Translate

Tuesday, April 16, 2013

१५० दिवसांची सागरी साहसगाथा-Sagar Parikrama-2


                                                        
३१ मार्च २०१३ रोजी भारतीय नौदलाच्या म्हणजेच पर्यायाने भारताच्या खात्यात एक अभिमानास्पद जागतिक विक्रम जमा झाला. या विश्वविक्रमासाठी कोणतीही स्पर्धा घेतली गेली नव्हती किंवा इतर खेळांप्रमाणे कोणत्याही लांच्छनास्पद प्रकारे आता भारताकडून हा विक्रम हिसकावून घेतला जाईल अशी शक्यता देखील नाही, या उलट हा विक्रम करणाऱ्या तरुणाने धाडसाचा कहर केलाय आणि अवघ्या पाच  महिन्यात विनाथांबा कोणाच्याही मदतीशिवाय तेही एकट्याने म्हादेई या छोट्या शिडाच्या नौके(यॉट)मधून २१,६०० समुद्री मैलांची म्हणजेच ४१,४०० किलोमीटरची सागर परिक्रमा पूर्ण करून जगाला त्याची दखल घेणं भाग पाडले आहे. लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांच्या विजयी सागरस्वारीने भारतीय नौदलाच्या इतिहासात नवे मापदंड रोवले गेले आहेत. विश्वविक्रमांच्या नोंदी जरी कागदावर होत असल्या तरी त्यांना जन्माला घालण्यासाठी कोणत्याही संकटाना तडीपार भिरकावण्याची जिगर लागते आणि तरच ‘सागर परिक्रमा’ सारखे विक्रम जगाच्या नकाशावर घडतात. असं म्हणतात कि मिळालेल्या संधीचं सोनं करावं, संधी दुसऱ्यांदा चालून येत नाही वगैरे पण म्हादेई आणि अभिलाष यांच्या बाबतीत गोष्ट वेगळी होती, संधी दुसऱ्यांदा त्यांच्याकडे आली होती. यापूर्वी अभिलाष यांनी केप टाऊन ते गोवा प्रवासात म्हादेईची धुरा एकट्याने सांभाळली होती. बोटीतून एकट्याने जगप्रवास करण्याच्या ‘धाडसी’ अभिलाषेला तेव्हाच खतपाणी मिळाले होते पण कोणत्याही साहसाची ठराविक अशी रेसिपी कोणत्याही पुस्तकात लिहिलेली नसते कि ती वाचल्यावर एक छानसे सुंदर साहस साकारता येतं. अशा साहसगाथा नेहमी नेहमी लिहिल्या जात नाहीत आणि त्या प्रत्यक्षात उतरवताना कुठेही एकदा झालेली चूक निस्तरण्यासाठी आपण पुन्हा जिवंत राहूच याची खात्री देता येत नाही. एका क्षणी आपल्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ या पृथ्वीतलावर नाही अश्याच आत्मविश्वासाने आलेल्या आव्हानाला तोंड द्यावे लागते. याच वृत्तीने धाडस, साहस, कर्तबगारी, थरार इत्यादी पुस्तकी शब्दानाही फिकी पाडेल अशी हिंमत दाखवून भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी थेट समुद्रालाच आव्हान देत त्याच्यावर सत्ता काबीज करून १५० दिवसात सागर परीक्रमेचा विक्रम खिशात घातला. त्यांच्या या थरारक प्रवासाची खबर देश-विदेशात घेतली गेली कारण अश्या प्रकारे १५० दिवसात कोणत्याही बंदरावर न थांबता आणि अगदी संकटसमयी देखील कोणाचीही मदत न घेता पृथ्वीच्या परीघरेषेवरून जलप्रदक्षिणा करणारे अभिलाष जगातले ७९ वे आणि आशिया खंडातले दुसरे दर्यावर्दी ठरले आहेत. पण या सागर परीक्रमेमधला कोणताही टप्पा आता मी लिहित असलेल्या कोणत्याही शब्दाइतका सोपा निश्चितच नव्हता तर अक्षरशः सत्व पणाला लावून अभिलाष यांनी सागर परिक्रमा-२ पूर्ण केली आहे. ३३ वर्षीय अभिलाष हे देखील आजच्या युवा पिढीचेच प्रतिनिधी आहेत आणि दूरचित्र वाहिन्यांवर चालणारे थिल्लर रियालिटी शोज पाहून वायफळ रोमांच अंगावर उमटवून घेणाऱ्या आजच्या पिढीने नक्क्कीच त्यांचा हा जलप्रवास अभ्यासावा असा आहे. ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटाच्या कथेपेक्षाही चित्तथरारक या सागर प्रवासाची कथा आहे.  थोडक्यात ओळख करून घेऊ यात या ‘सागरी’ साहसगाथेची..
म्हादेई बोटीचे सुकाणू वैमानिकाच्या हाती
भारतीय नौदलाची एक परंपरा आहे, बोट दुसऱ्या कप्तानाच्या ताब्यात देताना ‘ऑल युअर्स’ असं म्हटलं जातं. गेल्या वर्षी अभिलाषच्या हातात बोटीचे सुकाणू सोपवताना अभिलाष यांचे गुरु कमांडर दिलीप दोंदे यांनीदेखील त्यांना हेच सांगितले होतं. पण बहुदा कमांडर दोंदे यांनी म्हादेईला देखील अभिलाषच्या बाबतीत ‘‘ऑल युअर्स’ असंच म्हटलं असावं कारण तेव्हापासून म्हादेईने आणि अभिलाषने एकमेकांची साथ संकटातही सोडलेली नाही. लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी हे नौदलाच्या वायुसेनेत वैमानिक आहेत मात्र त्यांचे सेलिंगचे ज्ञान आणि प्रेम पाहून एसपी-२ म्हणजे सागर परिक्रमा-२ साठी त्यांची निवड झाली. १ नोव्हेंबर २०१२ पासून सुरु झालेल्या सागर परिक्रमेच्या दुसऱ्या मोहिमेत मानसिक आणि शारीरिक बळाची कसोटी पाहणारे अनेक अवघड जीवावर बेतणारे प्रसंग आले मात्र म्हादेई आणि अभिलाष सर्व संकटांमधून तावून सुलाखून बाहेर पडले. याआधी नौदलाचे कमांडर दिलीप दोंदे यांनी केवळ चार बंदरांवर थांबे घेऊन आणि दोन मदतनिसांसह ( ज्यात अभिलाष यांनी म्हादेई नौकेची दुरुस्तीसाठी मदत केली होती ) २०१० साली जलप्रदक्षिणा पूर्ण केली होती. त्या अनुभवामुळेच सागर परिक्रमेच्या दुसऱ्या विनाथांबा मोहिमेसाठी अभिलाष यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. तब्बल पाच महिन्यांनी म्हादेई  नौकेच्या शिडाने वाऱ्याशी झुंज थांबवली आणि तिच्या कप्तानाच्या हातांनी देखील विश्रांती घेतली तेव्हा सागरानेही या दोघांच्या अथक जिद्दीला मनोमन सलाम ठोकला. भारतीय नौदलात प्रवेश केल्यापासून अभिलाष यांनी गेली १४ वर्षं जे सागर परिक्रमेचं स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाला अखेर सत्याची झळाळी मिळाली. विनाथांबा एकट्याने जगप्रदक्षिणा घालणारे जगातले पहिले नाविक ब्रिटनचे सर रॉबिन नॉक्स-जॉनस्टन यांनी अभिलाषचा विक्रम पूर्ण होण्याआधीच त्याचं अभिनंदन केले होते. साहसाला सीमा नसाव्यात म्हणूनच तर ते साहस ठरते असं अभिलाष यांचे मत आहे. सागर परिक्रमेच्या साहसात असणाऱ्या थरारापेक्षाही अनिश्चिततेचे आकर्षण वाटले म्हणूनच त्यांनी हे शिवधनुष्य उचलले. पाच महिने एकट्याने हा संपूर्ण जलप्रवास करण्याचेही आकर्षण देखील  आव्हान स्वीकारण्यामागे होते. झपाटलेपणाला कोणत्याही मर्यादा नसतात. एकदा का साहसाला सुरुवात केली कि हे झपाटलेपण अंगावर सतत बाळगूनच राहावं लागतं. त्यातच जर समोर खिजवणारा समुद्र प्रतिपक्षात असेल तर निश्चितच साहसाला सीमा उरत नाहीत. नेमके हेच त्यांच्या बाबतीत घडले.
यशाची सहनायिका ‘म्हादेई’
या पूर्ण सागर परिक्रमेत दोनच गोष्टीवर ओरखडे पडले नाहीत त्या म्हणजे म्हादेई बोट आणि अभिलाष यांचे मनोबल. किंबहुना समुद्रावरचे अत्यंत खराब हवामान आणि वादळ-वारे झेलूनही म्हादेई सुखरूप राहिली आणि म्हणूनच अभिलाष यांची जिद्ददेखील प्रखर राहिली. यामुळेच अभिलाष यांचे गुरु कमांडर दिलीप दोंदे या परीक्रमेचे पूर्ण श्रेय अभिलाष इतकेच म्हादेईला देखील देतात. म्हादेईची मजबूत बांधणी गोव्यातल्या दिवार आयलंडवर असलेल्या अक्वेरीस फायबरग्लास या कारखान्यात श्री. रत्नाकर दांडेकर यांच्या खास देखरेखीखाली झाली होती. वास्तविक सागर परीक्रमेसाठी खास धाटणीची बोट बांधण्यासाठी अनेक बड्या कंपन्यांना विचारण्यात आलं होते परंतु अगदी गोवा शिपयार्डसकट मोठमोठ्या कंपन्यांनी एक छोटीशी यॉट बांधण्यात आर्थिक फायदा नसल्याचं पाहिल्यावर भारतीय नौदलाची हि यॉट बांधणं नाकारलं होतं. पण रत्नाकर दांडेकर आणि त्यांच्या अक्वेरीस फायबरग्लासच्या टीमने हे आव्हान स्वीकारलं आणि चार वर्षांपूर्वी म्हादेई अस्तित्वात आली. आयएनएसव्ही म्हादेई ही एक ५६ फूटी यॉट प्रकारातली नौका आहे. बोटीचे रचनाचित्र नेदरलँड्सच्या व्हान दे स्टट डिझाईन ब्युरो या कंपनीकडून मागवण्यात आले होते. बोट बांधण्यासाठी सुमारे एक वर्ष दोन महिन्यांचा कालावधी लागला होता. दांडेकर यांचे व्यावसायिक कौशल्य आणि त्यांनी जीव लावून केलेल्या मेहनतीमुळेच म्हादेई अप्रतिमरित्या साकार झाल्याचं कमांडर दिलीप दोंदे सांगतात. म्हादेईचे इतके कौतुक होत असताना रत्नाकर दांडेकर यांनी मात्र म्हादेई बांधताना मी स्वतः बोटीच्या कप्तानाच्या जागी असल्याची कल्पना केली आणि त्यामुळेच म्हादेईची बांधणी इतकी मजबूत घडल्याचे सांगितले. कमांडर दिलीप दोंदे आणि लेफ्टनंट कमांडर अभिलाष यांची प्रत्येकी एकच वेळा जगप्रदक्षिणा झाली असली तरी म्हादेईने फक्त चार वर्षांच्या आयुष्यात दोनवेळा जगाचा फेरा केला आहे. त्यादृष्टीने म्हादेई या दोघांनाही सिनिअर ठरली आहे. म्हादेई एव्हढी कणखर नसती तर कदाचित आमच्यापैकी एकाच्या फोटोला नक्कीच हार लागला असता असं विनोदाने दोंदे सर सांगतात. म्हादेई मजबूत होती म्हणूनच आमच्या दोघांच्याही जगप्रदक्षिणा यशस्वी झाल्या असं त्यांना वाटतं. अख्ख्या सागर परिक्रमेवर आतापर्यंत सुमारे चार लाख रुपये खर्च झाले आहेत मात्र परिक्रमेची खरी नायिका म्हादेई हिच्या बांधणीवर सव्वा चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे जगात सर्वप्रथम विनाथांबा एकट्याने शिडाच्या नौकेतून विश्वजलप्रदक्षिणा घालणारे सर रॉबिन नॉक्स यांची ‘सुहैली’ हि बोट देखील मुंबईतच बांधण्यात आली होती आणि भारतीय हातांनीच बनवलेल्या म्हादेईतुन दोन जलप्रदक्षिणा पूर्ण झाल्याचा दोंदे यांना अभिमान वाटतो. आतादेखील तब्बल पाच महिन्यांच्या खडतर जलसफरीनंतर ती  पूर्वीइतकीच नवी दिसत असल्याचं दोंदे म्हणतात. चार वर्षांनी खरं तर इतर बोटी बऱ्याच जुन्या दिसायला लागतात पण म्हादेईकडे पाहून तिने चार वर्षात दोन सागर परिक्रमा पूर्ण केल्या असतील यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. अजूनही म्हादेई सेलिंग स्पर्धेत उतरू शकते असा विश्वास त्यांना वाटतो. म्हादेई आणि अभिलाष यांच्याशी कमांडर दोंदे यांचे एक वेगळेच तरल नाते आहे. म्हादेई दांडेकरांच्या कारखान्यात बांधायला घेतली तेव्हापासून ते सागर परिक्रमेची दुसरी फेरी पूर्ण होईपर्यंत कमांडर दोंदे सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. सागर परिक्रमेच्या मोहिमेची अथपासून इतिपर्यंत तयारी करण्याची जबाबदारीही कमांडर दोंदे यांनी निभावली होती. अर्थातच त्यांनी स्वतः १९ ऑगस्ट २००९ ते १९ मे २०१० या काळात सागर परिक्रमेची पहिली फेरी जिंकली होती त्यामुळे त्यांच्या अनुभवाची मोठीच शिदोरी अभिलाष यांच्या पाठीशी होती. याच पहिल्या मोहिमेतला म्हादेईलाच घेऊन केप टाऊन ते गोवा आणि रिओ दि जानेरो ते केप टाऊन हे अंतर कापण्याचा अनुभव अभिलाष यांच्या हाताशी होता.
 म्हादेईच्या नावामागील कथा
कर्नाटकातील म्हादेई नदी गोव्यात येताना मांडोवी नाव घेते आणि मांडोवीच्या परिसरात सत्तरी तालुक्यात सुमारे हजार वर्षांपूर्वीचे नौदेवीचे मंदिर पाहायला मिळते. जहाजांची हि संरक्षक देवता असल्याचे मानले जाते. त्यामुळे नौदेवी आणि मांडोवी नदीच्या नावावरून भक्तिभावाने बोटीचे नावदेखील म्हादेई ठेवण्यात आले.

