Translate

Showing posts with label dalai lama. Show all posts
Showing posts with label dalai lama. Show all posts

Wednesday, October 4, 2017

दलाई लामांच्या पाठशाळेत एक दिवस

 मुंबई ते हिमाचल प्रदेशातील धरमशाला असा प्रवास मी फक्त दलाई लामांच्या दर्शनासाठी केला होता. धरमशालाच्या निसर्गसौंदर्यापेक्षाही त्यांना पाहण्याचं आकर्षण मोठं होतं. त्यांचं भाषण ऐकण्याची संधी मला अजिबात चुकवायची नव्हती. अवघ्या जगातील सर्वसामान्य लोकांसहीत बड्या बड्या लोकांनाही ज्यांच्या विचारांनी प्रभावित केलं आहे, ते इतकं किमयागार व्यक्तिमत्व आहे तरी कसं हे मला अनुभवायचं होतं.                       

 तेनझिन ग्यात्सो या माणसाने जगात येऊन तब्बल ८१ वर्ष पूर्ण केलीयत आणि गेली कित्येक दशकं सा-या जगाला शांतीचा संदेश देणा-या या माणसाचं दर्शन घेण्यासाठी मी खूप लांबवर प्रवास करत चालले होते. असं का?; तर तेनझिन ग्यात्सो अशा तिबेटी नावाच्या एका माणसाबद्दल एवढं कुतूहल असण्याचं कारण म्हणजे या साध्यासुध्या राहणीमानाच्या आणि विनम्र दिसणा-या व्यक्तीला जग दलाई लामा म्हणून ओळखतं. महात्मा गांधींनंतर सर्वात अधिक अनुयायी असणारे सर्वांचे लाडके बौद्ध धर्मगुरू चौदावे दलाई लामा. दलाई लामांचं आयुष्य, त्यांची शिकवण, त्यांचा तिबेटसाठी चाललेला लढा, जगभरात त्यांना मिळणारा मानसन्मान, त्यांचे विख्यात अनुयायी, त्यांची पुस्तकं अशा कित्येक गोष्टींबद्दल कित्येक वर्ष वाचलं होतं. मात्र कधी त्यांच्या व्याख्यानाला हजर राहण्याची व त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली नव्हती. दलाई लामा हे हिमाचल प्रदेशातील धरमशाला (किंवा धरमशाळा)मध्ये कायमचे वास्तव्याला असतात हे माहित होतं. आपल्या सुदैवाने आणि भारत सरकारच्या आतिथ्यशीलतेमुळे ते आज गेली कित्येक वर्ष धरमशाला शहरात राहत आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशाच्या सहलीची आखणी करत होते तेव्हा दलाई लामांचं व्याख्यान चुकवायचं नाही हे ही ठरवून टाकलं. तेच तर माझ्या या धरमशाला ट्रीपचं मोठं आकर्षण होतं.
                   
हिमाचल प्रदेशातील कांगरा जिल्ह्यातील धरमशाला शहरात उतरल्यावर आपण दलाई लामांच्या गावात आलोय हे ताबडतोब जाणवतं. इथल्या मॅकलिऑडगंज, नॉरबुलिंका आणि प्रामुख्याने अप्पर धरमशाला भागात गेल्यावर एका वेगळ्याच प्रकारच्या मन:शांतीची अनुभूती येते. सभोवताल निसर्ग सौंदर्याची अपरिमित उधळण असते. आजूबाजूला लहान-मोठ्या बौद्ध भिख्खूंचा वावर दिसतो. पर्यटकांची गर्दी असली तरीही इथल्या वर्दळीतही एक प्रकारची शांतता जाणवते. बाजारातील दुकानांमध्ये दलाई लामांची पुस्तके व त्यांच्या भाषणांच्या कॅसेट्स, सीडीज्, त्यांची पोस्टर्स इत्यादी विकायला ठेवलेलं दिसतं. बाजारात फिरताना किंवा एखाद्या सुंदरशा कॅफेमध्ये बसून निवांत वेळ घालवताना ही भाषणंही ऐकू शकतो. एकूणच दलाई लामांच्या अस्तित्वाचा आणि बौद्ध संस्कृतीचा प्रभाव इथे जाणवत राहातो. त्यांचे अनुयायी व चाहते जगभरातून त्यांना पाहण्यासाठी या लिटल ल्हासामध्ये येत असतात. नुकतीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमही दलाई लामांची भेट घेण्यासाठी इथे आली होती. धरमशाला क्रिकेट स्टेडियम जगप्रसिद्ध आहे. कदाचित निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे जगातील एकमेव क्रिकेट स्टेडियम असावं. मलाही धरमशालामधील इतर अनेक ठिकाणं पाहायची होती परंतु त्याआधी दलाई लामांच्या व्याख्यानाला हजेरी लावता यावी यासाठी मी तिथे गेल्यावर प्रयत्न सुरू केले. मॅकलिऑडगंजमध्येच चौदावे दलाई लामा यांचं निवासस्थान आहे. त्यांचा कार्यालयीन कारभारही इथूनच चालतो. माझ्या धरमशालामधील गाईडने मला निश्चिंत राहायला सांगितलं पण प्रत्यक्ष त्यांचे व्याख्यान ऐकेपर्यंत माझं स्वप्न पूर्ण झालंय असं मला वाटणार नव्हतं.                               

