकानुशतकं या अरण्यात वावरतायत.
अरण्याशी बोलण्याची त्यांची एक वेगळी भाषा आहे. या स्थानिकांकडे पाहिलं की, त्यांच्यात वावरलं की आपण किती क्षुद्र आहोत असं वाटतं. कारण एकदा खोल अरण्यात गेल्यावर तुमचे आयफोन वगैरे कवडीमोल होतात. तुमच्या लाखोच्या कॅमेरात बंद करायला धावाल तर तिथे अजूनच काहीतरी धमाल अधिकाधिक वेगाने घडत राहते. कृष्णमेघ कुंटे यांचं पुस्तक आहे, ‘एका रानवेडयाची शोधयात्रा’. त्यात एक लेख आहे. पुस्तक अप्रतिम व कोणत्याही जंगलवेडयाला आवडेल असं आहे. तर या लेखात मुदुमुलाईच्या जंगलातल्या एका अशाच गर्द खाईमधल्या वनसंपदेचं वर्णन आहे. हे पुस्तक वाचताना एखाद्या जंगलात हरवल्यासारखंच वाटतं.
तर आपण असे एखाद्या ठिकाणी पोहोचलेलो असतो, जिथे कुठेही पाहिलं तर समोर पसरलेली घनदाट प्राचीन वनराई असते. आपल्या नजरेला वरचेवर झेलून परत पाठवणारा तो हिरवागर्द गच्च थर, तिथे सूर्याची किरणंही कित्येक र्वष पोहोचलेली नसतील असं वाटतं. अशा या हिरव्या रंगाच्या अनेक छटांचे अनेक फटकारे पडलेल्या जंगलात न जाणो कितीतरी प्राणी-पक्षी कधीपासून राहात असतील. त्यांची तिथंच उत्क्रांती होत गेली असेल.
जंगलाला माणसाचा वाराही लागलेला नसल्यामुळे ते सुरक्षित राहिलेले असतात. अशा या अरण्यावरून येणारा वाराही रोमांच देऊन जातो. तिथे आतपर्यंत पोहोचणं अशक्य नाही; पण खूप कठीण मात्र असतं. कडयाच्या टोकाला दूरवर उभं राहून पाहण्यातही एक वेगळाच थरार असतो.
धट्टयाकट्टया माणसालाही हलवेल असा वारा सुटलेला असतो. काही बोलावं तर ऐकूही जाऊ नये एवढा वा-याचा आवाज, तो असा खोल दरीत सूर मारून वर येत असावा, मग शिखरावर घिरटया घालून, एखाद्या ढगाची छेड काढून पुन्हा दरीकडे झेपावत, झाडाझुडपांना धक्के मारत त्याचा संचार सुरू असतो. आपल्यासमोर निसर्गाचा अनाकलनीय देखावा मांडलेला असतो. त्या हिरव्या चित्रात दूरवर कुठल्या तरी नदीच्या नागमोडी वळणांनी पांढ-या रेषा उमटवलेल्या असतात.
ढगांकडे पाहावं तर त्यांनी गर्द होण्यामध्ये खालच्या वनराईशी स्पर्धा लावलेली असते. कोणत्याही क्षणी तुफान पाऊस कोसळेल अशी स्थिती असते. नजरेच्याही पल्याड जाणा-या डोंगररांगा. तिथे कोण वस्तीकरून असावं असा प्रश्न पाडतात. आपण इथपर्यंत यावं यातच आपलं सद्भाग्य असावं असं वाटून जातं. इथून पुढे जास्त वेळ थांबलो तर अजूनच गहन प्रश्न पडतील, मग त्यांचा सामना नको म्हणून आपलं क्षुद्रत्व तसंच अंगी राहू देऊन आपण पुन्हा उतरू लागतो.
कधी कोणाला मनातलं सगळं सांगून टाकावं असं वाटत असेल तर खुशाल अशा एखाद्या अरण्यात जाऊन मन मोकळं करून यावं. मागे एकदा सिरसीजवळच्या भीमनवारे हिलपॉइंटवर गेलो होतो. तेव्हा अक्षरश: नि:स्तब्ध झालो होतो. त्या निसर्गाच्या जादूपुढे आपले बोल मुके होतात. किती पाहशील दोन डोळ्यांनी अशी गत होते.