सागर परीक्रमेसाठी सुसज्ज म्हादेई...
पूर्णतः भारतीय बनावटीच्या म्हादेईचे शीड केप टाऊन येथील नॉर्थ सेल कंपनीकडून बनवून घेण्यात आले होते. डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरखेरीज पवनउर्जेवर चालणारा जनरेटरदेखील मदतीला होता. गरज लागल्यास सौरउर्जा यंत्रणाही बसवण्यात आली होती. बोटीच्या तळाशी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंपाची सोय बोटीवर आहे. तसेच कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी छोटी सनशेड बोटीवर एका बाजूला टाकण्यात आली होती. संपर्कासाठी एफबी-५०० हि अत्यंत महागडी यंत्रणा बसवण्यात आली होती.
म्हादेईच्या कप्तानाविषयी थोडेसे..
मूळचे केरळचे असणारे लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी हे भारतीय नौसेनेच्या वायुदलात २००१ साली वैमानिक म्हणून दाखल झाले. त्यांचे वडील निवृत्त लेफ्टनंट कमांडर व्हि.सी. टॉमी यांच्यामुळेच लहान वयातच अभिलाष यांची समुद्राशी ओळख झाली. अभिलाष वयाच्या सातव्या वर्षापासून पोहायला शिकले आणि कित्येकवेळा ते कुटुंबियांची नजर चुकवून समुद्रावर पोहायला जायचे. काहीसे अबोल, शांत आणि निगर्वी असले तरीही अभिलाष निडर आहेत त्यामुळेच हि परिक्रमा त्यांनी निभावून नेली. डॉर्निअर विमान चालवण्यात ते अत्यंत कुशल आहेत. मात्र नौकानयनात त्यांना फार पूर्वीपासूनच रस होता आणि त्यांनी नौदलात आल्यानंतर २००४ सालापासून यॉट सेलिंगला व्यावसायिकरित्या सुरुवात केली. खरे तर त्यांनी विमान चालवणे शिकण्याच्याही आधी यॉट सेलिंगचे धडे घेतले आणि कार ड्रायव्हिंग तर त्यांनी या दोन्हीनंतर आत्मसात केले. अभिलाष यांना वाचनाची खूप आवड आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे रोजच्या कंटाळवाण्या वाटणाऱ्या जगण्यातला नर्मविनोद हेरण्याचेही कसब आहे. त्यांना सेलिंगखेरीज फोटोग्राफी आणि गिटार वाजवण्याची देखील आवड आहे. आहाराने सध्या शाकाहारी असलेल्या अभिलाषची वेळप्रसंगी मांसाहाराला ना नसते.

सागर परिक्रमा-२ मधील परीक्षा घेणारे क्षण....
अभिलाष यांच्या मते वादळानंतर हेलकावणाऱ्या साउथ पैसिफिकच्या समुद्रात भर पावसात २५ मीटर उंच डोलकाठीवर चढून शीड बदलणे हा खरेतर आततायीपणाच होता. मात्र शीड अश्या प्रकारे फाटलेल्या अवस्थेत असताना बोट पुढे नेणे म्हणजे महामूर्खपणा झाला असता. परिस्थिती अशी होती कि डोलकाठीवर चढले किंवा नाही चढले तरीदेखील या ना त्या प्रकारे जीवावर बेतणारच होते. त्यामुळे वाघ म्हटले तरी खाणार आणि वाघोबा म्हटले तरी खाणार असा विचार करून अभिलाष निर्धार करून त्या उंच डोलकाठीवर चढले. हा सर्व नाट्यमय ’पराक्रम’ पार पाडण्यासाठी त्यांना सुमारे एक-दीड तास लागला होता. परंतु डोलकाठीच्या टोकावर पोहोचल्यानंतर एक प्रकारच्या अनोख्या चैतन्याचा आपल्यात वावर होतो आहे असेच क्षणभर अभिलाष यांना वाटले. तिथून समुद्रावर दूरपर्यंत नजर जात होती आणि तो नजारा त्यांच्यासाठी आजही अविस्मरणीय आहे. खाली उतरून या चढाई प्रसंगाचा व्हिडीओ पाहिल्यावर मात्र अभिलाष यांना आपण किती अशक्य कोटीतले साहस केले आहे याची जाणीव झाली आणि त्यांच्या अंगावर त्या आठवणीने आजही शहारे उमटतात. ऑस्ट्रेलियाजवळून जाताना म्हादेई मोठ्या वादळात सापडली त्यावेळी ते खरेच खूप धास्तावून गेले होते. महाभयंकर वादळात बोट चालवताना त्यांच्या जीवाचं पाणी पाणी झालं होतं परंतु त्यानंतर इतकी भयानक संकट झेलली कि त्या तुफानी वादळाचं आता त्यांना काहीच वाटत नाही. या दोन संकटांनीच त्यांची खरी सत्वपरीक्षा पाहिल्याचे अभिलाष सांगतात.
बोटीवरील अडचणींचा सामना...

तुफानी वादळे, ४०-५०-६० समुद्री मैलाच्या वेगाने वाहणारे झंजावाती वारे, समुद्रावरील अफाट काळामिच्च अंधार, समुद्री चाच्यांची भीती, दहा मजली इमारतीइतक्या उंचीच्या लाटा, भयानक उष्ण आणि थंड तापमानाचे प्रदेश अश्या बोटीच्या बाहेरील सर्व नैसर्गिक संकटांपुढे त्यांना बोटीच्या आतमध्ये उद्भवणाऱ्या अडचणी कमी त्रासदायक वाटायच्या. अर्थात याला अपवाद फक्त शीड फाटण्याचा प्रसंग होता. बोटीच्या इंजिनरूम मधली तेलगळती, जनरेटरमधील सतत बिघडणारे ऑईल प्रेशर, इंजिनाच्या कुलर यंत्रणेचा पंप आणि लीड सेन्सरमधील बिघाड, खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणाऱ्या यंत्राने केलेली हाराकिरी, फाटलेली स्लीपिंग ब्याग अश्या कितीतरी अडचणी येत होत्या. एकदा तर बोटीवरील सर्व घड्याळ्यांनी संप पुकारला आणि विविध वेळा दाखवायला सुरुवात केली तेव्हा अभिलाष यांची तारांबळ उडाली होती. मात्र सर्वात कठीण होते ते पाण्याचे दुर्भिक्ष्य ! २० मार्चला म्हादेईने विषुववृत्त ओलांडले पण त्याआधी १७ मार्चला बोटीवरील सुमारे २०० लिटरहून अधिक पाणी दूषित झाले आणि त्यामुळे पाण्याचा शेवटचा घोट संपण्याआधी म्हादेई मुंबईच्या किनाऱ्यावर परत नेण्याचे आव्हान अभिलाष यांच्यासमोर उभे राहिले. 

