Translate

Showing posts with label gypsies outdoors. Show all posts
Showing posts with label gypsies outdoors. Show all posts

Thursday, January 12, 2012

बहु खुब्बच नागझिरा !

काकडनाला, चोरखमारा रस्ता, टायगर रोड, लिंक रोड,घाटमारा रस्ता, थाडेझारी, गौरगल्ली, वाकडा बेहेडा, बंदरचूआ गेट,चितळ मैदान,पिटेझरी रस्ता, अंधारबन, तळं नंबर १ ते ७, आम्बेझरी, तिरोडा रस्ता हे सर्व राहण्याचे पत्ते आहेत पण माणसांचे नाहीत तर वाघ, गवे, रानकुत्री, अस्वलं,बिबट अशा जंगली प्राण्यांचे...आणि हे सर्व पत्ते शोधण्यासाठी तुम्हांला नागझिरापर्यंत पोहोचावंच लागेल. त्यातही मारुती चितमपल्ली आणि व्यंकटेश माडगुळकर यांचे लेख आणि पुस्तके वाचण्याचा चस्का तुम्हांला लागला असेल तर तुम्ही नागझिरापर्यंत जरुर पोहोचणारच. नागपूरहून जवळच म्हणजे दीड-दोन तासात भंडारा जिल्ह्यात साकोली रोडवरून आत गेल्यावर पिटेझरी गावातून पुढे नागझिरा अभयारण्य सुरु होतं. गाईड सुभाष किचकने आमचं पिटेझरी गेटवरच स्वागत केलं. गेटपासून पुढे आत नवा रस्ता बांधण्याचे काम सुरु आहे तेव्हा जीपला थोडा त्रास होईल असा इशाराही दिला. अर्थात एकदा जंगलात शिरल्यावर आजूबाजूला काय दिसतंय हे पाहण्यात लक्ष असल्यामुळे खालचा खडबडीत रस्ता आम्हाला जाणवलाच नाही ( आणि रस्त्यांमध्ये खड्डे असतातच हा समज पुण्या-मुंबईच्या खड्डेयुक्त रस्त्यांनी पक्का केला आहे. )
नागझिरानं रानकुत्र्यांसाठी लौकिक कमावला असला तरी नागझिरा नुसतंच जंगल नाही तर व्याघ्र अभयारण्य ही आहे. त्यामुळे इथल्या जंगलात प्रवेश केल्यावर आपण वाघाच्या जंगलात आलोयत हे जाणवल्याखेरीज राहत नाही. नागझिराचा विस्तार फार मोठा नाही त्यामुळे जीपनं एका दिवसात अख्खं रान आरामात पाहून होतं, पण ते नुसतं ‘पाहणं’ झालं, पण नागझिराच्या रानाशी खास हितगुज करायचं असेल तर वेळच काढला पाहिजे. आमच्या ‘जीप्सिज आउटडोअर्स’सोबत पहिल्यांदाच जंगल पाहण्याऱ्या ९ ते १४ वयोगटातल्या माणसांच्या पिल्लांचाही चमू होता, त्यामुळे आम्ही देखील निवांत सवड काढून गेलो होतो. नागझिऱ्याच्या रानात शिरल्यानंतर काही मिनिटातच गवे दिसले होते त्यामुळे मुलांची टोळीही प्रचंड खुश झाली आणि आमचा जीव भांड्यात पडला. गाड्यांची चाहूल लागताच गव्यांचा कळप रस्त्याच्या मध्यातून चौखूर उधळला. कधीही गवे न पाहिलेल्या आमच्यासाठी हे दृश्य केवळ अविस्मरणीय होतं. फोटोग्राफीसाठी तर ही संधी उत्तमच होती. ताडोबाला गव्यांनी दाट गवताच्या आडून आडून चुटपुटते दर्शन दिलं होतं. आता मात्र मन भरून या सुंदर राजबिंड्या प्राण्याला अगदी जवळून पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. गव्यांच्या कळपात छोटी पिल्लं आणि गाभण मादीही होत्या, अशा कळपाचा नायक आणि त्याच्या आधिपत्याखाली कळप रानात कसे वावरतात हे जवळून पाहता आलं. गव्यासारखा ऐटबाज आणि डौलदार शरीरयष्टी असणारा प्राणी नाही हे पटलं. ताडोबाला असताना एकांड्या गव्याला पाहण्याची संधी मिळाली होती, पण तो जास्त वेळ समोर ठाकला नव्हता. पण इथं नागझिरामध्ये रानात शिरल्यावर काही वेळातच गवे दिसले आणि पुढले काही दिवस कसे जातील याचा ट्रेलरच मिळाला.