आपल्या भारतात आजही अशी काही ठिकाणं आहेत. जिथपर्यंत माणसाची उद्ध्वस्त करण्याची नशा पोहोचलेली नाहीये. त्याचे संहारक हात पोहोचलेले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत असं काही शोधता येईल तिथे जात राहावं. मनातली ओझी तिथं हलकी करावीत आणि देहावरले शून्यमोल निर्थक मुलामे ओघळून जाऊ द्यावेत.
Print Friendly
Tags:  |  |  | 

उत्साही वन्यजीवप्रेम

भारतीय पर्यटन व्यवसायात सध्याच्या काळात चांगली चालणारी एक शाखा म्हणजे वन्यजीव पर्यटन व्यवसाय. जोपर्यंत भारत आपलं प्राणीवैभव टिकवून ठेवेल आणि वन्यजीवप्रेमी असतील तोपर्यंत या व्यवसायाला मरण नाही.
kanhaसकाळी १० किंवा संध्याकाळी साडेपाच वाजताची वेळ. स्थळ कोणतंही व्याघ्र अभयारण्य आणि तिथल्या गेटवर उभ्या असणा-या जंगल जिप्सीज व कँटर्स. चर्चा एकच. तुम्हाला वाघ दिसला का? आणि तो नाही दिसला तर मग कोणते प्राणी दिसले? अशा अनेक रसरंजित गोष्टींची देवाण-घेवाण केली जाते. त्या दिवसात वाघ न दिसलेल्यांच्या चेह-यावर उद्या तरी तो दिसेल का याचं प्रश्नचिन्ह दिसत असतं. दिसलेल्यांच्या चेह-यावर अतोनात आनंद असतो. मग, ‘दिसेल हो तुम्हालाही उद्या’ असा सांत्वनाचा सूर एकंदरीत वातावरणात ऐकू येतो. आशा-निराशेचा खेळ जणू इथे रंगत असतो.
खुल्या अरण्यात वाघ-बिबटयाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून सतत वर्षानुवर्षे विविध जंगलांमध्ये खेपा टाकणारे कितीतरी जण आहेत. तसंच त्यांना वाघ हमखास दाखवतो म्हणून जंगलात नेणारे देखील अनेक आहेत. त्यातही भोळ्याभाबडया, वाघाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून तरसलेल्या वन्यजीवप्रेमींना गळाला लावलं जातं. अर्थात भारतीय जंगल, आपला पर्यटन व्यवसाय व वाघ यांची पूर्ण माहिती असणारे लोक क्वचितच अशा गळाला लागतात. म्हणूनच वाघ हमखास पाहायला मिळेल याची शक्यता वाढावी यासाठी काही ठरावीक जंगलांमध्येच लोकांना नेलं जातं.
उदाहरणार्थ रणथंबोर, कान्हा, बांधवगढ इ. जंगलात व्याघ्रदर्शन होण्याची शक्यता इतर जंगलांच्या तुलनेत जास्त असते. लोकांनाही वाघ पाहायला मिळेल ना, याच्याशीच फक्त कर्तव्य असतं. त्यांना कोणत्या जंगलात जात आहोत याच्याशी अज्ञानामुळे फारसं देणं-घेणं नसतं. वास्तविक लोकांच्या याच रोमांचित उत्साहामुळे आज भारतीय वन्यजीव पर्यटन व्यवसाय तेजीत चालतो आहे. किंबहुना त्याला एक वेगळंच धंदेवाईक स्वरूप मिळालं आहे. कितीतरी राष्ट्रीय उद्यानांच्या आसपासच्या गावांमध्येही पर्यटन व्यवसाय याच कारणामुळे फोफावला आहे. यात छोटया व्यावसायिकांबरोबरच मोठे व्यावसायिकही आहेत.
आज अनेक जण आपला मूळ धंदा सोडून वन्यजीव पर्यटन व्यवसायामध्ये नव्याने उतरत आहेत. यात भारतीय वन्यजीवनाची मामुली माहिती असणारे कितीतरी जण आहेत. कारण यात पैसा आहे. मागणी आहे. गरज आहे ती फक्त तुमच्या ग्राहकांना शोधण्याची. पुढे गरज असते ती ग्राहक तुमच्याकडे टिकून राहील यासाठी प्रयत्न करण्याची. तेवढं जमलं की तुम्ही यशस्वी होता. हे व्यवस्थापन कमी माणसांची सहल ठेवली की यशस्वी होण्याची शक्यता जास्त. मात्र इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणे यातही विश्वास टिकवून ठेवता आला पाहिजे. वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे म्हणून नाही, तर त्याखेरीज इतर अनेक पशू-प्राण्यांनी देखील आपली जंगलं समृद्ध आहेत.
