Translate

Showing posts with label himachal pradesh. Show all posts
Showing posts with label himachal pradesh. Show all posts

Wednesday, October 4, 2017

दलाई लामांच्या पाठशाळेत एक दिवस

 मुंबई ते हिमाचल प्रदेशातील धरमशाला असा प्रवास मी फक्त दलाई लामांच्या दर्शनासाठी केला होता. धरमशालाच्या निसर्गसौंदर्यापेक्षाही त्यांना पाहण्याचं आकर्षण मोठं होतं. त्यांचं भाषण ऐकण्याची संधी मला अजिबात चुकवायची नव्हती. अवघ्या जगातील सर्वसामान्य लोकांसहीत बड्या बड्या लोकांनाही ज्यांच्या विचारांनी प्रभावित केलं आहे, ते इतकं किमयागार व्यक्तिमत्व आहे तरी कसं हे मला अनुभवायचं होतं.                       

 तेनझिन ग्यात्सो या माणसाने जगात येऊन तब्बल ८१ वर्ष पूर्ण केलीयत आणि गेली कित्येक दशकं सा-या जगाला शांतीचा संदेश देणा-या या माणसाचं दर्शन घेण्यासाठी मी खूप लांबवर प्रवास करत चालले होते. असं का?; तर तेनझिन ग्यात्सो अशा तिबेटी नावाच्या एका माणसाबद्दल एवढं कुतूहल असण्याचं कारण म्हणजे या साध्यासुध्या राहणीमानाच्या आणि विनम्र दिसणा-या व्यक्तीला जग दलाई लामा म्हणून ओळखतं. महात्मा गांधींनंतर सर्वात अधिक अनुयायी असणारे सर्वांचे लाडके बौद्ध धर्मगुरू चौदावे दलाई लामा. दलाई लामांचं आयुष्य, त्यांची शिकवण, त्यांचा तिबेटसाठी चाललेला लढा, जगभरात त्यांना मिळणारा मानसन्मान, त्यांचे विख्यात अनुयायी, त्यांची पुस्तकं अशा कित्येक गोष्टींबद्दल कित्येक वर्ष वाचलं होतं. मात्र कधी त्यांच्या व्याख्यानाला हजर राहण्याची व त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली नव्हती. दलाई लामा हे हिमाचल प्रदेशातील धरमशाला (किंवा धरमशाळा)मध्ये कायमचे वास्तव्याला असतात हे माहित होतं. आपल्या सुदैवाने आणि भारत सरकारच्या आतिथ्यशीलतेमुळे ते आज गेली कित्येक वर्ष धरमशाला शहरात राहत आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशाच्या सहलीची आखणी करत होते तेव्हा दलाई लामांचं व्याख्यान चुकवायचं नाही हे ही ठरवून टाकलं. तेच तर माझ्या या धरमशाला ट्रीपचं मोठं आकर्षण होतं.
                   
हिमाचल प्रदेशातील कांगरा जिल्ह्यातील धरमशाला शहरात उतरल्यावर आपण दलाई लामांच्या गावात आलोय हे ताबडतोब जाणवतं. इथल्या मॅकलिऑडगंज, नॉरबुलिंका आणि प्रामुख्याने अप्पर धरमशाला भागात गेल्यावर एका वेगळ्याच प्रकारच्या मन:शांतीची अनुभूती येते. सभोवताल निसर्ग सौंदर्याची अपरिमित उधळण असते. आजूबाजूला लहान-मोठ्या बौद्ध भिख्खूंचा वावर दिसतो. पर्यटकांची गर्दी असली तरीही इथल्या वर्दळीतही एक प्रकारची शांतता जाणवते. बाजारातील दुकानांमध्ये दलाई लामांची पुस्तके व त्यांच्या भाषणांच्या कॅसेट्स, सीडीज्, त्यांची पोस्टर्स इत्यादी विकायला ठेवलेलं दिसतं. बाजारात फिरताना किंवा एखाद्या सुंदरशा कॅफेमध्ये बसून निवांत वेळ घालवताना ही भाषणंही ऐकू शकतो. एकूणच दलाई लामांच्या अस्तित्वाचा आणि बौद्ध संस्कृतीचा प्रभाव इथे जाणवत राहातो. त्यांचे अनुयायी व चाहते जगभरातून त्यांना पाहण्यासाठी या लिटल ल्हासामध्ये येत असतात. नुकतीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमही दलाई लामांची भेट घेण्यासाठी इथे आली होती. धरमशाला क्रिकेट स्टेडियम जगप्रसिद्ध आहे. कदाचित निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे जगातील एकमेव क्रिकेट स्टेडियम असावं. मलाही धरमशालामधील इतर अनेक ठिकाणं पाहायची होती परंतु त्याआधी दलाई लामांच्या व्याख्यानाला हजेरी लावता यावी यासाठी मी तिथे गेल्यावर प्रयत्न सुरू केले. मॅकलिऑडगंजमध्येच चौदावे दलाई लामा यांचं निवासस्थान आहे. त्यांचा कार्यालयीन कारभारही इथूनच चालतो. माझ्या धरमशालामधील गाईडने मला निश्चिंत राहायला सांगितलं पण प्रत्यक्ष त्यांचे व्याख्यान ऐकेपर्यंत माझं स्वप्न पूर्ण झालंय असं मला वाटणार नव्हतं.                               