आमच्यासोबतच्या या शहरी मुलांनी आतापर्यंत आयुष्यात कधीही जंगलातलं पानही पाहिलेलं नव्हतं आणि अश्या मुलांना घेऊन थेट नागझिरासारख्या शहरी सुख-सोयींचा लवलेश ही नसणाऱ्या अस्सल जंगलात नेऊन आठवडा काढण्याचं आव्हान पुण्याच्या रोहन तावरेनं घेतलं होतं. पहिल्या दिवसापासूनच सर्व मुलं एवढी समजूतदारपणे जंगलात राहण्याचा अनुभव एन्जॉय करत होती की आम्ही मुलांना मनोमन धन्यवादच दिले. हे इथं सांगणं यासाठी महत्वाचं आहे कारण नागझिरामध्ये निवासाची आणि खानपानाची सोय आहे पण निवास गृहांमध्ये वीज नाहीये त्यामुळे काळोख झाल्यावर कंदिलाच्या प्रकाशावरच सारा कारभार करायचा. इथे संध्याकाळी अंधार झाल्यानंतर कर्मचारी अतिथीगृहाच्या प्रत्येक खोलीबाहेर एक-एक कंदील आणून ठेवतात. अर्थात जिथे विजेचे दिवेच नाहीत तिथे विजेवर चालणारे पंखेही नाहीत. असा सर्व विजेशिवायचा कारभार पण त्यातही एक मजा आहे जी शहरात राहून मुळीच कळणार नाही. कोणत्याही पर्यटन प्रकारात सर्वात कमी तयारी न्यावी लागत असेल तर ती जंगलासारख्या ठिकाणी, काही जण याच्याशी सहमत होणार नाहीत पण खरं तर जिथं कोणतंही बंधन नाही आणि जिथे आपल्या असण्याला फारसे महत्वच नसतं तिथे शहरी जामानिमा नेण्याचं काही कारणच नसतं. नागझिराची गोष्टही काही वेगळी नाही उलट तिथे तर अशी बंधन नसण्यातही एक प्रकारच थरार वाटतो कारण नागझिरामध्ये भर जंगलाच्या मध्यात आजूबाजूला प्राण्यांची चाहूल असताना संध्याकाळ आणि रात्रीदेखील सोबत फक्त रॉकेलच्या वातीवरला लालटेनच असतो. अर्थात जंगल परिसराला डिस्टर्ब न करता खऱ्या जंगलात राहण्याचा फील घ्यायचा असेल तर याचीही तयारी हवीच आणि हेच तर खरं नागझिरा जंगलाचं आकर्षण आहे.
भरगच्च चांदण्यांच्या मऊसर् उजेडात अतिथीगृहासमोरच्या छोट्याश्या मोकळ्या मैदानात बसून जंगलातून येणारे प्राण्यांचे आवाज ऐकत गप्पांची ( अर्थात हळू आवाजातल्या ) महफिल जमवण्यातला आनंद काही वेगळाच आहे. भर जंगलात मध्यभागी (कोअर एरियात) आणि तळ्याकाठी राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नागझिरामध्ये जायलाच हवं. मध्यरात्रीनंतर हळूच खिडकीबाहेर समोर कंदिलाच्या प्रकाशात पाहिलं तर चरता चरता विश्रामकुंजापर्यंत आलेली हरणं,रानडुक्करं,सांबर असे काही प्राणी दिसतात. विश्रामकुंजाजवळच्या या हिरवळीच्या थोडसं उजव्या अंगालाच सुंदर तलाव आहे. अनेकदा तळ्याकाठी रात्री पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचीही चाहूल लागते. रात्री तळ्याच्या बाजूच्या खोलीत झोपायला आमच्यातल्या काही मुली घाबरल्या आणि आम्हाला खोली बदलायला लागली. त्यांनी खोली बदलणार का विचारल्यावर म्हटलं की हे म्हणजे नेकी और पूंछ पूंछ झालं की..मग नंतर तळ्याकडून येणारे आवाज ओळखण्याची स्पर्धा लावण्यात रात्र गेली.