या सर्वासाठी विविध स्तरातील ग्राहक, वन्यजीवप्रेमी, संशोधक आहेत. त्यामुळे इतर व्यवसायांप्रमाणेच यातही ‘क्लाएंट टॅपिंग’ जमलं पाहिजे. हा एक असा व्यवसाय आहे, ज्यात आपणही अनुभवसंपन्न होत जातो. इतरांसोबतच आपणही आनंद घेऊ शकतो. म्हणूनच वन्यजीवप्रेमी असणा-या माझ्या अनेक मित्रमंडळींनी लोकांना जंगलात फिरवून आणण्याचा व्यवसाय आवडीने स्वीकारलेला आहे. काही जणांनी तर याच आर्थिक नफ्यालाही फाटा दिलेला आहे. कारण ही मंडळी पर्यटनाचा व्यवसाय केवळ फायद्याच्या स्वार्थापोटी करायला आलेली नाहीत, तर त्यांच्या आवडीतून त्यांनी हा मार्ग निवडलाय. आपल्यासोबतच इतरांनाही भारतीय वन्यजीवनाचं अनोखं विश्व दाखवण्याची असोशी त्यांच्याकडे आहे. तसं पाहिलं तर वन्यजीव पर्यटनामध्ये आज हजारो टूर ऑपरेटर व एजंट्स सापडतील.
पण ख-या प्रेमापोटी अशा सहली नेणारे फार कमी आढळतात. अशांची निवड करणं कठीण आहे. खरं तर तुम्हाला तुमच्या उद्दिष्टापर्यंत नेऊन ठेवणं हे सहल आयोजकाचं काम. तेच कोणताही वन्यजीव पर्यटन व्यावसायिक करतो. त्यापुढे त्याच्या हुकुमाची सद्दी संपते. पुढे हुकूम चालतो तो फक्त आणि फक्त निसर्गाचा. तेव्हा अमुक एखादा पशू-प्राणी दिसला नाही म्हणून सहल आयोजकाला दोषी धरण्यात काहीच अर्थ नसतो. परंतु अज्ञानामुळे अनेक जण अशी निराशा अनुभवतात व वन्यजीव सहल आयोजकाला दोषी धरतात. अशावेळी या पर्यटकांना एकंदरीत ‘सामान्य ज्ञान’ देण्याचं कसब त्या पर्यटन आयोजकाच्या अंगी असावं लागतं.
अनेक वेळा स्थानिकांना आपल्या व्यवसायात गुंतवून घेतलं जातं. या स्थानिकांकडेच बरेचदा सहल आयोजकापेक्षा जास्त ज्ञान असतं असं आढळून येतं. माझ्या माहितीत असे अनेक जण आहेत जे स्वत: अरण्यात फिरायला जातात व सोबतीला फक्त एखाद्या स्थानिकाला नेतात. या व्यवसायात जोखीमही तेवढीच असते. कारण प्रत्यक्ष जंगलात आपल्या जबाबदारीवर १०-१२ जणांना घेऊन जाणं ही सोपी गोष्ट नाही. याचं कारण मुळात जंगल फिरणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. अनेकांना तिथे कोणती सावधगिरी बाळगावी लागेल, कसं वागावं लागेल, काय समोर येईल याचीही कल्पना नसते. या सर्वाना सांभाळण्याची जबाबदारी सहल आयोजकावर किंवा त्या टूर लीडरवर असते. शहरातून बाहेर पडून प्रथमच जंगल सफारी करणारे, त्या वातावरणाचा अनुभव घेणारे अनेक जण असतात.