मी गेले तेव्हा डिसेंबर महिना चालू होता. थंडीचा मोसम सुरू झालाच होता. तरीही स्थानिकांच्या मते डिसेंबरनंतर तिथे कडाक्याची थंडी पडते आणि धरमशाला नखशिखांत बर्फाची चादर ओढून घेतं. मला बर्फ पाहण्याचा योग काही आला नाही मात्र दलाई लामांना भेटण्याचा योग काही केल्या मी चुकवणार नव्हते. प्रवेशासाठी अर्ज सकाळी नऊ वाजता त्यांच्या कार्यालयात स्वीकारला जाईल असं आदल्या दिवशीच्या संध्याकाळी कळवण्यात आलं. या अर्जावर लावण्यासाठी फोटो आयडी काढावा लागणार होता. मग त्यासाठी भल्या सकाळी आठ वाजता अस्मादिक फोटोच्या दुकानात हजर झाले. तिथे माझ्यासारख्याच पन्नासएक जणांनी रांग लावली होती. चौकशी केली तर समजलं की हे सर्व देखील व्याख्यानासाठीच अर्ज भरणार होते. व्याख्यानाला उपस्थितांची संख्या मर्यादीत असते त्यामुळे स्वत:ला प्रवेश मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मी फोटो आयडी काढून तो अर्जासहीत भरून दिला. आता आम्हाला काही तास वाट पाहायची होती. त्यानंतर प्रवेश मिळणार की नाही हे समजणार होतं. ब्रॅन्च सिक्योरीटी ऑफीसमध्ये आपण अर्जात जी माहिती भरून देतो त्याची छाननी करून मगच दलाई लामा यांच्या व्याख्यानाला प्रवेश दिला जातो. पत्रकार असल्यामुळे मला प्रवेश मिळेल की नाही याची शंका मनात होती. ती शंका तशीच मनात घेऊन मग मी मॅकलिऑडगंजचा फेरफटका सुरू केला. थोड्या वेळाने समजलं की मला त्या दिवशी नाही पण दुस-या दिवशीच्या व्याख्यानाला हजर राहाता येणार होतं. कारण त्या दिवशीच्या व्याख्यानासाठी माझा अर्ज फार उशिरा गेला होता. असो, काही का असेना प्रवेश मिळणार होता हीच आनंदाची गोष्ट होती.
                            

तिबेटमधून आलेल्या चौदाव्या दलाई लामांनी त्यांच्या अनुयायांसमवेत गेली कित्येक दशकं स्वायत्त स्वतंत्र तिबेटची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या अहिंसावादी, शांतीपूर्ण मार्गाने तिबेट चीनच्या तावडीतून कधीही स्वतंत्र होणं शक्य नाही अशी धरमशालेतील तिबेटी तरूणांची धारणा आहे. अशा प्रकारे दलाई लामा यांच्याभवती टीकेचीही बरीच वादळं घोंघावत असतात. तरीही धरमशाला म्हणजे दलाई लामा हे समीकरण आज कायम आहे. वास्तविक चौदावे दलाई लामा हे भारतात व जगभरात अनेक ठिकाणी धर्म-शांतीप्रसारासाठी फिरत असतात. प्रत्यक्ष धरमशालामध्ये त्यांना पाहायला व ऐकायला मिळणं ही नशीबाचीच गोष्ट. मला राजकीय विचारधारांशी फार काही देणं-घेणं नव्हतं परंतु दलाई लामांनी जीवनसार अनेकदा त्यांच्या तत्वज्ञानातून मांडलेलं आहे, ते मला नेहमीच वाचायला आवडतं. त्यासाठीच मी अखेर धरमशालापर्यंत येऊन पोहोचले होते. एकटीच असल्यामुळे भ्रमंतीवर कोणतंही बंधन नव्हतं. दुस-या दिवशी सकाळी आठ वाजता दलाई लामा यांचं भाषण सुरू होणार होतं. रशियातून आलेल्या बौद्ध धर्माच्या प्रचारक-अनुयायांसाठी हे विशेष व्याख्यान ठेवण्यात आलं होतं.
मी सकाळी सातलाच हॉटेलबाहेर पडले होते. थंडी असली तरी खूप प्रसन्न असं वातावरण होतं. कोवळं उनही पडलेलं होतं. टेंपल ऑफ दलाई लामा म्हणजे नामग्याल बौद्ध पाठशाळेत हे व्याख्यान होतं. तिथे लोकांची रांग लागलेलीच होती. मी जाऊन त्या रांगेत उभी राहिले. प्रत्येकाकडून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काढून घेण्यात आले. मग आम्ही सर्व पहिल्या मजल्यावर लेक्चर हॉलमध्ये जाऊन पोहोचलो. तिथे एका बाजूला चपला काढून ठेवण्याची सोय होती. चपला देखील शिस्तशीर लावून ठेवलेल्या होत्या. शेकडो माणसं होती पण उगाचच चपलांचा ढिग तिथे नव्हता. मग स्वयंसेवकांनी मला एक पांढरी तागाची पिशवी दिली, ज्यात एक खाता म्हणजे पांढरा लहानसा रेशमी कपडा, जपमाळ, एक नोटपॅड व वाचण्यासाठी काही साहित्य असं सर्व होतं. तिथे इतक्या सा-या परदेशी व स्थानिक अनुयायांची, भिख्खू व माझ्यासारख्या काही पर्यटकांची गर्दी होती, परंतु कुठेही आवाज किंवा गोंधळ नव्हता. जो तो आपापलं काम शांततेत पार पाडत होता. मग मी देखील एका कोप-यात जाऊन बसले. बसण्यासाठी आपापली चटई घेऊन येण्याची इथे पद्धत आहे. वास्तविक आदल्या दिवशी व्याख्यानाला हजर राहाताना कोणत्या गोष्टी घेऊन याव्यात याची यादी सोपवण्यात आली होती मात्र ती मी विसरल्यामुळे मी जवळची शाल जमिनीवर अंथरली व त्यावर बसले. दलाई लामा जिथून येणार होते त्या जिन्याजवळची जागा मी शोधून बसले होते.
                     