अतिथीगृहाच्या मागे असलेला तळ्याचा काठ म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी एकदम अप्रतिम निवांत जागा..इथं कोणत्याही झाडाखाली आरामात बसायचं आणि समोर तळ्यावर येणाऱ्या विविध पक्ष्यांच्या निरीक्षणात गुंतून जायचं. पक्षी अभ्यासकांसाठी तर ही खासच जागा आहे. ‘निलय’समोर असलेलं मध्यवर्ती तळं म्हणजे या जंगलातली चावडी आहे. कित्येकदा रानकुत्र्यांच्या शिकारी इथेच येऊन संपतात. रानकुत्र्यांनी केलेली अशीच एक चित्तथरारक शिकार आमच्या डोळ्यांदेखतच या तळ्यातच त्यांनी संपवली होती. ही लाईव्ह शिकार आमच्या टीमला पाहायला मिळाली. वरच्या डोंगराकडे गेलेल्या आमच्या अर्ध्या टीमने रानकुत्र्यांच्या टोळीला शिकारीच्या शोधात फिरताना पाहिलं होतं. त्याच टोळीने एक हरीण मादी आणि तिच्या पाडसाला हेरलं होतं. त्यांनाच पळवत पळवत तळ्याकाठपर्यंत आणून रानकुत्र्यांनी शिकारीचा दि एंड केला होता. नागझिराची युएसपी रानकुत्री आहेत याची डोळ्यादेखत खात्रीच पटली होती. असे शिकारीचे अनेक क्षण आम्हाला नागझिराच्या भटकंतीत अनुभवायला मिळाले.
महाराष्ट्रात ज्यांच्याविषयी अधिक लिहिलं गेलंय अशा जंगलांपैकी नागझिरा एक आहे. मराठीत मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगुळकर, किरण पुरंदरे अशा काही लेखकांनी अभ्यास,संशोधन आणि मोठ्या मेहनतीनं नागझिरासंबधी अप्रतिम पुस्तकं लिहिली आहेत. नागझिराला जाऊ इच्छिणाऱ्यांनी ही पुस्तकं जरूर वाचावीत. ताडोबा किंवा कान्हा वगैरे सारख्या जंगलांच्या तुलनेत नागझिरा जंगलाचा विस्तार अगदीच लहानसा आहे, पण इथं वन्यजीवांचे वैविध्य एकवटलं आहे. वाघ, गवे,सांबर, हरीण, रानकुत्री , अस्वल, भेकर,बिबट्या असे अनेक प्राणी आणि शेकडो पक्ष्यांच्या जाती पाहायला मिळतात. तरीही देशातील इतर जंगलांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातलं हे वैभव नागपूरपासून जवळ असूनही सरकार आणि पर्यटकांकडून दुर्लक्षित राहिलं आहे. मुळात महाराष्ट्रातल्या कुठल्याच जंगलाचं देशातल्या इतर अभयारण्यांप्रमाणे मार्केटिंग होताना दिसत नाही. टीव्हीवर येणाऱ्या ‘इनक्रेडीबल इंडिया’च्या जाहिरातींमध्ये गुजरात, मध्यप्रदेश, केरळ,गोवा आघाडीवर दिसतात. इतर ठिकाणीही उत्तरांचलचे जिम कॉर्बेट, मध्यप्रदेश मधलं कान्हा आणि बांधवगढ, आसामचं काझीरंगा, राजस्थानचं रणथंबोरसारख्या जंगलाचं भरपूर मार्केटिंग आणि जाहिरातबाजी होताना दिसते ( जे त्या त्या राज्यातले प्रवासी, टूर ऑपरेटर्स आणि राज्य सरकारचा पर्यटन विभाग करतात ) पण आपल्याकडे याबाबतीत सर्व आनंदच आहे.
गरुडाने( चेन्जेबल हॉक ईगलने ) केलेली शिकार देखील नागझिरामध्ये पहायला मिळाली. वास्तविक आम्ही भालुच्या शोधात चितळ मैदानाच्या पुढे गेलो होतो जो आम्हाला पुढे दिसलाच. इथल्या टाक्यावर भर उन्हामध्ये तुडुंब पाणी पिऊन सावलीला बसलेली ७-८ रानकुत्र्यांची एक टोळी पण आम्हाला भेटली. त्यानंतर झाडांच्या फांद्यांवर अगदी मिसळून गेलेला हा अत्यंत रुबाबदार गरुड आम्हाला दिसला. आमच्या गाडीच्या आवाजाला न घाबरता हा गरुड वेगात हवेतून काहीतरी घेऊन एका झाडाखाली उतरला. थोडं अधिक निरखून पाहिल्यावर कळलं की तो एक साप होता,इतका त्या सापाचाही रंग मातीशी मिसळलेला होता. या गरुडानं शिकारीचे तुकडे केले आणि त्यावर थोडी माती पसरली आणि तो पुन्हा झाडावर जाऊन बसला. बहुधा त्याला आमची चाहूल लागली होती. त्याला सोडून आम्ही पुढे निघालो. वाटेत एका छोट्याश्या तळ्यावर मगरीचं पिल्लू स्वतःला उन्हात शेकवत बसलेलं दिसलं.