सर्व काही छान छान, प्रसन्न वाटत असलं तरी या वातावरणात कधी कोणाला भीती वाटू शकते. जंगलात काहीवेळेस वाहन बंद पडण्याची वेळ येते. वरवर पाहता हे गमतीशीर वाटू शकतं. मात्र हत्ती, गेंडे, वाघ, सिंह असलेल्या अरण्यात संध्याकाळच्या वेळी पर्यटकांना घेऊन चाललेलं वाहन बंद पडलंय हा अनुभव कोणालाच नकोसा असणार. कारण बरेचदा यात लहान मुलं देखील असतात. तर अशा प्रकारे सहल आयोजकाला ब-याच स्तरावर काळजी घ्यावी लागते. मग ती आर्थिक जबाबदारी असो किंवा इतर कोणतीही. फक्त त्याची जोखीम इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा वाढते, कारण अरण्य हे वाटतं तेवढं सुकर, सोपं नाही. रणथंबोरच्या जंगलात पाऊस खूप पडल्यामुळे एकदा एका ओढयाला पूर आला होता. पर्यटकांनी हट्टाने जीप ओढयातून नेली व ती वाहून गेली. अशी अनेक संकटं तिथं येऊ शकतात. याचं भान राखावं लागतं. अनेक वन्यजीव सहल आयोजक हे खूप धंदेवाईक असतात. त्यांचं उथळ ज्ञान सामान्य पर्यटकांना फारसं कळून येत नाही.
इथेच असे व्यावसायिक त्यांचा फायदा घेतात. नाईट नेचर ट्रेलचं आमिष काही सहलींमध्ये दाखवलं जातं. दिवसभर दोन सफारी करून झाल्यावर आपोआप पर्यटक दमलेला असतो. हीच संधी घेऊन काही सहल आयोजक रात्रीचा नेचर ट्रेल रद्द करून टाकतात आणि तो पर्यटक एका अनोख्या अनुभवाला मुकतो. भारतीय राष्ट्रीय उद्यानांमध्ये फिरताना तिथल्या झोन्सची पुरेपूर माहिती सहल नेणा-याला असली पाहिजे. तरच त्याच्यासोबत फिरण्याला अर्थ आहे. काही फोटोग्राफर्स देखील वन्यजीव सहली नेतात. मात्र काहीवेळा अशा सहलींवर निसर्ग अभ्यासक किंवा नॅचरलिस्ट नसतो. अशावेळेस कुठे जावं, काय पाहावं याचा गोंधळ उडू शकतो. मुळात तुम्ही एखाद्या जंगलात कशासाठी जात आहात हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याविषयी पुढील लेखातून बोलू.
Print Friendly
Tags:  |  |  | 

नियमाने वागू चला

अनेकदा जंगलात वन्यजीवांच्या अभ्यासानिमित्त भटकंती होते. ती अर्थातच हवीहवीशी असते. शहरातल्या कोंदटलेल्या वातावरणातून मोकळा श्वास घेण्याची ती एकमेव संधी असते. हिरवाईमध्ये लपेटलेल्या वनचरांच्या विश्वात आम्ही थोडीफार ढवळाढवळ करत असतो. वन्यजीव संशोधक व अभ्यासक असणा-या मंडळींसमवेत जंगलात जाण्याचा, निरीक्षणाचा अनुभव अनेकदा मिळतो. यावेळी पक्षी-प्राण्यांना कसं पाहावं याचेही काही नियम कळतात.
elephantकोणत्याही राष्ट्रीय उद्यानात सहल गेल्यावर अनेकांना प्रश्न पडतो तो म्हणजे नेमकं काय पाहायचं याचा. प्राणी पाहणं व पक्ष्याचं निरीक्षण करणं यात उत्साह तेवढाच असला तरी खूप फरक आहे. दोघांमध्ये एक समानता आहे ती म्हणजे, खूप संयम इथे पाळावा लागतो. त्याशिवाय काहीच शक्य नाही. तुम्हाला कोणत्या प्रकारचे वन्यजीव पाहण्यात रस आहे ते ठरवावं लागेल अथवा त्या व्यतिरिक्त फक्त वनस्पतीविश्वाचा अभ्यास करायचा आहे का हेही ठरवावं.
तुमचा उद्देश स्पष्ट झाला की सहलीचा आनंद अधिक जाणीवपूर्वक घेता येतो. त्या अनुषंगाने तुम्ही वन्यजीव सहलीवर जाणार असाल तर काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा. हे नियम नाहीत; पण ती तुमची जाण आहे असं म्हणता येईल. या गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकत असाल तर एक चांगला वन्यजीवप्रेमी म्हणून तुमचा विकास होतोय असं म्हणता येईल.