फोटोग्राफर्स व स्वयंसेवकांची फौज तयारच होती. तितक्यात तिबेटी भाषेत घोषणा झाली. मग इंग्रजी भाषेतही सांगण्यात आलं की दलाई लामा येत आहेत. अगदी खास कार्यकर्त्यांच्या घोळक्यातून दलाई लामा जिन्यावरून येताच उपस्थित सर्वांनी त्यांना बसलेल्या स्थितीत ओणावून दोन हात खाली आडवे करून नमस्कार केला. मी देखील त्यांचं अनुकरण केलं. काहीच मिनिटांमध्ये लेक्चर हॉलमध्ये एक धीरगंभीर आवाज उमटला. हॉलमध्ये एकदम शांतता होती. तिबेटी न समजणा-यांसाठी हेडफोनवर भाषांतराची सोय होती. मधूनच ते काही वाक्य इंग्रजीतही बोलत होते. तिबेटी मनांवर व जगातल्या लाखो लोकांच्याही मनावर अधिराज्य करणारे दलाई लामा प्रत्यक्ष आमच्यात बसून बोलत होते. वरच्या मजल्यावर एक सिंहासनासारखी छानशी तक्तपोशी होती त्यावर ते विराजमान झाले होते. आम्ही थोडे खालच्या बाजूला बसलो होतो. असं हे भाषण एक-दीड तास चाललं. त्यांच्या वाणीप्रभुत्वाचा अनुभव येत होता. मधूनच ते काही मजेशीरही बोलत असावेत कारण लोक तेव्हा हसत होते. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी जमलेल्यांमध्ये अगदी गरीब म्हातारीपासून ते महागड्या कारमधून आलेल्या लोकांपर्यंत सर्वच प्रकारचे लोक होते. दलाई लामांचं व्यक्तिमत्वही खरंच तेजपुंज आहे. हसल्यावर ते लहान बालकासारखे वाटत. इथे आल्यावर कित्येकांची बौद्धिक भूक भागते तर कित्येकांना मन:शांती लाभते.                               


भाषणामध्ये एक चहासाठी विश्रांती देखील झाली. मी आल्यापासून इतरांनी आणलेल्या मगांकडे पाहत होते, ते कोडं मला तेव्हा उमगलं. मी काही मग नेला नव्हता मग माझ्यावर दया दाखवून मला एका कागदी कपात तिबेटी चहा देण्यात आला. थंडीच्या दिवसात सकाळच्या उन्हात बसून तो चहा पिणं छानच वाटलं. सुमारे दोन तासांनी दलाई लामा भाषण संपवून जायला निघाले. तेव्हा त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी इच्छुकांची एक रांग करण्यात आली. त्यावेळेस मला पिशवीतल्या रेशमी कपड्याचा अर्थ उमगला. तो खाता मी दलाई लामा यांच्या हातात दिला व त्यांनी तो पुन्हा माझ्या गळ्यात घातला व त्यांनी काही आशिर्वादपर शब्द पुटपुटले. ही तिबेटी अभिवादनाची व आदरभाव व्यक्त करण्याची पारंपरिक पद्धत आहे. त्यानंतर आम्ही एकमेकांना हात जोडून नमस्कार केला. थोड्याच वेळात मी तिथून निघाले. ही भेट अविस्मरणीय होती. मन कसं हलकं झालं होतं. एक स्वप्न पूर्ण झाल्याचा अपार आनंद मनात मावत नव्हता. खूपशी थोर माणसं माझ्या पिढीचं समजण्याचं वय येईपर्यंत जगातून निघून गेली होती. त्यामुळेच पूर्ण जगावर आपल्या सत्शील विचारांचा प्रभाव टाकणा-या दलाई लामांना भेटण्याची माझी इच्छा पूर्ण झाल्याचाही तो आनंद होता.

This article has been published in the newspaper, Maharashtra Dinman on 30/03/2017

Friday, April 24, 2015

तुम्ही कोण?


