Translate

Showing posts with label wildlife. Show all posts
Showing posts with label wildlife. Show all posts

Friday, September 25, 2015

उत्साही वन्यजीवप्रेम

भारतीय पर्यटन व्यवसायात सध्याच्या काळात चांगली चालणारी एक शाखा म्हणजे वन्यजीव पर्यटन व्यवसाय. जोपर्यंत भारत आपलं प्राणीवैभव टिकवून ठेवेल आणि वन्यजीवप्रेमी असतील तोपर्यंत या व्यवसायाला मरण नाही.
kanhaसकाळी १० किंवा संध्याकाळी साडेपाच वाजताची वेळ. स्थळ कोणतंही व्याघ्र अभयारण्य आणि तिथल्या गेटवर उभ्या असणा-या जंगल जिप्सीज व कँटर्स. चर्चा एकच. तुम्हाला वाघ दिसला का? आणि तो नाही दिसला तर मग कोणते प्राणी दिसले? अशा अनेक रसरंजित गोष्टींची देवाण-घेवाण केली जाते. त्या दिवसात वाघ न दिसलेल्यांच्या चेह-यावर उद्या तरी तो दिसेल का याचं प्रश्नचिन्ह दिसत असतं. दिसलेल्यांच्या चेह-यावर अतोनात आनंद असतो. मग, ‘दिसेल हो तुम्हालाही उद्या’ असा सांत्वनाचा सूर एकंदरीत वातावरणात ऐकू येतो. आशा-निराशेचा खेळ जणू इथे रंगत असतो.
खुल्या अरण्यात वाघ-बिबटयाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून सतत वर्षानुवर्षे विविध जंगलांमध्ये खेपा टाकणारे कितीतरी जण आहेत. तसंच त्यांना वाघ हमखास दाखवतो म्हणून जंगलात नेणारे देखील अनेक आहेत. त्यातही भोळ्याभाबडया, वाघाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून तरसलेल्या वन्यजीवप्रेमींना गळाला लावलं जातं. अर्थात भारतीय जंगल, आपला पर्यटन व्यवसाय व वाघ यांची पूर्ण माहिती असणारे लोक क्वचितच अशा गळाला लागतात. म्हणूनच वाघ हमखास पाहायला मिळेल याची शक्यता वाढावी यासाठी काही ठरावीक जंगलांमध्येच लोकांना नेलं जातं.
उदाहरणार्थ रणथंबोर, कान्हा, बांधवगढ इ. जंगलात व्याघ्रदर्शन होण्याची शक्यता इतर जंगलांच्या तुलनेत जास्त असते. लोकांनाही वाघ पाहायला मिळेल ना, याच्याशीच फक्त कर्तव्य असतं. त्यांना कोणत्या जंगलात जात आहोत याच्याशी अज्ञानामुळे फारसं देणं-घेणं नसतं. वास्तविक लोकांच्या याच रोमांचित उत्साहामुळे आज भारतीय वन्यजीव पर्यटन व्यवसाय तेजीत चालतो आहे. किंबहुना त्याला एक वेगळंच धंदेवाईक स्वरूप मिळालं आहे. कितीतरी राष्ट्रीय उद्यानांच्या आसपासच्या गावांमध्येही पर्यटन व्यवसाय याच कारणामुळे फोफावला आहे. यात छोटया व्यावसायिकांबरोबरच मोठे व्यावसायिकही आहेत.
आज अनेक जण आपला मूळ धंदा सोडून वन्यजीव पर्यटन व्यवसायामध्ये नव्याने उतरत आहेत. यात भारतीय वन्यजीवनाची मामुली माहिती असणारे कितीतरी जण आहेत. कारण यात पैसा आहे. मागणी आहे. गरज आहे ती फक्त तुमच्या ग्राहकांना शोधण्याची. पुढे गरज असते ती ग्राहक तुमच्याकडे टिकून राहील यासाठी प्रयत्न करण्याची. तेवढं जमलं की तुम्ही यशस्वी होता. हे व्यवस्थापन कमी माणसांची सहल ठेवली की यशस्वी होण्याची शक्यता जास्त. मात्र इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणे यातही विश्वास टिकवून ठेवता आला पाहिजे. वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे म्हणून नाही, तर त्याखेरीज इतर अनेक पशू-प्राण्यांनी देखील आपली जंगलं समृद्ध आहेत.
या सर्वासाठी विविध स्तरातील ग्राहक, वन्यजीवप्रेमी, संशोधक आहेत. त्यामुळे इतर व्यवसायांप्रमाणेच यातही ‘क्लाएंट टॅपिंग’ जमलं पाहिजे. हा एक असा व्यवसाय आहे, ज्यात आपणही अनुभवसंपन्न होत जातो. इतरांसोबतच आपणही आनंद घेऊ शकतो. म्हणूनच वन्यजीवप्रेमी असणा-या माझ्या अनेक मित्रमंडळींनी लोकांना जंगलात फिरवून आणण्याचा व्यवसाय आवडीने स्वीकारलेला आहे. काही जणांनी तर याच आर्थिक नफ्यालाही फाटा दिलेला आहे. कारण ही मंडळी पर्यटनाचा व्यवसाय केवळ फायद्याच्या स्वार्थापोटी करायला आलेली नाहीत, तर त्यांच्या आवडीतून त्यांनी हा मार्ग निवडलाय. आपल्यासोबतच इतरांनाही भारतीय वन्यजीवनाचं अनोखं विश्व दाखवण्याची असोशी त्यांच्याकडे आहे. तसं पाहिलं तर वन्यजीव पर्यटनामध्ये आज हजारो टूर ऑपरेटर व एजंट्स सापडतील.
पण ख-या प्रेमापोटी अशा सहली नेणारे फार कमी आढळतात. अशांची निवड करणं कठीण आहे. खरं तर तुम्हाला तुमच्या उद्दिष्टापर्यंत नेऊन ठेवणं हे सहल आयोजकाचं काम. तेच कोणताही वन्यजीव पर्यटन व्यावसायिक करतो. त्यापुढे त्याच्या हुकुमाची सद्दी संपते. पुढे हुकूम चालतो तो फक्त आणि फक्त निसर्गाचा. तेव्हा अमुक एखादा पशू-प्राणी दिसला नाही म्हणून सहल आयोजकाला दोषी धरण्यात काहीच अर्थ नसतो. परंतु अज्ञानामुळे अनेक जण अशी निराशा अनुभवतात व वन्यजीव सहल आयोजकाला दोषी धरतात. अशावेळी या पर्यटकांना एकंदरीत ‘सामान्य ज्ञान’ देण्याचं कसब त्या पर्यटन आयोजकाच्या अंगी असावं लागतं.
अनेक वेळा स्थानिकांना आपल्या व्यवसायात गुंतवून घेतलं जातं. या स्थानिकांकडेच बरेचदा सहल आयोजकापेक्षा जास्त ज्ञान असतं असं आढळून येतं. माझ्या माहितीत असे अनेक जण आहेत जे स्वत: अरण्यात फिरायला जातात व सोबतीला फक्त एखाद्या स्थानिकाला नेतात. या व्यवसायात जोखीमही तेवढीच असते. कारण प्रत्यक्ष जंगलात आपल्या जबाबदारीवर १०-१२ जणांना घेऊन जाणं ही सोपी गोष्ट नाही. याचं कारण मुळात जंगल फिरणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. अनेकांना तिथे कोणती सावधगिरी बाळगावी लागेल, कसं वागावं लागेल, काय समोर येईल याचीही कल्पना नसते. या सर्वाना सांभाळण्याची जबाबदारी सहल आयोजकावर किंवा त्या टूर लीडरवर असते. शहरातून बाहेर पडून प्रथमच जंगल सफारी करणारे, त्या वातावरणाचा अनुभव घेणारे अनेक जण असतात.
सर्व काही छान छान, प्रसन्न वाटत असलं तरी या वातावरणात कधी कोणाला भीती वाटू शकते. जंगलात काहीवेळेस वाहन बंद पडण्याची वेळ येते. वरवर पाहता हे गमतीशीर वाटू शकतं. मात्र हत्ती, गेंडे, वाघ, सिंह असलेल्या अरण्यात संध्याकाळच्या वेळी पर्यटकांना घेऊन चाललेलं वाहन बंद पडलंय हा अनुभव कोणालाच नकोसा असणार. कारण बरेचदा यात लहान मुलं देखील असतात. तर अशा प्रकारे सहल आयोजकाला ब-याच स्तरावर काळजी घ्यावी लागते. मग ती आर्थिक जबाबदारी असो किंवा इतर कोणतीही. फक्त त्याची जोखीम इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा वाढते, कारण अरण्य हे वाटतं तेवढं सुकर, सोपं नाही. रणथंबोरच्या जंगलात पाऊस खूप पडल्यामुळे एकदा एका ओढयाला पूर आला होता. पर्यटकांनी हट्टाने जीप ओढयातून नेली व ती वाहून गेली. अशी अनेक संकटं तिथं येऊ शकतात. याचं भान राखावं लागतं. अनेक वन्यजीव सहल आयोजक हे खूप धंदेवाईक असतात. त्यांचं उथळ ज्ञान सामान्य पर्यटकांना फारसं कळून येत नाही.
इथेच असे व्यावसायिक त्यांचा फायदा घेतात. नाईट नेचर ट्रेलचं आमिष काही सहलींमध्ये दाखवलं जातं. दिवसभर दोन सफारी करून झाल्यावर आपोआप पर्यटक दमलेला असतो. हीच संधी घेऊन काही सहल आयोजक रात्रीचा नेचर ट्रेल रद्द करून टाकतात आणि तो पर्यटक एका अनोख्या अनुभवाला मुकतो. भारतीय राष्ट्रीय उद्यानांमध्ये फिरताना तिथल्या झोन्सची पुरेपूर माहिती सहल नेणा-याला असली पाहिजे. तरच त्याच्यासोबत फिरण्याला अर्थ आहे. काही फोटोग्राफर्स देखील वन्यजीव सहली नेतात. मात्र काहीवेळा अशा सहलींवर निसर्ग अभ्यासक किंवा नॅचरलिस्ट नसतो. अशावेळेस कुठे जावं, काय पाहावं याचा गोंधळ उडू शकतो. मुळात तुम्ही एखाद्या जंगलात कशासाठी जात आहात हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याविषयी पुढील लेखातून बोलू.
Print Friendly
Tags:  |  |  | 