सफरीतील काही आनंदाचे मैल...
या मोहिमेवर असताना पाच महिने अभिलाष यांना बाहेरच्या जगात चालणारी सर्व हौस-मौज स्वप्नवतच होती. आधार होता तो फक्त त्यांच्या आवडत्या पॉपकॉर्नचा. बोटीवरील कोणतीही अडचण निस्तरली कि अभिलाष लगेचच पॉपकॉर्नच्या पिशवीकडे धाव घ्यायचे. अशी पॉपकॉर्न खाण्याची संधी त्यांना अनेकदा मिळत होती. त्यापैकीच एक होता २६ जानेवारीचा दिवस जेव्हा अभिलाष यांनी केप हॉर्नला वळसा घालून बोटीवर भारताचा तिरंगा फडकवला. केप हॉर्नला यशस्वीरीत्या घातलेला वळसा हा या मोहिमेतील एक महत्वाचा टप्पा होता. वर्षअखेरीस आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार २०१३ साली म्हादेईने आंतरराष्ट्रीय प्रमाणरेषा पहिल्यांदा पार केली पण सहा तासातच दुसऱ्यांदा देखील प्रमाणरेषा पार केली त्यामुळे भारतीय प्रमाणवेळेनुसार अभिलाष हे नववर्षाचे स्वागत करणारे आणि त्याचबरोबर मावळत्या वर्षाला निरोप देणारे पहिले भारतीय ठरले. काही समुद्रपक्षी आणि डॉल्फिन्स यांच्या अनोख्या सहवासात अभिलाष यांनी त्यांचा वाढदिवस देखील ५ फेब्रुवारीला बोटीवर साजरा केला. अश्या कित्येक मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण अनुभवांची नोंद अभिलाष यांच्या ब्लॉगवर  http://sagarparikrama2.blogspot.in/ वाचायला मिळते. सागर परिक्रमेवर लक्ष ठेवून असणाऱ्या चाहत्यांसाठी हा ब्लॉग ते या खडतर प्रवासातही वेळ मिळेल तेव्हा अपडेट करीत होते. तसेच फेसबुक आणि ट्विटरवरून देखील ते सर्वांशी संवाद साधत होते.
अभिलाष यांचे मनोबल टिकवणारा योग...
भल्याभल्या दर्यावर्दींचाही आत्मविश्वास उलथवून टाकणाऱ्या बेभान समुद्रात अभिलाष यांनी विचलित न होता नेहमीच थंड डोक्याने तारतम्य ठेवून अचूक निर्णय घेतले. कितीही प्रतिकूल हवामानात आणि समस्यांमध्येही त्यांच्या मनशक्तीला खिंडार पडले नाही याचे सर्व श्रेय त्यांनी योगाभ्यास आणि ध्यानधारणेला दिले आहे. बोटीवर असताना कमीतकमी अर्धा तास योगाभ्यास आणि ध्यानधारणा करण्याचा रिवाज त्यांनी सुरु ठेवला होता. त्यामुळेच त्यांना या महाकठीण मोहिमेचे दडपण जाणवलं नाही उलट अडचणी आणि आव्हानांकडे नेहमीपेक्षा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता आलं. ‘प्रहार’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले कि योगाभ्यास विरक्तीची भावना जोपासायला मदत करतो त्याचाही मला पाच महिने सर्वांपासून दूर राहताना फायदाच झाला. एकटेपणाच्या भावनेचं ओझंदेखील योगाच्या मदतीनेच कमी झालं. योगाभ्यासामुळेच मी अनेकदा विविध भास होत असताना देखील सतर्क राहिलो, अचूक निर्णय घेऊ शकलो आणि माझ्यावर बाह्यपरिस्थितीचा फारसा परिणाम मी फारसा होऊ देत नव्हतो त्यातही मला योगाभ्यासच हाताशी आला. आता म्हादेईपासून विलग राहावे लागणार आहे पण माझ्या या भावनिक गुंतवणुकीतून बाहेर पडायला मला योगाभ्यासाचीच मदत होईल असा विश्वास त्यांना वाटत आहे. कोइमतूरमधील इशा फाउंडेशन योगा सेंटरमधून त्याने योग आणि ध्यानधारणेचा अभ्यास केला आहे.

एकांतप्रिय दर्यावर्दी
अभिलाष यांच्याच शब्दात सांगायचं तर जमिनीवरल्या जगात असतो तेव्हा आपण विनाकारण बारीकसारीक गोष्टी मनाला लावून घेत असतो. आता सागर परिक्रमा पूर्ण केल्यानंतर तर मला जगातील थोडक्यात जमिनीवरील ९९ टक्के गोष्टी फिजूल वाटायला लागल्या आहेत. एकांतात राहिल्यामुळेच या गोष्टींची जाणीव झाली. त्यामुळेच कदाचित सागर परिक्रमा पूर्ण करून मी फार मोठा विक्रम केलाय असं वाटत नाही. पण निश्चितच भारतीय नौदलाच्या इतिहासासाठी हि एक अभिमानास्पद गोष्ट आहे असे सांगत अतिशय विनम्रपणे भारतीय नौसेनेचे अत्यंत कुशल वैमानिक लेफ्टनंट कमांडर अभिलाष त्यांनी केलेल्या विक्रमाची तारीफ करून घेणं टाळत होते. हा पूर्ण जलप्रवास एकट्याने तेही कोणाच्याही मदतीशिवाय करायचा असल्यामुळे प्रथम त्यांना घरातून आईचा खूप विरोध झाला. पण शेवटी लाडक्या मुलाने आईला या सफारीसाठी मनवलेच. परंतु पहिल्यापासूनच थोडं अबोल आणि मनस्वी असणाऱ्या अभिलाष यांना मुळात एकटे राहण्याचं आकर्षणच आहे. इतके दिवस एकटे राहताना तुमच्या मनात काय विचार येत होते असा प्रश्न त्यांना नेहमीच विचारला जायचा. ‘’मला पर्याय दिल्यास पुढील वेळी मी इंटरनेटशिवायच सागर परिक्रमा करेन कारण मला हा असा सर्व कोलाहलापासून दूर निवांत एकटेपणाच अधिक भावतो. खरंतर मी असंच राहणं जास्त पसंत करतो आणि मला एकटे असण्याचं नवल मुळात वाटतच नाही. अशावेळी तुम्हाला वेगळ्या ध्यानधारणेची गरज भासत नाही. त्यामुळे पाच महिने म्हादेईवर एकटे राहण्याची कल्पना उलट मला जास्तच आवडली होती.’’ भारतीय नौसेनेचे अत्यंत कुशल वैमानिक लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी ‘प्रहार’ला दिलेल्या मुलाखतीत एकटे राहण्यामागील त्यांचा विचार मांडला होता. म्हादेई बोटीवर संपर्कासाठी एफबी-५०० हि अत्यंत महागडी यंत्रणा बसवण्यात आली होती. काही कोटी रुपयांची ही संपर्क आणि दळणवळण व्यवस्था उपग्रहाद्वारे देण्यात आली होती. दर मिनिटाला अंदाजे २,५०० रुपये इतके तिचा वापर केल्यास खर्च होतात. या व्यवस्थेचा आवश्यक तेवढाच वापर करून अभिलाष या मोहिमेत सर्वांच्याच संपर्कात राहिले. शेवटच्या टप्प्यात असताना त्यांनी काही प्रसारमाध्यमांनाही मुलाखती दिल्या. लगेच तासनतास बकाल मुलाखतींचे अनावश्यक रतीब घालणाऱ्या टीव्हीवाहिन्या डोळ्यासमोर आणू नका जरी त्यांचं कामदेखील उपग्रहांद्वारेच चालतं कारण मोठमोठ्या उद्योगसमूहांचं आणि जाहिराती देऊन पुरस्कृत करणाऱ्या कंपन्यांचं ( आणि कोण जाणे कोणा कोणाचं !) त्यांना आर्थिक पाठबळ असतं. तेव्हा तिथे तुम्हाला दिसणाऱ्या प्रत्येक फ्रेममागे वाहिनीला लाखोवारी पैसे आधीच मिळालेले असतात. सागर परिक्रमा करताना मात्र अभिलाष आणि म्हादेई यांना अनेक बंधन पाळावी लागली त्यापैकी इंटरनेट आणि इतर संपर्क सुविधांचा कमीतकमी वापर हे बंधन अभिलाष यांनी स्वतःहूनच घालून घेतलं होतं. त्यांना एकटे राहण्याची सवय होत गेली आणि हे बंधन पाळणंदेखील सोपं होत गेलं. कित्येकवेळा बोटीवरील इतर कामांमुळे आणि बाहेरील दृश्य भान हरपवून टाकणारं असल्यावर बोटीवर संगणक आणि इंटरनेट असल्याचाही विसर पडायचा असं अभिलाष यांनी सांगितलं.
सागर परिक्रमा म्हणजे काय ?
लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांच्या आधी कमांडर दिलीप दोंदे यांनी २००९ ते २०१० या काळात १६५ दिवसात चार विश्रांतीथांबे घेत सागर परिक्रमा-१ पूर्ण केली होती. परंतु विनाथांबा आणि कोणाच्याही मदतीशिवाय सागर परिक्रमेचे साहस अंगावर घेण्यासाठी समुद्राला पुरून उरेल इतक्या धैर्याची गरज आहे. कारण या प्रकारच्या परिक्रमेत कोणत्याही परिस्थितीमध्ये बंदरावरून किंवा समुद्रावरील इतर बोटींची मदत घेता येत नाही. दुसरी अट म्हणजे केवळ शिडाच्या सहाय्याने बोट चालवत इंजिनाचा वापर न करता २१,६०० समुद्री मैलांचे अंतर कापणे अपेक्षित असते. परिक्रमेची सुरुवात जिथून होते तो किनारा सोडताना आणि परत त्या किनाऱ्याजवळ पोहोचल्यानंतरच इंजिनाची सुविधा वापरता येते. परिक्रमेच्या मार्गात तीन केप्सच्या उत्तरेने जात ( केप हॉर्न, केप ऑफ गुड होप आणि केप लिऊविन ) रेखावृत्त आणि विषुववृत्त (दोन वेळा) पार करावे लागतात. या मार्गात कोणत्याही कालव्यातून बोट काढता येत नाही.  
म्हादेईवरची मेजवानी
म्हादेईवर सुमारे ६०० लिटर गोड्या पाण्याचा आणि १५० किलो अन्नाचा साठा देण्यात आला होता. काही खाद्यपदार्थांची पाकिटे म्हैसूरच्या संरक्षण दलाच्या अन्न प्रयोगशाळेत बनवण्यात आली होती. दिवसाला अभिलाष यांनी निदान ५०० ग्राम अन्न खावे अशी त्यांना सूचना होती. अन्नामध्ये इन्स्टट खीर,भाज्या, व्हेज पुलाव, चिकन खिमा, पॉपकॉर्न, कॅडबरी चॉकलेट, ड्राय आईसक्रिम,गोड हलवा, भात, बटाटे,मक्याचे दाणे, बिस्किटं, खारवलेले पोहे, मासे आणि लिंबाच्या फोडी, लोणचे इत्यादींचा समावेश होता तर द्रवपदार्थात फळांचे रस, ताक, शीतपेये आदींचा समावेश होता. मात्र सततच्या परिश्रमाने अभिलाष यांचे पहिल्याच काही दिवसात १० किलो वजन कमी झाले होते.
परिक्रमेची सांगता..
म्हादेईने अपेक्षित वेळेतच म्हणजे १५० दिवसात ३१ मार्च २०१३ रोजीच परिक्रमा पूर्ण करून मुंबईच्या किनाऱ्याला स्पर्श केला. मात्र राष्ट्रपतींकडून कार्यक्रमासाठी पाच दिवसांनंतरची वेळ मिळाल्याने म्हादेई एक आठवडा आधीच मुंबईला पोहोचल्याची गोष्ट गुप्त ठेवण्यात आली. गेल्या सहा एप्रिल रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांचा सत्कार करण्यात आला . या सागर परिक्रमेमध्ये डोलकाठी तुटण्यापासून ते अगदी पाण्याचा तुटवडा, अश्या अनेक संकटांनी अभिलाष यांचा निग्रह विचलित करण्याचा प्रयत्न केला. परंतु अभिलाष हे जीवावर बेतू शकणाऱ्या अनेक कसोटीच्या क्षणांना केवळ मनोबलाच्या जोरावरच तोंड देत होते. आपल्या परीक्रमेचं श्रेय मात्र या सुपरहिरोने म्हादेई आणि तिची देखभाल करणारे मोहम्मद इस्लाम आलम यांना दिलं आहे. म्हादेईला सागर परिक्रमेवर निघण्याआधीचे वर्षंभर मोहम्मद आलम यांनी म्हादेईला तळहाताच्या फोडासारखं जपून तिची निगराणी ठेवली. त्यामुळेच म्हादेई मजबूत राहून तिनं सागर परिक्रमा-२ निभावण्यात मोलाची साथ दिल्याचं अभिलाष सांगतात. सागर परीक्रमेचे तीन आधारस्तंभ नौदलाचे माजी ध्वजाधिकारी व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी, कमांडर दिलीप दोंदे आणि म्हादेईचे शिल्पकार रत्नाकर दांडेकर यांच्याशिवाय हि परिक्रमा तडीस गेलीच नसती असंदेखील अभिलाष यांनी सांगितलं. त्याचबरोबर अभिलाष यांनी ‘सागर परिक्रमा-२’ चे पूर्ण श्रेय नौदलातील एअरफोर्सच्या दलाला (ज्यांनी वैमानिकांची कमतरता असूनही सागर परीक्रमेसाठी अभिलाष यांना हुरूप दिला ), त्यांची आई श्रीमती वल्सा, व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी, कमांडर दिलीप दोंदे, बोटीचे कर्ताधर्ता रत्नाकर दांडेकर आणि म्हादेईच्या सागर परिक्रमेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला समर्पित केले आहे.
शाळांमध्ये पोहोचली सागर परिक्रमा-२
इंटरनेटवर शोधल्यास फक्त सागर परीक्रमा-२ साठी सुमारे ७०,८०० रिझल्ट्स सापडतात. पण त्याहीपेक्षा अधिक कष्ट घेऊन मुंबईच्या स्वप्नाली धाबुगडे हिने सागर परिक्रमेला शाळाशाळांमध्ये पोहोचवण्याचे मोठे काम केले आहे. तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी मुंबई आणि जळगाव येथील हर एक शाळेत जाऊन इयत्ता ७वी ते ९वी मधील विद्यार्थ्यांना सागर परिक्रमेच्या मोहिमेची सखोल आणि सचित्र माहिती दिली. त्यांच्या या ‘सागर परिक्रमा जागरुकता अभियाना’मुळे आत्तापर्यंत सुमारे ३ हजारांहून अधिक मुलांना या धाडसी मोहिमेची ध्वनीचित्रफितीतून माहिती मिळाली आहे. या अभियानात मुलांना मोहिमेचा हेतू, म्हादेई बोटीची रचना, पृथ्वीवरील खंड, प्रवासाचे सागरी मार्ग, हवामान आणि समुद्राशी निगडीत इतर भौगोलिक माहिती देण्यात येते. सध्याच्या शाळांच्या सुट्ट्या संपल्यानंतर या अभियानाचे वर्ग पुन्हा सुरु होतील. भारतीय नौदलाच्या जनसंपर्क खात्यानेही या अभियानाचे कौतुक केले आहे. सागर परिक्रमेची शालेय विद्यार्थ्यांना माहिती द्यायची असल्यास इच्छुकांनी sailwithmhadei@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा.
सागर परिक्रमा-३ कधी ?
पाच महिन्यांच्या या अविश्रांत मोहिमेनंतर केवळ दोन दिवसांच्या रजेनंतर अभिलाष सेवेत पुन्हा रुजू झाले आहेत. वरिष्ठांनी परवानगी दिल्यास पुन्हा एकदा सागर परिक्रमेवर जायचीदेखील त्यांची तयारी आहे. नौसेनेला आता प्रतीक्षा आहे ती तिसऱ्या सागर परिक्रमेची आणि यावेळी नौदलातून युवकांनी विशेषतः महिला अधिकाऱ्यांनी पुढं यावं असं वरिष्ठांना वाटत आहे. त्यामुळे पुढील यशस्वी सागर परिक्रमेची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याची नौदलात चर्चा सुरु झाली आहे. विनाथांबा सागर परिक्रमेची ही दुसरी मोहीम फत्ते झाल्यामुळे भारतीय नौसेनेतही उत्साहाचं वारं पसरलं आहे.
सागर परिक्रमा-२-जिद्द आणि स्फूर्तीचा धडा
सागर परिक्रमा-२ साठी चार लाखाहून कमी रुपये खर्च झाले आहेत. वास्तविक आजकाल देशात लग्नसोहळ्यांवर होणारे अनावश्यक खर्च आणि आयपीएल सारखे निरर्थक क्रिकेट सामने यांच्या खर्चाच्या तुलनेत हा खर्च अत्यंत क्षुल्लक आहे. अशा निरुपयोगी खेळांच्या सामन्यांमधून युवा पिढीला वास्तविक कोणतीही स्फूर्ती मिळत नाही मात्र सागर परिक्रमा-२ने यश मिळवल्यामुळे भारतीय नौसेनेतही नव्या चैतन्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. भारतीय नौदलाच्या सागर परीक्रमा-२ या साहसी जलसफरीला लाखो भारतीयांनी पाठींबा दिला. यात सर्वधर्मीय लोक होते म्हणूनच एकत्र आल्यास भारतीयांमध्ये खूप मोठी मजल मारण्याची ताकद आहे असंही अभिलाष यांना वाटते. देशासाठी गर्व ठरलेल्या अभिलाष यांच्या विश्वविक्रमाने नव्या युगाची नांदी सुरु झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. आज कुछ तुफानी करते है असे म्हणत निव्वळ चित्रपट आणि जाहिरातीतून थराराची चव घेण्यापेक्षा देशाची शान वाढवू शकणाऱ्या साहसांकडे युवा पिढीने जरूर वळावे हा अभिलाष यांचा संदेश गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारण शेवटी ‘डर के आगे जीत है’ हे देखील खरेच आहे !