मी गेले तेव्हा डिसेंबर महिना चालू होता. थंडीचा मोसम सुरू झालाच होता. तरीही स्थानिकांच्या मते डिसेंबरनंतर तिथे कडाक्याची थंडी पडते आणि धरमशाला नखशिखांत बर्फाची चादर ओढून घेतं. मला बर्फ पाहण्याचा योग काही आला नाही मात्र दलाई लामांना भेटण्याचा योग काही केल्या मी चुकवणार नव्हते. प्रवेशासाठी अर्ज सकाळी नऊ वाजता त्यांच्या कार्यालयात स्वीकारला जाईल असं आदल्या दिवशीच्या संध्याकाळी कळवण्यात आलं. या अर्जावर लावण्यासाठी फोटो आयडी काढावा लागणार होता. मग त्यासाठी भल्या सकाळी आठ वाजता अस्मादिक फोटोच्या दुकानात हजर झाले. तिथे माझ्यासारख्याच पन्नासएक जणांनी रांग लावली होती. चौकशी केली तर समजलं की हे सर्व देखील व्याख्यानासाठीच अर्ज भरणार होते. व्याख्यानाला उपस्थितांची संख्या मर्यादीत असते त्यामुळे स्वत:ला प्रवेश मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मी फोटो आयडी काढून तो अर्जासहीत भरून दिला. आता आम्हाला काही तास वाट पाहायची होती. त्यानंतर प्रवेश मिळणार की नाही हे समजणार होतं. ब्रॅन्च सिक्योरीटी ऑफीसमध्ये आपण अर्जात जी माहिती भरून देतो त्याची छाननी करून मगच दलाई लामा यांच्या व्याख्यानाला प्रवेश दिला जातो. पत्रकार असल्यामुळे मला प्रवेश मिळेल की नाही याची शंका मनात होती. ती शंका तशीच मनात घेऊन मग मी मॅकलिऑडगंजचा फेरफटका सुरू केला. थोड्या वेळाने समजलं की मला त्या दिवशी नाही पण दुस-या दिवशीच्या व्याख्यानाला हजर राहाता येणार होतं. कारण त्या दिवशीच्या व्याख्यानासाठी माझा अर्ज फार उशिरा गेला होता. असो, काही का असेना प्रवेश मिळणार होता हीच आनंदाची गोष्ट होती.
                            

तिबेटमधून आलेल्या चौदाव्या दलाई लामांनी त्यांच्या अनुयायांसमवेत गेली कित्येक दशकं स्वायत्त स्वतंत्र तिबेटची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या अहिंसावादी, शांतीपूर्ण मार्गाने तिबेट चीनच्या तावडीतून कधीही स्वतंत्र होणं शक्य नाही अशी धरमशालेतील तिबेटी तरूणांची धारणा आहे. अशा प्रकारे दलाई लामा यांच्याभवती टीकेचीही बरीच वादळं घोंघावत असतात. तरीही धरमशाला म्हणजे दलाई लामा हे समीकरण आज कायम आहे. वास्तविक चौदावे दलाई लामा हे भारतात व जगभरात अनेक ठिकाणी धर्म-शांतीप्रसारासाठी फिरत असतात. प्रत्यक्ष धरमशालामध्ये त्यांना पाहायला व ऐकायला मिळणं ही नशीबाचीच गोष्ट. मला राजकीय विचारधारांशी फार काही देणं-घेणं नव्हतं परंतु दलाई लामांनी जीवनसार अनेकदा त्यांच्या तत्वज्ञानातून मांडलेलं आहे, ते मला नेहमीच वाचायला आवडतं. त्यासाठीच मी अखेर धरमशालापर्यंत येऊन पोहोचले होते. एकटीच असल्यामुळे भ्रमंतीवर कोणतंही बंधन नव्हतं. दुस-या दिवशी सकाळी आठ वाजता दलाई लामा यांचं भाषण सुरू होणार होतं. रशियातून आलेल्या बौद्ध धर्माच्या प्रचारक-अनुयायांसाठी हे विशेष व्याख्यान ठेवण्यात आलं होतं.
मी सकाळी सातलाच हॉटेलबाहेर पडले होते. थंडी असली तरी खूप प्रसन्न असं वातावरण होतं. कोवळं उनही पडलेलं होतं. टेंपल ऑफ दलाई लामा म्हणजे नामग्याल बौद्ध पाठशाळेत हे व्याख्यान होतं. तिथे लोकांची रांग लागलेलीच होती. मी जाऊन त्या रांगेत उभी राहिले. प्रत्येकाकडून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काढून घेण्यात आले. मग आम्ही सर्व पहिल्या मजल्यावर लेक्चर हॉलमध्ये जाऊन पोहोचलो. तिथे एका बाजूला चपला काढून ठेवण्याची सोय होती. चपला देखील शिस्तशीर लावून ठेवलेल्या होत्या. शेकडो माणसं होती पण उगाचच चपलांचा ढिग तिथे नव्हता. मग स्वयंसेवकांनी मला एक पांढरी तागाची पिशवी दिली, ज्यात एक खाता म्हणजे पांढरा लहानसा रेशमी कपडा, जपमाळ, एक नोटपॅड व वाचण्यासाठी काही साहित्य असं सर्व होतं. तिथे इतक्या सा-या परदेशी व स्थानिक अनुयायांची, भिख्खू व माझ्यासारख्या काही पर्यटकांची गर्दी होती, परंतु कुठेही आवाज किंवा गोंधळ नव्हता. जो तो आपापलं काम शांततेत पार पाडत होता. मग मी देखील एका कोप-यात जाऊन बसले. बसण्यासाठी आपापली चटई घेऊन येण्याची इथे पद्धत आहे. वास्तविक आदल्या दिवशी व्याख्यानाला हजर राहाताना कोणत्या गोष्टी घेऊन याव्यात याची यादी सोपवण्यात आली होती मात्र ती मी विसरल्यामुळे मी जवळची शाल जमिनीवर अंथरली व त्यावर बसले. दलाई लामा जिथून येणार होते त्या जिन्याजवळची जागा मी शोधून बसले होते.
                     