पर्यटक, मग तो हौशी वा नवखा असो किंवा अगदी दर आठवडयाला घराच्या बाहेर वीकेंड घालवणारा, प्रत्येकाची काही ना काही आवडनिवड असतेच. कुठे जायचं, काय पाहायचं हे सर्व ठरवूनच बहुतेक वेळा आपण प्रवासाला सुरुवात करत असतो. परंतु फिरण्यासाठी इतकी विविध आकर्षण असतात की अनेकदा काय पाहावं हेच कळत नाही. या सा-या गुंत्यातून अगदी पर्यटकालाही ‘कोहम’ असा प्रश्न पडतो.
टूर कंपन्यांसोबत जाऊन इथली-तिथली देवळं पाहणा-या भाविकांसाठी अख्खा जन्म अपुरा पडेल इतकी देवळं भारतात आहेत, असं मी कधीतरी गमतीने म्हणते.
अर्थात, यात कुठेही मस्करीचा भाग नाही; पण भारतातली मंदिरांची पुरातन स्थापत्यशैली व कोरीवकाम हे खरंच इतकी अप्रतिम व प्रेक्षणीय आहे की कोणत्याही प्रांतात जा, तिथली निदान १० प्रमुख देवळं तरी पाहण्यासारखी असतातच असतात.
तुमच्या सहलीत पाहण्याच्या प्रेक्षणीय स्थळांमधून काढून टाकता येणं अशक्य असं एखादं तरी देऊळ प्रत्येक प्रांतात असतंच. याचा अनुभव मला दक्षिणेत आला तसाच राजस्थानातही आला.
कितीही पाहायचं नाही म्हटलं तरीही इथली देवळं व राजवाडे, महाल यांची अत्यंत मनमोहक वास्तुशैली व कारागिरी ही आपल्याला त्यांच्याकडे खेचून नेतेच.
परंतु राजवाडे-महाल किंवा देवळं पाहणं ही माझी आवड नक्कीच नाही. मला शिल्पकला व वास्तुरचना यात काही विशेष असेल तर पाहायला आवडतं, मात्र फिरायला गेल्यावर उठसूट तेच पाहीन असंही नाही.
ही झाली माझी आवड. तर प्रत्येक पर्यटकाची स्वत:ची अशी काही खास आवडनिवड असते. ज्यात त्याला त्याच्या पसंतीची ठिकाणं पाहायला आवडतात. कोणाला जंगलं आवडतात तर कोणाला द-याखो-या, कोणाला सागरकिनारे आवडतात तर कोणाला ग्रामीण विभागात फेरफटका मारायला. शक्यतो स्वत:ला आवडेल त्या ठिकाणीच जाण्याचा पर्यटकांचा कल असतो. उदाहरणार्थ शिल्पकला पाहण्यात रुची असणारा पर्यटक हा तशाच ठिकाणी जाईल.
आपल्याला नेहमीच्या आयुष्यात न मिळू शकणा-या अशा गोष्टींकडे आपला प्रवास सतत सुरू असतो. हे केवळ दैनंदिन आयुष्यासाठीच नव्हे तर पर्यटनासाठीही लागू होतं. भारतात राहणारा पर्यटक सतत बारा महिने ऊन-घाम-गर्दी याला तोंड देत असतो.
मग त्याला युरोप-अमेरिकेसारख्या थंड हवेच्या प्रदेशांची भुरळ पडते. तिथे घालवलेले दिवस मोजकेच असले तरी ते त्याच्यासाठी अविस्मरणीय होतात. अशा प्रकारे आपल्या भोवतालच्या परिस्थितीवरही आपली फिरण्याची आवड ठरत असते.
तशीच ती स्वभावावरही अवलंबून असते. साहसी वृत्तीचा असलेला पर्यटक त्याला पॅराग्लायिडग, स्कुबा डायिव्हग, बंजी जंपिग, सी-ग्लायिडग असे काही साहसी, रोमांचक खेळ खेळायला मिळतील अशा ठिकाणांना प्राधान्य देतो. निसर्गप्रेमाची व वन्यजीवनाची आवड असल्यामुळे माझ्या यादीत जंगल जवळपास असलेली स्थळं भरपूर असतात.
मात्र हे झालं सर्व वैयक्तिक. आपण बरेचदा टूर कंपन्यांसोबतही फिरायला जात असतो. काही वेळा तो प्रदेश आपल्याला अनोळखी असतो. तेव्हा मात्र टूर एजंट व गाईड सांगेल ती स्थळं आपल्याला पाहावी लागतात. त्याला नाइलाज असतो. हे स्थलदर्शन आपल्या हातात नसतं, त्यामुळे इच्छा नसेल तरीही आपल्याला त्या ठिकाणी जावंच लागतं.
मी भारतातली बरीचशी देवळं याचमुळे पाहिलेली आहेत. अर्थात ग्रुपसोबत गेल्यामुळे ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही. असो. परंतु आता पूर्वीसारखे टिपिकल थंड हवेची स्थळं, धबधबे वगरे पाहणारे पर्यटक राहिलेले नाहीत. त्यांच्याही आवडी, मागण्या बदलत चालल्या आहेत. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांसमोर नवी पर्यटन स्थळं शोधून काढण्याचं आव्हान समोर उभं राहिलेलं आहे.
अशीच एक नवी टूम निघाली आहे ती युद्धग्रस्त किंवा तणावग्रस्त भागांना भेट देण्याची. जर्मनी, रशिया, जपान वगरे देशात जाऊन जागतिक महायुद्धांचे अवशेष व स्मारकं पाहण्याची आजही लोकांना आवड आहेच.
मात्र नव्या पिढीने यात अजूनच भर घातलीय. इस्रयल, काबूल, अफगाणिस्तान, इजिप्त वगरेसारख्या ठिकाणी जाऊन तिथलं जनजीवन, संस्कृती आदी पाहण्यात हल्ली लोकांना रस निर्माण झाला आहे.
जागतिक घडामोडींचे पडसाद आपल्या वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, मासिकं इत्यादी माध्यमातून उमटत असतात. याचं अत्यंत रंजक पद्धतीनं वर्णन व चित्रण केलं जातं. त्यामुळे तिथल्या लोकांबाबत जगातील नागरिकांना सहानुभूती निर्माण तर होतेच, शिवाय त्यांना जाऊन एकदा प्रत्यक्ष पाहावं किंवा भेटावं असंही ब-याच जणांना वाटत असतं.
मात्र अशा तणावग्रस्त भागात एकटयाने फिरू शकणारे धाडसी पर्यटक फार कमी असतात. सर्वामध्येच एवढे धाडस नसते. अशांसाठी मग आता टूर कंपन्यांनीच पॅकेजेस जाहीर केलेली आहेत. अगदी आपलं काश्मीरही यात येतंच की.
कारण आपल्यासाठी ती एक सर्वसाधारण सहल असली तरी भारताबाहेरून येणा-या पर्यटकासाठी ती निश्चितच एक साहसी सहल असते. कारण त्याने टीव्हीवर काश्मीरसंबंधीचं वृत्तांकन पाहिलेलं असते, त्यासंबंधी वाचलेले असते.
असाच एक प्रकार देशाच्या टोकाच्या सीमाभागात जाण्या-या पर्यटकांचा असतो. कोणत्याही देशाच्या अशा शेवटच्या सीमाभागात फिरणं हे इतर पर्यटनस्थळी फिरण्यापेक्षा थोडं जास्त जोखमीचं असतं.
कारण आज अनेक देशांमध्ये प्रांतीय, धार्मिक वाद सुरू आहेत. अशा ठिकाणी तणाव असण्याची शक्यता बरेचदा असते. त्यामुळे देशाच्या सीमाभागात जाऊन प्रत्यक्ष सीमा पाहता आल्या तर नक्कीच ते पर्यटकांना आवडतं.
आता त्यासाठी वाघा बॉर्डरला जाणारे लाखो पर्यटक आपल्याकडे आहेत. पण तो झाला संरक्षित व जनतेला पाहण्यासाठी कायदेशीररित्या खुला असलेला सीमाभाग. परंतु अनेकांना इंफाळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, प. बंगाल, काश्मीर इत्यादी भागात जाऊन तिथल्या सीमेनजीकच्या गावांनाही भेट द्यायला आवडतं.
तिथे जाऊन सीमा पाहणं हा अर्थातच एक पूर्णपणे वेगळा अनुभव असतो. त्यात तुमच्यासोबत जाणकार व्यक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे, शिवाय विशेष परवानगीही लागते. अन्यथा नुसताच निरुद्देश इकडे-तिकडे पाहत फिरणारा पर्यटक घुसखोर म्हणून मारला जाऊ शकतो.
तर अशा प्रकारे पर्यटकांच्या यादीमध्ये काही वेगळीच पर्यटनस्थळं असू शकतात. अशा ठिकाणी एकदा तरी जायला मिळावं यासाठी जातीचा पर्यटक कसोशीचे प्रयत्न करत असतो.
मात्र नेहमीच आपल्या आवडीचे पाहायला मिळेलच असं नाही. तेव्हा आजूबाजूला दिसणा-या गोष्टींमध्येही खूप काही सापडतं. एखादं ठिकाण तुमच्या खास पसंतीस उतरलं नसेल तर तिथे थीम फोटोग्राफी करा.
कोणत्याही ठिकाणी निसर्ग हा आपल्यासोबत असतोच. त्यातल्या थीम्स शोधा. परिसरातील लोकांमध्ये, इतर जीवनामध्ये थीम शोधा. त्यानेही समाधान होत नसेल तर तिथलं लोकजीवन पाहा, तिथली गाणी ऐका, लोकांशी बोला, स्थानिक खाद्यपदार्थ चाखा, चालीरितींची माहिती करून घ्या. स्थानिक वाहनांमधून प्रवास करा. तिथली भाषा अवगत करण्याचा प्रयत्न करा.
तिथं एखादी स्थानिक वस्तू छोटयाशा दुकानात जाऊन खरेदी करा. यातून तो प्रदेश तुम्हाला समजत जातो. कोणत्याही शहराची-गावाची माहिती घ्यायची म्हणजे इंटरनेट किंवा पुस्तक, नकाशे उघडून पाठ करायचं असं नाही तर तिथं प्रत्यक्षात गेल्यावर जे दिसतेय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.
यामुळे तुम्ही पर्यटक म्हणून समृद्ध व्हाल. कदाचित मग पुढल्या वेळी तुम्ही अमुकच एका ठिकाणीच मी जाईन म्हणून हट्ट धरणार नाही. एकदा का पर्यटक म्हणून अनुभवसंपन्न झालात की ‘वसुधव कुटुंबकम’चा प्रत्यय तुम्हाला जरुर येईल.
Here is the link for published article- http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=6,1406,1462,2266&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/22032015/Mumbai/Suppl/Page4.jpg