साप पकडणा-या तज्ज्ञांचं निरीक्षण करा. त्याला किती वेळ पकडून ठेवायचं, कसं पकडायचं याचे काही नियम असतात. कोणत्याही वन्य प्राण्याच्या अभ्यासासाठी निरीक्षण करताना त्याचे काही नैतिक नियम पाळावे लागतात. वन्य प्राण्यांचा अभ्यास करताना हे नियम शिकवले जातात. त्यानुसारच पक्षी-प्राण्यांचा अभ्यास केला जातो.
काही वेळा वन्यजीव संशोधकांसमवेत जंगलात जाण्याची संधी मिळते. तेव्हा हे निसर्गाचे अभ्यासक व सामान्य पर्यटक यातील महद्अंतर पाहून मला नेहमीच दु:ख वाटतं. आश्चर्यही वाटतं. महत्त्वाचे संशोधन करताना जर वन्यजीव संशोधक एवढी काळजी बाळगत असतील तर आपल्यासारख्या सामान्य पर्यटकांनी व वन्यजीवप्रेमींनी जंगलात किंवा प्राणिसंग्रहालयामध्ये प्राणी पाहायला गेल्यावर अशी काळजी का घेऊ नये. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
प्राणिसंग्रहालयातील प्राणी पाहताना तो अजिबात मिळत नाही. त्यासाठी लहानशा वनक्षेत्राला बंदिस्त करून त्यात प्राण्यांना मोकळं सोडलं जातं. हा एखाद्या शेजारी शेजारी पिंजरे मांडून ठेवलेल्या अगतिक प्राणिसंग्रहालयापेक्षा बरा प्रकार असतो. आपल्याकडे बंगळुरूचं बाणेरगट्टा बायॉलॉजिकल पार्क, धरमशाला व पालमपूरपासून जवळ असलेलं गोपालपूर झू, भोपाळचं वनविहार ही अशी काही वनउद्यानं पाहण्यासारखी आहेत.
देशात अजून अशी बरीच वनउद्यानं आहेत. परंतु कुठेही वन्यजीवन पाहायला जाताना काही नियम पाळावेत असं मला जरूर वाटतं. वास्तविक निसर्गात गेल्यावर शहरातल्यासारखा धांगडधिंगा बंद करून त्याच्या कलाने गोष्टींचं निरीक्षण करावं.
प्रथम जंगलात जाताना तुम्ही कोणत्याही नैसर्गिक संकटाला किंवा प्रत्यक्ष त्या प्राण्याला घाबरणार नाहीत तसंच आरडाओरडा करून त्या प्राण्याला घाबरवणार नाहीत हे मनाशी ठरवावं लागेल. याचा चांगला प्रत्यय मला सुंदरबनला आला. बोटीवरची लहान मुलं काठावर पहुडलेली मगर दिसली की आधीच ओरडायला सुरुवात करत व मगर वेगात पाण्यात नाहीशी होत असे.
अन्यथा बोट नदीतून जात असताना मगर न घाबरता सुस्त पडून राहू शकते. लक्षात ठेवा की प्राण्यांच्या रूपात अरण्याचे तुमच्यावर असंख्य डोळे रोखलेले असतात. तुमच्या बारीकसारीक हालचालींची तिथे नोंद होत असते. तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधी तुमचा वास, आवाज हे त्या प्राण्यापर्यंत पोहोचलेले असतात. त्यामुळे एखादा प्राणी पाहायचा असेल तर अंगात स्तब्धता बाणवायला शिकलं पाहिजे. परंतु प्राणी पाहायच्या उत्साहात कोणत्याही अनोळखी जागेत उतरून तिथे हात लावू नका.
विशेषत: प्राणी व वनस्पतींची माहिती नसेल तर हे धाडस करूच नका. दुसरं म्हणजे प्राण्यांपासून योग्य ते अंतर राखा. काझिरंगाच्या जंगलात गेंडा मादी व पिल्लांजवळ जीप घेऊन जाणा-या पर्यटकांना याचा अनुभव अनेकदा येतो. वाघ किंवा गेंडयासारखा आक्रमक प्राणी पिल्लांना धोका आहे असं दिसल्यास हिंसक होऊ शकतो. मग अशावेळी प्राणी सरळ जीपवर चार्ज करतात.
हत्तींच्या बाबतीतही अनेक अभ्यासकांनी हा अनुभव घेतलेला आहे. जंगलामध्ये गेल्यावर कधीही स्वत:चा माग ठेऊ नका. खाद्यपदार्थ खाऊ नका आणि प्राण्यांनाही देऊ नका. रणथंबोरसारख्या जंगलात रुफस ट्री पाय पक्ष्यांना पर्यटकांनी खायला घालण्याची इतकी सवय झालेली आहे की ते आता चक्क पर्यटकांच्या खांद्यावर येऊन बसतात व खाण्याच्या वस्तू पळवतात.