जंगलात फिरताना अनेकदा जळालेल्या लाकडांचे काळेठिक्कर ओंडके लांबवरून पाहून अस्वल असल्याचा भास व्हायचा. अस्वलाच्या बाबतीत नागझिरा खूप लकी ठरलं. साकोली वॉच टॉवरच्या रस्त्यावर, गौरगल्ली, निलयच्या पुढील वळणावर, बंदरचूआ गेटवरून पुढे आतमध्ये अशी आमची अनेकदा भालुशी गाठभेट झाली. खरं तर निलयच्या पुढल्या रस्त्याला अनेकदा मादी अस्वल पाहिलं होतं पण ती नेहमी झाडांमध्ये पळून जायची. शेवटी तर अस्वलाच्या अश्या छुमंतर होत दिसण्याचाही कंटाळा आला होता. तरीदेखील अगदी निघायच्या दिवशी शेवटल्या सफारीपर्यंत अस्वलाचा शोध घेत आम्ही चितळ मैदानाच्याही बरेच आत पोहोचलो होतो आणि तिथल्या शेवटल्या टाक्यावर आमची आणि अस्वलाची गाठभेट झालीच. हा नर भालू आम्हाला पाहून अजिबात बुजला नाही उलट त्याने आरामात टाक्यावर पाणी प्यायले, चालता चालता जमिनीत खणून खाद्य मिळवलं आणि बरेच अंतर तो आम्हाला समांतर चालत राहिला पण तेवढ्यात समोरच्या वळणावरून एक खाजगी गाडी भरधाव येतानाचा आवाज त्यानं ऐकला आणि तो बाजूच्या रानात पळाला.
बंदरचूआ गेटवर अजून एक विलक्षण अनुभव पाहायला मिळाला. तिथं वानरांची टोळी बसलेली होती. आमच्या जीपचा घर्र आवाज आल्यावर सर्व माकडं झाडावर सुरक्षित ठिकाणी पळाली,पण या गडबडीत एक नवजात पिल्लू खालीच राहिलं. ते वर गेलेल्या आईकडे पाहून केविलवाण्या चेहऱ्याने चिं चिं चीत्कारू लागलं पण त्याची आई आमच्या जीपला पाहून खाली यायला घाबरत होती, तेवढ्यातच एका अनुभवी प्रौढ माकडिणीने एका झेपेतच त्या पिल्लाला जीप समोरून दूर केलं. वानरांच्या कुटुंबकाबिल्यात नाती कशी घट्ट असतात ते या निमित्तानं पाहायला मिळालं.
नागझिरा पर्यटन संकुलाजवळ फिरणारी माकडं जंगलातील इतर माकडांच्या तुलनेत कमी बुजरी आणि रानटी आहेत. पर्यटकांच्या जवळ वावरणाऱ्या या टोळ्यांमधले हुप्पे आणि तरुण नर पर्यटकांसमोर शक्तीप्रदर्शन करून दाखवतात तेव्हा पहायला मजा येते. आम्हीही असाच प्रकार पाहिला. एखाद्या डिस्कव्हरीसारख्या वाहिनीला शूट करून पाठवावा अशी अचाट कसरत एका वानराने करून दाखवली. संकुलाच्या आवारात एक पिंप पडलेले होते आणि बाजूला फलकाचे दोन खांब होते. त्यांचा वापर करून हा वानर अक्षरशः मल्लखांब खेळत होता. गम्मत म्हणजे प्रत्येक फेरी झाल्यावर तो विजयाच्या मुद्रेने पर्यटकांकडे पहायचा. त्याचा हा खेळ जवळपास १० मिनिटे चालला होता.