The edited article about Sagar Parikrama-2 by Lt.Cdr.Abhilash Tomy was published in 'Prahaar' news daily on 14th April,2013, you may like to read that so here is the link http://prahaar.in/collag/81141  

Sunday, March 24, 2013

With Olive Riddley turtles on Velas beach


                                                             
कासविणीने पाठ फिरवलेल्या अंड्यांमधून बाहेर येऊन ज्यांचे डोळे आणि पावले देखील अजून विकसित झालेली नाहीत अशी इवलाली पिल्ले कोणत्याही मदतीशिवाय मुलायम रेतीमधून अथांग सागराकडे धाव घेतात आणि त्यावेळी एकप्रकारे इच्छाशक्ती कशी सकारात्मक असली पाहिजे याचे प्रात्यक्षिकच जणू आपल्याला मिळते. कारण या पिल्लांना पाण्याचा स्पर्श ही माहित नसतो तरीदेखील भवताली शिकारी सागरी पक्षी आणि प्राणी त्यांचा घास घ्यायला टपलेले असताना फक्त समुद्राकडेच जायचे आहे या उपजत जाणिवेमुळे ही पिल्ले सागराच्या लाटांवर स्वार व्हायचे धाडस करतात. लाटा त्यांना निर्दयीपणाने पुन्हा किनाऱ्यावर भिरकावून देतात पण या पिल्लांची पाण्याकडे जाण्याची आस जबर असते त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून कासवांची ही पिल्ले शेवटी समुद्र गाठतातच. अर्थात ऑलिव्ह रिडले कासवाच्या अशा हजार पिल्लांपैकी काहीच पिल्ले जिवंत राहतात आणि त्यांची मोठी कासवे होतात. कोकणच्या किनारपट्टीला ऑलिव्ह रिडले प्रजातींच्या कासवांची वीण होते हे १२ वर्षांपूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणात माहिती झाले आणि त्यानंतर चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने कासवांच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठी पुढाकार घेतला. ऑलिव्ह रिडले ही कासवाची जात वन्यजीव कायद्याच्या शेड्यूल एकमध्ये मोडतात थोडक्यात सांगायचे तर त्यांना वाघाइतकाच संरक्षण दर्जा आहे. संस्थेने जे बीज रोवले त्याची फळे आज किनाऱ्यावरील वेळास, दिघी, मारळ सारख्या काही गावांना पर्यटन विकासाच्या रुपाने चाखायला मिळत आहेत. कासव जत्रेच्या निमित्ताने वेळासला भेट देता आली आणि पर्यटन विकासात कोकणातील सागर किनारा लाभलेल्या गावांच्या यादीत आता वेळासनेही आपलं खाते उघडले आहे हे लक्षात आले. वेळासची कासव जत्रा या संकल्पनेला आता सात वर्षे झाली आहेत. सागरी किनाऱ्याचे आकर्षण असले तरीही कासव संवर्धनासारख्या गोष्टीकडे पर्यटकांचे लक्ष आणि स्वारस्य वळवणे ही सोपी गोष्ट नाही. पुन्हा पर्यटक इथे आल्यानंतर त्यांना शिस्तीमध्ये ठेवून कासवांची पिल्ले दाखवून कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या चार गोष्टी सांगणे हे त्याहून ही कठीण काम आहे. सह्याद्री निसर्ग मित्र आणि वेळासचे गावकरी यांनी गेली सात वर्षे परस्पर सहकार्याने ही कासव जत्रा चालवली आहे.

आपल्या देशात वाघ,सिंह किंवा डॉल्फिन पाहायला चला म्हटल्यावर सहलींना चांगला प्रतिसाद मिळतो. अश्या सहलींना जाण्यासाठी कुटुंब, निसर्गप्रेमी, भटके पर्यटक,वन्यजीव अभ्यासक, हौशी फोटोग्राफर असे सारेच उत्सुक असतात. या साऱ्यांनी काढलेल्या फोटोंनी फेसबुक इत्यादी सोशल मिडिया ओसंडून वाहत असतो. अर्थातच यातला बिझनेसचा भाग सोडून दिला तर कधी कोणी एव्हढ्याच हौशीने किंवा तळमळीने मगरी, कासवे किंवा माळढोक, गिधाडे असे प्राणी-पक्षी पाहायला जाणे जरा मुश्कीलच आहे. म्हणूनच अश्या परिस्थितीत सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमध्ये सुमारे सहा वर्षे नेटाने टिकाव धरलेल्या समुद्री कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्पाला आता लोकांकडून मिळणारा बराचसा प्रतिसाद आणि मदत खूप महत्वाची ठरते आहे. या प्रकल्पाला राज्य शासन, पर्यावरण आणि वन खात्याचेही सहकार्य आहे. यामध्ये स्थानिकांनाही सामावून घेण्यात आले आहे, कारण कोणतीही वन्यजीव संवर्धन मोहीम ही स्थानिकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होत नाही. प्राण्यांचे संवर्धन आणि संरक्षण प्रकल्प म्हणजे फक्त वन्यप्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील लोकांचेच काम अशी काहीशी समजूत आहे. जे पर्यटक डॉल्फिन किंवा सर्पउद्यान पाहायला जातील, ते पर्यटक कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्प पाहायला जातीलच असे नाही. त्यामुळेच सह्याद्री निसर्ग मित्रने चालवलेले प्रयत्न आणि आता त्याचा वेळासच्या पर्यटन विकासात होणारा उपयोग महत्वाचे ठरतात. देशात टायगर टूरिझम वगळता अन्य वनचर अथवा जलचरांसाठी वेगळे प्रयत्न करून पर्यटकांना सामावून घेणारे विशेष प्रकल्प फारसे नाहीत आणि त्या अनुषंगाने आयोजित केल्या जाणाऱ्या सहलीदेखील नाहीत. आपल्याकडे ज्या काही मोजक्याच ठिकाणी डॉल्फिन दिसतात तिथे सहली नेल्या जातात. आपल्याकडे अश्या प्रकारच्या संवर्धन आणि संरक्षण प्रकल्पांना सहल म्हणून भेट देण्याची आवड रुजलेली नाही त्यामुळेच सह्याद्री निसर्ग मित्रचा हा कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्प उल्लेखनीय ठरतो. म्हणूनच वेळासच्या कासव जत्रेमधली ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची पिल्ले कशी दिसतात या उत्सुकतेपोटी यावर्षी वेळासला जायचे ठरवले.