फोटोग्राफर्स व स्वयंसेवकांची फौज तयारच होती. तितक्यात तिबेटी भाषेत घोषणा झाली. मग इंग्रजी भाषेतही सांगण्यात आलं की दलाई लामा येत आहेत. अगदी खास कार्यकर्त्यांच्या घोळक्यातून दलाई लामा जिन्यावरून येताच उपस्थित सर्वांनी त्यांना बसलेल्या स्थितीत ओणावून दोन हात खाली आडवे करून नमस्कार केला. मी देखील त्यांचं अनुकरण केलं. काहीच मिनिटांमध्ये लेक्चर हॉलमध्ये एक धीरगंभीर आवाज उमटला. हॉलमध्ये एकदम शांतता होती. तिबेटी न समजणा-यांसाठी हेडफोनवर भाषांतराची सोय होती. मधूनच ते काही वाक्य इंग्रजीतही बोलत होते. तिबेटी मनांवर व जगातल्या लाखो लोकांच्याही मनावर अधिराज्य करणारे दलाई लामा प्रत्यक्ष आमच्यात बसून बोलत होते. वरच्या मजल्यावर एक सिंहासनासारखी छानशी तक्तपोशी होती त्यावर ते विराजमान झाले होते. आम्ही थोडे खालच्या बाजूला बसलो होतो. असं हे भाषण एक-दीड तास चाललं. त्यांच्या वाणीप्रभुत्वाचा अनुभव येत होता. मधूनच ते काही मजेशीरही बोलत असावेत कारण लोक तेव्हा हसत होते. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी जमलेल्यांमध्ये अगदी गरीब म्हातारीपासून ते महागड्या कारमधून आलेल्या लोकांपर्यंत सर्वच प्रकारचे लोक होते. दलाई लामांचं व्यक्तिमत्वही खरंच तेजपुंज आहे. हसल्यावर ते लहान बालकासारखे वाटत. इथे आल्यावर कित्येकांची बौद्धिक भूक भागते तर कित्येकांना मन:शांती लाभते.                               


भाषणामध्ये एक चहासाठी विश्रांती देखील झाली. मी आल्यापासून इतरांनी आणलेल्या मगांकडे पाहत होते, ते कोडं मला तेव्हा उमगलं. मी काही मग नेला नव्हता मग माझ्यावर दया दाखवून मला एका कागदी कपात तिबेटी चहा देण्यात आला. थंडीच्या दिवसात सकाळच्या उन्हात बसून तो चहा पिणं छानच वाटलं. सुमारे दोन तासांनी दलाई लामा भाषण संपवून जायला निघाले. तेव्हा त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी इच्छुकांची एक रांग करण्यात आली. त्यावेळेस मला पिशवीतल्या रेशमी कपड्याचा अर्थ उमगला. तो खाता मी दलाई लामा यांच्या हातात दिला व त्यांनी तो पुन्हा माझ्या गळ्यात घातला व त्यांनी काही आशिर्वादपर शब्द पुटपुटले. ही तिबेटी अभिवादनाची व आदरभाव व्यक्त करण्याची पारंपरिक पद्धत आहे. त्यानंतर आम्ही एकमेकांना हात जोडून नमस्कार केला. थोड्याच वेळात मी तिथून निघाले. ही भेट अविस्मरणीय होती. मन कसं हलकं झालं होतं. एक स्वप्न पूर्ण झाल्याचा अपार आनंद मनात मावत नव्हता. खूपशी थोर माणसं माझ्या पिढीचं समजण्याचं वय येईपर्यंत जगातून निघून गेली होती. त्यामुळेच पूर्ण जगावर आपल्या सत्शील विचारांचा प्रभाव टाकणा-या दलाई लामांना भेटण्याची माझी इच्छा पूर्ण झाल्याचाही तो आनंद होता.

