Translate

Showing posts with label resort. Show all posts
Showing posts with label resort. Show all posts

Friday, September 25, 2015

एक खिडकी असावी न्यारी..



कोणत्याही पर्यटनस्थळी किंवा निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर सर्वात प्रथम पाहिली जाते ती राहण्याची खोली. ती छान असेल तर तिथपर्यंत झालेल्या प्रवासाचा निम्मा शीण निघून जातो आणि त्यातून त्या खोलीला जोडून खिडकी, व्हरांडा, गॅलरी वगैरे असेल तर अधिकच आनंद होतो. आणि त्यातही भर म्हणजे त्या खोलीतलं हे दुस-या बाजूला उघडणारं मोकळं दार एखाद्या घनदाट जंगलाकडे किंवा समुद्राकडे उघडणारं असेल तर अजूनच बहार !
windowमुंबईतल्या सर्व शीणाचा, भयानक विळखा घातलेल्या थकव्याचा एक एक वेढा सुटत होता. पहाटे उठल्यावर बाहेर व्हरांडयात आले. थंडगार शिरशिरी उमटवणारा वारा वाहत होता. हवा कमालीची शुद्ध व निर्मळ होती. असं वाटत होतं की, आपण यापूर्वी असा श्वास कधी घेतलाच नव्हता. शहरात राहताना मन प्रसन्न राहावं म्हणून आपण काय काय प्रयत्न करत असतो. तसंल इथे काहीच करावं लागत नव्हतं. मनाला, डोळ्यांना, शरीराला प्रसन्न वाटून घेण्यासाठी कुठलेच कष्ट करावे लागत नव्हते. त्यांच्यासाठी आज कोणतेही आदेश नव्हते. त्यांना फक्त आरामच करायचा होता.
जगात इतकं काही छान, शुद्ध असू शकतं आणि तेही आपल्यासमोरच यावर विश्वासच बसत नव्हता. पक्ष्यांचा, प्राण्यांचा दिवस कधीचाच सुरू झाला होता. एका लाकडाच्या ओंडक्यावर जाऊन बसले. समोरच्या घनदाट या शब्दालाही मागे टाकेल अशा गच्च जंगलात नजर लावून काय दिसतंय ते पाहण्याचा प्रयत्न केला. डोळे त्या हिरवाईने नुसते निवून गेले. कदाचित त्यांनी मला धन्यवादच दिले असावेत. रोज दिवसाचे १०-१२ तास कॉम्प्युटरच्या झगझगीत स्क्रीनकडे पाहण्याची त्यांना शिक्षा होत असते, त्यामुळे हा हिरवा रंग त्यांच्यासाठी नक्कीच धक्कादायक पण सुखावणारा होता.
सर्व काही शांत, निश्चल होतं. निसर्गनियमाप्रमाणे सर्वकाही चालू होतं. त्यात कुठेही घाईगडबड नव्हती. इथे शहरात सकाळी उठल्यावर घाण्याला जुंपल्यासारखी धावपळ करणा-या मला खरंच स्वर्गात असल्यासारखं वाटत होतं. समोरच्या जंगलातून येणा-या विविध आवाजांनी जंगलात राहत असल्याची धुंदी मनावर चढत होती. सकाळचा गरमागरम चहा घेत इतक्या सुंदर दृश्यात आपणही एक भाग असावं, आपलं अस्तित्व विरघळून जावं, भानही जावं यापेक्षा अजून मनाला काय हवं असणार? या माझ्या सर्व आनंदाला छोटंसं कारण ठरला होता तो, मी जिथे उतरले होते, त्या इको कॅम्पमधल्या खोलीचा व्हरांडा.
खोलीचा दरवाजा थेट जंगलाच्या बाजूनेच उघडत होता. आम्ही रात्री पोहोचलो तेव्हा काळोखात समोर काय पसरलं आहे हे लक्षातच आलं नव्हतं व सकाळी उठल्यावर हा सुखद धक्का मिळाला होता. कर्नाटकातल्या सिरसीजवळ काही मैलांवर असणारं एक डोंगरावर वसलेलं छोटं पठार, तिथला हा इको कॅम्प होता. अशा ठिकाणी जाताना नेहमीच वाटतं की कोणत्याही सुखसुविधा नसल्या तरी चालतील, पण एक दरवाजा असा असावा जो एखादं रम्य दृश्य दाखवण्यासाठी उघडत असेल.