नियमाने वागू चला

अनेकदा जंगलात वन्यजीवांच्या अभ्यासानिमित्त भटकंती होते. ती अर्थातच हवीहवीशी असते. शहरातल्या कोंदटलेल्या वातावरणातून मोकळा श्वास घेण्याची ती एकमेव संधी असते. हिरवाईमध्ये लपेटलेल्या वनचरांच्या विश्वात आम्ही थोडीफार ढवळाढवळ करत असतो. वन्यजीव संशोधक व अभ्यासक असणा-या मंडळींसमवेत जंगलात जाण्याचा, निरीक्षणाचा अनुभव अनेकदा मिळतो. यावेळी पक्षी-प्राण्यांना कसं पाहावं याचेही काही नियम कळतात.
elephantकोणत्याही राष्ट्रीय उद्यानात सहल गेल्यावर अनेकांना प्रश्न पडतो तो म्हणजे नेमकं काय पाहायचं याचा. प्राणी पाहणं व पक्ष्याचं निरीक्षण करणं यात उत्साह तेवढाच असला तरी खूप फरक आहे. दोघांमध्ये एक समानता आहे ती म्हणजे, खूप संयम इथे पाळावा लागतो. त्याशिवाय काहीच शक्य नाही. तुम्हाला कोणत्या प्रकारचे वन्यजीव पाहण्यात रस आहे ते ठरवावं लागेल अथवा त्या व्यतिरिक्त फक्त वनस्पतीविश्वाचा अभ्यास करायचा आहे का हेही ठरवावं.
तुमचा उद्देश स्पष्ट झाला की सहलीचा आनंद अधिक जाणीवपूर्वक घेता येतो. त्या अनुषंगाने तुम्ही वन्यजीव सहलीवर जाणार असाल तर काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा. हे नियम नाहीत; पण ती तुमची जाण आहे असं म्हणता येईल. या गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकत असाल तर एक चांगला वन्यजीवप्रेमी म्हणून तुमचा विकास होतोय असं म्हणता येईल.
साप पकडणा-या तज्ज्ञांचं निरीक्षण करा. त्याला किती वेळ पकडून ठेवायचं, कसं पकडायचं याचे काही नियम असतात. कोणत्याही वन्य प्राण्याच्या अभ्यासासाठी निरीक्षण करताना त्याचे काही नैतिक नियम पाळावे लागतात. वन्य प्राण्यांचा अभ्यास करताना हे नियम शिकवले जातात. त्यानुसारच पक्षी-प्राण्यांचा अभ्यास केला जातो.
काही वेळा वन्यजीव संशोधकांसमवेत जंगलात जाण्याची संधी मिळते. तेव्हा हे निसर्गाचे अभ्यासक व सामान्य पर्यटक यातील महद्अंतर पाहून मला नेहमीच दु:ख वाटतं. आश्चर्यही वाटतं. महत्त्वाचे संशोधन करताना जर वन्यजीव संशोधक एवढी काळजी बाळगत असतील तर आपल्यासारख्या सामान्य पर्यटकांनी व वन्यजीवप्रेमींनी जंगलात किंवा प्राणिसंग्रहालयामध्ये प्राणी पाहायला गेल्यावर अशी काळजी का घेऊ नये. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
प्राणिसंग्रहालयातील प्राणी पाहताना तो अजिबात मिळत नाही. त्यासाठी लहानशा वनक्षेत्राला बंदिस्त करून त्यात प्राण्यांना मोकळं सोडलं जातं. हा एखाद्या शेजारी शेजारी पिंजरे मांडून ठेवलेल्या अगतिक प्राणिसंग्रहालयापेक्षा बरा प्रकार असतो. आपल्याकडे बंगळुरूचं बाणेरगट्टा बायॉलॉजिकल पार्क, धरमशाला व पालमपूरपासून जवळ असलेलं गोपालपूर झू, भोपाळचं वनविहार ही अशी काही वनउद्यानं पाहण्यासारखी आहेत.
देशात अजून अशी बरीच वनउद्यानं आहेत. परंतु कुठेही वन्यजीवन पाहायला जाताना काही नियम पाळावेत असं मला जरूर वाटतं. वास्तविक निसर्गात गेल्यावर शहरातल्यासारखा धांगडधिंगा बंद करून त्याच्या कलाने गोष्टींचं निरीक्षण करावं.
प्रथम जंगलात जाताना तुम्ही कोणत्याही नैसर्गिक संकटाला किंवा प्रत्यक्ष त्या प्राण्याला घाबरणार नाहीत तसंच आरडाओरडा करून त्या प्राण्याला घाबरवणार नाहीत हे मनाशी ठरवावं लागेल. याचा चांगला प्रत्यय मला सुंदरबनला आला. बोटीवरची लहान मुलं काठावर पहुडलेली मगर दिसली की आधीच ओरडायला सुरुवात करत व मगर वेगात पाण्यात नाहीशी होत असे.
अन्यथा बोट नदीतून जात असताना मगर न घाबरता सुस्त पडून राहू शकते. लक्षात ठेवा की प्राण्यांच्या रूपात अरण्याचे तुमच्यावर असंख्य डोळे रोखलेले असतात. तुमच्या बारीकसारीक हालचालींची तिथे नोंद होत असते. तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधी तुमचा वास, आवाज हे त्या प्राण्यापर्यंत पोहोचलेले असतात. त्यामुळे एखादा प्राणी पाहायचा असेल तर अंगात स्तब्धता बाणवायला शिकलं पाहिजे. परंतु प्राणी पाहायच्या उत्साहात कोणत्याही अनोळखी जागेत उतरून तिथे हात लावू नका.