अरण्यात दोन वन्यजीवांमध्ये एखादी गोष्ट सुरू असेल तर त्यात अजिबात हस्तक्षेप करू नये. वाघांच्या मेटिंगच्या वेळेस अनेक फोटोग्राफर्सनी त्यांच्या प्रणयात व्यत्यय आणून फोटो काढण्यात धन्यता मानलेली आहे. हे नंतर त्यांच्या फेसबुकवरील पोस्टवरून कळतं. हाच प्रकार अन्य प्राण्यांबाबतही घडतो. आम्ही एकदा ताडोबामध्ये असताना पोपटाचं पिल्लू घरटयातून खाली पडलेलं पाहिलं.
मात्र आम्ही त्याला वर उचलून ठेवलं नाही. कारण तो आमचा हस्तक्षेप झाला असता. नागझिरामधून फिरत असताना माकडाचं एक नवजात पिल्लू अचानक आमच्या जीपसमोर पडलं, त्याबरोबर त्याच्या कुटुंबीयांचा जोरजोरात कलकलाट सुरू झाला. आम्ही जीप थांबवली व वाट पाहू लागलो. इतक्यात एका प्रौढ माकडीणीने खाली झेप घेऊन ते पिल्लू उचललं व त्याच्या आईला नेऊन दिलं. प्राणीविश्वात काय नियम असतात, हे जग कसं असतं हे अशा अनुभवातून कळतं.
अरण्यात फिरायचं असेल तर नेहमी त्या अरण्याबद्दल माहिती घेऊन जा. त्यामुळे ते कळायला अधिक मदत होईल व गंमतही वाटेल. शिवाय एखादा विशिष्ट प्राणी वा प्रजातीसाठी तुम्ही जात असाल तर त्यासंबंधी तुमचा अभ्यास पक्का पाहिजे. अन्यथा तो जीव समोर आला तरी तुम्हाला कळणार नाही अशी गत ओढवेल. प्राण्यांचा माग काढताना त्यांच्या सवयीचा अभ्यास केलेला असेल तर उपयोग होतो.
वन्यजीवनाचं निरीक्षण करायचं असेल तर आळस दूर ठेवा. कोणत्याही वेळी जागं राहण्याची आणि तेही संयमाने राहण्याची तयारी ठेवा. कारण बरेचसे प्राणी हे अंधारात बाहेर पडतात किंवा एकतर पहाटे. तेव्हा नेहमी पहाटे उठण्याची तयारी असू द्यात. फोटोग्राफर्सना तर सुंदर फोटोंसाठी विशिष्ट वेळा आवश्यक असतात. तेव्हा कंटाळा करून चालतच नाही.
जंगलातल्या हिरव्या वातावरणाशी मिळत्याजुळत्या रंगाचे कपडे घालून जाण्याचा नियम तर बहुतेक सर्वानाच माहीत असेल. तो आवश्यकच आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला स्तब्ध, शांत राहता येणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. केवळ तुमच्या शांत राहण्याने एखादं सुंदर अरण्यनाटयाचे साक्षीदार होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. नागझिराला असताना आम्ही रस्त्यावरून जात असताना बाजूला हालचाल पाहिली. प्राणी दिसत नव्हता म्हणून गाडी पुढे नेऊन उभी केली व पाहू लागलो.
आमच्या जाण्यानंतर तिथे चांदी अस्वल अवतरलं व त्याने त्याचं खोदकाम बिनधास्त सुरू केलं. पण आमची तिथे चाहूल होती तोपर्यंत ते तिथं आलं नव्हतं. जंगलात जाताना नेहमी योग्य ती उपकरणं जवळ ठेवा. मग त्यात कॅमेरा, स्पॉटिंग स्कोप, दुर्बीण अशी साधनं येतात. हत्तीसारख्या मोठया प्राण्याला पाहायचं असेल तर दुर्बिणीची गरज नाही, मात्र पिवळ्याजर्द गवतात दडून बसलेल्या एखाद्या वाघाला पाहायचं असेल तर मात्र ती हवीच. सोबत काय न्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा.
Print Friendly
Tags:  |  |  |  |  |