मला वाटतं, तुमच्या-आमच्यापैकी पर्यटनस्थळी जाणा-या प्रत्येकालाचा अशी एखादी खिडकी किंवा दरवाजा नक्कीच हवाहवासा असेल. अखेर आवडत्या ठिकाणी गेल्यावर चार भिंतींनी बंद, जराही मोकळेपणा नसणारी खोली कोणाला आवडेल म्हणा. अनेकदा हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये खोल्यांचं बुकिंग करायला गेल्यावर कळतं की अशा निसर्गरम्य दृश्याचा देखावा दाखवणारी एखादी खोली तिथे असेल तर ती सर्वात आधी बुक झालेली असते. अशा खोल्यांचा दरही इतर खोल्यांपेक्षा जास्त असतो. कारण त्यांना नेहमीच जास्त मागणी असते.
भंडारद-याला एमटीडीसीचं रिसॉर्ट आहे, तिथं तलावाचा नजारा दाखवणारी एक लेक फेसिंग खोली आहे, तिचं बुकिंग मिळणं कठीणच असतं. अशी कित्येक उदाहरणं देता येतील. मग अशावेळी समुद्रकिनारी फिरायला जाणारे भाग्यवान ठरतात. कारण अख्खा समुद्रच खोल्यांमधून पाहण्यासाठी तिथे असतो. तिथे फारशी अशी अडचण होत नाही.
एखादं हिल स्टेशन असेल किंवा समुद्र किनारी असणारं रिसॉर्ट असेल तर, आपल्या खोलीतून अप्रतिम निसर्गनजारा दिसावा अशी बहुतेकांचीच इच्छा असते. ज्यांना अशी खोली मिळत नाही, त्यांच्या हेवापूर्ण नजरा मग या लोकांना झेलाव्या लागतात. कोणत्याही पर्यटनस्थळी असलेल्या रिसॉर्ट किंवा हॉटेलच्या जाहिरातीत त्यांच्याकडे अशा सुंदर खोल्या किती आहेत हे पहिलं नमूद केलेलं असतं.
एखाद्या छानशा ठिकाणी प्रवास करून आलेल्या व्यक्तीला त्याच्या आठवणी विचारल्या तर त्याच्या आठवणीत एक गोष्ट हमखास असते, ती म्हणजे त्या ठिकाणी असलेली राहण्याची व्यवस्था. अर्थात, एखादे रिसॉर्ट किंवा हॉटेलची रूम, बंगला वगैरे आणि त्यातही त्या राहिलेल्या खोलीला एखादी खिडकी, बाल्कनी किंवा मोठा व्हरांडा होता असेल तर त्याची छानशी आठवण नेहमी मनात रेंगाळत राहते.
व्हरांडा म्हटला की नेहमी फॉरेस्ट बंगले किंवा रेस्ट हाऊस किंवा जुने ब्रिटिशकालीन बंगले आठवतात. अशा बंगल्यांमध्ये नेहमीच निवांतपणा असतो, शिवाय आजूबाजूचा परिसरही छान असतो. आपण एखाद्या ठिकाणी गेलो आहोत आणि तिथं राहत असलेल्या खोलीतून बाहेरचा अप्रतिम असा नजारा दिसत असेल तर ती आठवण नक्कीच अविस्मरणीय असते. मग तो समुद्रकिनारा असो किंवा वृक्षराजी किंवा पांढ-याशुभ्र बर्फाच्छादित पर्वतांचा देखावा असेल.
आपल्या खोलीतून छानसं दृश्य दिसलं पाहिजे असा ब-याच पर्यटकांचा नेहमीच आग्रह असतो. माझ्याही आठवणीत अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे सुदैवाने मला नेहमीच उत्तम राहण्याची व्यवस्था मिळाली. अगदी न मागता. तेव्हा तेव्हा मला स्वत:चाच हेवा वाटत आला. नेहमीप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी गेल्यावर हीच जगातली अखेरची सुंदर जागा असंही वाटून गेलं. आपण कुठेही जातो कशासाठी, तर थकवा, ताण विसरून जाण्यासाठीच तर ना.. मग अशी सुंदर दृश्यं दाखवणारी खोली मिळाली तर ते स्वर्गसुखच म्हणायला पाहिजे.
Print Friendly
Tags:  |  |  | 