Monday, August 22, 2011

मसरूरचं रॉक टेम्पल

                                                  
तीर्थस्थानांना किंवा देवस्थानांना भेट देताना काहीवेळा बरेचसे साम्य जाणवते. एक म्हणजे मंदिरं हा या साम्यातला अविभाज्य भाग..वेगवेगळया ठिकाणी विविध पुरातन आणि भिन्न राजवटींचा इतिहास तसेच शिल्पशैलींचा शतकांचा वारसा सांगणारी मंदिरं, देवालय पाहायला मिळतात. हिमाचल प्रदेशात गेले असताना कांगरा जिल्ह्यात धरमशालाजवळ असणाऱ्या नारगोटा सुरीयन लिंक रोडवर अश्याच एका अतिपुरातन मंदिरशिल्पाला भेट देण्याचा योग आला. धरमशाला हे खरं तर तिबेटी संस्कृतीचा प्रभाव असणारं छोटसं शहर आहे. मात्र खुद्द कांगरा जिल्ह्यातील इतर गावांमध्ये हिंदू संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. धरमशालेजवळ काठघर, बैजनाथ, बज्रेश्वरी,ज्वालामुखी आणि श्री नैनादेवी मंदिर अशी काही मंदिरं पाहायला मिळाली परंतु सर्वात उल्लेखनीय आणि लक्षणीय वाटलं ते मसरूरचं रॉक टेम्पल ! माझ्या गाईडला आधीच सांगून ठेवल्यामुळे त्यानंही सर्वच प्रेक्षणीय स्थळांना भोज्जा देऊन येण्याच्या कामगिरीला काट मारण्याची खबरदारी घेतली होती आणि त्यामुळेच मला हे मसरूरचं रॉक कट टेम्पल अर्थात एका अखंड दगडातून कोरलेलं अत्यंत सुंदर मंदिर शिल्प पाहण्याची संधी मिळाली.


धरमशालामधील भागसुपासून मसरूरला पोहोचायला आम्हाला सुमारे दोन तास लागले पण मसरूरजवळच्याच लुंज गावात मस्तपैकी दही-आलू पराठे असा नाश्ता झाल्यामुळे एवढ्या प्रवासाचं काही वाटलं नाही. खरं तर हे मंदिर दुर्लक्षित आहे हे तिथं पाउल टाकल्या टाकल्याच समजते. पुराणवस्तू संशोधन खात्यानं लावलेला ‘संरक्षित स्थळ’चा एक नाममात्र फलक तिथं आहे, त्यामुळेच केवळ या मंदिर प्राचीन असल्याचं समजते. बाकी तिथं कधीकधी प्रवेश फी घेण्यासाठी देखील द्वारपाल उपस्थित नसतो. ऑफ सिझन असो किंवा पीक सिझन असो, या मंदिरापाशी फिरकण्याची तसदी फारसे पर्यटक घेत नाहीत. मात्र ऑफबीट स्थळांना भेट देण्याची आवड असणारे काही पर्यटक आणि संशोधक-अभ्यासक इथे आवर्जून येतात. आम्ही तिथं पोहोचलो तेव्हाही तिथं कोणीच पर्यटक नव्हते त्यामुळे ‘ देखो म्याडमजी, बोला था ना..यहां कोई भी नही है’ असं ऐकवण्याची संधी माझ्या गाईडला मिळाली.