नागझिराचा विस्तार इतर अरण्यांच्या तुलनेत छोटेखानी असला तरी हाच त्याचा प्लस पॉईंट देखील आहे. कारण इथं राज्यातील इतर जंगलांमध्ये दिसणारे बहुतेक सर्व पशु-पक्षी आहेत आणि विस्तार कमी असल्याने ते समोर येण्याचे चान्सेसही अधिक असतात. अर्थात याला अपवाद फक्त वाघाचा आहे. वाघ हा तसा सहजासहजी म्हणजे ‘चला आलोच आहोत अभयारण्यात तर वाघ पाहूनच जाऊ’ अश्या वल्गनेत दिसणारा प्राणी बिलकुल नाही. पण नागझिरा आणि आसपासच्या चोरखमारा, उमरझरी, सोनेगाव गावांमधून असा थोडासा का होईना कॉरिडॉर इथल्या वाघांना उपलब्ध आहे आणि त्यामुळेच नागझिरा व्याघ्र अभयारण्यांच्या यादीत सामील आहे. लाईट्स नाहीत, मोबाईल रेंज नाही, टेलिफोन नाही,वर्तमानपत्रं नाहीत, शहरांचा वाण लागलेली गावं नाहीत अशा पूर्णपणे नैसर्गिक वन्य अधिवासात थोडक्यात शुद्ध अरण्यात राहण्याची संधी नागझिरा तुम्हांला देतं. शहरी सुखसुविधांना सरावलेली आमच्या सोबतची मुलं तिथं एक क्षणतरी काढतील की नाही याची शंका होती, पण नागझिराच्या जंगलानं अशी काही जादू मुलांवर केली की मुलं निघताना परत येण्याचे प्लान्स बनवू लागली होती.
कोणत्याही जंगलात जाऊन प्राणी पाहण्यासाठी शक्यतो हिवाळ्याचा उत्तरार्ध आणि उन्हाळा हे उत्तम कालावधी असतात. रानोमाळ भटकण्याची तयारी असली तरी विदर्भातल्या या नंदनवनात जाण्यासाठी तिथला कडक उन्हाळा आणि भयंकर थंडी या दोहोंना तोंड देण्याची तयारी ठेवूनच गेलेलं बरं. हळदु पॉइंटला गेल्याच महिन्यात एका वाघिणीने तीन छोट्या पिल्लांसह दर्शन दिलंय. रानातल्या झुळकेसारखी एव्हाना ही खबर नागझिराकडे कान-डोळे लावून बसलेल्या रानसरुंपर्यंत येऊन पसरलीय. चार-पाच महिने पाऊस झेलून रान पुन्हा एकदा घट्ट-मुट्ट झाले आहे. पर्यटकांचा इतके महिने वास आणि त्रास दोन्ही नसल्यामुळे रान आणि प्राणी दोन्ही बेफिकीरीत आहेत. प्राण्यांना त्यांच्या सहजवासात गुरफटून गेलेले असताना पाहण्याची हीच योग्य वेळ आहे. नंतर पुन्हा एकदा जंगल पर्यटकांनी गजबजेल आणि प्राणी अधिक सजगपणे वावरू लागतील.

Above article was published on 8th January 2012  in Marathi news daily 'Prahaar',link to published article:-http://www.prahaar.in/collag/53913.html
Way to Nagzira Wildlife Sanctuary, District-Gondiya,State-Maharashtra.
Nearest city to Nagzira is Nagpur and Bhandara in Maharashtra. Nagpur is well connected with domestic flights. Buses etc are available from Gondia,Bhandara,Sakoli,Tirora and Nagpur. Nearest railway stations are Nagpur,Gondiya,Bhandara road,Saundad and Tirora.

Sunday, May 1, 2011

जंगलच्या राजाची 'राजधानी'

                                                  
लांबलचक आणि अफाट पसरलेला अथांग इराई डोह थेट मोहर्लीपर्यंत सोबत करतो. जंगलाकडे जाणाऱ्या वाटेची दिशा दाखवली की जणू तो निश्चिंत होतो. विदर्भातल्या उन्हाळ्याला आता मनानं केव्हाच मागे टाकलेलं असतं आणि इराई डोहामुळे भुललेले मन आता पुढल्या रानभुलीसाठी तय्यार झालेले असतं. जंगलात बसलेला तारू देव आपल्यावर प्रसन्न व्हावा आणि मनासारखे प्राणी दिसावेत हि तुमची प्रार्थना एव्हाना त्याच्यापर्यंत पोचलेली असते. पहिल्याच टप्प्यात तेलिया डोहावर मगर दाखवण्यासाठी म्हणून गाडी विसाव्याला उभी राहते आणि उन्हामध्ये तेलिया डोहाच्या चमचमत्या पाण्याकडे पाहता पाहता कधीतरी तंद्री लागते आणि क्वचित मृगजळासारखे भासही होतात. डोहाच्या पलिकडल्या मातकट हिरवळीवर वाघ चालतोय असाही भास होऊ लागतो आणि बरेचदा हा भास खरादेखील ठरतो. तेलियाच्या रस्त्यावर आधी लागणाऱ्या चिचघाटातून जातानाही बाजूच्या काटेरी जाळीतून कोणीतरी आपल्याला समांतर चालत आपल्यावर नजर ठेवून असल्याचे जाणवते आणि अकस्मात त्या माणिक डोळ्यांचा मालक, बिबट्यावाघ तुमच्यासमोरच झेप घेऊन रस्ता क्रॉस करतो.