This article has been published in the newspaper, Maharashtra Dinman on 30/03/2017

Wednesday, September 23, 2015

कशासाठी.. कोणासाठी?

निरुद्देश मनाने निघालेली पावलं कुठल्या ना कुठल्या गोष्टीत गुंततातच आणि मग त्यांना मिळतात वळणं आणि रस्ते. पाहिजे असणा-या ठिकाणी आपण पोहोचलो किंवा अगदी नाही पोहोचलो तरी काही ठिकाणी पावलं जरा जास्तच काळ रेंगाळतात. अशा आठवणींमध्ये मऊ रेतीत पावलं जशी रुतत जातात, तसं मन रुततच जातं. अशाच एका अनुभवाबद्दल. मॅकलिऑडगंजमधल्या नामग्याल मोनास्ट्रीमध्ये भरपूर गर्दी जमलेली होती. पण इतकी गर्दी असूनही गोंधळ-गोंगाट अजिबात नव्हता. लोक जणू काही मूकपणे व्यवहार करत होते. त्या गर्दीलाही एक शिस्त होती व सोबत लय देखील होती. सकाळचे सात-साडेसात वाजले होते. लोक भरभरून येतच होती. अर्थातच ही मोनास्ट्री शेकडो लोकांना सामावून घेण्याइतकी मोठी आहे.
कोणी, कुठून कसं जावं हे सांगण्यासाठी स्वयंसेवक ठिकठिकाणी उभे होते. सभागृहात शिरण्याआधी प्रत्येकाला एक सुती पिशवी देण्यात येत होती. त्यामध्ये काही माहितीपत्रकं होती. सभागृहात शिरण्याआधीच इलेक्ट्रॉनिक उपकरणं काढून घेण्यात आली होती.
अर्थात, हे माहीत असल्यामुळे मी मोबाईल व कॅमेरा तिथे नेलाच नव्हता. बसण्याचं आसन आपलं आपण आणायचं अशी सूचना आदल्या दिवशी देण्यात आली होती. त्यामुळे मी शालीची बैठक करून बसले. ज्यांना तिबेटी भाषा समजत नव्हती त्यांना इअरफोन देण्यात आले. थोडयाच वेळात सर्व जण अगदी शांत बसून वाट पाहू लागले.
तिथे सर्व वयोगटातली माणसं आलेली होती. भारतीयांसोबतच तिथे अनेक परदेशी मंडळी देखील होती. त्या वाट पाहण्यात देखील एक प्रकारची आत्मीयता, तन्मयता होती. मग एक धीरगंभीर आवाज तिथे निनादला. तो आवाज ऐकताच हरेकाच्या चेह-यावरचे भाव पालटले. त्या आवाजातली भारदास्तता जाणवत होती, माझ्यावर तर त्या आवाजाने जादूच फेरली. तीन मजल्यांवर माणसं दाटीवाटीने तरीही कोणाला त्रास न होईल अशा पद्धतीने बसली होती.
एक तासाभराने भाषण संपलं व मी उठून वरच्या मजल्याकडे दर्शनासाठी जायला निघाले. टीव्ही पत्रकारांच्या घोळक्यात शिरल्यावर मला हायसं वाटलं व त्यांच्यासोबत पुढेही सरकता आलं. अचानक एका व्यक्तीच्या पुढयात जाऊन मी थबकले. त्यांनी माझे हात हातात घेतले आणि त्यांच्या हातातला ‘खाता’ हे पांढरं वस्त्र मला दिलं. त्या क्षणाला सर्व जीवन सार्थकी लागलं आहे असंच वाटलं.
Buddha Statue at Namgyal Monastry1माझ्या तोंडून फार काही शब्द फुटूच शकले नाहीत, इतकी मी त्या क्षणाला भारावून गेले होते. मी तुमची पुस्तकं वाचली आहेत किंवा मला तुमचे विचार आवडतात असं काहीसं मी पुटपुटले असावे. पण माझ्या डोळ्यातली श्रद्धा त्यांना दिसली असावी, तिचं प्रतिबिंब त्यांच्या मिस्कील वाटणा-या डोळ्यात दिसत होतं.