विशेषत: प्राणी व वनस्पतींची माहिती नसेल तर हे धाडस करूच नका. दुसरं म्हणजे प्राण्यांपासून योग्य ते अंतर राखा. काझिरंगाच्या जंगलात गेंडा मादी व पिल्लांजवळ जीप घेऊन जाणा-या पर्यटकांना याचा अनुभव अनेकदा येतो. वाघ किंवा गेंडयासारखा आक्रमक प्राणी पिल्लांना धोका आहे असं दिसल्यास हिंसक होऊ शकतो. मग अशावेळी प्राणी सरळ जीपवर चार्ज करतात.
हत्तींच्या बाबतीतही अनेक अभ्यासकांनी हा अनुभव घेतलेला आहे. जंगलामध्ये गेल्यावर कधीही स्वत:चा माग ठेऊ नका. खाद्यपदार्थ खाऊ नका आणि प्राण्यांनाही देऊ नका. रणथंबोरसारख्या जंगलात रुफस ट्री पाय पक्ष्यांना पर्यटकांनी खायला घालण्याची इतकी सवय झालेली आहे की ते आता चक्क पर्यटकांच्या खांद्यावर येऊन बसतात व खाण्याच्या वस्तू पळवतात.
अरण्यात दोन वन्यजीवांमध्ये एखादी गोष्ट सुरू असेल तर त्यात अजिबात हस्तक्षेप करू नये. वाघांच्या मेटिंगच्या वेळेस अनेक फोटोग्राफर्सनी त्यांच्या प्रणयात व्यत्यय आणून फोटो काढण्यात धन्यता मानलेली आहे. हे नंतर त्यांच्या फेसबुकवरील पोस्टवरून कळतं. हाच प्रकार अन्य प्राण्यांबाबतही घडतो. आम्ही एकदा ताडोबामध्ये असताना पोपटाचं पिल्लू घरटयातून खाली पडलेलं पाहिलं.
मात्र आम्ही त्याला वर उचलून ठेवलं नाही. कारण तो आमचा हस्तक्षेप झाला असता. नागझिरामधून फिरत असताना माकडाचं एक नवजात पिल्लू अचानक आमच्या जीपसमोर पडलं, त्याबरोबर त्याच्या कुटुंबीयांचा जोरजोरात कलकलाट सुरू झाला. आम्ही जीप थांबवली व वाट पाहू लागलो. इतक्यात एका प्रौढ माकडीणीने खाली झेप घेऊन ते पिल्लू उचललं व त्याच्या आईला नेऊन दिलं. प्राणीविश्वात काय नियम असतात, हे जग कसं असतं हे अशा अनुभवातून कळतं.
अरण्यात फिरायचं असेल तर नेहमी त्या अरण्याबद्दल माहिती घेऊन जा. त्यामुळे ते कळायला अधिक मदत होईल व गंमतही वाटेल. शिवाय एखादा विशिष्ट प्राणी वा प्रजातीसाठी तुम्ही जात असाल तर त्यासंबंधी तुमचा अभ्यास पक्का पाहिजे. अन्यथा तो जीव समोर आला तरी तुम्हाला कळणार नाही अशी गत ओढवेल. प्राण्यांचा माग काढताना त्यांच्या सवयीचा अभ्यास केलेला असेल तर उपयोग होतो.
वन्यजीवनाचं निरीक्षण करायचं असेल तर आळस दूर ठेवा. कोणत्याही वेळी जागं राहण्याची आणि तेही संयमाने राहण्याची तयारी ठेवा. कारण बरेचसे प्राणी हे अंधारात बाहेर पडतात किंवा एकतर पहाटे. तेव्हा नेहमी पहाटे उठण्याची तयारी असू द्यात. फोटोग्राफर्सना तर सुंदर फोटोंसाठी विशिष्ट वेळा आवश्यक असतात. तेव्हा कंटाळा करून चालतच नाही.
जंगलातल्या हिरव्या वातावरणाशी मिळत्याजुळत्या रंगाचे कपडे घालून जाण्याचा नियम तर बहुतेक सर्वानाच माहीत असेल. तो आवश्यकच आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला स्तब्ध, शांत राहता येणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. केवळ तुमच्या शांत राहण्याने एखादं सुंदर अरण्यनाटयाचे साक्षीदार होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. नागझिराला असताना आम्ही रस्त्यावरून जात असताना बाजूला हालचाल पाहिली. प्राणी दिसत नव्हता म्हणून गाडी पुढे नेऊन उभी केली व पाहू लागलो.
आमच्या जाण्यानंतर तिथे चांदी अस्वल अवतरलं व त्याने त्याचं खोदकाम बिनधास्त सुरू केलं. पण आमची तिथे चाहूल होती तोपर्यंत ते तिथं आलं नव्हतं. जंगलात जाताना नेहमी योग्य ती उपकरणं जवळ ठेवा. मग त्यात कॅमेरा, स्पॉटिंग स्कोप, दुर्बीण अशी साधनं येतात. हत्तीसारख्या मोठया प्राण्याला पाहायचं असेल तर दुर्बिणीची गरज नाही, मात्र पिवळ्याजर्द गवतात दडून बसलेल्या एखाद्या वाघाला पाहायचं असेल तर मात्र ती हवीच. सोबत काय न्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा.
Print Friendly
Tags:  |  |  |  |  | 