जिथं प्रवेशद्वाराऐवजी मंदिराच्या मागून प्रवेश करावा लागतो असं मंदिर मी प्रथमच पाहत होते. मागल्या बाजूनं शिरतानाच या मंदिर शिल्पाची भव्यता जाणवते. आतमध्ये गेल्यावर पुढील प्रांगणात आल्यावर दोन मोठी शिखरं दिसतात. पूर्ण अवलोकन केल्यावर कळते कि हे संपूर्णपणे एकाच अखंड पाषाणातून कोरलेले भव्यतम असें १५ मंदिरांचे संकुल आहे. सुमारे १६० फूट लांब, १०५ फूट रुंद आणि ५०-६० फूट उंचीचे हे मंदिर शिल्प खरं तर भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम आविष्कारच आहे. काही तज्ञांनी या मंदिराची कंबोडियातील ‘अंगोकार वट ’ या मंदिर शिल्पांशी तुलना केली आहे. मसरुरची हि सर्व मंदिरं पूर्वाभिमुख असून मुख्य मंदिरातील गर्भगृहात प्रभू रामचंद्र, सितामाई आणि लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत. छोटेखानी दगडी सभामंडप देखील बांधलेला लक्षात येतो. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुबक नक्षीकाम आढळतं आणि तसेच नक्षीकाम मंदिरात ठिकठिकाणी दिसतं. पुराणवस्तू संशोधकांच्या आणि इतिहास तज्ञांच्या अंदाजानुसार हे मंदिरशिल्प आठव्या शतकात बांधलेलं आहे. अर्थात हे मंदिर कोणी आणि का बांधलं याचे काही पुरावे उपलब्ध नसले तरी या मंदिराशी निगडीत अनेक पौराणिक आख्यायिका परिसरात ऐकायला मिळतात. पांडवांनी हे मंदिर अवघ्या एका रात्रीत कोरून काढल्याची गोष्टही इथे सांगितली जाते. या मंदिराला ठाकुरद्वार आणि शिवमंदिर म्हणूनही ओळखले जाते .

मंदिरासमोरच्या आवारात अतिशय सुंदर असा दगडी बांध असलेला तलाव आहे. या बांधालगत काही शिल्पाकृती ठेवलेल्या दिसतात ज्यावर शिलालेखही आहेत. तलावाच्या पाण्यात मंदिराचं प्रतिबिंब फारच मोहक दिसतं विशेषतः पौर्णिमेच्या रात्री हा मंदिर परिसर अतिशय अलौकिक दिसत असल्याचं इथल्या पंडितजींनी सांगितलं. मंदिरातील राम-सीतेच्या मूर्तींची नैमित्तिक पूजा-अर्चना केली जाते. मला मात्र गाभाऱ्यात बराच अंधार असल्यामुळे मूर्तींचा फोटो काढता आला नाही. १९०५ साली झालेल्या प्रचंड भूकंपात या मंदिराची खूपच पडझड झाली. त्यावेळी तुटून पडलेले पाषाणखंड अजूनही तसेच आवारात आहेत. त्या भूकंपानंतर इथली काही शिल्प आणि मूर्ती सिमल्याच्या वस्तुसंग्रहालयात हलविण्यात आली होती. प्रमुख मंदिराच्या जिन्यातून वर गेल्यावर धौलाधार पर्वतराजीने वेढलेला अतिशय मनोहारी परिसर पाहताना तिथून पाय निघत नाहीत.

पडझड झाल्यामुळे सध्या हे मंदिर शिल्प जीर्णशीर्ण झालेय. एका अखंड प्रस्तरात खोदलेले आणि तेही एकसंध असें हे मंदिर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. पूर्ण भारतात फक्त चारच ठिकाणी अशा प्रकारची मंदिरं पाहायला मिळतात. मसरूर सोडल्यास आपल्या महाराष्ट्रातील कैलास वेरूळ लेणी, दक्षिणेला महाबलीपुरम येथील रथ आणि राजस्थानमध्ये धर्मनाथ इथं अशी अखंड पाषाणात कोरलेली मंदिर शिल्पकला आढळते. या मंदिरातली शिल्पकलेची शैली नागर पद्धतीची असली तरी शिखरांमध्ये दाक्षिणात्य द्रविडी शैलीचा प्रभाव जाणवतो. या शिल्पांमध्ये देव, अप्सरा, गंधर्व, शिव-पार्वती, ऋषी, प्राणी इत्यादींचा समावेश आहे. भारतीय शिल्पकलेच्या आणि पौराणिक इतिहासात मंदिरांचं स्थान अतिशय मोठं आणि अढळ आहे. मात्र मसरूरच्या या मंदिर शिल्पाचा ठेवा आजही दुर्लक्षित आहे. वास्तविक या मंदिराचा युनेस्कोतर्फे जाहीर झालेल्या जागतिक ठेव्याचा दर्जा असणाऱ्या स्थळांमध्ये समावेश झाला आहे परंतु त्या दर्जाची कोणतीही देखरेख किंवा सुरक्षा इथं आढळत नाही. एवढंच काय आजूबाजूला पर्यटकांसाठी कोणत्याही सोयीसुविधा इथं आढळत नाहीत. प्रसारमाध्यमातून फारशी प्रसिद्धी मिळाली नसल्यामुळे या सुंदर मंदिराकडे जाण्याचे कष्ट पर्यटकही घेत नाहीत. पण हिमाचल प्रदेशात गेल्यावर आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि पौराणिक शिल्पकलेचा हा अनमोल नमुना नक्कीच पाहावा असा आहे.