आधीच आडवळणावर असलेल्या एखाद्या गावाला अचानक पहिल्यांदाच भेट द्यायचे ठरले तर ठरलेल्या मुक्काम पोस्टवर पोहोचेपर्यंत जो खटाटोप करावा लागतो तो सर्व वेळासच्या प्रवासात घडला. वेळासला पोहोचताना बऱ्याचजणांची ‘जाते थे जापान पहुँच गये चीन’ अशी अवस्था होते कारण इथे दोन विरुद्ध दिशांना असणारी दोन वेळास गावे आहेत. एक आहे बाणकोट(आगरी) वेळास तर दुसरे आहे साधे वेळास. गोरेगाव-श्रीवर्धन-म्हसळा नंतर एक हरिहरेश्वरला जाणारा तर दुसरा दिघीला जाणारा असे दोन फाटे फुटतात. गोरेगाववरून आंबेत घाटात उतरूनही वेळासपर्यंत पोहोचता येते पण तो लांबचा रस्ता आहे, पण हरिहरेश्वर-बागमंडला असा रस्ता धरून नंतर जेटीने फेरीबोटीव्दारे नदी पार करून गेल्यास बाणकोट वेळासला कमी वेळात जाता येते. कासव मित्र मंडळाच्या किंवा सह्याद्री निसर्ग मित्रच्या माहिती स्थळावर कोठेही दोन वेळास गावे अस्तित्वात असल्याचा आणि हरिहरेश्वर- बागमंडला रस्त्याने व्हाया फेरीबोटीने येण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचा उल्लेख केलेला नसल्याने आमच्या प्रवासात  बाणकोटी हिसका बसला  याचे कारण म्हणजे आम्ही दुसऱ्याच वेळासचा रस्ता धरला होता. जेटीवरून फेरीबोटीने जायचे असल्यास त्यांच्या काही ठराविक वेळादेखील माहिती असणे आवश्यक आहे. पण गावात पोहोचल्यानंतर जेव्हा परदेशी पर्यटक पाहिले तेव्हा कोकणच्या किनारपट्टीवर असणाऱ्या एका लहानशा गावात फक्त कासवांची पिल्ले पाहण्यासाठी कुठूनतरी सातासमुद्रापलीकडून आलेल्या त्यांचे आणि सह्याद्री निसर्ग मित्रच्या प्रयत्नांचेही कौतुक करावेसे वाटले. गेली वीस वर्षे रत्नागिरी,रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने ऑलिव्ह रिडले कासवे, शेषारी गरुड, गिधाडे आणि भारतीय पाकोळ्या यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न चालवले आहेत.

ऑलिव्ह रिडले कासव मादी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान वेळासच्या किनाऱ्यावर येऊन अंडी घालते. साधारण ४५ ते ५५ दिवसांचा उबवण काळ लोटल्यानंतर पिल्ले बाहेर येतात. पर्यटकांना पिल्ले पाहता यावीत यासाठी वेळास येथे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान कासव जत्रा घेतली जाते. सुमारे महिनाभर चालणाऱ्या कासव जत्रेत सामील होण्यासाठी दर रोज इथे सुमारे पाचशे पर्यटक येतात. या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते त्यासाठीच मग वेळाससारख्या ठिकाणी स्थानिकांची मदत घेतली जाते. सागरी कासवे, विशेषतः ऑलिव्ह रिडले जातीच्या दुर्मिळ कासवांची वीण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा, मोचेमाड, आरवली, तळाशील, केळूस, मुणगे आणि बागायतवाडी, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर आणि मारळ तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील तवसाळ, करडे, गुहागर, कोळथरे, मुरूड, दाभोळ, केळशी, आंजर्ला, वेळास या किनाऱ्यांवर आढळून आली आहे. येथील स्थानिकदेखील या प्रकल्पामध्ये आवडीने सहभागी होत आहेत कारण कासव पर्यटनामुळे त्यांचाही फायदा होतो आहे. सह्याद्री निसर्ग मित्रला वनखात्याकडूनही सहाय्य मिळते. कासवांची पिल्ले पाहण्यासाठी जमा झालेल्या पर्यटकांमध्ये फोटो काढण्यासाठी चढाओढ लागते आणि अश्या वेळी ही तळहाताएव्हढी पिल्ले कोणाच्याही पायाखाली येऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी कासव जत्रेच्या दिवसातही वनखात्याने बेशिस्त पर्यटकांवर जरब बसवण्यासाठी एक सहाय्यक द्यावा अशी मागणी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने केली आहे. कासव जत्रा आयोजित करताना त्याचे व्यावसायिकीकरण होणे अटळ आहे त्यामुळेच पर्यटन अथवा इतर कामांसाठी किनाऱ्यांचा विकास करताना तेथील जैविक विविधतेला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

येत्या काही वर्षात वेळास येथे कायमस्वरूपी कासव संशोधन आणि संरक्षण केंद्र उभारण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्रचे प्रयत्न सुरु असल्याचे वेळास कासव जत्रेचे समन्वयक रामाशिष जोशी यांनी सांगितले. त्यासाठी सुमारे नऊ लाख रुपयांची गरज आहे. त्यासंबधीची आणि या प्रकल्पाविषयीची सर्व माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संस्थेला अभ्यासू कार्यकर्त्यांचीही गरज आहे. स्थानिकांचा सहभाग आणि पर्यटन विकास या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर कासव संरक्षण आणि संवर्धनाचा हा संस्थेचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी प्रयोग आहे. वेळासच्या कासव मित्र मंडळाचा देखील एक ब्लॉग आहे जो पुरेसा अपडेट नसतो. कासव जत्रेला हजेरी लावणाऱ्या पर्यटकांसाठी गावातल्या काही घरांमध्ये निवास-भोजनाची सोय केली जाते मात्र प्रत्यक्ष जत्रेच्या काळात यातील किती घरे पाहुण्यांचे बुकिंग घेण्यासाठी उपलब्ध आहेत याची माहिती दोन्ही संकेतस्थळांवर दिली जात नाही. तरीदेखील दोन्ही माहितीस्थळावरून इतर बरीचशी माहिती मिळू शकते. कासव जत्रेच्या निमित्ताने उजेडात आलेले वेळासदेखील आता झपाट्याने बदलत आहे. गावाचा पर्यटन आणि आर्थिक विकास होण्याचे महत्व स्थानिकांच्या लक्षात आले आहे आणि त्यादृष्टीने त्यांच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. प्रकल्पात सहभागी झालेल्या इतर गावांनादेखील आर्थिक विकासाचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. वेळासला जाताना रस्त्याला अत्यंत देखणी अशी सागरी किनार आहे आणि प्रत्यक्ष वेळासला देखील सुंदर समुद्र किनारा आहे. फोटोग्राफी टुरीझम या नव्याने फोफावत चाललेला प्रकारातील पर्यटकांचा वेळाससारख्या गावांना फायदा होऊ शकतो.

वेळास गाव कोणत्याही कोकणी गावासारखेच अगदी साधे आणि स्वच्छ गाव आहे, पण कासव संरक्षण आणि संवर्धन प्रकल्प तसेच कासव जत्रेमुळे वेळासला नवे वलय प्राप्त झाले आहे. याच प्रकल्पामुळे वेळास आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आणि त्याचा फायदा पर्यटन विकासाच्या दृष्टीने आता वेळासला होतो आहे. या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या वेळास आणि इतरही गावांना रोजगाराच्या अनेक संधी मिळाल्या आहेत. अर्थात पर्यटन विकास क्षेत्रात अश्या वेळी नेहमीच संधीचा गैरफायदा न घेता आणि योग्य मार्गाने पर्यटकांची लुबाडणूक न करता गावाचा आर्थिक विकास आणि पर्यटन विकास या दोन्ही गोष्टी समांतर चालतील हे पहायचे असते. दुर्दैवाने रोजगाराची उत्तम संधी मिळालेली असतानाही वेळासचे काही गावकरी पर्यटकांचा गैरफायदा घेताना दिसले. कासवांची पिल्ले पूर्णपणे नैसर्गिक स्थितीत जन्म घेत असल्याने ते पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्याची गरज नसताना वेळासचे उपसरपंच आणि काही तरुण हे पर्यटकांकडून दर दिवशी प्रत्येकी पन्नास रुपये उकळताना दिसले. विशेष म्हणजे या शुल्काचा कोणताही उल्लेख माहितीस्थळावर केलेला नाही. त्यामुळे अनपेक्षितरित्या मागण्यात आलेल्या या शुल्काचा काही पर्यटकांनी तीव्र निषेध देखील केला. वास्तविक कोकणी पदार्थ आणि वस्तू, कासव स्मृती चिन्हे यांची विक्री तसेच कासव जत्रेसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी होम स्टेची सोय, सहल आणि प्रकल्प मार्गदर्शक अशा काही माध्यमातून गावकऱ्यांना चांगला पैसा मिळू शकतो. सध्या गावातल्या १९ घरांमध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय केली जाते. गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांनाही कासव संवर्धन प्रकल्पातून चांगला रोजगार मिळतो. पर्यटन विकास आणि रोजगार संधी महत्वाच्या आहेतच, परंतु व्यावसायिक वृत्ती प्रमाणाबाहेर वाढली तर काहीच वर्षात कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्पाचा मूळ हेतू बाजूला पडून या कासव जत्रेचा ‘इव्हेंट’ बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात पर्यटन विकास होण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

कोकणी घरात आणि कोकणी वातावरणात राहण्याचा अस्सल अनुभव मात्र वेळासमध्ये मिळतो. गावातली घरे अतिशय सुंदर आणि  पारंपरिक  पद्धतीची आहेत तसेच माणसेदेखील मोकळ्या मनाची आहेत. इथे पहिल्यांदाच येणाऱ्या परदेशी आणि देशी पाहुण्यांना आकर्षित करण्यासाठी सागर किनारा, माड, काजू आणि पोफळीच्या बागा, आमराया, फणस, रातांबे, विहिरी, शेते अश्या असंख्य गोष्टी आहेत, फक्त नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे. याबाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा केव्हाच प्रगत झाला आहे, आता वेळ उर्वरित कोकणाची आहे. महाराष्ट्राच्या कोकणपट्टीला सुदैवाने सागरी किनाऱ्यांनी संरक्षण आणि वैभवही दिले आहे. त्यातही मनशांती देणारे काही स्वच्छ किनारे अजूनही गर्दीपासून सुरक्षित आहेत. वेळास सध्या तरी फक्त कासव जत्रेच्या मोसमातच गजबजत आहे. अजून तरी वेळासचा किनारा पर्यटकांनी आक्रमून टाकलेला नाही. वेळासच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोबाईल संपर्क क्षेत्राबाहेर राहण्याची मोकळीक अनुभवता आली. कोणतेही बंधन नसताना फेरफटका करण्याची मजा केवळ शहरी नोकरदार पर्यटकच जाणो. उसळत्या लाटांमधून पुढे कचरा न येता अजून तरी इथे फेसाची स्वच्छ शुभ्र फुलेच उमलत आहेत आणि सुरूच्या बनामधून पावले थेट मऊ मुलायम रेतीकडे धाव घेताना फेरीवाले आडवे येत नाहीत. विशेषतः कासवांच्या पिल्लांसाठी तरी वेळासच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या गाजेला साद द्यायला हरकत नाही.