Thursday, May 14, 2015

सृष्टीसमष्टी


चराचर म्हणजे काय याचा अनुभव अरण्यातच येतो. आपण एखाद्या दरीच्या कडयापाशी उभे राहतो आणि तिथून पुढे सारं काही अथांग घनदाट हिरवंगार असतं किंवा एखाद्या तलावापाशी जातो आणि त्या पाण्यात दिसणारं झाडांचं कमालीचं स्थिर प्रतिबिंब आपली दृष्टी बांधून घेतं. अरण्यात गेल्यावर सृष्टी समग्र रूपांनी अशी आपल्या समोर ठाकते. तिचं हे रूप नजरेत किती साठवावं, किती ते श्वासात खोल भरून घ्यावं, किती तिच्या अंगाखांद्यावर बागडावं-लोळावं याचं भान राहत नाही. हे अमृत पिण्यासाठी मग अधिकाधिक अपुरेच वाटू लागते. जंगलातले दिवस-रात्र कसे जातात याची ही एक झलक. अरण्यात घालवलेला प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असतो. मग तिथे एक तास घालवा नाहीतर दोन-तीन दिवस फक्त. जंगलातल्या एका दिवसाच्या एकेका प्रहरात कायकाय दडलंय हे सांगणा-्या अष्टौप्रहरांमधल्या कथा.