थोडी जिप्सी पुढं न्यावी तर (स्लोथ बेअर) काळीभोर केसाळ अस्वल मादी मोहाची फुले हुंगत हुंगत येताना दिसते. तुम्हाला पाहिल्यामुळे झाडावर चढण्याचा बेत तिने वरकरणी तरी रद्द केलेला असतो. पुढल्या वळणावरल्या टाक्यावर भेकराची मादी तहानेने इतकी व्याकूळ झालेली असते की जिप्सी पुढ्यात येऊन थांबली तरी ती दुर्लक्ष करते आणि चटचट पाणी पीत राहते.
इतक्या साऱ्या जंगलजादूनंतर एव्हाना ताडोबाच्या रानाची झिंग चढायला लागलेली असते आणि त्यात गाईड मोहाची फुले आणि टेंभूर्लीची फळं चाखायला देऊन अजून भर टाकतो. हे इतक्यावरच थांबत नाही कारण ताडोबाच्या जंगलानं खरे पत्ते अजून उघडलेलेच नसतात. या अरण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे अरण्य पर्यटन आणि फोटोग्राफीच्या दृष्टीने अजूनही 'रॉ' आहे. काही भागामध्ये वनखात्याच्या माणसांखेरीज दुसरं कोणी फारसं गेलेलंही नाही. त्यामुळेच इथल्या भ्रमंतीची मजा काही वेगळीच आहे. ६२५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हक्क सांगण्याऱ्या या ताडोबाच्या भूलभूल्लैय्या जंगलात आम्हीदेखील तारू देवाची प्रार्थना करीत जिप्सीनं उभे-आडवे रस्ते धुंडाळत होतो.
यंदाचं वर्ष हे अंतरराष्ट्रीय वन वर्ष आहे हे माहित पडल्यापासूनच यावर्षीच्या भटकंतीचा शुभारंभ एखाद्या व्याघ्र प्रकल्पापासून करावा असा विचार डोक्यात होताच. त्यातच पुण्याच्या तरुणाईला जंगल भ्रमंतीची चटक लावण्याचा ध्यास घेतलेल्या रोहन तावरेच्या ‘ जिप्सीज आउटडोअर’ ग्रूपबरोबर सामील होण्याचे आमंत्रण मिळालंच होतं, मग म्हटलं महाराष्ट्रातलं हे वैभव पाहण्याची संधी का सोडा..आमच्यापैकी काहीजण अगदी पहिल्यांदाच जंगलात फिरण्याचा अनुभव घेत होते तर काहीजण अगणित वेळा जंगल वारी करून आलेले 'वारकरी' होते. नुकतीच व्याघ्र गणनेची आकडेवारी हातात पडली होती. वनांचं क्षेत्रफळ कमी झालेलं असलं तरी वाघांची संख्या वाढलेली असल्यामुळे राज्यातल्या या दुसऱ्या मोठ्या व्याघ्र प्रकल्पात जाताना हुरूप आला होता. सध्याच्या गणनेनुसार ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या 60 च्या वर गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. खातोडा गेटवरून एकावेळी २७-२८ गाड्या आत सोडल्या जातात. ताडोबा-मोहर्ली रेंजजवळच्या परिसरात अजून तरी कॉर्बेट किंवा बांधवगढप्रमाणे व्यावसायिक रिसोर्टनी आक्रमण केलेलं नाही. त्यामुळे M.T.D.C च्या विश्रामगृहावरच पर्यटक बरेचसे अवलंबून आहेत. ताडोबा- अंधारी टायगर रिझर्व देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे जो पावसाळ्यातही पर्यटकांसाठी अंशतः खुला असतो मात्र पावसामुळे काही रस्ते बंद ठेवण्यात येतात . ताडोबाला जाणार असाल तर M.T.D.C चं विश्रामगृह उत्तम पर्याय आहे. मोहर्ली गेटच्या अगदी जवळ राहण्याचे हेच ठिकाण आहे जे रिझनेबलदेखील आहे. इंटरनेटवर पर्यटनविषयक माहिती देण्याऱ्या काही प्रसिद्ध संकेतस्थळांवर या अतिथीगृहाविषयी खराब रिव्ह्यूज लिहून पर्यटकांची दिशाभूल करण्यात आली आहे , पण ते खरे न मानता प्रत्यक्ष जाऊन अनुभव घ्यावा असा सल्ला आहे. पांढरपवनी, तेलिया,येनबुडी, काटेझरी, वसंतबंधारा अशा काही भागांखेरीज या अभयारण्यातले आणखी काही रस्ते पर्यटकांसाठी खुले करावेत अशी मागणी इथल्या गाईडसनी केलीयं. पण अरण्याचा खूपसा भाग अजून 'माणसाळलेला' नाही आणि हेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं मोठं आकर्षण आहे. पर्यटकांचा त्रास त्यामानाने कमी आणि वन्यप्राणी दिसण्याच्या मुबलक शक्यतांमुळे national geographic सारख्या वाहिन्यांच्या टिम्स इथे शूटिंगसाठी तळ टाकून बसलेल्या दिसतात.