हिज होलीनेस दलाई लामांना भेटून मी कृतार्थ झाले होते. अशा व्यक्तींना भेटणं हे देखील आपल्या नशिबात असावं लागतं. मी धरमशालाला पोहोचल्यावर सर्वप्रथम दलाई लामा यांच्या लेक्चरसंबंधी चौकशी केली होती. फारच कमी सीट्स शिल्लक होत्या, काही परवानग्या मिळवल्यानंतर त्यांच्या लेक्चरला बसण्याची अनुमती मला मिळाली होती. त्यांच्याचसाठी मी धरमशालापर्यंत गेले होते. त्यामुळे हा माझ्या दृष्टीने अलौकिक, अविस्मरणीय क्षण होता. ते माझ्या या प्रवासाची प्रेरणा होते.
प्रवासाला प्रेरित करणारं, आपण बाहेर पडावं यासाठी उद्युक्त करणारं असं काहीतरी असलंच पाहिजे असं वाटणारे अनेक लोक आहेत आणि याउलट वाटणारेही खूप लोक आहेत. इंग्लिश लेखक गिल्बर्ट चेस्टरटनचं एक वचन आहे, ‘अ ट्रॅव्हलर सीज व्हॉट ही सीज, अ टूरिस्ट सीज व्हॉट ही हॅज कम टू सी’. कुठेही जायला एका पायावर तयार असणारे फिरस्ते आणि कोरीव प्रवासी यांच्यातला फरक सांगायला चेस्टरटनचं हे एकच वाक्य पुरेसं आहे.
खरा प्रवासी जो असतो, ज्याला एखाद्या गोष्टीच्या नेमून दिलेल्या अर्थापलीकडेही काही दिसतं तर केवळ पर्यटक असणारा व्यक्ती एखाद्या गोष्टीचा सर्वसामान्य अर्थच फक्त समजू शकतो. अमुक एक गोष्ट पाहायलाच बाहेर पडलोय म्हणून आपण तीच गोष्ट पाहणार आहोत किंवा खरं तर अमुक एक गोष्ट पाहण्यासाठीच बाहेर पडावं असं नाही. कोणताही प्रवास हा फार काही न बोलता-सांगता तुमच्या जाणिवा समृद्ध करत असतो. फक्त प्रवासाला बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या जाणिवांच्या कक्षा विस्तारणं ही ज्याची त्याची गोष्ट. असे अनेक बहुपदरी अनुभव प्रवासादरम्यान आपल्या झोळीत पडत असतात. त्यांच्याकडे आपलं लक्ष असतंच असंही नाही.
काही वेळा ती गोष्ट घडून गेल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ कळतो. प्रवास करताना तर बरेचदा असं होतं. कारण आपण एखाद्या ठिकाणी खूप जास्त वेळ थांबत नसतो. त्यामुळे ती गोष्ट तिथून आल्यानंतरही आपल्या मनात रेंगाळत राहते व तिचे अर्थ मग उलगडत जातात. बहुतेक वेळा हे अनुभव खूप साधेही असतात, त्यात फार काही खोल असा अर्थही नसतो, तरीही त्या त्या वेळी ते अनुभव आपल्याला स्तिमित करून जातात. हे तुमच्या प्रवासाला नवा अर्थ, संपन्नता मिळवून देणारे अनुभव असतात.
त्यांना ओढून-ताणून आणता येत नाही आणि तसंच त्यांचा अर्थ दुस-यांना विचारून वगैरे समजावून घेताही येत नाही. आपला आपणच तो शोधायचा असतो. एखाद्या दुष्काळग्रस्त, पाण्याची तीव्र टंचाई असणा-या गावात गेल्यावर त्यांचा जीवनानुभव आपल्याला उमजतो. एरव्ही भारतीय ग्रामीण विभागातील संस्कृतीचा अनुभव घ्या वगैरे जाहिराती करून टूर कंपन्यांतर्फे दाखवल्या जाणा-या गावांमध्ये हा चटका जाणवणार नाही. याचसाठी नेहमी चाकोरीबद्ध प्रवास न करता, उद्देशांमध्ये नवीनता आणून वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करण्याचा प्रयत्न करा.
Print Friendly
Tags:  |  |  | 