प्रहर १
आज साडेपाच वाजताच ड्रायव्हरने आम्हाला खोलीवरून पिकअप केलं आणि हत्तींच्या गोठयापाशी आणून सोडलं. हत्ती बिचारे आमची जणू वाटच पाहत होते. नव्या दिवसाचा तो कोरा करकरीत गंध किती छान वाटत होता. त्यात हत्तींच्या शेणाचा उग्र वासही मिसळला होता. आकाशात अनोखं चित्र हळूहळू साकारत होतं. त्याआधी एक अप्रतिम निळसर प्रकाश क्षितिजावर रेंगाळल्यासारखा वाटत होता. मग त्यात हलके हलके पिवळे सोनेरी रंग मिसळू लागले. मग ते गडद होत शेंदरी झाले आणि म्हणता म्हणता त्या शेंदरी रंगाचा चक्क एक गोलच झटकन क्षितिजावर आला.
काही क्षणार्धातच हा एवढा मोठा गोळा कसा काय तयार झाला याचं आश्चर्य वाटलं. त्या विस्तीर्ण दाट हिरव्या गवताळ कुरणावर देखील त्या शेंदरी गोळ्याने त्याच्यातला सोनेरी रंग शिंपडला आणि तमाम पक्ष्यांना आवाज फुटला. वेषांतरासाठी घातलेला पोशाख बदलून एखाद्याने समोर यावं तसं त्या गवतात लपलेल्या आकारांना पाय फुटले आणि हरणं, गेंडे, हत्ती, पक्षी असं सर्व काही अचानक समोर येऊ लागले. वाटलं, किती महागडा दुर्लभ असावा हा या क्षणाचा श्वास.
इथे येण्यासाठी मोजलेल्या पैशांपेक्षाही कितीतरी पटीने महागडा. कशात तरी साठवून घरी घेऊन जाता आली असती ही हवा तर त्यापरते सुख नाही. इतक्यात मागून कुणीतरी हाक मारली. तीही मराठीत. बाजूच्या हत्तीवरल्या लोकांना त्यांचा फोटो काढून पाहिजे होता. मला मराठीत फोनवर बोलताना पाहिलं होतं बहुतेक त्यांनी. त्यामुळे विश्वासाने त्यांनी कॅमेरा माझ्या हाती दिला. तुम्ही जंगलात गेल्यावर काय पाहता हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. असो.
प्रहर २
सकाळच्या फेरीतला शेवटचा टप्पा. उनं वर यायला लागलीत. भयानक उष्मा. सर्वत्र कोरडं आणि सावलीला पान देखील नाही. जिथे नजर जावी तिथं काटेसावरच फक्त. सारा लँडस्केपच या काटेसावरीने आणि निळ्याभोर आकाशाने व्यापून टाकलेला. या राखाडी निळ्या रंगांमध्ये अगदी क्वचितच कुठेतरी हिरव्या रंगाला जागा मिळालेली. त्याच रणरणत्या रणात गाडी चालतेय. एवढया सर्व आसमंतात पक्षीदेखील नाहीत. नाही म्हणायला रुफस ट्री पायने सोबत सोडलेली नाही. थव्याने त्यांच्या कर्कश्य आवाजासकट गाडीबरोबर उडतायत. त्यांना गाडीतले प्रवासी खायला देतात हे माहीत झालंय. पण बाकी पक्षी-प्राणी कुठेतरी गडप झालेत.
अभयारण्य असूनही अरण्याचा मागमूस नाही. पण इथल्या प्राण्यांसाठी हाच निवारा आहे, हा उघडावाघडा आसरादेखील ते मोठया कसबाने वापरत असणार. आपल्याला त्यातलं फार कमी कळतं. तहान लागतेय सारखी. आणि अचानक गाडी चालता चालता ठप्प! सर्वाना परत खोलीवर जाण्याचे वेध लागलेत. सकाळचा नाश्तादेखील केलेला नाही. आता या वाळवंटी अरण्यात किती वेळ काढावा लागणार याची काहीच कल्पना नाही.
एक-दोन गाडया येऊन पुढे निघून गेल्या. पुढे थोडया लांब मृगजळाप्रमाणे हिरवळ पट्टा दिसतोय. तिथे तळंही असावं बहुदा. पण नियमाप्रमाणे गाडीतून उतरता येत नाही. त्यातच गाडीच्या जवळून गेलेल्या वाघाच्या ताज्या पाऊलखुणा दिसतात. तो विरुद्ध दिशेने गेल्याचं तज्ज्ञ सांगतात. तो कोणत्याही दिशेने गेलेला असो, आता तर कोणीच खाली उतरण्याची हिंमत करणार नाही. त्या लँडस्केपमध्ये तो कुठेही दडलेला असू शकेल असं वाटत राहतं. काही मिनिटांत होईल गाडी सुरू असं मोजत मोजत झाला तासाच्या वर वेळ. अखेर सव्वा तासाने गाडी सुरू झाली. आता एवढया शांततेत सर्वाचेच निश्वास ऐकायला आलेत.
प्रहर ३
ही वेळ शांत राहून आजूबाजूचा निसर्ग निरखण्याची. रेस्टहाऊसच्या पडवीत छानपैकी सतरंजीवर लकटावं आणि मस्तपैकी इकडेतिकडे पाहत राहावं. कोणीच त्रास देणार नसतं. आरामच आराम. विचारांनाही दूर लोटून द्यावं आणि निवांत पडावं. इतक्यात समोरच्या छोटयाशा मोकळ्या जागेत माकडांचा गलका ऐकू येतो.
कसला एवढा मोठा आवाज म्हणून सगळेच खोलीबाहेर येतात. बघितलं तर मोठीच गंमत सुरू असते. चांगला शंभरएक माकडांचा कळप आलेलाय. मोकळ्या जागेत काही कचरा टाकण्यासाठीच्या पेटया पण आहेत. त्यात हात घालून कचरा बाहेर काढण्याचे उद्योग काही जणांचे सुरू आहेत. पण एक जण सर्वाचं लक्ष वेधून घेतोय. त्याच्याचमुळे हा सर्व किचाट सुरू आहे. हे मर्कटराजे तिथल्या दोन खांबांवर कसरती करतायत.