Please do read my article 'Velas chya kinarya varun' published on 24/03/2013 in Marathi news daily 'Prahaar',to read click on the link
 http://epaper.prahaar.in/24032013/Mumbai/Suppl/Page8.pdf   

Sunday, March 3, 2013

Living the excitement..


                                                       
I travel, I see, I talk and I write, this is the simplest way of letting my mind speak to the world. My inspirations are the people I meet and places where I go. My journeys are my motivations for my blogging. Now blogging is inseparable part of my journeys and travel feature writing.  I thank www.bigblogexchange.org for giving a dream platform for my blog.  This ingenious thought of blog exchange has clubbed participants from 90 countries, this is unbelievable but true yeah…just a few days more and who knows, I would find myself chatting with family in Cambodia or watching the bravura magical wildlife of Serengeti. I wish the participant, who would be exchanging the country with me, will find India enthralling and wonderful. So please read my blog and keep alive the excitement!


Sunday, November 11, 2012

सुंदरबन सफारी

बोनबीबी आणि दक्षिण राय देवाच्या जंगलातला शिकारी दबक्या पावलानी येतो मात्र चालत येत नाही तर तो पोहोत येतो आणि ते देखील तब्बल २-३ कि.मी अंतर पार करून येतो. परत जाताना शिकारीचे ओझे देखील पाण्यातूनच घेऊन जातो. त्याच्याच दहशतीमुळे बोनबीबीच्या म्हणजे वनदेवतेच्या पायाशी हिंदू आणि मुस्लीम दोघेही एकत्र येतात. ती त्यांचे जगातल्या सर्वात शक्तिमान आणि धूर्त शिकाऱ्यापासून संरक्षण करेल अशी सुंदरबनमध्ये राहणाऱ्या स्थानिकांची घट्ट श्रद्धा आहे आणि म्हणूनच जंगलात मध गोळा करायला जाताना किंवा मासेमारीसाठी जाताना हे स्थानिक बोनबीबीला साकडं घालून जातात. पण तेवढयानेही भागले नाही तर संकटाला दूर ठेवण्यासाठी सुंदरबनच्या आसमंतात रात्री फटाके आणि ढोलाच्या आवाजाचे पडसाद उमटतात. तरीही इथला सर्वेसर्वा म्हणजे रॉयल बंगाल टायगर त्याची शिकार उचलतोच. सुंदरबनमधील गावागावातून वाघाने केलेल्या शिकारींचे किस्से ऐकायला मिळतात. इथला निसर्ग जेवढा लहरी आहे तेवढाच इथला माणूस आणि वाघ देखील चिवट इच्छाशक्तीचा आहे. त्यामुळेच पश्चिम बंगालमधील सुंदरबन जगातील एक आश्चर्य आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे.

सुंदरबनमध्ये प्रवेश करणारे बहुतांशी पर्यटक ‘रॉयल बंगाल टायगर’ दिसेल काय अशीच हुरहूर मनाशी बाळगून बोटीतल्या प्रवासाला सुरुवात करतात आणि या भटकंतीमधला खरा थरार हरवून बसतात. प्रवासाच्या सुरुवातीला सोबत करणारी किनाऱ्याला लगटून असणारी छोटी छोटी गावं कधीच मागे पडलेली असतात. आता जमिनीच्या सीमा नजरेला शोधाव्या लागतात आणि समोर फक्त गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आणि त्यांच्या अनेक उपनद्यांचा निळाशार कॅनव्हास अफाट पसरलेला असतो आणि तेव्हाच वर आकाशात भान हरपवून टाकणारा रंगांचा विलक्षण खेळ सुरु असतो. दुतर्फा हेन्ताल( गोलपाता) ,काकडा आणि सुंदरीच्या झाडांनी ( इथल्या स्थानिक भाषेत तिवरांना सुंदरीची झाडं म्हणतात. ती बहुसंख्येने इथे आहेत म्हणूनच हे सुंदरबन ) व्यापलेले किनारे , किनाऱ्यावर उन खात पहुडलेल्या आणि बोटीच्या आवाजाची चाहूल लागताच पाण्यात गडप होण्याऱ्या विशालकाय मगरी, हिरवळीच्या पट्ट्यामध्ये चरणारी हरणं, माकडं आणि इतर प्राणी, लाटांनी बनवलेले पुळणींचे विविध आकार आणि त्यावर बसलेले अनेक जातींचे पाणपक्षी, बांगलादेशच्या बाजूने येणारी मोठाली व्यापारी जहाजं असं सर्व पाहता पाहता विचारांना आणि नजरेला कोंदण उरत नाही पण या इंडियन अमेझॉनच्या प्रदेशाची अद्भूत सफर आत्ता कुठे सुरु झालेली असते. पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातले सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाचं जंगल निश्चितच बंगालच्या पर्यटन क्षेत्रासाठी सोन्याची खाण आहे. भारतीय सुंदरबन ९६२९ चौरस कि.मी इतक्या क्षेत्रफळावर अफाट पसरलेलं आहे. परंतु पूर्ण सुंदरबनचा मोठा म्हणजे २/३ हिस्सा बांगलादेशातही गेलाय. हुगळी, गोमर, दुर्गादुनी आणि गोमदी या चार नद्यांचा संगम जिथे होतो तो सुंदरबनमधला प्रदेश तर स्तिमित करून सोडतो.

सुंदरबनचा खरा प्रवास सुरु होतो तो गोद्खाली जेटीपासून. कधी कधी जे चित्र काना-डोळ्यांसमोर रेखाटले जातं त्यापेक्षा सत्य नेहमीच काहीतरी वेगळे असू शकते. सांगायचं कारण असं कि पर्यटन करताना भ्रमनिरास करणारे अनुभव नेहमीच येतात आणि सुंदरबनला भेट देण्याआधी देखील अशीच काहीशी भीती मनात होती. कोलकाता ते गोद्खाली गावापर्यंतच्या रस्ता नामक मातीच्या खड्डेयुक्त पट्ट्याने या भीतीला तडा जाऊ दिला नाही. नाही म्हणायला दुतर्फा अगदी केरळात असल्यासारखे नजारे होते पण खड्डे मात्र देवाचे नाव घ्यायला लावत होते. गोद्खालीपर्यंत कित्येक गावा-गावांमधून प्रवास होतो. पश्चिम बंगालचं खरं चित्र दाखवणारी ही छोटी गावं बाजूबाजूने दिसत राहतात. एका अर्थानं भारतातली प्रातिनिधिक गावं, गरीब तरी ही आनंदी. प्रत्येक घराची भातशेती, अंगणात बागडणारी बदकं आणि मासे असलेलं तळं असल्याशिवाय इथल्या गावातलं घर पूर्ण होत नाही. इथेच एकेकाळच्या प्रसिद्ध येझदी बाईकची सायकल रिक्षा केलेली पाहायला मिळाली. पश्चिम बंगालच्या गावा-गावात लोकप्रिय असणाऱ्या या सायकल रिक्षाला येझदी बाईकचं इंजिन जोडणाऱ्या भन्नाट डोक्याला मानलं पाहिजे. गोसाबा मार्केटपर्यंतचा सुमारे ३ तासांचा रस्त्यावरून होणारा प्रवास जरा त्रासदायक आहे पण एकदा का मोटारलॉन्चने नदीतून प्रवास सुरु झाल्यावर सर्व कंटाळा निघून जातो. फोटोग्राफर्ससाठी अक्षरशः नंदनवन असणाऱ्या या टायगर रिझर्वमध्ये शिरल्यावर भान हरपून जाते.

सुंदरबनचे कोअर, फक्त पर्यटकांसाठी आणि बफर असे तीन विभाग पाडण्यात आले आहेत कारण इथल्या सर्वच बेटांवर पर्यटकांना प्रवेश नाहीये. एकूण १०८ बेटांपैकी ५४ बेटांवर मानवी वस्ती आहे आणि फक्त अशा बेटांच्या आजूबाजूलाच प्रवाशांना फिरवले जाते. सजनेखाली इथं वनविभागाचं ऑफिस आहे तिथे गेल्यावरच गाईड दिला जातो. एकूण २१ गाईड आहेत ज्यापैकी वेळेला काहीच उपलब्ध असतात कारण अनेकदा हे गाईड तिथल्या रिसोर्टसाठी देखील काम करतात. त्यामुळे गाईड मिळणं मुश्कील असते आणि म्हणूनच बरोबर जर एखादा तज्ञ असेल तर उत्तमच ( तज्ञ सोबत असावाच कारण सुंदरबन एक भूलभुलैया आहे आणि माहितगार माणसाशिवाय कधी कधी बोटी भरकटत पार बांगलादेशच्या सीमेला जाऊन पोहोचतात. ) सजनेखालीला बोटीची आणि गाईडची नोंद झाल्यानंतरच सुंदरबन भ्रमंती सुरु होते. सजनेखालीला देखील वॉच टॉवर आणि सजनेखाली म्यान्ग्रोव इंटरप्रीटेशन सेंटर आहे. हा परिसर अगदीच माणसाळलेला असल्याने इथेच आजूबाजूला काही रिसोर्टस देखील आहेत. सजनेखाली,सुधन्यखाली, दोबांकी, नेतीधोपानी, बुरीर दाब्री, मारीच झापी, कुमीरमारी अश्या काही वॉच टॉवर्स आणि बेटांच्या बाजूने प्रवाशांना फिरवले जाते पण या फिरवण्यात देखील सहल संचालक लबाडी करतातच. अगदीच अनभिज्ञ असणाऱ्या हौशी प्रवाशांच्या कळपाला घेऊन वरवर तिथल्या तिथे गोल गोल फिरवले जाते, मघाशी म्हटल्याप्रमाणे सुंदरबन भूलभुलैया असल्यामुळे फिरताना सगळीकडे पाणीच पाणी आणि तिवरांची झाडी दिसत असल्यामुळे फारसा वेगळेपणा जाणवत नाही आणि त्यातून बोटीवर गाणी,खाणे-पिणे यात प्रवाशांना गुंगवून ठेवले जाते त्यामुळे बाहेर लक्ष गेलेच तरी कोणाच्या फारसं काही लक्षात येत नाही. सजनेखालीवरून बोट फिरत फिरत सुधन्यखाली,दोबांकी,नेतीधोपानी, बुरीर दाब्री इथल्या वॉच टॉवर्सकडे घेऊन जाते.

बुरीरदाब्रीचा रायमंगल वॉच टॉवर आणि सिमेंटच्या ठोकळ्यांवरून घेऊन जाणारा वॉक चुकवूच नये असा आहे कारण एकतर या वॉचटॉवरवरून अगदी समोरच बांगलादेशची सीमा आपल्याला दिसते अन् सभोवताल पसरलेलं घनदाट जंगल. वॉचटॉवरपर्यंत पोहोचण्यासाठी आधी एक केज वॉक करावा लागतो ज्यामध्ये दुतर्फा लोखंडी जाळी लावलेल्या चिखलमय मार्गावर सिमेंटचे दोन फ़ुट उंचीचे ब्लॉक्स बनवून ठेवले आहेत आणि अश्या सुमारे १००-१५० ब्लॉक्सवरून उड्या मारत मारत आपण बुरीरदाब्रीच्या वॉचटॉवरपाशी पोहोचतो. नेतीधोपानी आणि दोबांकीचे वॉचटॉवरही पाहण्यासारखे आहेत. बुरीरदाब्रीला आपण केज वॉक करतो तर दोबांकीला एका बंदिस्त पुलावरून तिवरांच्या जंगलात जाता येतं. या पुलाला दुतर्फा नायलॉनच्या जाळ्या लावून सुरक्षित केलं आहे. या ठिकाणी बरीच हरणं चरताना दिसतात आणि कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार तिथं वाघदेखील कधी कधी शिकारीसाठी येतो. अर्थातच सुंदरबनमध्येही वाघ पहायला मिळणं हे कठीणच आहे. नेतीधोपानी वॉचटॉवरच्या परिसरात एक चारशे वर्षांपूर्वीचे शिवमंदिर आहे पण आता त्याचे फक्त भग्नावशेषच पाहायला मिळतात.