Friday, April 24, 2015

सारे प्रवासी घडीचे, ग्राहक कायमचे!


प्रवास करणं हे खरं तर एक निमित्त असते; पण या निमित्ताने आपल्या पदरी अनेक बरे-वाईट अनुभव पडत असतात. एखादी उत्तम सहल लक्षात राहते तेव्हा तिच्यापाठी असेच काही चांगले अनुभव असतात व तसेच एखाद्या प्रवासातून चांगलाच धडाही आपल्याला मिळून जातो. १५ मार्च म्हणजे आजच्या जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्ताने अशा अनुभवांची ही उजळणी.
सारे प्रवासी घडीचे हेच सत्य असतं कारण हल्ली आपला प्रवास हा फक्त आपला नसून तो साकार करण्यामागे कितीतरी जण खपत असतात. गेली काही दशकं पर्यटन व्यवसायाला जगभरात भरभराट लाभलेली दिसतेय. त्सुनामी, महापूर, भूकंपासारखी मोठी नसर्गिक हादरवणारी आपत्ती किंवा एखादा सांसर्गिक रोग अशा कारणांनी काही काळापुरता पर्यटन व्यवसाय जरूर मंदावतो मात्र पुन्हा तरारतो. त्याचं श्रेय तुमच्या-
आमच्यासारख्या प्रवाशांनाच जातं. आपण या पर्यटन व्यवसायाचे ग्राहक असतो. हल्लीच्या काळात पैसे खर्च करायची तयारी असेल तर प्रवासासारखा दुसरा आनंद नाही. आजच्या ग्राहककेंद्रित जगात पर्यटन व्यवसायानं ग्राहकाचं पर्यायाने प्रवाशांचं मूल्य व त्यांची आवडनिवड चांगलीच जोखली आहे. म्हणूनच अनेक पर्यटन कंपन्या, विमान कंपन्या, क्रूझ कंपन्या, रेल्वे, हॉटेल्स इ. प्रवाशांना त्यांचं उत्पादन अत्यंत आकर्षक वाटेल अशी प्रलोभनं दाखवत विकतात.
इथे ग्राहक हा त्याच्या घराबाहेर देखील राजा असतो. शिवाय त्याला निवडीमध्ये वैविध्य असतं. परंतु याच ग्राहक राजाने आपला प्रवास व सहल संस्मरणीय करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक असते.
होतं काय की आपण रोजच्या नोकरी-धंद्याच्या, कामाच्या कंटाळवाण्या कटकटीतून सुटणार या आनंदात असलेला पर्यटक ग्राहक गरसोय किंवा फसवणूक झाली तरी होता होईतो सहन करत दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असतो.
प्रवासात असताना कशाला हवाय झमेला असं त्याला वाटत असतं. मात्र आपल्याच फायद्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. याचं सर्वात साधं उदाहरण म्हणजे एसी रूम.
आपण एसी रूम बुक करतो आणि तिथे गेल्यावर आपल्याला सांगण्यात येतं की साहेब, रूम एसी बंद पडलाय. मेकॅनिकला बोलावलंय. आपण दुसरी रूम द्या म्हटलं तर दुस-या सर्व रुम्स भरलेल्या असतात, हे आपल्यालाही दिसत असते.
अशा वेळी आपल्याला नाइलाजाने एसीचं भाडे भरून नॉन एसी झालेल्या रूममध्ये राहावं लागतं. भाडं मात्र तेच लागतं, कारण हॉटेलचे नियम बदलता येत नाहीत, असं कारण सांगितलं जातं. हॉटेलांमधील सोयीसुविधा नेहमी व्यवस्थित सुरू आहेत की नाही याची माहिती गेल्या गेल्या घेणं व फोनवरूनही घेणं गरजेचं आहे. नाहीतर होते ना फसगत..
ग्राहक असूनही फसले जाण्याची वेळ आपल्यावर प्रवासात अनेकदा येत असते. याचा असाच एक अनुभव नागपूरहून मुंबईला येत असताना एकदा आम्हाला आला.
रेल्वेचा जेवणासाठीचा माणूस किती लोकांना जेवण हवंय याची यादी घेऊन गेला. आम्हीही आम्हाला जेवणाचा कोणता प्रकार हवाय हे त्याला सांगितलं. काही वेळाने जेवण वाटप झालं. इतर माणसं जेवायला लागली.
आमचे डिनर बॉक्स काही येईनात आणि तो यादी घेऊन जाणारा मनुष्यही फिरकेना. अखेर आम्हीच शोधाशोध करून त्याला पकडलं तेव्हा जेवण संपलंय असा साक्षात्कार त्यानं घडवला. भांडून उपयोग नव्हता.