Saturday, April 30, 2011

शुभ्रसुंदर धरमशाला

                                               
उत्तरेकडची सर्व हिल स्टेशन्स पालथी घातलीयत, त्यात आता आणखी धरमशालात काय उरलंय पाहण्यासारखं, असं म्हणणारे पर्यटक खरोखरीच मनात आणलं तर अध्र्या-एक तसात पूर्ण धरमशाला पाहून टाकू शकतात, पण खरं तर असा विचार करणं चुकीचंही ठरू शकतं. इथं तब्येतीत मस्तपैकी ट्रेक करत आणि गेस्ट हाऊसेसच्या रूमवर लोळत, इथल्या मार्केटमध्ये फिरत-फिरत पंधरा-वीस दिवस काढल्याखेरीज धरमशालाचं कल्चर आपल्याला कळत नाही. ‘किंगफिशर’चं छोटेखानी विमान अवघ्या दीड तासातच दिल्लीच्या शाहरी गजबजाटापासून आपल्याला एका वेगळ्या जगात आणून सोडतं.. समोर याला लँडस्केप म्हणावं की एअरपोर्ट, अशा कोड्यात टाकणारा अप्रतिम कांगरा एअरपोर्ट असतो. धरमशालाला विमानमार्गे जायचं असेल तर इथंच यावं लागतं. उतरल्या-उतरल्या प्रेमातच पडावा असा हा सुंदर-सुबकसा आणि छोटासाच कांगरा विमानतळ कांगरा हॅलिमधल्या गग्गल गावात आहे. धरमशाला इथून साधारण 40 ते 45 मिनिटांवर आहे. (बाय रोड) या एअरपोर्टवर दिवसातून फक्त एकदाच विमान उतरतं आणि तेच विमान परतीच्या प्रवाशांना माघारी दिल्लीला घेऊन जातं. छानपैकी विविध फुलांची बागा मेटेंन केलेला आणि सभोवताली ‘धवलधार’ पर्वत रांगानी वेढलेला हा कांगरा एअरपोर्ट पुढल्या प्रवासात दिसणा-या निसर्गसौंदर्याची चुणूक दाखवतो.