सुंदरबनला गेल्यावर एकवेळ वाघ नाही दिसला तरी चालेल ( कारण तो इतर जंगलातही दिसतोच ) पण अफाट पसरलेल्या भारताच्या या ‘अमेझॉन’ मधून छोट्याश्या नावेतून स्वतः वल्हं मारत जाण्याचा जाण्याचा अनुभव खरेच अमेझिंग आहे. किनाऱ्यावर असलेल्या ‘चारघेरी चार’ गावात छोट्या होडक्यांमधून पोहोचण्याच्या आधी, किनारा अर्धा तासभर दूर असताना ( म्हणजे खरे तर किनारा सुरक्षित असा नजरेच्या टप्प्यात असताना ! ) आमच्या हातात वल्हं सोपवलं गेलं आणि नावाड्यांनी चक्क विश्रांती घेतली. अर्थातच वल्हं चालवताना आमची होणारी त्रेधा पाहून त्यांचीदेखील छान करमणूक झाली. आम्ही वल्हं मारताना नावाड्यांची आम्हाला कळू न देता काहीतरी कुजबुज सुरु होती, पण आमच्या होडीत मी सोडल्यास कोणीच बंगाली समजणारे नव्हते त्यामुळे ( मी सोडून !) कोणीच घाबरले नाही. नावाड्यांनी जवळपास मगर पाहिली होती पण हे जर आम्हाला कळले असते तर आम्ही घाबरलो असतो म्हणूनच त्यांनी मगर पाहिल्याची आम्हाला गंधवार्ता देखील लागू दिली नाही. सुंदरबनला गेल्यावर मोटरबोटीतून प्रवास अनिवार्य आहे अन्यथा दुसरा पर्याय नाहीच. पाण्यात तरंगण्यापासून ब्रेक हवा असेल तर सरळ रिसोर्टवर परतायचे नाहीतर चिखलातून चालत किनाऱ्यावरल्या गावात शिरायचे. ‘चारघेरी चार’ गावात जाताना मडफ्ल्याट म्हणजे रेतीच्या गाळातून चालण्याचा भन्नाट अनुभव घेतला. गाळामधली रेती चिकणमातीसारखी पांढरी आणि चमकणारी असते. पण अश्या या घट्ट चिखलात गुडघ्यापर्यंत पाय रुतला कि बाहेर काढणं अतिशय कठीण होऊन बसतं. त्यातच आतमधून पायाला स्पर्श होणारा खेकडा आहे कि समुद्री वनस्पती या भीतीने पाय वर काढण्यासाठी जोर लावत किनारा ते गाव असा मडवॉक पार पडतो. या चिखलात पाऊल टाकण्याआधी हातभर अंतर चालायला कितीसा वेळ लागतोय असं वाटलं होतं पण नंतर हेच अंतर पार करताना अशी धमाल आली कि एव्हढेसे अंतर चालायलाच अर्धा तास लागला. अश्या या चिखलातून पाय रुतवत आणि वर काढण्याचा व्यायाम करतच गावात पोहोचलो. इथे पाण्यात भयानक मोठ्या मगरींचं वास्तव्य आणि काठावरल्या जंगलात वाघासारखं अत्यंत हिंस्त्र श्वापद त्यामुळेच सुंदरबन आजही मोठ्या प्रमाणावर निर्मनुष्य आहे. आहेत ती गावंदेखील खूप मोठी नाहीतच. एका गावात फारतर २०-३० घरं असतात. गावाच्या किनाऱ्यावर होड्या आणि बोटींच्या येण्या-जाण्याकरिता जेट्टी म्हणजे धक्का बांधलेला असतो. काही गावात तर अश्या जेट्टीचीही सोय नसते,तर तिथे फक्त सिमेंटचे दगड बसवून पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायवाट केलेली असते. पश्चिम बंगालमध्ये भावी काळात येणारं आणि सध्या असलेलं सरकार केव्हा तरी भलं करेल अश्या आशेत इथले गावकरी अजूनही दिवस काढतायत. ऐन पावसाळ्यात तर यांच्यासाठी अजूनच हलाखीचे दिवस. पावसाळ्यापूर्वी गावकरी छोट्या होड्या-नावांमधून आवश्यक साधन-सामुग्रीचा जमेल तसा साठा करून ठेवतात. अशीच ने-आण एरव्हीदेखील रोजच्या प्रवासात चालते. मग अगदी बाळंतीण असू देत वा शाळकरी मुलं, रोजच्या प्रवासासाठी मग होडीशिवाय पर्याय नाही. २००९ साली आलेल्या ‘आयला’ वादळानं इथल्या गावकऱ्यांचे जीवन पुरतं उध्वस्त केले ज्याच्या परिणामाच्या धक्क्यातून ते आता सावरलेयत खरे पण आर्थिक नुकसानाची भरपाई अजूनही काहीजणांपर्यंत पोहोचलेली नाही. आज ना उद्या कोणतं तरी सरकार आपला त्राता बनेल याची ते वाट पाहतायत. भाजीपाला,तांदळाची शेती,गाई-गुरांचं पालन तसेच मत्स्यपालन हाच त्यांचा उदरनिर्वाह. काही गावकरी जंगलात मध गोळा करण्याचं धाडस दाखवतात पण हा मध गोळा करून विकण्याचा धंदा खुपच जोखमीचा कारण तसेही गावात वाघाचे हल्ले होत राहतात त्यात मध गोळा करायला किंवा चोरट्या शिकारीसाठी प्रत्यक्ष जंगलात जायचं म्हणजे वाघाच्या जाळ्यात आयतेच सापडणं. वाघांचे हल्ले आणि वादळी हवामान यामुळे या गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन सतत धोक्याच्या रडारवर असते. या ग्रामीण भागात वीजपुरवठा नाही. अतिशय दुर्गम ठिकाणी असणाऱ्या या गावांचा पावसाळ्यात तर जगाशी संपर्कच संपतो.

इथल्याच स्थानिकांमधून मग गाईड तयार होतात. त्यातलेच काही जण बोटी किंवा लॉन्च भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. दीपंकर मंडल, मृत्युन्जय, निरंजन रपतानसारखे अनेक स्थानिक गाईड इथं नावाजलेले आहेत. फक्त गाईडगिरी करणं हाच त्यांचा व्यवसाय नाही तर त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या लॉन्चदेखील असतात. अनेकदा हे सर्व रिसोर्टशी किंवा शहरातील एखाद्या टूर ऑपरेटरशी बांधील असतात. वनखात्याचे एकूण २७ गाईड उपलब्ध असतात, पण सिझनच्या वेळेस एकही गाईड मिळत नाही. आमचा गाईड होता अमर रपतान- गाईड नंबर १९. सुंदरबनमधील अवाढव्य प्रदेशात फिरण्यासाठी नावाड्याना मार्ग ठरवून दिलेले आहेत. त्यातूनच मग पर्यटक बोटी फिरतात. बोटीने सुंदरबनमध्ये फिरण्याचा आणि दिवसरात्र बोटीवरच काढण्याचा अनुभव विलक्षण असतो, कारण या मोटर बोटी म्हणजे लक्झरी क्रुझ नव्हेत. हवामान ठीक असेल तरच मोटरबोटी बाहेर काढल्या जातात. पाउस इथे अवकाळी आहे त्यामुळे असा पाउस आणि वादळी हवा असेल तर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटी बाहेर काढण्याचा धोका कोणी पत्करत नाही. मुख्य म्हणजे अश्या वातावरणात वाघ दिसण्याची शक्यता अजिबात नसते आणि तसेही सुंदरबनला जाऊन पाण्यात पोहणारा वाघ दिसेल अशी अपेक्षा ठेवली तर प्रचंड निराशा होईल कारण सुंदरबनमधला वाघ कान्हा किंवा बांधवगढ जंगलातल्या वाघांसारखा सहजगत्या दृष्टीस पडणं म्हणजे चमत्कारच. तरीही लॉन्चवर काही दिवस राहण्याचा अनुभव घेण्यासारखा आहे किंबहुना जर हा अनुभव घ्यायचा नसेल तर इतक्या लांबपर्यंत तंगडतोड करत जाणेच व्यर्थ आहे.

सुंदरबन नैसर्गिकरित्या विलक्षण शांत प्रदेश आहे, शांतता इतकी नीरव कि पाण्यात सुळकन मासा जरी गेला तरी आवाज ऐकू येतो. सुंदरबन त्रिमितीत अनुभवण्याची गोष्ट आहे. जमीन, आकाश आणि पाणी यांचं एखाद्या ठिकाणी किती महत्व असू शकते हे इथे आल्यावरच कळते. गेली शेकडो वर्षं इथल्या निर्मनुष्य बेटांवर रॉयल बंगाल वाघाचं वर्चस्व होतं पण आता याच आदिम प्रदेशात माणसांची धांगडधिंगा घालणारी पावलं रुतायला लागली आहेत. तसे म्हटले तर जमिनीवरल्या जंगलाचे नियम या प्रदेशातील जंगलाला लावता येत नाहीत कारण इथली माणसे, वाघ, इतर पशु-प्राणी आणि जैव-विविधता यावर फक्त निसर्गाचीच हुकुमत चालते. सुंदरबनमध्ये असे म्हटले जाते कि जमिनीवर वाघाच्या तावडीतून सुटलात तर मगरी पाण्यात तुमची खबर घेतीलच एकूणच काय दोन्हीही ठिकाणी इथला मनुष्य शिकाऱ्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. तरीही कोणत्याही भीतीला न जुमानता पर्यटक इतक्या दुर्गम ठिकाणी येऊन सुंदरबनसारख्या अतिशय मनोहारी प्रदेशाची वाट लावतच आहेत. वाघांच्या चोरट्या शिकारी इथे जास्त होत नाहीत पण इथल्या पर्यावरणाची मात्र गेली कित्येक वर्षे इमानदारीत नासधूस केली जाते आहे. किनाऱ्यावरच्या संरक्षक जाळ्यांमध्ये अडकून राहिलेल्या जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलच्या थाळ्या याची साक्ष देतात. रिसोर्टवर आणि लॉन्चवर वाजवले जाणारे कर्कश संगीत यामुळे इथली शांतता तडीपार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र इथला निसर्ग आणि प्राणी देखील अतिशय लहरी आहेत त्यामुळेच माणसाची सुंदरबनमध्ये फारशी सत्ता चालत नाही आणि म्हणूनच बोनबिबिच्या कृपेने सुंदरबनचे वाघ देशातल्या इतर जंगलांपेक्षा अधिक सुरक्षित आहेत.

सुंदरबनच्या सफरीसाठी लक्षात ठेवा :

कसे जाल? कोलकाता शहरातून सोनाखाली, नामखाना, सागर आयलंड किंवा बक्खाली येथे बाय रोड जाऊन पुढील जलप्रवास सुरु करता येतो.

कुठे राहाल? साजनेखाली टुरिस्ट लॉज, दयापूर, पाखीराला.