प्राणी हमखास दिसतील अशी अपेक्षा न बाळगता गेलात तर ताडोबा अभयारण्यासारखा दुसरा खजिना राज्यात नाही. अपवाद फक्त सह्याद्रीचं जंगल आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा.
इथल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक रस्त्यावर, जिप्सीच्या आवाजानं सावध होऊन कान टवकारत, उड्या मारत चौखूर उधळणारे, इतरांना सावध करणारे, प्रवासी आल्याबद्दल नापसंती दर्शवणारे, जाळीतून दबक्या पावलांनी आतल्या जंगलात नाहीसे होणारे , गवताळ कुरणाच्या रंगात मिसळून लपणारे, डोहाच्या पाण्यातून नजर रोखणारे असे शेकडो पशु-प्राणी भेटतात . ताडोबाचं हे जंगलबुक खरेच अदभूत आहे. अर्थात या सर्वाना पाहण्यासाठी धीर आणि संयम हवाच.
आम्ही असाच पेशंस ठेऊन राहिलो आणि काटेझरीत एका भल्याथोरल्या नर वाघानं आम्हांला मनसोक्त दर्शन दिलं. काटेझरीत वाघ बसल्याची बातमी सकाळीच लागली होती आणि मग वाघ पाहण्यासाठी उत्सुक अश्या साऱ्यांनीच तिकडे जिप्सी वळवल्या. समोर २०-२५ गाड्या असताना हा वाघ आरामात जाळीत लोळण घेत दुपारची वामकुक्षी घेत होता. शेवटी त्याच्या विश्रांतीत फारसा व्यत्यय न आणता त्याला रामराम करावा लागला. पण त्याचवेळी तेलिया डोहावर वेगळेच नाट्य घडले होते. डोहालगतच्या हिरवळीवर बसून वाघ-वाघिणीच्या जोडीनं मनमुराद टाईमपास केला होता आणि तिथे असणाऱ्या एका पर्यटक जोडप्यासाठी हा लग्गा ठरला होता. या जोडीचं फोटोसेशन करताना त्यांनी क्यामेराची मेमरीकार्ड्स अक्षरशः रिती केली होती..
पण जंगलात असेचं चालतं . धावत्या जिप्सीतून नजरेला अनेक आकार दिसत असतात. जाळीमागे कोणीतरी नक्कीच दडलंय असे भास होत राहतात. कधी झाडामागून कोणीतरी पळालं असं वाटून जातं. हिरव्या गर्द झाडांमधून तऱ्हेतऱ्हेचे आकार उगाचच दिसत असतात. आमच्यासमोर हिरव्या-पिवळ्या जाळीमधून बिबट्या अवतरला तो क्षणही असाच भासमयी होता. पण त्याची ऐटबाज सावध टप्प्याटप्प्याची चाल पाहून आम्ही भानावर आलो. दिवसा फारसा दृष्टीला न पडणारा बिबट्या दिसला आणि त्यावेळी वाघ दिसण्यापेक्षाही जास्त आनंद झाला. ताडोबाच्या सफरीत तीन वाघ पाहून झाले असल्यामुळे बिबट्या हा सर्वस्वी अनपेक्षित बोनस होता. मात्र बिबट्या दिसल्याचा आनंद आम्ही ताडोबाहून परतल्याच्या दुसऱ्याच दिवशी आलेल्या एका बातमीनं हिरावून घेतला. अष्टभुजा गावाजवळ बिबट्याच्या एका तहानलेल्या ६ महिन्याच्या बच्च्याला गावकऱ्यांनी अमानुष रीतीनं मारलं. पण या परिसरात अश्या घटना नव्या नाहीत असं आमच्याबरोबर असलेल्या आणि ‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’मध्ये फील्ड ऑफिसर असणाऱ्या आदित्य जोशीनं सांगितलं. त्याच्या मते अश्या प्राण्यांना पकडून त्यांना सुखरूप त्यांच्या निवासात सोडण्यासाठी वनरक्षकासोबत प्रशिक्षित लोकांचीही गरज आहे. अश्या प्रशिक्षित लोकांची rapid response team, अत्याधुनिक उपकरणं असलेलं मोबाईल व्हेट वाहन घेऊन कोणत्याही गावात जाऊ शकेल आणि त्यामुळे अश्या दुर्दैवी घटना टळतील.