एका स्टेशनवर रात्री अकरा वाजता जे काही मिळेल ते घेतलं आणि जेवलो. अर्थात त्याच्याकडून पैसेही परत घेतले. एका ठिकाणी रस्त्यावरचा प्रवास होता, ऐनवेळी सहल संयोजकाने जास्तीची माणसं कोंबली व माझी अवस्था खुराडयातील कोंबडीसारखी झाली. पुढचे चार तास मी दरवाजाला चिकटून आता बाहेर पडते की नंतर पडते अशा भीतीत प्रवास केला. वादावादी शक्य नव्हती. मला इच्छित स्थळी जायचंच होतं, त्यामुळे अत्यंत दाटीवाटीत बसण्याचा पर्याय स्वीकारावा लागला.
पर्यटन कंपनीकडून प्रवास व सहल करणार असाल तर आपल्याला हव्या त्या गोष्टी काळजीपूर्वक पाहाव्या लागतात, इथेही माझी एकदा घाईघाईत फसगत झाली होती. सर्वसाधारणत: जंगलांमध्ये फिरताना जिप्सीज वापरल्या जातात. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करताना मी वाहन काय आहे ते पाहिलं नाही आणि पर्यटन कंपनीने फिरण्यासाठी कॅन्टर वापरला.
ज्यांना जिप्सी आणि कॅन्टरच्या अनुभवातला फरक माहितेय त्यांना माझ्या म्हणण्याचा अर्थ बरोबर कळेल. शक्यतो कोणत्याही अभयारण्यात छत मोकळं असणा-या जिप्सीजमधून फिरावं त्यामुळे जंगल मोकळेपणाने वाचता येतं. तुम्हाला खाली उतरून भटकण्याची संधी मिळणार असेल तर त्यासारखी दुसरी गोष्ट नाही. पण कॅन्टरमधून फक्त नवख्यांनीच फिरावं.
असं नवख्यासारखं जंगल पाहण्याची वेळ माझ्याच चुकीमुळे माझ्यावर आली. पण काही वेळा तुमचा नाइलाजही होतो. एके ठिकाणी जाताना मला जेट एअरवेजचं शॉर्ट सीटर विमान मिळालं होतं. आणि त्यातही माझ्या वाटयाला आली ती सीट होती अगदी शेवटची, जिला पुढे लेग रेस्ट व मागे हेड रेस्टसाठी जागाच उपलब्ध नव्हती.
ही माहिती मला तिकीट बुकिंग करताना देण्यात आली नव्हती. पण सुदैवाने विमानात ब-याच जागा रिकाम्या होत्या व छोटंच विमान असल्यामुळे क्लासबिसचा काही प्रश्न नव्हता, त्यामुळे मला आरामात सीट बदलून मिळाली व प्रवास छान झाला.
नेहमीच वाईट अनुभव येतात, असं नाही तर कधीकधी चांगले देखील अनुभव असतात. एकदा पुण्याला जाताना आमची बस वाशीजवळ बंद पडली, त्यावेळी ड्रायव्हर व कंडक्टर यांची बस दुरुस्त होत नाही असं दिसल्यावर आमची दुस-या बसमध्ये सोय करून दिली. त्यांनी प्रवाशांना वा-यावर सोडलं नाही हे महत्त्वाचं.
अन्यथा आमच्यावर भांडण्याची वेळ आली असती. खरं तर तुम्ही स्वत: कशा प्रकारचे पर्यटक व व्यक्ती आहात यावर तुमचा प्रवास, सहल कशी होते हे बरेचसे अवलंबून असतं. चांगल्याचं वाईटात रूपांतर करणं हे अखेर आपल्याच हाती असतं.
तर अशा प्रकारच्या अनुभवांना तोंड देताना पर्यटकामधला ग्राहक देखील जागृत असावा लागतो. हल्ली खूप ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषं दाखवली जातात. त्यात नको असलेली स्थळं किंवा हॉटेल्स पण यादीत घातली जातात.
अशावेळी तुम्ही पर्यटकासोबत ग्राहकही आहात हे लक्षात ठेवा. घाईत किंवा काही वाक्यांचा अर्थ न कळल्यामुळे असे अनुभव आपल्याला प्रवासादरम्यान येत असतात. यात तुमची फसवणूक करणारा कोणीही असू शकतं, मग तो टूर एजंट असेल किंवा पर्यटन कंपनी किंवा रिसॉर्ट मालक. चुकीची सुरुवात आपल्याकडून होत नाही ना याचं भान बाळगावं आणि प्रवास आनंदाचा करावा.
Here is the link for published article- http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=8,952,756,2276&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/15032015/Mumbai/Suppl/Page4.jpg