Wednesday, August 10, 2011

when I met an archaeologist in the sky…

                                                      
It was the year of 2009 when I decided to visit Dharamshala as I was much impressed by the words of His Holiness Dalai Lama ( fortunately there I got an opportunity to attend his lecture & to see him from close ). I landed at Delhi airport from Mumbai to catch the flight to Dharamshala. I was not actually worried for how to spend whole two good hours at Delhi airport so started enjoying a good time at the bookshop and was just observing the people around while waiting for that dearest sugary boarding announcement for the flight to Dharamshala.
When I entered in the plane I was really amused by it's short and sweet structure as it was my first time to board on this kind of plane. I liked it at the very first sight. It was a flight for around 50-60 people and then soon I found myself adjusting to the last seat next to the door. While I was searching a good wide place to move my feet’s and a headrest, I heard someone speaking in ‘Shudhha Hindi Bhasha’ surprisingly ( as that flight had more foreign travelers than Indian ) I turned my head toward the scene and found one huge well heightened American ( he was dressed typically like a tourist with a felt hat ) was politely requesting to the flight attendant to place his big geographical map in the safe place. An American speaking the language of masses on a flight is not so regular scene, so I looked back because this gentleman conversing deliberately in Hindi was certainly an attraction for me. For a while, I forgot my seating penalty and enjoyed his conversation.
I was planning to request a shift of seat and I eyed upon empty seat near this American stranger. For a moment my journalistic curiosity aroused & I asked him if I can sit on that empty seat nearby his. He obliged me and then very soon we exchanged our visiting cards. I found him very friendly.  He informed me about the Dhauladhar range of mountains which we were watching through our plane windows and even helped me shooting them too.
After one & half hour our flight landed and I was smitten by the beauty around Kangra airport in Gaggal… It was strikingly awesome and then I heard the invitation sort of words from Mr. John Vincent Bellezza, my new & the first friend in Dharamsala.
We had a good simple Pahari style lunch at his home on my another day in Dharamshala and had very interesting time talking with him. John told me that he is living in India for 25 years and that’s the reason he can speak good Hindi (besides Hindi John can speak & understand 5-6 languages like Punjabi, Urdu, Western Pahari, Tibetan, Nepali, Spanish etc ) Still after 25 years in India a strong dedication exists in John which made him to took the decision to devote his life to the study of Tibetan civilization & now he is loving his life here in India so away from his home, from his people all the way. Salute to his adventurous life! Once again I met him when I was leaving Dharamshala ( again for a lunch  ) and promised John that I would not come back to him only for an official interview but would like to meet him again as a friend.
To know more about John Vincent Bellezza’s amazing genius personality please visit-  http://www.tibetarchaeology.com/

Saturday, April 30, 2011

शुभ्रसुंदर धरमशाला

                                               
उत्तरेकडची सर्व हिल स्टेशन्स पालथी घातलीयत, त्यात आता आणखी धरमशालात काय उरलंय पाहण्यासारखं, असं म्हणणारे पर्यटक खरोखरीच मनात आणलं तर अध्र्या-एक तसात पूर्ण धरमशाला पाहून टाकू शकतात, पण खरं तर असा विचार करणं चुकीचंही ठरू शकतं. इथं तब्येतीत मस्तपैकी ट्रेक करत आणि गेस्ट हाऊसेसच्या रूमवर लोळत, इथल्या मार्केटमध्ये फिरत-फिरत पंधरा-वीस दिवस काढल्याखेरीज धरमशालाचं कल्चर आपल्याला कळत नाही. ‘किंगफिशर’चं छोटेखानी विमान अवघ्या दीड तासातच दिल्लीच्या शाहरी गजबजाटापासून आपल्याला एका वेगळ्या जगात आणून सोडतं.. समोर याला लँडस्केप म्हणावं की एअरपोर्ट, अशा कोड्यात टाकणारा अप्रतिम कांगरा एअरपोर्ट असतो. धरमशालाला विमानमार्गे जायचं असेल तर इथंच यावं लागतं. उतरल्या-उतरल्या प्रेमातच पडावा असा हा सुंदर-सुबकसा आणि छोटासाच कांगरा विमानतळ कांगरा हॅलिमधल्या गग्गल गावात आहे. धरमशाला इथून साधारण 40 ते 45 मिनिटांवर आहे. (बाय रोड) या एअरपोर्टवर दिवसातून फक्त एकदाच विमान उतरतं आणि तेच विमान परतीच्या प्रवाशांना माघारी दिल्लीला घेऊन जातं. छानपैकी विविध फुलांची बागा मेटेंन केलेला आणि सभोवताली ‘धवलधार’ पर्वत रांगानी वेढलेला हा कांगरा एअरपोर्ट पुढल्या प्रवासात दिसणा-या निसर्गसौंदर्याची चुणूक दाखवतो.