अगदी पोल व्हॉल्टचा तरबेज खेळाडू असल्यागत त्याच्या उडया सुरू आहेत. खूप बारकाईने पाहिल्यावर त्याच्या उडया खरंच खूप पद्धतशीर वाटू लागल्यात. जवळजवळ पाऊणएक तास त्याचा हा खेळ सुरू होता, त्यात त्याचे कोणीच साथीदार सहभागी झाले नव्हते ही नवलाची गोष्ट. या अशा उडया मारण्यामागे त्याचा काय उद्देश होता हे कळत नव्हते. कदाचित मोहाची फुलं जास्त झाली असावीत. पण त्याचा खेळ खूपच मनोरंजक होता. आम्ही विश्रांती सोडून तेच पाहत बसलो.
प्रहर ४
आम्ही पाणवठयाकडे गाडी वळवली. वाटेत एक छोटा सिमेंटचा पाण्याचा चौक लागला. तिथं भेकर उभं होतं. जवळपास पिल्लूच होतं. गाडीचा आवाज ऐकून भेदरलं. त्याला काय करावं ते सुचेना. खरं तर त्याने पळून जायला हवं होतं. पण भ्यायल्यामुळे ते तिथेच थिजून त्याच्या भेकरडोळ्यांनी आमच्याकडे टुकटुक बघत उभं राहिलं. भर उन्हाळ्यात असे कृत्रिम पाणसाठे जंगलात ठिकठिकाणी बांधलेले असतात. नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांपर्यंत नेहमीच सर्वच प्राण्यांना पोहोचता येत नाही.
कधीकधी दुस-या मोठया जनावरांचं भय असतं. कधी कळपांच्या मारामा-या असतात. त्यामुळे असे वेगवेगळे पाणवठे प्राण्यांना-पक्ष्यांना खूप उपयोगी पडतात. शिवाय नैसर्गिक पाणवठे सुकले तरी या कृत्रिम पाणवठयांमध्ये वनखात्याचे कर्मचारी पाणी आणून सोडतात. या कृत्रिम पाणवठयांमुळे कितीतरी पशु-पक्ष्यांचा जीव वाचतो. इथे असंच एक तहानलेलं भेकर उभं होतं. नंतर थोडं आत पाहिलं तर अजून एक भेकर होतं. कदाचित आई असावी. आमच्या येण्यामुळे त्याच्या पाणी पिण्यात व्यत्यय आला होता. आम्ही गाडी तशीच पुढे नेली, त्याच्याकडे न पाहता. नंतर मागे वळून पाहिलं तर ते पाणी पित होतं.
प्रहर ५
संध्याकाळच्या भटकंतीला बाहेर पडलोय. जंगलाच्या इतक्या जवळ राहणाऱ्यांची घर-दुकानं पाहत फिरतोय. केळीची बनं दिसतायत. केळी हत्तींचं मोठं आकर्षण. मग का नाही इथे हत्तींचा मोठया प्रमाणात वावर असणार असं मनात आलं. ती गावठी केळी सगळ्यांच्याच मनात भरली होती. दुकानात मांडलेली केळी मग हातोहात खपली. इथे थेट निसर्गातूनच तुमच्या समोर आलेली फळं होती.
लांबलचक प्रवास करून आलेल्या फळांपेक्षा ही केळी खाण्यात मजा होती. ती हातात घेऊनच मग जंगलाकडे निघालो. उंच झाडांच्या दाट गर्दीतून वाट काढत आम्ही चालतोयत. अचानक माझ्या पुढयातून मोठी धामण सळसळत ओंडक्याबाहेरून निघते. ती रस्ता ओलांडून जाते. बाकी बोलण्यात गर्क होते, त्यामुळे तिच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं आणि मग ती कुठे गेली असेल याची चर्चा.
थोडया अंतरावर पुन्हा एकदा एक मोठा साप आम्हाला ओलांडून गेला. आता चालण्यातली मजा थोडी सांभाळून घ्यायला हवी. कारण बोलता बोलता पायाखाली लक्ष राहत नव्हतं. मग सर्वानाच गप्प राहून निसर्गाकडे लक्ष द्यायला सांगितलं. आता अंधार पडला होता. पुढे एक तळं होतं.
छान हिरवाईने वेढलेले शांत तळं. तिथे उभं राहिलो आणि काहीवेळातच पलीकडल्या झाडांमधून खसपस सुरू झाली. काय आहे पाहतो तर, बघता बघता एक एक करत पाच हत्ती तळ्यात दाखल झाले. त्यांनी आमची फारशी दखल घेतली नाही. आम्ही रस्त्याच्या एका बाजूला जाऊन उभे राहिलो. हत्तींची आंघोळ बघत. बराचवेळ पाण्यात खेळून झाल्यावर मग त्यांनी जंगली केळ्यांच्या झाडांकडे मोर्चा वळवला. पिल्लांना हत्तीण कसं भरवते ते पाहायला मिळालं. तिथून जावंसं वाटत नव्हतं; पण कदाचित हत्ती तळ्यातून रस्त्यावर आले असते त्यामुळे निघावं लागलं.
प्रहर ६
आम्ही सकाळीच बाहेर पडलो होतो. काही दिसेल अशी अपेक्षाही नव्हती इतकं जंगल शांत होतं. असं जेव्हा असतं तेव्हाच नेमकी कुठेतरी हालचाल होत असते. आजही तसंच झालं होतं. बांबूच्या झाडीमधून जाणारा सुरेख लाल रस्ता. सुदैवाने गचके देणारा नव्हता. सकाळची शांतता. त्यात फक्त पक्ष्यांचे आवाज. या इथे अशा भल्या सकाळी काय दिसणार अशा विचारात सर्वजण. पण कोणाशीतरी नजरानजर व्हावी अशीच सर्वाची आतून इच्छा. पण इथले कायदेकानून वेगळे असतात.
आपल्या मर्जीप्रमाणे घडायला हे आपलं घर नव्हे. त्यामुळे आम्हीही निवांत होतो. इतक्यात समोर नजर गेली आणि आम्ही गारच पडलो. आनंद, उत्सुकता, थरार, रोमांच असं सर्वकाही एकाच क्षणात मनात मावेनासं झालं. एक सुंदर देखणं लांबलचक जनावर. बांबूच्या पिवळ्या सोनेरी हिरव्या जंगलामध्ये तो खरं तर आम्हाला प्रथम दिसलाच नव्हता.