गेल्याच वर्षी ताडोबामध्ये काही सिमेंटची पाणटाकी बांधण्यात आली होती. बांधताना रस्त्याजवळ बांधल्यास त्यामध्ये tanker नं पाणी भरणं सोपं जाईल या विचारानं ही टाकी रस्त्यालगत बांधण्यात आली होती. पण एकदम रस्त्याला लागून असल्यामुळे प्राणी तिथे यायला बिचकतात आणि तहानलेलेच राहतात. त्यामुळेच कधी कधी शिकारी प्राणी त्यांच्या तहानलेल्या सावजापाठोपाठ गावात शिरतात किंवा स्वतःदेखील पाण्यासाठी गावाच्या आसपास येतात. अश्या वेळी प्राण्यांचा हकनाक बळी जाण्याचा मोठा संभव असतो. असे प्रसंग घडतात हे लक्षात आल्यामुळेच ही पाणटाकी थोडी आतल्या बाजूला बांधण्याचे काम सुरु आहे. ताडोबाच्या क्षेत्रात इराई, ताडोबा, तेलिया, खातोडा असे एकूण २४ छोटे-मोठे तलाव आणि पाणझरे आहेत. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचं मोठं दुर्भिक्ष्य निर्माण होते आणि प्राण्यांची अगतिकता उघडी पडते.
देशातल्या एकूण ३९ टायगर रिझर्वपैकी ताडोबा-अंधारी हा महाराष्ट्रातला एक व्याघ्र प्रकल्प. ताडोबामध्येही यंदा वाघांची संख्या वाढलीये. महाराष्ट्रानं 'टायगर कॅपिटल'चा किताब यंदा मध्यप्रदेशकडून हिरावून घेतलाय. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी नागपूरला 'टायगर कॅपिटल' म्हणून विकसित करण्याचं आश्वासन दिलंय. इथं आसपास ६० हून अधिक गावं आहेत. लोकसंख्या वाढतेय आणि जंगलाचं क्षेत्रफळ कमी होतंय. इथले टायगर कॉरीडोर अवैध कोळसा खाणींमुळे आधीच धोक्यात आलेत. पण या सर्वावर मात करून ताडोबा-अंधारी टायगर रिझर्वच्या वाट्याला अधिक सुधारणा येतील अशी आशा आहे.
ताडोबा-अंधारी टायगर रिझर्वमध्ये आज वाघांची संख्या 69 च्या आसपास आहे , ज्यात २५-२८ बछडे आहेत. पण वाघाखेरीज इथं बर्डींगही अप्रतिम होते. पक्षीप्रेमींसाठी तर ताडोबा अभयारण्य म्हणजे तीर्थस्थानच आहे. .चेन्जेबल हॉक-इगल , क्रेस्टेड सर्पंट इगल, इंडियन रोलर (नीलकंठ) , इंडियन पिटा, व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर, ग्रीन पिजन, इंडियन ग्रे होर्नबील, जंगल फाउल असे नानाविध पक्षी आढळतात. किंगफिशर, river lapwing, white heron, serpent eagle, rocket tailed drango,flame backed woodpecker, white shouldered kite, green pegion अश्या कित्येक मनमोहक रंगांच्या पक्ष्यांची इथं मांदियाळी आहे. त्याशिवाय मगर, गवे, हरणं, नीलगाय, सांबर, रानटी कुत्रे, साळींदर, चंदेरी पाठीचे अस्वल अश्या प्राण्यांचेही हे आश्रयस्थान आहे. डिकेमाली, बेहडा, हिरडा, बेलफळ, अर्जुन अश्या अनेक वनौषधी या रानात आहेत. नुसतं अरण्यात जरी भटकायचं म्हटलं तरी आठवडा पुरा होणार नाही. अश्याच मोठ्या भटकंतीनंतर आपोआपच इथल्या टेंभूर्लीच्या झाडाकडे जाणाऱ्या वाटा तुम्हाला पाठ होतील आणि डोक्यावरून उडालेला पक्षी नीलकंठ होता की सोनेरी पाठीचा सुतार हे ओळखण्यासाठी तुम्हाला गाईडची गरज भासणार नाही. ताडोबाच्या जंगलाचा तारू देव तुम्हाला प्रसन्न झालेला असेल !

Link for published article :  http://www.prahaar.in/collag/40898.html