कांगरा हा हिमाचल प्रदेशातला सर्वात मोठा जिल्हा. धरमाशालामध्ये पोहोचेपर्यंत रस्त्यावरल्या गावांमध्ये ‘प्रकृती की रक्षा, जलसंपदा बचाओ’, ‘सर्वशिक्षा अभियान’ अशा टाइपच्या सरकारी योजना गावांपर्यंत पोहोचल्याच्या खुणा दिसत राहतात. वाटेतल्या गावात उतरून पहाडी कावा पिणं मस्ट असतं. नाही तर तिथल्या जोरदार थंडीमध्ये तोंडाची बडबड सुरू ठेवणं मुश्कील होतं.
उत्तरेकडची सर्व हिल स्टेशन्स पालथी घातलीयत, त्यात आता आणखी धरमशालात काय उरलंय पाहण्यासारखं, असं म्हणणारे पर्यटक खरोखरीच मनात आणलं तर अर्ध्या-एक तासात पूर्ण धरमशाला पाहून टाकू शकतात, पण खरं तर असा विचार करणं चुकीचंही ठरू शकतं. इथं तब्येतीत मस्तपैकी ट्रेक करत करत आणि गेस्ट हाऊसेसच्या रूमवर लोळत, इथल्या मार्केटमध्ये फिरत फिरत 15-20 दिवस काढल्याखेरीज धरमशालाचं कल्चर आपल्याला कळत नाही. म्हटलं तर धमशाला आणि भागसूनाग, मॅकलिऑड गंज, फोरसिथ गंज, नड्डी, तलनू, धरमकोट असा सर्व आपसपाचा एरिया अगदी टिकलीएवढा आहे; पण धरमशाला म्हणजे केवळ फॉरेनर्सची चहल-पहल नाही, तर तिबेटियन कल्चरचा झेंडा हिज होलीनेस दलाई लामांच्या या आवडत्या निसर्गधामात पक्का रोवला गेलाय. या ‘लिटिल ल्हासा’त तिबेटियन संस्कृतीचा आणि दलाई लामांचा प्रभाव पावलोपावली जाणवत राहतो.
शेवटी नाही म्हटलं तरी धरमशालाकडून येणारा पर्यटन महसूल हा बहुतांशी दलाई लामांमुळेच इथं भेट देणा-या विदेशी पर्यटकांच्या खिशातून येत असतो. हिज होलीनेस दलाई लामांच्या टिचिंग सेशन म्हणजे प्रवचनांसाठी धरमशालात पर्यटक आणि त्यांचे शिष्य जगभरातून येत असतात. नुसतेच येत नाहीत तर हजारो जण इथंच तीन ते सहा महिने मुक्काम ठोकून असतात. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दलाई लामा धरमशालेत वर्षातून दोन ते तीन वेळाच टिचिंग सेशन घेतात. अनेकदा ही टिचिंग सेशन्स त्यांच्या रशियन, अमेरिकन, जर्मन शिष्यांसाठी असतात. तरीही प्रत्येक वेळी केवळ हिज होलीनेसना पाहण्यासाठी म्हणून श्रद्धाळू तिबेटियन्स हजारोंच्या संख्येनं त्यांच्या मठात गर्दी करतात.
मार्केटमध्ये फिरतानाही अमिताभ बच्चनच्या खर्जातल्या आवाजाशी स्पर्धा करणा-या दलाई लामांच्या आवाजातल्या प्रवचनांच्या सीडीज- टेप्स जागोजागी दुकानातून ऐकू येतात. तिबेटी भाषेचा आपल्याला गंधही नसला तरी एकूणच या धीरगंभीर आवाजात प्रेमळ हुकूमत आणि आश्वासकता जाणवते. ‘सेव्ह तिबेट’च्या आंदोलनाला चीनमध्ये स्थान नसलं तरी धरमशालामध्ये मात्र या चळवळीचं अस्तित्व ठिकठिकाणी दिसतं. इथल्या तरुण पिढीचे पालक गेल्या जमान्यातल्या तिबेटमधून निर्वासित म्हणून धरमशालेत येऊन राहिलेले आहेत. तसाच तरुण मुलांच्याही मनात भारत आणि तिबेट असा भेदभाव पक्का आहे. ‘सेव्ह तिबेट’च्या या चळवळीत तरुण मुलं बहुसंख्येनं आहेत आणि विशेष म्हणजे आपण कधी ना कधी स्वतंत्र तिबेटमध्ये परत जाणार, ही भावना ही मुलं पटकन बोलूनही दाखवतात. गॉड ब्लेस देम ऑल!