आमच्या सुदैवाने तो एका जाळीतून दुस-या जाळीकडे जाताना आणि आम्ही तिथे हजर व्हायला एकच गाठ पडली होती. त्याला पाहून आम्ही स्तब्धच झालो. तो मात्र जाळीत जाऊन विसावला. वाघाइतकंच भारतीय प्राण्यांमध्ये उमदं जनावर कोणी असेल तर तो बिबटया आहे. आपल्या दुर्दैवाने आपल्याकडला चित्ता फार पूर्वीच नामशेष झालाय. पण बिबटयाही काही कमी देखणा नाही. आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं.
प्रहर ७
रात्रीच्या काळोखातही पलीकडे गवतात हरणं चरताना दिसतायत. दिसतायत म्हणजे त्यांचे डोळे लुकलुकतात. घुबडांचे आवाज येतायत. आम्ही जिथं तळ्याच्या बाजूला बसलोयत तिथून मुंगुसाची जोडी भरभर पळत गेलीय. अंधार गच्च आहे आणि गचपण पण तेवढंच दाट आहे. त्यामुळे मुंगुसं कोणती होती ते फारसं नीट समजलं नाही. दोन जंगल आऊलेटना तर आताच बाजूच्या झाडाच्या ढोलीत पाहिलंय. तळ्यावरच्या एका झाडावर फिश आउलेटपण असतं. तेही आता बाहेर पडलं असेल.
रातकिडयांचा(सिकाडा) आवाज कहर करतोय असं फक्त जंगलातच वाटू शकतं. कारण आताशा शहरात ते तुमच्यापाशी येऊन ओरडणार नाहीत. तो काळ गेला. आज किडयामुंग्यांसाठी आपण झाडंच शहरात ठेवत नाही, साखळीच तोडतोय तर त्या साखळीतले हे बारीकसारीक प्राणी सिमेंटच्या जंगलात कुठून येणार? पूर्वी लहानपणी काजवे व रातकिडे दोन्ही घराच्या गॅलरीबाहेर येत. वाघळंपण चक्कर टाकत.एखाद् दुसरं घरातही शिरे.
आता शहरात ना पाकोळ्या उरल्या ना वाघळं, ना रातकिडे ना काजवे. लहानपणी चतुरांच्या शेपटाला दोरी लावून त्यांना हेलिकॉप्टरसारखं उडवायचा खेळ खूप आवडायचा. माझ्या मोठया भावाने शिकवलेला. पोपटांचे थवे नेहमी दिसत. शाळेतल्या निलगिरीच्या झाडांवर तर त्यांचा डेराच असे.
शाळेतल्या स्टेजच्या वर असणाऱ्या पोकळीत तेव्हा त्यांची घरटी असत. तेव्हा छानशा गोंडस अशा दिसणाऱ्या राघूंचा तो काळ होता. आता स्टेजची पोकळी कबुतरांनी घाण करून टाकलीय. या इथे तळ्याकाठच्या जमिनीवर बसून वर निरभ्र मोकळं आकाश पाहताना चांदण्या दिसण्याच्या ऐवजी हेच सर्व काही आठवतंय.
इथपर्यंत कुणी खेचून आणलंय त्याचा शोध मन घेतंय. अचानक महासीरने मोठी उडी घेतल्याचा आवाज येतो. खूप मोठा तरंग उठून नाहीसा होतो. त्याच्यासोबत मनातल्या आठवणी पण हळूहळू नाहीशा होत जातात आणि तळ्याच्या पलीकडे दिसलेल्या हालचालीकडे लक्ष जातं. ते काय असावं याचा वेध घेतल्यावर गवा असल्याचं दिसतं. इथे बॅटरी मारणं शक्य नाही. जे काही बघायचं ते चांदण्या न् चंद्राच्या प्रकाशातच. आता रान गोळा व्हायला सुरुवात झालीय. रात्रीच्या या खेळात कोण कोण सामील होतंय याची वाट पाहायची.
प्रहर ८
दोन वाजता झोपल्यावर खरं तर झोपच लागत नव्हती. सूं सूं वारा नुसता उधाणला होता आणि त्या उधाणाबरोबर काय काय उडत होतं हे बाहेर जाऊन पाहायची गरज नव्हती. सर्व पालापाचोळा खिडकीशी येऊन जात होता. साचत होता. सर्वत्र अंधार होता. कंदीलाची वात छोटीच केली होती, ती पण मालवली. उगाच त्यात मेणबत्ती-टॉर्च वगरे पेटवून त्या अनाम अंधाराचं न् वाऱ्याचं ते गुज भंग करावं असं वाटत नव्हतं.
खिडकीजवळ जाऊन उभं राहिल्यावर लक्षात आलं की वारा नुसताच नाहीये, सोबत पाऊस पण घेऊन आलाय. मृदगंध जाणवतोय, इतक्यातच अलवार थेंब मोठे टपोरे होऊन पत्र्यावर आदळू लागले. म्हटलं, हा ऑर्केस्ट्रा आता चांगलाच रंगात येणार, आपण निवांत झोपलेलं बरं. पावसामुळे की काय जंगलात देखील एक प्रकारची शांतता पसरली होती.
बाहेर काही सुरूही असेल; पण या पत्र्याच्या खोलीत काय सुगावा लागणार. झोप डोळ्यांवर पसरतेय. पहाटे चार साडेचारच्या सुमाराला जाग आली. बाहेर साडेपाचपर्यंत पडायचं होतं. इतक्यात दाणकन छपरावरून काहीतरी खाली आदळल्यासारखा आवाज आला. एक क्षण घाबरलेच. कारण बाहेर अजून काळोख होता आणि बाथरूम बाहेर होतं. मग लक्षात आलं की वानरं असणार. दोन्ही कंदील पेटवून दरवाजा उघडून सावकाश बाहेर पाहणी करून घेतली. सापकिरडू दिसतंय का ते प्रथम पाहिलं. मग वर पाहिलं तर माकडं नव्हती. दिवस सुरू झाला.
Here are the links for published articles http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=12,10,1464,2280&id=story1&pageno=http://epaper.eprahaar.in/10052015/Mumbai/Suppl/Page4.jpg