कांगरा हा हिमाचल प्रदेशातला सर्वात मोठा जिल्हा. धरमाशालामध्ये पोहोचेपर्यंत रस्त्यावरल्या गावांमध्ये ‘प्रकृती की रक्षा, जलसंपदा बचाओ’, ‘सर्वशिक्षा अभियान’ अशा टाइपच्या सरकारी योजना गावांपर्यंत पोहोचल्याच्या खुणा दिसत राहतात. वाटेतल्या गावात उतरून पहाडी कावा पिणं मस्ट असतं. नाही तर तिथल्या जोरदार थंडीमध्ये तोंडाची बडबड सुरू ठेवणं मुश्कील होतं.
उत्तरेकडची सर्व हिल स्टेशन्स पालथी घातलीयत, त्यात आता आणखी धरमशालात काय उरलंय पाहण्यासारखं, असं म्हणणारे पर्यटक खरोखरीच मनात आणलं तर अर्ध्या-एक तासात पूर्ण धरमशाला पाहून टाकू शकतात, पण खरं तर असा विचार करणं चुकीचंही ठरू शकतं. इथं तब्येतीत मस्तपैकी ट्रेक करत करत आणि गेस्ट हाऊसेसच्या रूमवर लोळत, इथल्या मार्केटमध्ये फिरत फिरत 15-20 दिवस काढल्याखेरीज धरमशालाचं कल्चर आपल्याला कळत नाही. म्हटलं तर धमशाला आणि भागसूनाग, मॅकलिऑड गंज, फोरसिथ गंज, नड्डी, तलनू, धरमकोट असा सर्व आपसपाचा एरिया अगदी टिकलीएवढा आहे; पण धरमशाला म्हणजे केवळ फॉरेनर्सची चहल-पहल नाही, तर तिबेटियन कल्चरचा झेंडा हिज होलीनेस दलाई लामांच्या या आवडत्या निसर्गधामात पक्का रोवला गेलाय. या ‘लिटिल ल्हासा’त तिबेटियन संस्कृतीचा आणि दलाई लामांचा प्रभाव पावलोपावली जाणवत राहतो.
शेवटी नाही म्हटलं तरी धरमशालाकडून येणारा पर्यटन महसूल हा बहुतांशी दलाई लामांमुळेच इथं भेट देणा-या विदेशी पर्यटकांच्या खिशातून येत असतो. हिज होलीनेस दलाई लामांच्या टिचिंग सेशन म्हणजे प्रवचनांसाठी धरमशालात पर्यटक आणि त्यांचे शिष्य जगभरातून येत असतात. नुसतेच येत नाहीत तर हजारो जण इथंच तीन ते सहा महिने मुक्काम ठोकून असतात. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दलाई लामा धरमशालेत वर्षातून दोन ते तीन वेळाच टिचिंग सेशन घेतात. अनेकदा ही टिचिंग सेशन्स त्यांच्या रशियन, अमेरिकन, जर्मन शिष्यांसाठी असतात. तरीही प्रत्येक वेळी केवळ हिज होलीनेसना पाहण्यासाठी म्हणून श्रद्धाळू तिबेटियन्स हजारोंच्या संख्येनं त्यांच्या मठात गर्दी करतात.
मार्केटमध्ये फिरतानाही अमिताभ बच्चनच्या खर्जातल्या आवाजाशी स्पर्धा करणा-या दलाई लामांच्या आवाजातल्या प्रवचनांच्या सीडीज- टेप्स जागोजागी दुकानातून ऐकू येतात. तिबेटी भाषेचा आपल्याला गंधही नसला तरी एकूणच या धीरगंभीर आवाजात प्रेमळ हुकूमत आणि आश्वासकता जाणवते. ‘सेव्ह तिबेट’च्या आंदोलनाला चीनमध्ये स्थान नसलं तरी धरमशालामध्ये मात्र या चळवळीचं अस्तित्व ठिकठिकाणी दिसतं. इथल्या तरुण पिढीचे पालक गेल्या जमान्यातल्या तिबेटमधून निर्वासित म्हणून धरमशालेत येऊन राहिलेले आहेत. तसाच तरुण मुलांच्याही मनात भारत आणि तिबेट असा भेदभाव पक्का आहे. ‘सेव्ह तिबेट’च्या या चळवळीत तरुण मुलं बहुसंख्येनं आहेत आणि विशेष म्हणजे आपण कधी ना कधी स्वतंत्र तिबेटमध्ये परत जाणार, ही भावना ही मुलं पटकन बोलूनही दाखवतात. गॉड ब्लेस देम ऑल!
बौद्धमठ किंवा मोनॅस्टरीज् हे धरमशालाचं उल्लेखनीय वैशिष्टय़. अर्थातच हिज हायनेस दलाई लामांच्या अस्तित्वामुळे धरमशाला आणि परिसरात अनेक बौद्धमठ आढतील; पण या सर्वामध्ये सर्वात देखणी मोनॅस्टरी आहे ती कर्मापा मोनॅस्टरी. सिधबारीजवळ असणा-या या भव्य बौद्धमठात तितकीच प्रसन्न शांतता आहे. या मठात दलाई लामांच्या खालोखाल आदरणीय मानले जाणारे सतरावे कर्मापा राहतात. ओग्येन ट्रिनले दार्जी कर्मापा अवघ्या 24 वर्षाचे आहेत. कर्मापा आणि दलाई लामा हे दोघंही पुनर्जन्म घेतात, असं मानलं जातं. बौद्धमठांखेरीज इथल्या ‘नॉरबुलिंका इन्स्टिटय़ूट’मध्येही फेरफटका मारायलाच हवा. या मठाची रचना एका जपानी वास्तुरचनाकारानं केली आहे. काळय़ा दगडांचा वापर करून बांधलेल्या या मठावर आणि तिथल्या बागेवर अर्थातच जपानी वास्तुकलेचा प्रभाव जाणवतो. इथं आर्टिस्ट मुलं येऊन राहतात आणि शिल्पकाम, चित्रकला, सुतारकाम, शिवणकाम, गार्डनिंग, हस्तकलेसारख्या कला शिकतात. त्यांना इथं ‘थांगका आर्ट’ ही तिबेटियन धार्मिक चित्रकला शिकवली जाते. यात चित्रं रंगवताना सोन्याचा वापर होतो आणि त्यांचे रंगही विशिष्ट प्रकारे बनवले जातात. त्यामुळं ही चित्रं शेकडो वर्ष टिकतात आणि तिबेटियन संस्कृतीत या ‘थांगका’ चित्रांना खास महत्त्व आहे.
या ‘नॉरबुलिंका इन्स्टिटय़ूट’नंतर अनेक गाईड फोरसियगंजला जाऊन स्तराव्या शतकातलं एक चर्च पाहण्याचा आग्रह करतात. तिथे विशेष काही पाहण्यासारखं नाही; पण बाजूच्याच सिमेट्रीत देवआनंदची एकेकाळची हिरॉईन आणि जिची मुंबईतल्या तिच्या राहत्या घरी हत्या झाली, ती प्रिया राजवंश इथं चिरविश्रांती घेताना पाहून नवल वाटतं.
जिभेला बारा गावांच्या खाण्या-पिण्याची चटक असेल तर धमशालेत नुकतेच तिबेटी आणि भारतीय नाही तर देशादेशींच्या खाद्यपदार्थाचे ऑप्शन्स मिळतात. प्रत्यक्षात ज्या देशांचं एकमेकांशी पटतही नाही, अशा अमेरिका, जर्मनी, इस्रायल, हंगेरी, रशियन, जपान, इटलीसारख्या देशांची खाद्यसंस्कृती इथं सुखनैव एकत्र नांदताना दिसते. साठ-सत्तर रुपयांत दोन दिवस पुरेल इतकी कॉफी देणारी इथे अनेक ‘कॅफेज्’ आहेत. त्यामुळे तीन-चार तास एका ठिकाणी गप्पा मारण्यासाठी एकत्र येणा-या पर्यटकांची मोठीच सोय होते. रिझनेबल दरातलं, उत्तम आणि चविष्ट तिबेटियन फूड खायचं असेल तर ग्यामेड मोनॅस्टरी हे बेस्ट ठिकाण नाही तर मग कोणत्याही स्ट्रीट फूड जॉइंटचा रस्ता धरणं उत्तम. आपल्याकडे जेवढी वडापावाला लोकप्रियता आहे तेवढाच फेमस इथला ‘थुगपा’ आहे. थुगपा म्हणजे भाज्या घालून शिजवलेल्या रस्सेदार नूडल्स. गरीब-श्रीमंत असे सर्वजण दिवसातल्या कोणत्याही वेळी या थुगपावर ताव मारताना दिसतात.
धरमशाला मनसोक्त भटकून झाल्यावर इथं ट्रेकिंगसाठीदेखील त्रियुंड तोरल पास, ब्लेनी पाससारखे अनेक पर्याय आहेत. हे ट्रेक चार-पाच दिवसांत सहज होऊ शकतात. झालंच तर आसपास जाऊन पालमपूरचे चहाचे मळे, कांगरा फोर्ट, चामुंडा देवीचं आणि बैजनाथचं मंदिर पाहू शकता. वेगळं काही पाहायचं असेल तर धरमशालेजवळ क्रिकेटचं मोठं स्टेडियमदेखील आहे. इथून सुमारे दीड तासावर असणारं मसरूरचं रॉक टेंपल न चुकवण्यासारखं आहे. वरवर पाहताना हे साधे दगड वाटले तरी एका पूर्ण भीमकाय पाषाणातून पाच हजार वर्षांपूर्वी पांडवांनी हे मंदिर कोरून काढलंय. मंदिरालगतच सुंदरसा तलाव आहे आणि पलीकडे पुन्हा जिथून तिथून दिसत राहणा-या धवलधार पर्वतरांगा आहेत. या मसरूर रॉक टेंपलला युनेस्कोनं जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या मंदिराकडे सरकारचं आणि पुरातत्त्व खात्याचं फारसं लक्ष नसल्यामुळे मंदिराची पडझड होत चाललीय. अस्सल ट्रेकर आणि शांततेच्या शोधात असणारा पर्यटक अशा दोन्ही प्रकारच्या फिरस्त्यांसाठी अशाप्रकारे धरमशाला हे एक उत्तम ठिकाण आहे.
this article previously published in:-
http://www.prahaar.in/madhyantar/madventure/22100.html