बौद्धमठ किंवा मोनॅस्टरीज् हे धरमशालाचं उल्लेखनीय वैशिष्टय़. अर्थातच हिज हायनेस दलाई लामांच्या अस्तित्वामुळे धरमशाला आणि परिसरात अनेक बौद्धमठ आढतील; पण या सर्वामध्ये सर्वात देखणी मोनॅस्टरी आहे ती कर्मापा मोनॅस्टरी. सिधबारीजवळ असणा-या या भव्य बौद्धमठात तितकीच प्रसन्न शांतता आहे. या मठात दलाई लामांच्या खालोखाल आदरणीय मानले जाणारे सतरावे कर्मापा राहतात. ओग्येन ट्रिनले दार्जी कर्मापा अवघ्या 24 वर्षाचे आहेत. कर्मापा आणि दलाई लामा हे दोघंही पुनर्जन्म घेतात, असं मानलं जातं. बौद्धमठांखेरीज इथल्या ‘नॉरबुलिंका इन्स्टिटय़ूट’मध्येही फेरफटका मारायलाच हवा. या मठाची रचना एका जपानी वास्तुरचनाकारानं केली आहे. काळय़ा दगडांचा वापर करून बांधलेल्या या मठावर आणि तिथल्या बागेवर अर्थातच जपानी वास्तुकलेचा प्रभाव जाणवतो. इथं आर्टिस्ट मुलं येऊन राहतात आणि शिल्पकाम, चित्रकला, सुतारकाम, शिवणकाम, गार्डनिंग, हस्तकलेसारख्या कला शिकतात. त्यांना इथं ‘थांगका आर्ट’ ही तिबेटियन धार्मिक चित्रकला शिकवली जाते. यात चित्रं रंगवताना सोन्याचा वापर होतो आणि त्यांचे रंगही विशिष्ट प्रकारे बनवले जातात. त्यामुळं ही चित्रं शेकडो वर्ष टिकतात आणि तिबेटियन संस्कृतीत या ‘थांगका’ चित्रांना खास महत्त्व आहे.
या ‘नॉरबुलिंका इन्स्टिटय़ूट’नंतर अनेक गाईड फोरसियगंजला जाऊन स्तराव्या शतकातलं एक चर्च पाहण्याचा आग्रह करतात. तिथे विशेष काही पाहण्यासारखं नाही; पण बाजूच्याच सिमेट्रीत देवआनंदची एकेकाळची हिरॉईन आणि जिची मुंबईतल्या तिच्या राहत्या घरी हत्या झाली, ती प्रिया राजवंश इथं चिरविश्रांती घेताना पाहून नवल वाटतं.
जिभेला बारा गावांच्या खाण्या-पिण्याची चटक असेल तर धमशालेत नुकतेच तिबेटी आणि भारतीय नाही तर देशादेशींच्या खाद्यपदार्थाचे ऑप्शन्स मिळतात. प्रत्यक्षात ज्या देशांचं एकमेकांशी पटतही नाही, अशा अमेरिका, जर्मनी, इस्रायल, हंगेरी, रशियन, जपान, इटलीसारख्या देशांची खाद्यसंस्कृती इथं सुखनैव एकत्र नांदताना दिसते. साठ-सत्तर रुपयांत दोन दिवस पुरेल इतकी कॉफी देणारी इथे अनेक ‘कॅफेज्’ आहेत. त्यामुळे तीन-चार तास एका ठिकाणी गप्पा मारण्यासाठी एकत्र येणा-या पर्यटकांची मोठीच सोय होते. रिझनेबल दरातलं, उत्तम आणि चविष्ट तिबेटियन फूड खायचं असेल तर ग्यामेड मोनॅस्टरी हे बेस्ट ठिकाण नाही तर मग कोणत्याही स्ट्रीट फूड जॉइंटचा रस्ता धरणं उत्तम. आपल्याकडे जेवढी वडापावाला लोकप्रियता आहे तेवढाच फेमस इथला ‘थुगपा’ आहे. थुगपा म्हणजे भाज्या घालून शिजवलेल्या रस्सेदार नूडल्स. गरीब-श्रीमंत असे सर्वजण दिवसातल्या कोणत्याही वेळी या थुगपावर ताव मारताना दिसतात.
धरमशाला मनसोक्त भटकून झाल्यावर इथं ट्रेकिंगसाठीदेखील त्रियुंड तोरल पास, ब्लेनी पाससारखे अनेक पर्याय आहेत. हे ट्रेक चार-पाच दिवसांत सहज होऊ शकतात. झालंच तर आसपास जाऊन पालमपूरचे चहाचे मळे, कांगरा फोर्ट, चामुंडा देवीचं आणि बैजनाथचं मंदिर पाहू शकता. वेगळं काही पाहायचं असेल तर धरमशालेजवळ क्रिकेटचं मोठं स्टेडियमदेखील आहे. इथून सुमारे दीड तासावर असणारं मसरूरचं रॉक टेंपल न चुकवण्यासारखं आहे. वरवर पाहताना हे साधे दगड वाटले तरी एका पूर्ण भीमकाय पाषाणातून पाच हजार वर्षांपूर्वी पांडवांनी हे मंदिर कोरून काढलंय. मंदिरालगतच सुंदरसा तलाव आहे आणि पलीकडे पुन्हा जिथून तिथून दिसत राहणा-या धवलधार पर्वतरांगा आहेत. या मसरूर रॉक टेंपलला युनेस्कोनं जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या मंदिराकडे सरकारचं आणि पुरातत्त्व खात्याचं फारसं लक्ष नसल्यामुळे मंदिराची पडझड होत चाललीय. अस्सल ट्रेकर आणि शांततेच्या शोधात असणारा पर्यटक अशा दोन्ही प्रकारच्या फिरस्त्यांसाठी अशाप्रकारे धरमशाला हे एक उत्तम ठिकाण आहे.
this article previously published in:-
http://www.prahaar.in/madhyantar/madventure/22100.html