काय पाहाल? सागर आयलंड, बक्खाली, कॅनिंग, साजनेखाली, दोबांकी, सुधन्यखाली,लोथीआन आयलंड, नेतीधोपानी, भागबतपूर, सुंदरकती, बुरीरदाब्री, हालीडे बेट, कलशद्वीप बेट,कुमीरमारी, मोरीचझापी इत्यादी.

एकूण प्रवास तास किती? बाय रोड ३-४ आणि जलप्रवास ३-४ तास असा मिळून एका दिवसात ७ ते ९ तासांची भटकंती होतेच.
Way to Sunderban,West Bengal-
From City of Kolkata, reach to Sonakhali, Namkhana, Sagar Island or Bakhali by road and then travel by launch to Sajanekhali,Dayapur or Pakhirala. There are some resorts near Sajanekhali and also the WBTDC tourist lodge is available at Sajanekhali. It takes around 3-4 hours from Kolkata to Godkhali jetty.
                                              
( सुंदरबन माझ्या आतापर्यंतच्या सर्व जंगल सफारीमधला सर्वात अविस्मरणीय असा अनुभव होता. तिथे प्राणी पाहायला तर मिळालेच पण इतक्या दुर्गम प्रदेशात माणसं कशी निसर्गाशी मिळतं-जुळतं घेऊन राहतात हे देखील पाहायला मिळालं. सुंदरबनमध्ये वाघ पहिल्याच खेपेत दिसणं फार भाग्याची गोष्ट आहे पण युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळालेलं हे जंगल अनुभवणं हे देखील तितकेच सुंदर आहे आणि खरे तर भारतीय जंगलाचा एक वेगळा प्रकार म्हणून हे जंगल आणि हा प्रदेश पाहिलाच पाहिजे. सुंदरबनच्या काही आठवणी माझ्या पुढील लेखात वाचायला मिळतील, त्यासाठी कृपया खालील लिंक क्लिक करा. )
http://epaper.prahaar.in/detail.php?cords=20,100,1478,1598&id=story2&pageno=http://epaper.prahaar.in/11112012/Mumbai/Suppl/Page8.jpg

Monday, July 2, 2012

दांडेलीच्या जंगलात..

                                                         
दांडेलीच्या जंगलाबद्दल पहिल्यापासूनच कुतूहल होतं आणि तसंही कर्नाटकावर मी फिदाच आहे कारण कर्नाटकचा निसर्ग अत्यंत श्रीमंत आणि लोभसवाणा आहे, म्हणूनच दांडेलीला येणार का असा मित्राचा फोन आल्यानंतर नाही म्हणायचा सवालच नव्हता. माझ्यासोबत माझी भाचीदेखील (अपूर्वा) येणार होती त्यामुळे अजूनच मजा येणार होती. या ट्रीपच्या निमित्ताने कराड शहराची थोडी ओळख झाली आणि याचे श्रेय कराडच्या डॉक्टर कल्पना चावला विज्ञान केंद्राचे संचालक संजय पुजारी यांनाच आहे. त्यांच्यामुळेच खरं तर दांडेलीला जाण्याची संधी मिळाली कारण त्यांनी केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या सहलीत आम्ही देखील सामील झालो होतो. कराडमध्ये रात्री पोहोचल्यामुळे शहरात फारसे फिरता आले नाही पण इथल्या प्रसिद्ध पाटील मेसच्या लज्जतदार जेवणाची चव घेता आली. या कराड भेटीतच नीलिमा देशपांडे यांच्यासारख्या सुहृद मिळाल्या. दांडेलीचं जंगल नक्कीच अनुभवण्यासारखे आहे, विशेषतः जंगलातील एका पॉईंटवरून धुक्यात लपेटलेली सातपुडा पर्वतराजी पाहणं खूप मनोरम वाटते. एकूणच दांडेली जंगलाचा हा फेरफटका अविस्मरणीय ठरला, त्याचाच हा एक मी लिहिलेला रिपोर्ट दैनिक प्रहारमध्ये प्रसिद्ध झालाय. जरूर वाचा आणि प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद !
 Way to Dandeli-Anshi Tiger Reserve Forest, Karnataka- 

The nearest city to Dandeli is Belgaum, which is about 90km away by road. Belgaum is conncted to Mumbai and Bangluru by railway, domestic flights and by road. From Belgaum, one can reach to Dandeli by bus or taxi. There are many resorts and nature camps are available for stay near Dandeli forest.

The link below will take you to my article published in news daily ‘Prahaar’ on 7th July 2012. It is about Dandeli-Anshi Tiger Reserve in Karnataka state of India. I spent three days in this absolutely fabulous forest, one of the Indian forests where river rafting is also available. For more details about DATR, you can contact me through comments. Thanks a lot.
http://www.prahaar.in/madhyantar/madventure/66208.html


Friday, May 18, 2012

मार्लेश्वर

                                                             
माझं आजोळ म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातलं मार्लेश्वर गाव. छोटं सुंदर टिपिकल कोकणातलं गाव. खूप वर्षांनी आजोळी जाण्याचा यंदा योग आला आणि त्यानिमित्ताने श्री क्षेत्र मार्लेश्वरासाठी चार ओळी आपसूकच लिहिल्या गेल्या, जे खरं तर इतक्या वर्षात जमलं नव्हतं. गावाची ओढ काय असते ते प्रत्येक अस्सल कोकणी मनुष्यच जाणतो, नेमक्या त्याच भावना हा लेख लिहिताना होत्या. सोबतची सकाळ ई-पेपरची लिंक कृपया क्लिक करा आणि माझा लेख वाचा, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. विशेष सूचना- या लेखात नजरचुकीने धनेश पक्ष्याऐवजी रॉबिन पक्ष्याचा फोटो छापला गेला आहे. त्याबद्दल माफी असावी.
Way to Marleshwar, District-Ratnagiri,State-Maharashtra
Marleshwar is accessible by road only from Sangameshwar, Ratnagiri or Chiplun railway station of Konkan railways. Kindly note that no straight bus facility is available for Marleshwar so one has to change 2 buses while traveling to Marleshwar. Bus route- Ratnagiri to Sangameshwar then Sangameshwar to Deorukh and then Deorukh to Marleshwar. From Chiplun, its Chiplun to Deorukh and then Deorukh to Marleshwar. Accommodations are available in Deorukh and Ratnagiri.
http://72.78.249.107/Sakal/8May2012/Normal/Mumbai/MumbaiToday/page8.htm


Tuesday, February 21, 2012

I rebel for….

                                                          
''Kothai tomi?''.. ''Aami belune ache’’…that is the most usual answer you will get if you call Tanmoy Ghosh, the founder of irebelasia.org which is based in Belun. After many long hour phone conversations with him I decided to hop in this opportunity to see the interiors of rural West Bengal when he invited me to see the work and projects started by his NGO’ irebelasia.org’. This was my first time to visit any wildlife related organization to see their work so closely. Tanmoy started irebel with few determined intentions in his mind. Now irebel is growing well and has been working to constraint illegal hunting & deforestation, changing farmers mind towards use of chemical pesticides & fertilizers, documentation & monitoring of threatened species, rehabilitation of birds & animals, creating new forests of indigenous trees and plantations etc.

Though a small village based organization, I realized the importance of its presence in rural side because the team irebel is really working hard from the grass route level. They have started this work at the right hour to voice the need of wildlife & eco-conservation. It is more difficult when you take the challenge of educating co-villagers about all these things. Still in rural India many primary facilities are inadequate so telling natives to ignore the jungle cat or fox housing in their paddy fields is just like a stupidity according to villagers. But tanmoy and his team at irebel have been doing this since last 14 years. Not only they are engaged in wildlife activities but now irebel is also playing lead role in providing financial, medical & educational conveniences to these villagers.

The villagers of this picturesque small village have learned a new language of wildlife care and eco-conservation and they love it too. Few years ago Tanmoy and his naturalist friends have started working seriously on the grasslands of Belun for the first ever bio-diversity park of village. Belun villagers are now considering the need of interdependence of birds & animals with their lives and obviously the significant efforts done by irebel team for the mass awareness campaigning for eco & wildlife conservation, these people have understood the need of bio-diversity forest and they are also helping irebel team for this.

Being a tiny remote village of west Bengal, Belun may not have luxurious lifestyle facilities but indeed Belun is a quiet, beautiful & serene natural habitat for many birds & animals. This petite village near Shiblun of Burdwan district of west Bengal is surrounded by Ajay and Hooghly River’s confluence and also has its very own small river-the Shibai, which is a primary source of water for farming & cultivation here. Like any typical village in west Bengal, Belun too had witnessed severe damages to houses, croplands, wildlife habitats by the annual flooding of these three rivers. Katwa town is nearly 12 Km from Belun, which is actually the advantage for irebel’s work.

Belun is encircled with enormous treasure of wildlife & forest. It was for the first time I trailed through the thickest & 7-8 ft high grasslands here and enjoyed it a lot. Initially Belun is a natural habitat for 200 species of birds, both resident and migratory birds & also animals like jungle cats, jackals, hyenas etc can be spotted in nearby forest. irebel team is creating new grassland & wetland habitats for birds and also protecting them. irebel is developing interest among village youth towards nature studies and helping them to become naturalist. Palash Ghosh is the boy who is perusing his M.A in nature studies, is also leading the naturalist team of irebel. This team is taking initiative in close monitoring of the bird & animal population, their behavior, nesting habits, reproduction & other physiological activities. irebel has developed its own financial support by giving tourists a weekend gate away option at Belun. With excellent eco-village kind of facilities for stay & food, this lovely nature hub has much more to give. It is just 175 km by road from Kolkata and other options like train, bus are also available to reach Belun. Once reach Belun, you can make it a base point and visit nearby places like Kalyanpur ghat or Nayachar for Gangetic dolphins, Attahas Tala for open billed stork, flying fox , Chot pukur for terrapins, Bengal fox & migratory birds, & Musharu-the snake village etc.

Tanmoy and his team at irebel have many plans to treasure this beauty of Belun and also focusing on the financial up gradation of villagers too, that is why tanmoy believes in people’s participation in preserving this natural wealth is very important and to create awareness among them is irebel’s prominent aim. Irebel team is working on conservation of critically endangered Ghariyal (Gavialis gangeticus) as the continuous research & monitoring work is going on. Irebelasia is lucky to have all its team working so enthusiastically and always ready to run on their toes for any project work & guests. Team is engaged mainly with outdoor research projects throughout the year, Sanjoy Ghosh is also one of the backbone of irebel from Belun. irebel team is lucky to always incomplete without a scrupulous inspiration it gets from Lee Ann Merril, who is intergovernmental Coordinator for water & land resources in US. I liked the longing for knowledge in every irebelian, be it a just a volunteer or a field activist. Santu, Prakash, Ajoy, Biplab, Ganesh & many others, who are really working hard for irebelasia and it is just because of all the team effort, irebel is growing towards an encouraging future.

Eco and wildlife conservation and mass awareness does not always need showy glossy presentations in media with catchy taglines or support by so called wildlifers, it just needs a direct hit on aim with all the dedication & love for nature. Tanmoy Ghosh’s team is doing exactly that. I think India needs many more tanmoy’s to preserve the wildlife wealth of this country. To visit Belun or for more information about irebel (institute for research on ecology and biodiversity to enunciate our liability protect your environment and ensure our existence.) please contact on Tanmoy Ghosh tanmoywildphoto@gmail.com.
Way to Belun in Burdwan district of West Bengal.

Nearest railhead to Belun is Katwa and Bandel near Kolkata in India. To reach Belun, journey to Siblun from Katwa junction or Bandel.