http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=16,1510,1470,2268&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/03052015/Mumbai/Suppl/Page4.jpg

Wednesday, January 5, 2011

वन शिक्षण..जन शिक्षण

                         
                           

२०११ वर्ष नुकतेच सुरू झालंय त्यासाठी आमच्या सर्व ब्लॉगर मित्र-मंडळीना शुभेच्छा. हे २०११ साल 'आंतरराष्ट्रीय वन वर्ष' म्हणून युनेस्कोने जाहीर केलंय. त्याच निमित्ताने एलआयसीने यावर्षी काढलेल्या एका अतिशय सुंदर कॅलेंडरमधले आपल्या देशातल्या १२ राष्ट्रीय अभयारण्यांचे अप्रतिम फोटो माझ्यातल्या निसर्गाप्रेमीला खुणावतायत. हे पाहून मन सारखं जंगलाकडे धाव घेऊ पाहतंय. मागल्या वर्षी मध्याप्रदेशमधले बांधवगढ आणि कर्नाटकातले नागरहोले नैशनल पार्क पायाखालून घातलंय. तसे त्याआधी उत्तरांचलचे जिम कॉर्बेट नैशनलपार्क देखील पाहून झालंय. पण अशा जंगलांमध्ये कितीही वेळा गेले तरी न भरणारे हे मन आणि न थकणारी हि पावले आहेत तोपर्यंत अश्या रानबुलाव्याना मन साद देतच राहणार. भारतामध्ये काही ठिकाणी वनांची आणि त्यामधल्या वन्यजीवांची सध्या काय विदारक अवस्था आहे हे सांगायला केवळ जयराम रमेश पुरे पडणार नाहीयेत तर त्यासाठी आज वन आणि वन्यजीव संरक्षणविषयक जागृतीची आणि सरकारी प्रयत्नांची खरे तर सर्वात जास्त गरज आहे. आजमितीला देशातल्या कित्येक जंगलांमध्ये कितीतरी वनरक्षकांची पदे अपुरे पगार आणि योग्य त्या सोयी मिळत नसल्यामुळे रिक्त आहेत. अशा काही त्रुटींची सरकारकडून दाखल घेतली गेली पाहिजे. कारण केवळ जनजागृती करून वने वाचणार नाहीयेत त्यासाठी सबळ कायद्यांची आणि अधिकाधिक सरकारी ( कागदावर न पडून राहण्याऱ्या ) योजनांची गरज आहे. असो, आपण सर्व प्रयत्न करत राहू आणि देशातल्या, राज्यातल्या निसर्ग,वन संवर्धनाला हातभार लावू यात. happy forest year 2011 :) save forests! save earth !